Tuesday, 31 October 2017

रायगड - एक अविस्मरणीय अनुभव

एखादी गोष्ट खूप प्लॅन करुनही व्यवस्थित घडून येत नाही. तर कधीकधी एखाद्या वेळेस अचानकपणे काही ठरतं आणि सगळं अगदी अनपेक्षितपणे छान होतं. अगदी असच झालं रायगड ट्रेक च्या बाबतीत. खरतर हा प्लॅन आधीच  ठरला होता. पण ऐनवेळेस पावसाने (नेहमीप्रमाणे) घोळ घातला आणि प्लॅन कॅन्सल करावा लागला.
     ही कल्पना मानसची. रायगड ट्रेक आणि तो ही नाईट ट्रेक करायचा. मी आयुष्यात आजवर कधीही नाईट ट्रेक केलेला नसल्यामुळे मी पण चटकन होकार दिला पण मुसळधार  पावसामुळे अगदी ऐनवेळी सगळ्यावर पाणी पडलं. पुन्हा 28 / 29 तारीख फिक्स झाली. पण त्या दिवशीसाठीचा माझा  दुसरा प्लॅन आधीच ठरल्याने मला जमणं जवळपास अशक्यच वाटत होतं. त्यात सर्दी आणि डोकेदुखीने मी बेजार झाले होते. अखेरीस हो नाही करता करता माझं जायचं ठरलं पण तोपर्यंत दहा जणं आधीच फिक्स झाली होती. दोन गाड्या आणि 11 मेंबर्स.... पुन्हा काय करायचं हा प्रश्न. बाकीच्यांचं आधीच ठरलेलं म्हणजे मी कॅन्सलच. पण मानस म्हणाला, 'होइल मॅनेज ये तू' आणि एकदाचं जाणं फिक्स झालं.
      दुपारी जवळपास तीन वाजता आम्ही पुण्यातून निघालो आणि रायगडाच्या पायथ्याशी साधारणतः आठ  वाजता पोचलो. सगळ्या सामानाची आवराआवरी करुन साधारणपणे सव्वाआठच्या सुमारास गड चढायला सुरुवात केली. सुरवातीला जाणवलं हे जरा कठीणच दिसतय. मिट्ट काळोख, निर्मनुष्य रस्ता, उंच पायऱ्या हे सगळं बघून आपण कितपत चढू शकू अशी शंका मनात आली. मानस अनेक सुचना देत होता. सगळेजण शहाण्या बाळासारखं(?)  सगळ्या सुचनांचं पालन करत होते. सुरुवातीला खूपच अवघड अगदी जमेल की नाही असं वाटणारा ट्रेक हळूहळू 'आता जमेल आपल्याला' या वळणापर्यंत आला. मनात सारखं येत होतं,  "त्या काळी मावळे ढाल तलवार घेऊन इथून कसे काय धावत असतील?"  पायऱ्या नसताना सगळ्यांचा चालायचा स्पीड वाढायचा पुन्हा पायऱ्या दिसल्या की कपाळावर आठी यायची.  एकमेकांना सांभाळून घेत, गप्पा गोष्टी/ चेष्टा मस्करी करत जवळपास अर्धाअधिक गड सर झाला आणि मग थोडावेळ सगळेजण विश्रांतीसाठी थांबलो स्वप्नील भदे फोटो काढण्यात व्यस्त झाला. बाकीच्यांनी एनर्जी ड्रिंक, लिमलेटच्या गोळ्या, श्रीखंडाच्या गोळ्या इत्यादीची देवाणघेवाण सुरु केली. विश्रांतीनंतर  पुन्हा गड चढायला सुरुवात केल्यावर मात्र "आता कधी संपतील या पायऱ्या" असं वाटू लागलं होतं. अखेर दहा वाजता गडावर सुखरूपपणे पोचलो. अवघ्या दीड/पावणेदोन तासात गड सर झाला होता. आपण गडावर पोचलो हे कळताक्षणी प्रचंड आनंद झाला. पण अजूनही चालणं संपल नव्हतं. आमची राहायची व्यवस्था जिथे होती तिथपर्यंत पोचायला गडाच्या  थोडं खाली उतरुन चालायला लागणार होतं. पण उतरताना तसाही त्रास कमी असतो त्यात 'पायऱ्या' नाहीत म्हटल्यावर सुटकेचा निश्वास टाकला.
      एका झोपडीवजा घरात जिथे लाईट्स नाहीत फक्त कंदिलाचा प्रकाश अशा ठिकाणी रहायचं म्हटल्यावर थोडसं टेंशन आलं होतं पण गप्पागोष्टी इतक्या रंगल्या की नंतर त्याचही काही वाटेनासं झालं. गरमागरम भाकरी, मसुराची उसळ, आमटी -भात, लोणचं, पापड असा जेवणाचा बेत. अंगणात चटईवर बसून, कंदिलाच्या उजेडात साधं पण अतिशय चविष्ट असं जेवण जेवताना आलेल्या मजेची सर  कॅन्डललाईट डिनरलाही नाही.
      जेवणानंतर अनेक विषयांवर गप्पा रंगल्या. रात्री दोन वाजेपर्यंत सगळेच जागे होते. त्यानंतर चार वाजताच कोंबड्यांनी बांग द्यायला सुरुवात केली आणि  पाच वाजता मुकुलच्या मोबाईल अलार्मने. तरीही कोणीही चिडचिड न करता हे सारं हसतखेळत एंजॉय केलं.
    सकाळी लवकर आवरुन आधी जगदीश्वराचं दर्शन घेतलं. त्यानंतर शिवाजी महाराजांची समाधी, टकमक टोक, राजवाडा ई. सगळं बघून आणि स्वप्नील भदेकडून भरपूर फोटो काढून घेऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. जाताना ओसंडून वाहणारा उत्साह जाऊन आता  थकवा जाणवायला लागला होता.  मानस आणि उन्मेशचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पुणे टू रायगड ड्रायव्हिंग, त्यानंतर ट्रेक, जागरण  आणि पुन्हा परतीच्या प्रवासातही ड्रायव्हिंग. दोघेही दोन्ही वेळेला अतिशय शांतपणे व्यवस्थित ड्राईव्ह करत होते. उन्मेशचा पाय मुरगळलेला असूनही त्याने हे सगळं सहज जमवलं. सौरभ आणि स्वप्नील भदेने हिशोबाचं डिपार्टमेंट भ्रष्टाचार न(?) करता सांभाळलं. ट्रेकच्या निमित्ताने अनेक नवीन ओळखी झाल्या रुचिता, अदिती, मुकूल यांना भेटून छान वाटलं. स्नेहल आणि नेहा या गोडबोले भगिनींशी तर अगदी जवळचीच ओळख निघाली.  Archaeology शिकत असणाऱ्या श्रेयाकडून काही विषयांवर नवीन माहिती कळली. अशा अनेक नवीन ओळखी आणि ट्रेकचा अविस्मरणीय अनुभव घेऊन आम्ही सगळे अखेरीस चार वाजता पुण्यात परतलो. मुकुलच्या घरी (तिने केलेला) आग्रहाचा चहा घेऊन सव्वापाचला घरी पोचले आणि एका अविस्मरणीय ट्रेकची सांगता झाली.
©मानसी जोशी

Monday, 23 October 2017

दिल चाहता हैं

[DCH
Friendship Lovestory]

रोमॅन्टिक मूव्ही म्हटलं की मला दिल चाहता हैं  हटकून आठवतो. माझ्या या वाक्यावर अनेकांनी भुवया उंचावल्या असतील. नाही मला माहिती आहे ही मूव्ही म्हणजे तीन मित्रांच्या मैत्रीची कहाणी आहे. पण तरीही त्यातल्या प्रत्येक मित्राची प्रेमकहाणी वेगळी आहे आणि त्यामुळेच चित्रपट अधिक रंगतदार झाला आहे.
       आकाश (अमीर खान), समीर (सैफ अली खान) आणि सिद म्हणजेच सिद्धार्थ ( अक्षय खन्ना)  या तीन जिवलग मित्रांनी केलेली धमाल, त्यांची मैत्री, त्यांच्या प्रेमकहाण्या म्हणजे दिल चाहता हैं.  फरहान अख्तर यांचा पहिलाच प्रयत्न (कथा आणि दिग्दर्शन) असूनही चित्रपट पहाताना त्यांचा नवखेपणा कुठेही जाणवत नाही. आकाश, सिद आणि समीरची मैत्री, त्यांनी कॉलेजला केलेली धमाल, त्यांची गोवा ट्रिप हे सगळे प्रसंग भरपूर हसवतात त्याचबरोबर  सिद आणि आकाशमद्ध्ये झालेले मतभेद, त्यांच्यात आलेला दुरावा, ग्रॅज्युएशननंतर वेगळ्या झालेल्या वाटा अशा  हृदयस्पर्शीही प्रसंगांची मांडणीही अतिशय सुंदर.
    आकाशचा प्रेमावर अजिबात विश्वास नसतो. "जाने क्यों लोग प्यार करते हैं" म्हणणारा आकाश  आधीच कमिटेड असणाऱ्या आणि कॉलेजच्या पार्टीत जिच्या बॉयफ्रेंड करुन मार खावा लागलेला असतो अशा शालिनीच्या (प्रिती झिंटा)  प्रेमात कधी पडतो ते त्याचं त्यालाच कळत नाही.
    समीरची प्रेमाची व्याख्या क्लिअर नसते त्यामुळे एखाद्या मुलीने सॉफ्ट कॉर्नर दाखवला की लगेच तिच्या प्रेमात पडणारा समीर गोव्यामध्ये एका फॉरेनर मुलीकडून फसतो. त्यानंतर टिपिकल 'कांदेपोह्याचा' प्रोग्रॅम होतो. या प्रोग्रॅमसाठी आलेली मुलगी पूजा ( सोनाली कुलकर्णी) त्याला मनापासून आवडते. पण ती आधीच एंगेज्ड असते. मग तिला मिळविण्यासाठी त्याने केलेली धडपड,  पूजाचा बॉयफ्रेंड सुबोध; त्याचं प्रत्येक गोष्टीचं तारीखवार लक्षात ठेवणं हे सारे प्रसंग मस्त जमून आले आहेत.
    सिद्धार्थचं व्यक्तिमत्त्व एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून समोर येतं. अतिशय शांत, विचारी सिद घटस्पोटित, प्रौढ आणि एका टिनएजर मुलीची आई असणाऱ्या तारा जैसवालच्या (डिंपल कपाडिया) प्रेमात पडतो. platonic love ही  कन्सेप्ट त्यावेळेस मला माहिती नव्हती. या चित्रपटाच्या निमित्ताने ती कळली. त्यावेळी हे पचवणं थोडं जड होतं. पण अक्षयच्या सहज सुंदर अभिनयाने हे अलगद गळी उतरवलं.
     तारा जैसवाल वरील  सिदचं प्रेम  आकाशला  पटत नाही त्यामुळे आकाश आणि सिदमध्ये टोकाचे मतभेद होऊन दोघे दुरावतात. त्यानंतर आकाश सिडनीला निघून जातो. जाताना त्याला प्लेनमद्ध्ये शालिनी भेटते. पुढे सिडनीत दोघांच्या वारंवार भेटीगाठी होतात. आकाशच्या मनात नकळत निर्माण झालेलं प्रेम तो शेवटी शालिनीच्या लग्नाच्या वेळी व्यक्त करतो. हा प्रसंग थोडा टिपिकल बॉलिवूड स्टाईल झाला असला तरी चित्रपट पहाताना फारसा खटकत नाही.
      शेवटी आकाश आणि सिदमध्ये दिलजमाई होते. आकाश फोन करुन  सिदला  सॉरी म्हणतो. तिघेही मित्र पुन्हा एकत्र येतात. आणि सहा महिन्यानंतर पुन्हा गोव्याला जातात. तिथेच सिदला त्याच्या आयुष्याची नवी जोडीदार मिळते.
    चित्रपटाला शंकर-एहसान-लॉय यांनी  संगीता दिले आहे. या चित्रपटातील सगळीच गाणी श्रवणीय तर आहेतच पण काही गाणी तर प्रेक्षणीयही झाली आहेत. 'जाने क्यों लोग प्यार करते हैं' या गाण्यात अमीर प्रितीसमोर  गुलाबाचं फुल धरतो ती ते घ्यायला जाते तेव्हा तिच्या हातात फक्त देठ येतो, त्यावेळचा तिचा लटका राग आणि क्षणात गोड हसून अमीरच्या हातातील गुलाबाचं फुल ओढून घेणं; या प्रसंगातील प्रितीच्या चेहऱ्यावरील खट्याळ हावभाव अगदी कायम लक्षात राहण्यासारखे. 'जिसे धुंडता हूँ मैं' हे सैफ सोनालीचं गाणही सुंदर. 'कैसी हैं ये ऋत' हे गाणं तर एखाद्या निवांत संध्याकाळी ऐकत रहावं असं. सिडनीमधील 'ओपेरा' आणि अमीरवर चित्रीत झालेलं 'तनहाई' हे गाणं पाहताना डोळे पाणावतात. समीरचं अनेकींवरील प्रेम(?) जेवढं हसवतं तेवढच सिदचं एकतर्फी निरपेक्ष प्रेम खरं प्रेम म्हणजे काय असतं हे शिकवतं.  आकाश, समीर आणि सिदची मैत्री तर मैत्रीचं आदर्श उदाहरणच. या चित्रपटाला 2001 सालातील "सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.
©मानसी जोशी



Thursday, 5 October 2017

आठवणी

आठवणी ! किती अद्भूत शब्द आहे ना हा!
नुसता ऐकला किंवा वाचला तरी मनातल्या मनात कोणाचीना कोणाची आठवण येते.
या आठवणी कधी मन हळवं करतात तर कधी रडता रडता हसायला लावतात.
कधी प्राजक्ताच्या फुलांप्रमाणे डोळ्यातून टपटप ओघळतात
तर कधी रातराणीच्या गंधापरी मनात हळूवार दरवळतात.
एखाद्या दिवशी पहाटेची भूपाळी किंवा मंदिरातला घंटानाद ऐकून मन बालपणात जातं.
तर कधी एखाद्या सकाळी चहाचा दरवळणारा गंधही मनात माहेरची आठवण घेऊन येतो.
आई बाबांबरोबर गप्पा मारत प्यायलेला चहा, भावंडाबरोबरची भांडणं, सगळं अगदी काल परवा घडल्यासारखं वाटतं.
एखाद्या हळव्या रात्री झोपताना  गोधडी अंगावर पांघरली की आजीच्या आठवणीने मन भरुन येतं.
एखादं छोटं बाळ बघितलं की आपल्याच पिल्लाचं बालपण आठवतं.
लेकीचा अभ्यास घेताना शाळेतल्या आठवणी जाग्या होतात.
मग मनात येतं इतकी वर्ष झाली तरी काहीच बदलेलं नाही.
संध्याकाळच्या आठवणींबद्दल काय लिहू? ही संध्याकाळ तर अक्षरशः वेड लावते.
एखाद्या संध्याकाळी मित्र मैत्रीणींबरोबर घालवलेला वेळ आठवतो.
ती चेष्टा मस्करी, गॉसिप सगळं आठवून मनात हसू उमटतं.
 मग नकळत फोन हातात घेऊन त्यावेळच्या ग्रूपमधल्या कोणालातरी फोन करावासा वाटतो पण, 'बिझी असेल तर ?' हा विचार मनात येतो आणि मग विचार बदलतो.
 तर कधी एखाद्या निवांत संध्याकाळी हमखास 'तिची किंवा 'त्याची' आठवण येते आणि मन हेलावून जातं.
मनाला एक वेगळीच हुरहूर लागते. या आठवणींमधून बाहेर पडायला मनही सहजासहजी तयार होत नाही.
वेळ मात्र कापरासारखी निघून जात असते आणि नाखूषीने का होईना मनाला आठवणींच्या राज्यातून बाहेर यावच लागतं.
आठवणीत जागणाऱ्या रात्री मात्र बरेचदा डोळे शुष्क करतात.
मुक्याने अश्रू ओघळत रहातात आणि रात्रभर जागून पुन्हा पहाटही भिजवून टाकतात.
©मानसी जोशी

Tuesday, 3 October 2017

सनसेट पॉईंट

हिमाचल प्रदेशातल्या एका नदीवरच्या उंच पुलावर उभं राहून 'ती' त्याची वाट बघते असते. अंगावर शाल, मेंदीने भरलेले दोन्ही हात, डोळ्यात प्रचंड विश्वास आणि ओढ. सूर्य हळूहळू डोंगराआड जात असतो. एक क्षण तिच्या मनात विचार येतो,'आता झोकून द्यावं या पुलावरुन स्वतःला!' पण अचानक तिची नजर समोरच्या डोंगरावर जाते आणि ती तशीच शांत उभी रहाते.

तिला तिची आणि त्याची पहिली भेट आठवते.

  तिने त्याच्याकडे मागीतलेली लिफ्ट, पंक्चर झालेला गाडीचा टायर, गाडी स्टार्ट करताना तिच्या तोंडावर उडालेला चिखल आणि मग त्यानंतरचा दोघांनी एकत्र घालवलेला वेळ. याचवेळी त्यांना जाणवलेलं एकमेकांबद्दलच प्रेम आणि नंतरची निरोपाच्या वेळची तगमग. असे एकएक प्रसंग तिला आठवत असतात.

   तिचं लग्न ठरलेलं असतं. तिच्या हातावर मेहंदी काढण्याचा कार्यक्रम चालू असतो. तिचे डोळे त्याच्या आठवणींनी भरुन आलेले असतात.

  त्यानंतर कपातून त्याने पाठवलेली अंगठी. हिने बहिणीच्या हातावर मेहेंदीने लिहून दिलेला "sunset point" असा निरोप आणि मग घरातून तिचं पळून येणं हे सगळं तिच्या डोळ्यासमोर येतं.

सुर्यास्ताची वेळ अगदीच जवळ येउन ठेपते. त्याच्या येण्याची कुठलीच शक्यता तिला दिसत नाही. आता अंगावरची शाल बाजूला काढून ती पाण्यात उडी मारणार इतक्यात तिला त्याच्या गाडीचा आवाज ऐकू येतो. तिचे डोळे चमकतात. चेहऱ्यावर हसू येतं आणि मग गुलजार सरांच्या आवाजातली एक अप्रतिम ओळ ऐकू येते-

#वो_देर_से_पहूँचा_था_लेकीन_वक्तपे_पहूँचा...

 #Sunset_point या अल्बममधील कच्चे रंग या गाण्यामध्ये एक रोमॅन्टिक स्टोरी दाखविण्यात आली आहे. अतिशय सुंदर ग्रीनरी, चांगले कलाकार, गुलजार यांचे शब्द, भूपिंदरसिंग आणि चित्राचा आवाज; या सगळ्यामूळे हे गाणं नुसतच श्रवणीय नाही तर प्रेक्षणीयही झालं आहे.   

    मला  #sunset_point लक्षात राहिला तो खास करुन या शेवटच्या ओळींमुळे! "देरसे पहुचा था मगर वक्त पे ...." दोन विरुद्धार्थी शब्द एकाच वाक्यात वापरून किती सुंदर आणि अर्थपूर्ण वाक्य तयार केलं आहे. यासाठी गुलजार सरांना हजारो Hats offfff!!!!!!

     आम्ही कॉलेजला असताना हा अल्बम खूप फेमस झाला होता. त्यावेळी गाण्याचे अनेक चांगले अल्बम्स आलेले होते. त्यावेळचे अल्बम्स ऐकले की nostalgic व्हायला होतं.

    आजकालची गाणी ऐकवत नाहीत. कानठळ्या बसवणारं म्युझिक आणि अर्थहीन शब्द; असली गाणी ऐकून कानावर हात ठेवावासा वाटतो. (अर्थात प्रत्येक पिढीला हे असच वाटत असतं.)  काही गाणी अपवाद असतात पण त्यांच प्रमाण फारच थोडं. आजकालचे अल्बम्स येतात कधी आणि जातात कधी तेच कळत नाही. कधीतरी मिरवणूकीत, दांडियामध्ये ही गाणी ऐकायला येतात. पण तेवढ्यापुरतीच. ती काही संस्मरणीय वगैरे होत नाहीत.

©मानसी जोशी






Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...