Tuesday, 18 June 2019

अंकांमधील बदल कितपत योग्य ?

महाराष्ट्रात दर १४ मैलावर भाषा बदलते असं म्हणतात. एकच मराठी भाषा पण त्यामध्ये एकूण ५२ प्रकारच्या बोली भाषा बोलल्या जातात. पण यामध्ये गमतीचा भाग म्हणजे प्रत्येक बोलीभाषेत  #मराठी_आकडे मात्र सारखेच आहेत. (उच्चाराचा फरक असूच शकतो कारण उच्चारांवर बोली भाषेचं प्रभुत्व असतं).
    तर मुद्दा तोच जो गेले ४/५ दिवस सोशल मीडियावर गाजतोय.
दहा दोन, पन्नास सहा, दहा सात….. ( लक्षात आलं असेलच)
    हा बदल करण्यामागे जी काही स्पष्टीकरणं देण्यात येत आहेत ती अजिबात म्हणजे अजिबातच पटणारी नाहीत.
स्पष्टीकरण क्र. १
जोडाक्षरे: हे अतिशय हास्यास्पद स्पष्टीकरण आहे.  
इतकी वर्षे मुलं शिकत आली आहेत, हा मुद्दा तर आहेच, पण जाऊदे हा मुद्दा बाजूला ठेवूया उगाच 'भूतकाळावर बोलू काही… ' असं नको.
आमच्या महाराष्ट्रात आम्ही मुलांना लहानपणी गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र, रामरक्षा, मनाचे श्लोक, पसायदान हे सर्व किंवा यातलं काही ना काही शिकवत असतो. त्यामुळे आकड्यांची जोडाक्षरे उच्चारताना त्यांना कठीण वाटण्याचा संबंधच नाही.
बरं धरून चालू नाही शिकवत आम्ही यातलं काहीच. पण शाळेत जन-गण-मन आणि प्रतिज्ञा तरी मुलं म्हणत असतीलच ना?
जोडाक्षरांच्या उच्चारामुळे मुलांचे उच्चार अधिक स्पष्ट होतात, हे तर सिद्ध झालं आहे.
बरं या सगळ्या अवांतर गोष्टी जाऊदेत.
  सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये 'फॉनिक्स' नावाचा प्रकार अनेक शाळांमध्ये शिकवला जातो. अगदी मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांनाही पहिलीपासून इंग्रजी शिकवले जात असल्यामुळे अनेक शाळांमध्ये हा प्रकार शिकवला जातो.
    'फॉनिक्स'मध्ये इंग्रजी अल्फाबेट्सचा उच्चार कसा करायचा हे शिकवतात.  सुरवातच A says 'अॅ' …. 'E says ए'....G says 'ग'…. या पद्धतीने उच्चार शिकवले जातात.  पण यामध्ये मुलांचं #confusion होत नाही. इतकंच काय तर मुलांना 'फॉनिक्स' हा शब्द उच्चारणे सत्तेचाळीस, त्रेपन्न, नव्वद अशा शब्दांपेक्षा सोपा वाटत असेल नाही?
  बरं ते फॉनिक्स बाजूला ठेवू. पण इतर इंग्लिश आकडे तरी पहिलीपासून शिकवत असतील? मग Three, six, Twelve, Thirteen…. हे सगळे उच्चार सोपे आहेत आणि ही जोडाक्षरे नाहीत हे मला नव्यानेच कळलं.
बरं उच्चारही बाजूला ठेवूया. मुलांना जोडाक्षरे लिहिणं कठीण जातं, हा मुद्दा धरला तर अनेक मुलांना त्यांचं नाव, वडिलांचं नाव, आण्णाव, घर/ गाव/ तालुका/ जिल्हा/ क्वचितप्रसंगी शाळेचं नावही लिहिणं कठीण होत असेल, तर ते ही बदलायचं का? (मी इथे आपल्या राज्याच्या नावविषयी काहीही लिहीत नाही. उगाच बदललं जाण्याची भीती ओ दुसरं काही नाही.)
 आमच्या इथल्या भाजी मंडईत शाळेत न जाणारी, जेमतेम ५ वी/ ६वी शिकलेली असतील/ नसतील, अशी मुलं भाजी विकायला बसलेली असतात. ती मुलं ज्या पद्धतीने हिशोब करतात त्याचं खूप कौतुक वाटतं मला. अगदी कमी शिकूनही मराठी आकडे उच्चारणे, हिशोब करणं त्यांना कठीण वाटत नाही. असो.

स्पष्टीकरण २:
संस्कृत आणि इंग्रजी भाषेचा संदर्भ
हे स्पष्टीकरण अतिशय कीव आणणारं आहे. प्रत्येक भाषा वेगळी असते. त्यामुळे एका भाषेची तुलना दुसऱ्या भाषेशी करण्याची गरजच काय? कोणतीही व्यक्ती कितीही हुशार असली तरी तिला भाषा बदलण्याचा अधिकार अजिबात नाही.
     "संस्कृत ही मराठीची जननी आहे." १००% मान्य! पण मुलीने आईसारखेच असले पाहिजे हा अट्टाहास चुकीचा नाही का? प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. त्या व्यक्तीची गुणवैशिष्ट्ये वेगळी असतात. तशीच प्रत्येक भाषा व तिची रचना, तिची वैशिष्ट्ये ही वेगळीच असतात. त्यामुळे या स्पष्टीकरणाला तर अजिबात अर्थ नाही.

आता प्रॅक्टिकल मुद्दा - खरंतर मुलांना दुसरीत नाही तर खूप लहान वयातच आकडे शिकवले जातात. अगदी सिनिअर केजी किंवा मोठ्या गटात फारफार तर पहिलीत शंभर पर्यंतचे आकडे शिकवले जातात.  मग मुलांना गेली २/३ वर्ष जे शिकलात ते चुकीचं होतं, असं सांगायचं का? यामुळे मुलांचा गोंधळ उडणार नाही?
या साऱ्यांमुळे किती गोंधळ होणार आहे याचा विचार शिक्षणमंडळाने केला नाही की त्यांना तो करायचा नाहीये?

तळटीप: मी कोणीही भाषा अभ्यासक नाही. पण भाषा बदलण्याचा अधिकार कोणालाच नसतो. हा बदल हा मराठी भाषेचा अपमान तर आहेच. पण त्या पेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे हा बदल एकूणच शिक्षण पद्धतीला धोकादायक आहे, म्हणून हा पोस्टप्रपंच!

©मानसी जोशी

No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...