Monday, 10 July 2017

कथा - अधुरी एक कहाणी

अधुरी एक कहाणी

त्याने विचारलं असतं तर ती 'हो' म्हणाली असती. तिने विचारलं असतं तर तो ही नाही म्हणाला नसता. पण हे त्यालाही जमलं नाही आणि तिलाही..... अशीच अधूरी राहिलेली एक प्रेमकहाणी....
       तो आणि ती एकाच कॉलेजमधले पण वेगवेगळ्या ग्रूपमधले. तो तिला दोन वर्षांनी सिनिअर. एका कॉलेज प्रोग्रॅमच्या वेळी तिने त्याला बघितलं आणि बघताक्षणी तो तिला आवडला ती तशी चूझी. असं सहजासहजी तिला काही आवडणं शक्यच नसे. पण तो मात्र तिला आवडला. हळूहळू दोघांची एकमेकांशी ओळख झाली. अधूनमधून भेटही  होऊ लागली, पण फक्त दोघच भेटली असं मात्र कधीच झालं नाही. जसजसा तो तिला कळत गेला तसतसं तिला जाणवत गेलं, "त्याच्या आणि तिच्या वाटा वेगळ्या आहेत त्या जुळणं शक्य नाही."मग तिने ठरवलं, "काहीही झालं तरी आपल्याला या स्वप्नांच्या दुनियेतून बाहेर पडायलाच हवं. जे शक्य नाही त्याचा विचार कशाला करायचा? पुढे जाऊन दोघांनाही त्रास होण्यापेक्षा आपण आत्ताच स्वतःला सावरलेलं बरं. पुढे त्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं आणि तो पुढच्या शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात निघून गेला. जाण्यापूर्वी तो सहजच(?) म्हणून कॉलेजला आला होता , तिलाही भेटला होता. कितीही नाही म्हटलं तरी तिचं मन त्याच्याकडेच ओढ घेतच होतं. पण तरीही ती स्वतःला सावरलेलं असतं. त्याच्या डोळ्यातलं मूकं प्रेम तिच्या भरलेल्या डोळ्यांना दिसलच नाही. त्या वेळी दोघांनाही माहिती नव्हतं; ही  भेट त्यांची शेवटची भेट ठरणार आहे.
     पुढे जाऊन दोघही आपआपल्या आयुष्यात सेटल होतात. तिच्या मनाच्या एका कोपऱ्यात मात्र त्याची आठवण तिने हळूवार जपलेली असते. जवळपास पंधरा वर्षांचा काळ मध्ये जातो. दोघही आता आपआपल्या संसारात व्यस्त झालेली असतात.एकमेकांच्या आठवणी धूसर झालेल्या असतात.
       एक दिवस एका फंक्शनमध्ये नेमकी तिच्या खास मैत्रीणीची आणि 'त्याची' भेट होते. तिच्या मैत्रीणीचा नवरा आणि तो एकाच ग्रूपमधले. त्या फंक्शनमध्ये कॉलेजच्या ग्रूपमधले अनेक मित्र भेटतात. सहाजिकच जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. कॉलेजच्या धमाल दिवसांपासून सुरु झालेल्या आठवणी 'ती सद्ध्या काय करते' पर्यंत येउन थांबतात. 'त्याची' वेळ येते तेव्हा मात्र तो हसून वेळ मारुन नेतो.  या ग्रूपची सगळी  धमाल दुरुनच बघणारी तिची मैत्रीण मात्र त्याच्या  चेहऱ्यावरचे बदललेले भाव चटकन ओळखते आणि थोड्या वेळाने त्याला एकटं बघून त्याच्याशी बोलायला जाते. सुरुवातीला हाय हॅलो आणि जुजबी बोलणं झाल्यावर त्याला विचारते, "तू खरच प्रेम करत होतास का तिच्यावर? इतक्या वर्षांनंतरही तिच्याशी बोलावसं; तिला भेटावसं वाटतं तुला ?" तो गप्प रहातो. तिची मैत्रीण आपला मोबाईल त्याच्यासमोर धरते आणि म्हणते, "हा बघ तिचा फोटो; तिच्या whats ap चा DP…" तो नकळत मोबाईल हातात घेतो. 'तिचा' फोटो बघून त्याचे डोळे भरुन येतात. कितीतरी वेळ तो त्या फोटोकडे बघत बसतो.
"तिचा whats ap नंबर देउ ? बोलणार आहेस तिच्याशी?" तिची मैत्रीण त्याला विचारते.
   "नाही! नको! मला तिचा whats ap नंबर देउ नकोस आणि तिलाही माझा whats ap नंबर देउ नकोस..असं म्हणून तो मोबाईल परत करतो.
    दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या मैत्रीणीच्या मोबाईलवर त्याचा मेसेज येतो

"दाटून आलेल्या मेघांनी
 बरसावं असं काही नसतं
प्रत्येकवेळी भावना व्यक्त करायला
शब्दच हवेत असही काही नसतं
अव्यक्त राहीलं तरीही
प्रेम हे प्रेमच असतं
अधूरी असली तरीही
ती एक प्रेमकहाणीच असते."

  खाली लिहिलेल असतं, "हा मेसेज तिला पाठवशील प्लीज. हा मी तिला पाठवलेला आयुष्यातला पहिला आणि शेवटचा मेसेज!"
      तिची मैत्रीण तिला हा मेसेज पाठवते. मेसेज बघून 'ती' मैत्रीणीला फोन करते. मैत्रीण सगळी हकीगत तिला सांगते. ती स्तब्ध होते. काय बोलावं तिला काहीच कळत नाही. आजपर्यंत ती समजत असते आपण त्याच्यावर एकतर्फी प्रेम करत होतो पण आज  तिला कळतं की, 'तो’सुद्धा तिच्यावर मनापासून प्रेम करत होता.
    "तुला भेटावसं वाटतय त्याला ? फक्त एकदा भेटा दोघजणं. यात काही चूक नाही. पण भेटला नाहीत तर मात्र खूप काही निसटेल हातातून." पलिकडून तिची मैत्रीण बोलत असते.
    एक क्षण तिच्या मनात कालवाकालव होते. पण लगेच तिला  वास्तवाचं भान येतं आणि ती नकार देउन फोन ठेवते. मन घट्ट करुन ती नकार तर देते  पण मनात जाग्या झालेल्या त्याच्या आठवणी थांबवणं मात्र तिला कठिण जातं.
   अजून दोन महिने सरतात. ती हळूहळू जुन्या आठवणी पुन्हा विसरायचा प्रयत्न करत असते. अशाच एका निवांत दुपारी तिच्या मैत्रीणीचा फोन येतो आणि पुन्हा त्याच्या आठवणी जाग्या होतात.
   "'तो' आत्ता आला आहे आमच्याकडे, बोलणार आहेस का त्याच्याशी?" तिची मैत्रीण तिला विचारते.
   हे ऐकून क्षणभर हिच्या मनात धडकी भरते."त्याने काही विचारलं का माझ्याबद्दल ? नकळत 'ती' विचारते.
   "अगं तुझ्याबद्दल कधी विचारेल? आत्ताच आला तो. मी चहा ठेवायला किचनमध्ये आले आणि इथूनच तुला कॉल केला”, तिची मैत्रीण तिला सांगते. हे ऐकून 'ती' थोडी निराश होते, पण तसं न दाखवता 'नाही' म्हणून फोन कट करते." खरं तर तिला त्याच्याशी बोलावं, त्याला भेटावं असं मनापासून वाटत असतं पण तरीही ती स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करते. कारण आता दोघांचीही लग्न झालेली असतात. दोघांनाही त्यांचे संसार असतात.
    जवळपास तासाभराने तिच्या मैत्रीणीचा पुन्हा फोन येतो. काहीशा धडधडत्या मनाने ती फोन रिसिव्ह करते. पलिकडून तिची मैत्रीण बोलत असते, "सांगितल मी त्याला तुला फोन केल्याचं आणि तू जे विचारलस तेसुद्धा सांगितल."
   "मग  काय म्हणाला तो?" ती अधीर होवून विचारते.
    "तो जे म्हणाला ते मला नीटसं  कळलं नाही पण तो म्हणाला, 'मला जे म्हणायचं आहे ते तिला बरोबर कळेल. तिला सांग, तू विचारी आहेस,प्रॅक्टिकल आहेस, उगाच इमोशनल होऊ नकोस. ते तुझं नेचर नाही. तू जशी आहेस तशीच रहा"
     तिच्या मैत्रीणीचं हे बोलणं ऐकून तिच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. मनातलं सगळं मळभ दूर होवून मन स्वच्छ होतं. "Thanks ! तुलाही आणि त्यालाही.."- ती.
    "तुला खरच कळलं त्याला काय म्हणायचं होतं ते? " मैत्रीण तिला आश्चर्याने विचारते.
    "हो! त्याला जे म्हणायचं होतं ते सगळं त्याने या एका वाक्यात सांगितल. त्याला म्हणायचं होतं, 'जेव्हा सगळ्या गोष्टी सहज शक्य होत्या तेव्हा विचारपूर्वक वागलीस. आता भावनांच्या आहारी जाऊ नकोस. कारण असं करुन फक्त त्रास होईल.'
   तिचं हे उत्तर ऐकून तिची  मैत्रीण आश्चर्याने तिला म्हणते, "अगं किती सहज  कळतं तुम्हाला एकमेकांच्या मनातलं! बाकी काही माहिती नाही मला पण तुम्ही दोघांनीही त्यावेळी गप्प राहून चूक केलीत असं वाटतय मला."
   "चूक का  बरोबर ते नाही सांगता येणार मला. पण एक मात्र नक्की त्यावेळी माझ्यापेक्षा जास्त विचारपूर्वक तो वागला. मला तर माहितच नव्हतं त्याचं माझ्यावर प्रेम आहे. त्यामुळे त्याच्या विचारांपासून दूर जाणं मला कठीण गेलं नाही. पण त्याला मात्र माझ्या नजरेतलं प्रेम जाणवलं होतं, तरीही त्याने स्वतःला माझ्यापासून लांब ठेवलं. जर त्यावेळी मला एक क्षण जरी जाणवलं असतं त्याचं माझ्यावर प्रेम आहे तर कदाचित मी स्वतःला थांबवू शकले नसते आणि सगळंच  कठीण होवून बसलं असतं. आयुष्यातल्या त्या एका वळणावर आम्ही एकत्र आलोही असतो पण पुढे जाऊन त्याचा आम्हा दोघांनाही त्रास झाला असता. कारण मुळात  आमच्या वाटा वेगळ्या होत्या.काही नात्यांना नाव देता येत नाही आणि काही नाती जुळतच नाहीत तरीही त्यामध्ये एक ओढ असते आणि ही ओढ जन्मभर अशीच राहते. काही गोष्टी अर्धवटच छान वाटतात कारण त्या पूर्ण झाल्या तर त्यातला गोडवा निघून जातो. आमची कहाणीही अशीच आहे अर्धवट! आणि म्हणूनच ती खूप गोड आहे." आयुष्यात पहिल्यांदाच ती त्याच्याबद्दल इतकं मोकळेपणाने बोलत असते. तिचं हे बोलणं ऐकून तिच्या मैत्रीणीचे डोळे पाणावतात.
    आयुष्यात काही नाती निर्माणच होत नाहीत पण तरीही ती असतात. त्यां नात्यांना  नाव नसतं, भविष्यही नसतं; पण त्यामध्ये असते एक आंतरीक ओढ,  राहून गेलेली  स्वप्न आणि गोड आठवणी!
©मानसी जोशी



 


 

2 comments:

  1. छान आहे गोष्ट.. 'ती सध्या काय करतेय' सारखीच आहे असं वाटत होतं सुरुवातीला, पण पुढे मध्यंतरानंतर आलेला बदल छान होता.
    I too have similar shorter stories..Do visit pradnyalihitey.wordpress.com

    ReplyDelete

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...