Monday, 24 June 2019

स्कुल बस स्टॉपची अनोखी दुनिया

स्कुल बसचा स्टॉप ही जागा म्हणजे आई वर्गाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जणींच्या ओळखी तिथे होतात. सकाळच्या वेळेत तर इथली मजा अनुभवण्यासारखी असते. अनेकदा कित्येक दिवस आपण जिच्याशी बोलत असतो तिचं नावही माहिती नसतं. खरंतर त्याची गरजही नसते. अमुक अमूकची आई एवढी ओळख पुरेशी असते. पहाटे लवकर उठून लेकरांना आणि त्यांच्यासाठी डबा तयार करून बसची वेळ गाठण्यासाठी धावत पळत येणाऱ्या समस्त आयांचा थकवा बस स्टॉपवरच्या एखादया गॉसिपनेही कुठल्या कुठे पळून जातो..
    एरवी अगदी टापटीप आवरल्याशिवाय सोसायटीच्या गेटपर्यंतही न जाणाऱ्या, बस स्टॉपवर जायला निघताना मात्र ड्रेसला लागलेलं पोळीचं पीठ झाडत केसांवरून कंगवा नाही हात फिरवून केस सारखे करत बस स्टॉप गाठतात.
     मुलं गेली की, "जा सिमरन जा जिले अपनी जिंदगी" अशा थाटात मॉर्निंग वॉकला निघणाऱ्या; शाळा, सोसायटी, क्लास, सासू, नणंद, जाऊ अशा अनेक जिव्हाळ्याच्या विषयावर गॉसिप करत अर्धा एक तास स्टॉपवरच उभ्या राहणाऱ्या; ऑफिस आहे म्हणत निव्वळ गॉसिप ऐकण्यासाठी दोन मिनिटं थांबून नाईलाजाने निघून जाणाऱ्या अशा  विविध वैशिष्ट्यपूर्ण जमाती या स्टॉपवर पहायला मिळतील.
   तसंच नाईलाजाने जीवावर उदार होऊन,अर्धवट झोपेतून उठून आलेले, प्रत्येक येणाऱ्या बसकडे आशेने बघणारे, मोबाईलमध्ये डोकं खुपसून उभं राहणारे (हे करताना हळूच एखादा चोरटा कटाक्ष एखाद्या देखण्या चेहऱ्याकडे टाकणारे), अशा प्रजातीही इथे पहायला मिळतात.
    प्रत्येक बसची वेळ ठरलेली असते, इतकंच काय त्या येण्याचा सिक्वेन्सही माहिती झालेला असतो. छोट्या छोट्या गल्ल्यांमधून मोठ मोठ्या गाड्या चालवणाऱ्या  स्कुल बस ड्रायव्हर्सचं मला प्रचंड कौतुक वाटतं.
   एरवी सुट्टीत यातल्या कोणाशी फारसा संबंध येत नाही. क्वचित रस्त्यात दिसल्यावर दुरूनच एक 'स्माईल' फेकलं जातं. पण शाळा सुरू झाल्यावर आयुष्य पुन्हा सुरू झाल्यासारखं वाटतं. मे मध्ये शांत असणाऱ्या रस्त्यावर पुन्हा रहदारी वाढते. कधी कधी सगळ्या गाड्या एकाच वेळी येतात आणि गोंधळ होतो. मुलं मात्र ही धमाल एन्जॉय करत असतात.
      गप्पात रंगलेल्या आया बघून दगड, पानं, फुलं गोळा करणारी, मस्ती करणारी आणि मधूनच एखादा दणका खाणारी मुलं बघितली की रस्त्यावरचं हरवलेलं चैतन्य परत आल्यासारखं वाटतं. कधी कधी मुलांचं नाव माहिती नसतं पण त्याची बस मात्र माहिती असते. कधी आरामात चालत येणाऱ्या एखादया मुलाची बस येताना दिसली की पालक ड्रायव्हरला थांबायला सांगतात तर मुलं इतक्या मोठ्या आवाजात त्याला/ तिला हाका मारतात की, आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये झोपलेली लोकं खडबडून जागी होत असतील. अशी ही स्कुल बस स्टॉपची #एक_वेगळीच_दुनिया आणि इथली एक #वेगळीच_दुनियादारी!

Tuesday, 18 June 2019

अंकांमधील बदल कितपत योग्य ?

महाराष्ट्रात दर १४ मैलावर भाषा बदलते असं म्हणतात. एकच मराठी भाषा पण त्यामध्ये एकूण ५२ प्रकारच्या बोली भाषा बोलल्या जातात. पण यामध्ये गमतीचा भाग म्हणजे प्रत्येक बोलीभाषेत  #मराठी_आकडे मात्र सारखेच आहेत. (उच्चाराचा फरक असूच शकतो कारण उच्चारांवर बोली भाषेचं प्रभुत्व असतं).
    तर मुद्दा तोच जो गेले ४/५ दिवस सोशल मीडियावर गाजतोय.
दहा दोन, पन्नास सहा, दहा सात….. ( लक्षात आलं असेलच)
    हा बदल करण्यामागे जी काही स्पष्टीकरणं देण्यात येत आहेत ती अजिबात म्हणजे अजिबातच पटणारी नाहीत.
स्पष्टीकरण क्र. १
जोडाक्षरे: हे अतिशय हास्यास्पद स्पष्टीकरण आहे.  
इतकी वर्षे मुलं शिकत आली आहेत, हा मुद्दा तर आहेच, पण जाऊदे हा मुद्दा बाजूला ठेवूया उगाच 'भूतकाळावर बोलू काही… ' असं नको.
आमच्या महाराष्ट्रात आम्ही मुलांना लहानपणी गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र, रामरक्षा, मनाचे श्लोक, पसायदान हे सर्व किंवा यातलं काही ना काही शिकवत असतो. त्यामुळे आकड्यांची जोडाक्षरे उच्चारताना त्यांना कठीण वाटण्याचा संबंधच नाही.
बरं धरून चालू नाही शिकवत आम्ही यातलं काहीच. पण शाळेत जन-गण-मन आणि प्रतिज्ञा तरी मुलं म्हणत असतीलच ना?
जोडाक्षरांच्या उच्चारामुळे मुलांचे उच्चार अधिक स्पष्ट होतात, हे तर सिद्ध झालं आहे.
बरं या सगळ्या अवांतर गोष्टी जाऊदेत.
  सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये 'फॉनिक्स' नावाचा प्रकार अनेक शाळांमध्ये शिकवला जातो. अगदी मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांनाही पहिलीपासून इंग्रजी शिकवले जात असल्यामुळे अनेक शाळांमध्ये हा प्रकार शिकवला जातो.
    'फॉनिक्स'मध्ये इंग्रजी अल्फाबेट्सचा उच्चार कसा करायचा हे शिकवतात.  सुरवातच A says 'अॅ' …. 'E says ए'....G says 'ग'…. या पद्धतीने उच्चार शिकवले जातात.  पण यामध्ये मुलांचं #confusion होत नाही. इतकंच काय तर मुलांना 'फॉनिक्स' हा शब्द उच्चारणे सत्तेचाळीस, त्रेपन्न, नव्वद अशा शब्दांपेक्षा सोपा वाटत असेल नाही?
  बरं ते फॉनिक्स बाजूला ठेवू. पण इतर इंग्लिश आकडे तरी पहिलीपासून शिकवत असतील? मग Three, six, Twelve, Thirteen…. हे सगळे उच्चार सोपे आहेत आणि ही जोडाक्षरे नाहीत हे मला नव्यानेच कळलं.
बरं उच्चारही बाजूला ठेवूया. मुलांना जोडाक्षरे लिहिणं कठीण जातं, हा मुद्दा धरला तर अनेक मुलांना त्यांचं नाव, वडिलांचं नाव, आण्णाव, घर/ गाव/ तालुका/ जिल्हा/ क्वचितप्रसंगी शाळेचं नावही लिहिणं कठीण होत असेल, तर ते ही बदलायचं का? (मी इथे आपल्या राज्याच्या नावविषयी काहीही लिहीत नाही. उगाच बदललं जाण्याची भीती ओ दुसरं काही नाही.)
 आमच्या इथल्या भाजी मंडईत शाळेत न जाणारी, जेमतेम ५ वी/ ६वी शिकलेली असतील/ नसतील, अशी मुलं भाजी विकायला बसलेली असतात. ती मुलं ज्या पद्धतीने हिशोब करतात त्याचं खूप कौतुक वाटतं मला. अगदी कमी शिकूनही मराठी आकडे उच्चारणे, हिशोब करणं त्यांना कठीण वाटत नाही. असो.

स्पष्टीकरण २:
संस्कृत आणि इंग्रजी भाषेचा संदर्भ
हे स्पष्टीकरण अतिशय कीव आणणारं आहे. प्रत्येक भाषा वेगळी असते. त्यामुळे एका भाषेची तुलना दुसऱ्या भाषेशी करण्याची गरजच काय? कोणतीही व्यक्ती कितीही हुशार असली तरी तिला भाषा बदलण्याचा अधिकार अजिबात नाही.
     "संस्कृत ही मराठीची जननी आहे." १००% मान्य! पण मुलीने आईसारखेच असले पाहिजे हा अट्टाहास चुकीचा नाही का? प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. त्या व्यक्तीची गुणवैशिष्ट्ये वेगळी असतात. तशीच प्रत्येक भाषा व तिची रचना, तिची वैशिष्ट्ये ही वेगळीच असतात. त्यामुळे या स्पष्टीकरणाला तर अजिबात अर्थ नाही.

आता प्रॅक्टिकल मुद्दा - खरंतर मुलांना दुसरीत नाही तर खूप लहान वयातच आकडे शिकवले जातात. अगदी सिनिअर केजी किंवा मोठ्या गटात फारफार तर पहिलीत शंभर पर्यंतचे आकडे शिकवले जातात.  मग मुलांना गेली २/३ वर्ष जे शिकलात ते चुकीचं होतं, असं सांगायचं का? यामुळे मुलांचा गोंधळ उडणार नाही?
या साऱ्यांमुळे किती गोंधळ होणार आहे याचा विचार शिक्षणमंडळाने केला नाही की त्यांना तो करायचा नाहीये?

तळटीप: मी कोणीही भाषा अभ्यासक नाही. पण भाषा बदलण्याचा अधिकार कोणालाच नसतो. हा बदल हा मराठी भाषेचा अपमान तर आहेच. पण त्या पेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे हा बदल एकूणच शिक्षण पद्धतीला धोकादायक आहे, म्हणून हा पोस्टप्रपंच!

©मानसी जोशी

Monday, 3 June 2019

मिस यु युवराज..

तो आला, तो खेळला आणि त्याने जिंकलं…!!!
२००० साली अंडर १९ क्रिकेट टीम इंडियाने जिंकला. त्या वर्ल्ड कपचा #प्लेअर_ऑफ_द_सिरीज होता #युवराज_सिंग.
२००७ साली T20 वर्ल्ड कप टीम इंडियाने जिंकला. त्या वर्ल्ड कपनंतर २००८ साली एका भारतीय खेळाडूला आयसीसी अवॉर्डस मध्ये #टी_२०_इंटरनॅशनल_प्लेअर_ऑफ_द_इअर  पुरस्काराने गौरविण्यात आले, तो प्लेअर म्हणजे युवराज सिंग.
२०११ साली भारतीय क्रिकेट जगतात वानखेडे स्टेडिअमवर माहिच्या टीमने इतिहास घडविला. भारताने वर्ल्ड कप तर जिंकलाच शिवाय #मॅन_ऑफ_द_सिरीज चा किताबही भारतीय खेळाडूला मिळाला, तो खेळाडू म्हणजे युवराज सिंग!
त्यानंतर त्याला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. पण म्हणतात ना दुर्धर इच्छाशक्ती आणि आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्न जाच्याजवळ असतील तो नियतीलाही हरवू शकतो. आणि झालंही तसंच, कॅन्सरवर मात करून युवराज परत आला आणि त्याने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये पुनरागमन केले.
   कॅन्सरचं निदान होईपर्यंतचा काळ, ते निदान झाल्यानंतरचा आणि उपचारादरम्यानचा काळ युवराजसाठी सोपा नव्हता. त्याची खालावत जाणारी तब्बेत आणि ठासळत जाणारी मनस्थिती त्याला निराशेच्या खोल गर्तेत ढकलत होती. पण या निराशेवर मात करून त्याने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. युवराजच्या #द_टेस्ट_ऑफ_माय_लाईफ या पुस्तकात युवराजने त्याचं बालपण, क्रिकेट करिअर, कॅन्सरची सुरुवात झाल्यापासून बरं होऊन पुन्हा मैदानात खेळायला उतरेपर्यंतचं संपूर्ण वर्णन केले आहे. कॅन्सरच्या आजारादरम्यान त्याची बदलत जाणारी मनस्थिती आणि क्रिकेटपासून सुरू होऊन क्रिकेटपर्यंतच येऊन थांबणार प्रश्न  वाचून गहिवरून जायला होतं.
  "Whatever happens tomorrow I just want God above to give us the 'World Cup'. He can take whatever he wants, take away my life, giving me pain…..God, just give me World Cup."
फायनल मॅचच्या आदल्या दिवशी रात्री गोळ्या द्यायला आलेल्या  संघाच्या डॉक्टरांशी युवराज भावूक होऊन बोलत होता. युवराजच्या आजाराच्या लक्षणाची सुरुवात २०११ च्या वर्ल्ड कपच्या आधीच झाली होती. संघाच्या डॉक्टरांनी त्याला चेक अप करुन घ्यायचा सल्लाही दिला होता. परंतु त्याने तो गांभीर्याने घेतला नाही. मॅचदरम्यान खेळताना त्याला होणारा त्रास त्याने निव्वळ वर्ल्ड कप जिंकायच्या इच्छाशक्तीच्या जोरावर सहन केला होता.
 युवराज केवळ चांगला खेळाडू नव्हे तर तो एक चांगली व्यक्तीही आहे. म्हणूनच स्वतः बरं झाल्यानंतर कॅन्सर पेशंट्सच्या मदतीसाठी  #You_can नावाची संस्था सुरू केली आहे.
 पण या साऱ्यानंतर २०१५ सालच्या वर्ल्ड कपमधून युवराजला वगळण्याची न्यूज आली आणि धक्का बसला. आधीच्या वर्ल्ड कपचा हिरो वर्ल्ड कप खेळणार नाही हेच मनाला पटत नव्हतं. त्याची निवड न होण्यामागची कारणे काहीही असुदेत पण प्रत्येक वेळी युवराज हवा होता हेच वाटत होतं.
 या वर्ल्ड कपमध्येही युवराज नसणार हे माहिती होतं, तरीही एक वेडी आशा होती. पण …
   कितीही नाकारलं तरी यापुढच्या कुठल्याच वर्ल्ड कपमध्ये युवराज खेळणार नाही हेच खरं आहे.  
   वर्ल्ड कप सुरू होऊन आठवडा होत आला. उद्या भारताची वर्ल्ड कपमधली पहिली मॅच आहे. पण मनात सतत एकच विचार येतोय ….  #Miss_you_Yuvaraj

© मानसी जोशी
फोटो: गुगलावरून साभार


Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...