Tuesday, 3 September 2019

कथा - सँडविच

"विसर्जनाचा पाट विहिरीतल्या पाण्यावर तरंगू लागला आणि नकळत डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. अवघ्या दीड दिवसांसाठीच येतो घरात, पण जाताना मात्र रडवून जातो. आता घरात जाऊन सामानाची बांधाबांध करायची आणि निघायचं. मनातल्या मनात ऋषीने उसासा टाकला.
"ऋषी, अगदी आजच निघायला हवं का?" आईने काकुळतीला येऊन विचारलं.
"हो आई. आजची रजाच कशीबशी मिळवली. सध्या ऑफिसमधलं वातावरण ठीक नाही. अचानक कोणालाही काढून टाकतात. अशा परिस्थितीत मी रिस्क नाही घेऊ शकत." ऋषी.
तू येतानाच ठरवून आलायस सगळं, तर काय बोलणार मी? यावर्षी निदान गौरीपर्यंततरी थांबशील असं वाटलं होतं. सणावाराला नको वाटतं एकट्यानेच राहणं. एकट्यानेच करायचं आणि एकट्यानेच खायचं. असो." आई.
"तू स्वतःच्या मर्जीने करतेयस हे सगळं आई. बाबा गेल्यानंतर मी तुला सांगितलं होतं आता आमच्या फ्लॅटवर आणूया गणपती. पण तुला काहीच मान्य नाही." ऋषी.
"वृंदाला काय हरकत आहे ८ दिवस यायला? कुळाचार तिनेच करायला हवेत आता." आई.
"ती कुठे नाही म्हणतेय आई. ती तर सगळं करायला आनंदाने तयार आहे. पण तिची बँकेतली नोकरी आठ दिवस रजा कुठून मिळणार?" ऋषी.
"का? तुम्ही फिरायला जाता तेव्हा मिळतेच की तिला रजा. घरच्या सणावारालाच बरी मिळत नाही. मंदासुद्धा नोकरी करत होती, तरी भावजी आणि मंदा, रोहन अगदी वर्षाचा असतानपासून येतच होते की प्रत्येक सणाला. तेव्हा अगदी प्रत्येक सण म्हणजे सोहळा असायचा. तू, रोहन आणि पूर्वा किती धमाल करायचात." आई.
"मंदा काकूची शाळेतली शिक्षिकेची नोकरी होती. तिला भरपूर सुट्ट्या मिळायच्या. वृंदाची परदेशी बँकेतली नोकरी. त्यात तिची मॅनेजरची पोस्ट. रजा अशी सहजासहजी नाही मिळू शकत. आणि आम्ही फिरायला जातो तेव्हा सुट्ट्या, मुलांच्या परीक्षा, क्लास सगळं मॅनेज करून प्लॅनिंग करतो आणि मगच जातो. सणवार काय हे सगळं मॅनेज करून येतात का?"ऋषी.
"अगदी बायकोचाच झालास रे. तिच्याबद्दल जरा म्हणून बोललेलं खपत नाही. अगदी लगेच बाजू सावरून घेतोस तिची. कधीतरी आईचाही विचार केलास तर बरं वाटलं मला." आई.
"तुझा विचार करतो म्हणूनच तर एवढी ओढाताण करून दीड दिवसांसाठी तरी येतो ना? आजपर्यंत नेहमी वृंदालाच बोलत आलो. तुला कधी काही बोललो नाही. पण आज अगदी राहवत नाहीये म्हणून बोलतो, प्रत्येकवेळी तू तुझा हेका चालवत आलीस. परिस्थितीशी जुळवून घेणं जमतंच नाही तुला कधी. तेव्हाही तुझं काकूशी कुठे पटायचं? मंदा काकूच जुळवून घाययची तुझ्याशी. वृंदा आधी येतंच होती की सणावाराला. पण तुला मात्र घरातली तुझी सत्ता सोडायची नव्हती. त्यामुळे सगळं तुझ्या मर्जीप्रमाणेच व्हावं हा तुझा अट्टाहास. तिने केलेलं तुला कधी पटायचं नाही. सतत तिच्या प्रत्येक गोष्टीला नावं ठेवायचीस. काकूच्या बाबतीतही असंच कारायचीस. पण वृंदा म्हणजे काकू नाही. ती आजच्या काळातली आहे. ती कसं जुळवून घेईल प्रत्येकवेळी? मान्य आहे ती तुझ्यातकी सुगरण नसेल, अग पण मुळात ही तुलना करणंच चुकीचं नाही का? तुझ्याहून निम्म्या वयाची मुलगी सगळंच उत्तम कसं करू शकेल? पूर्वा ताईला तरी कुठे येत होतं सगळं?" ऋषी.
"पूर्वा सगळे कुळाचार करते हो घरातले. सासूचा काहीही उपयोग नाही तिला. उलट तिचं सगळं करून पूर्वा सगळं करते घरातलं. तरी कधी तक्रार नाही करत ती." आई.
"सासूची मदत नाही, तशी तक्रारही नाही पूर्वा ताईबद्दल. आज तिची सासू आजारी आहे म्हणून सगळं एकट्या ताईवर पडतंय. पण ताईचं लग्न झालं तेव्हा काय येत होतं ग ताईला? सगळं तिच्या सासुनेच तिला शिकवलं ना? सोहम आणि सईसुद्धा दरवर्षी म्हणतात आपण आपल्या घरी, इथेच गणपती आणूया. त्यांच्या मित्र मैत्रिणींच्या घरचे गणपती बघून त्यांनाही वाटतं आपल्याकडे पण गणपती आणावा. शेवटी मुलांनाच जास्त हौस असते." ऋषी.
"तुझ्या मुलांची हौस इथे येऊनही पूर्ण होऊ शकते की. पण तुझ्या बायकोला ते मान्य नाही. तसंही तुझ्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. तू काय माझ्यावरच दोषारोप करणार. ही आपली मूळ वास्तू आहे. सगळे कुळाचार इथेच झाले पाहिजेत. अरे गाडगीळांचा रवी दरवर्षी येतो गणपतीला चांगली आठ दिवस रजा घेतो.  वर्षानुवर्षे घर बंद आहे त्यांचं. तरीही सगळं कुटुंब येऊन झाडलोट करून गणपती बसवतं दरवर्षी. त्याची बायकोही नोकरी करते. मुलांच्या शाळा असतात. पण इथे यायचा नेम काही चुकत नाही त्याचा. " आई.
"आई अग प्रत्येकाची परिस्थिती, विचारसरणी वेगळी असते. मंदा काकू नाही का रोहनकडे अमेरिकेला जाऊन राहिली. तू का नाही आलीस आमच्याकडे राहायला? सोहम सईच्यावेळीही पहिलं बाळंतपण माहेरी करतात सांगून सगळी जबाबदारी झटकलीस. मी असं म्हणतंच नाहीये सगळं तुझंच चुकतंय. पण आत्ता परिस्थितीच अशी आहे की जे आहे तसं चालू ठेवणं किंवा कोणीतरी परिस्थितीशी जुळवून घेणं. यापैकी एक काहीतरी करावं लागणार आहे. नेहमी म्हणतेस, 'तुला सुनेच्या घरी राहायचं नाही', अग पण ते घर तुझ्या मुलाचं पण आहेच की. पण तुझं आपलं एकच, 'माझं घर माझी सत्ता'. तिकडे सत्ता गाजवायला वृंदा घरी तरी असते का? तरीही इतकी वर्षे ते घर ती तिच्या पद्धतीने सांभाळतेय.  सकाळी ८ वाजता जाते ती रात्री उशिरा परत येते. तू आलीस तर तिला आवडेलच. आम्ही चार जणांनी ऍडजस्ट करून इथे यायचं का तू एकटीने? प्रत्येक पिढीला 'जनरेशन गॅप' सहन करावीच लागते. बाकी सगळं जाऊदे, तुझ्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन सणवार साजरे करणं महत्वाचं आहे का, या घरात एकट्याने सणवार करणं, हे तुझं तूच ठरव. मूळ घर आहे मान्य. मलाही वाटतं, पण काळानुसार बदलणं आवश्यक आहे. अगदी आपल्या शास्त्रांनाही हे मान्य आहे. म्हणूनच त्यांनी यासाठीही पर्याय सुचवले आहेत. पण, तू तुझा हट्ट सोडणार नाहीस. त्यामुळे आता जास्त चर्चा न केलेलीच बरी. दोन दिवस यायचं आणि निघताना मनात कटुता घेऊन जायचं असं नको व्हायला." ऋषी.
संध्याकाळी सदाच्या रिक्षेचा आवाज आल्यावर ऋषी देवाला नमस्कार करायला देवघरात गेला. देवघरातून बाहेर येऊन आजी आजोबा आणि बाबांच्या फोटोला नमस्कार करून आईजवळ आला. सदा एव्हाना ओटीवर येऊन बसला होता.
"काळजी घे आई. जमल्यास मी काय म्हणतोय त्याचा विचार कर", असं म्हणून ऋषी नमस्कारासाठी वाकला.
तेवढ्या वेळात डोळ्याच्या ओलावलेल्या कडा पुसून घेत आईने ऋषीला आशीर्वाद दिला. 
"काळजी करू नकोस ऋषी, आम्ही आहोत सगळे. दोन तीन दिवसांतून माझी एक खेप असतेच इथे. चल निघुया आता गाडीची वेळ झालेय", असं म्हणत सदाने त्याची बॅग उचलली. 
रिक्षेत बसल्यावर पुन्हा एकदा त्याने घराकडे नजर टाकली आणि मनात म्हणाला, "गणपती बाप्पा निदान पुढच्या वर्षी तरी माझ्या घरी या. पुन्हा एकदा गोकुळात आल्यासारखं वाटेल. अगदी पूर्वीसारखं!" 

© मानसी जोशी 

Thursday, 25 July 2019

कथा: टू बी ऑर नॉट टू बी...

हॉस्पिटलच्या वेटिंग रूम मध्ये सायली उदास बसून होती. आज शुभमने तिची साथ द्यावी असं तिला खूप मनापासून वाटत होतं. अचानक तो येईल अशी पुसटशी अशाही तिच्या मनात होती. पण त्याचवेळी तसं होणार नाही याची खात्रीही तिला होती 
     तिला मूल नको होतं. त्यामुळे अबॉरशन करण्याचा तिचा निर्णय पक्का होता. वेटिंग रूममध्ये बाजूला बसलेल्या आणि एका स्त्रीने खरं तर मुलीने तिला विचारलं, “कितवा महिना?” तिला काहीच उत्तर न देता ती गप्प बसून राहिली.  
“माझा पाचवा महिना आहे. हे मूल हवंय मला. माझ्या नवऱ्याची शेवटची आठवण आहे ही. दोन महिन्यापूर्वीच ते अपघातामध्ये गेले.” 
सायलीला तिच्याशी बोलायची अजिबात इच्छा नव्हती. पण एकतर ती खूप लहान दिसत होती आणि त्यात नवरा गेलाय हे तिने सांगितल्यामुळे तिच्याबद्दल सहानुभूती वाटू लागली होती. त्यामुळे मनात नसतानाही सायलीने तिला विचारलं, “तुम्ही एकट्याच आल्यात? तुमच्यासोबत अजून कोणी नाही आलं?”
“तुम्हीही एकट्याच आला आहात की”, ती बाई हसून म्हणाली. 
यावर सायली काहीच बोलली नाही.थोडावेळ शांततेत गेल्यावर ती बाई म्हणाली, “नवरा गेल्यावर सासरच्यांनी काही दिवस माहेरी पाठवलं. दोन्ही घरं तुझीच आहेत तू कुठेही रहा. सासू-सासरे,आई- वडील, भाऊ- वहिनी सगळी चांगली आहेत. पण या मुलाचा जन्म कोणालाच नकोय. मला माहिती आहे त्याचं कारण, काही दिवसांनी दुसरं लग्न करताना हे मूल त्यामध्ये अडसर ठरेल असं वाटतंय सगळ्यांना. 
“मग बरोबरच आहे त्यांचं. तुम्हाला तुमचं आयुष्य जगण्यासाठी धडपड करावी लागणार आहे. त्यात अजून एका जीवाची जबाबदारी कशासाठी? आयुष्य इतकं सोपं नाही. इथे प्रत्येक गोष्टीत संघर्ष आहे. आठवणींवर आयुष्य नाही जगता येत”, सायली.
“मी काही उच्चशिक्षित नाही. मला नोकरी नाही. आणि बाळाला जन्म द्यायचा तर अजून किमान वर्षभर तरी पैसे कमावण्यासाठी  काहीच करू शकत नाही मी. पण आपण खंबीर नाही यामध्ये त्या बाळाचा काय दोष? जन्माला येण्यापूर्वीच त्याचं अस्तित्व का संपवून टाकायचं? गावातल्या सरकारी दवाखान्यात रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांच्या बायकांपासून ते आंधळ्या पांगळ्या बायकांपर्यंत सगळ्यांना बाळं झालेली बघितली आहेत मी. कमी का होईना पण शिक्षणाची शिदोरी आहे माझ्याजवळ. सुदैवाने देवाने मला अगदी धडधाकट शरीर दिलं आहे. मग सगळं असताना या बाळाची जबाबदारी नाकारणं निदान मला तरी पटत नाही.” आठवणींवर जगता येत नाही पण आठवणींशिवायही माणूस जगू शकत नाही.” ती 
“या सगळ्या गोष्टी पुस्तकात वाचायला छान वाटतात पण प्रत्यक्ष आयुष्यात निभावणं खूप कठीण आहे”, सायली.
“काय कठीण, काय सोपं, हे सगळं आपल्या मानण्यावर असतं. बारावी झाल्यावर लग्न झालं माझं. शिकायची इच्छा होती खूप, पण नाही जमलं. तेव्हा परिस्थितीमुळे मनाविरुद्ध लग्नाला तयार झाले. संसार करणं जमेल का? हा मोठा प्रश्न होता. तेव्हा आजीने सांगितलं होतं. कुठलीही गोष्ट मनापासून केली की  सगळं जमतं. सुदैवाने नवरा चांगला होता. त्यामुळे दोन वर्षात या संसारात कधी गुंतून गेले कळलंच नाही. माझ्या शिक्षणाच्या आवडीबद्दल त्याला सांगितल्यावर त्याच दिवशी कॉलेजच्या अॅडमिशनचा फॉर्म घेऊन आला. ज्या दिवशी ऍडमिशन घेतली त्याच दिवशी ही गोड बातमी मिळाली. पण तरीही तो मागे आला नाही. त्याही परिस्थितीत त्याने मला शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं. एके काळी नको असणाऱ्या नात्यानेही भरभरून सुख दिलं मला. त्या नात्याची शेवटची आठवण असणारं बाळ मी कसं नाकारू?” दुसऱ्या लग्नाबद्दल म्हणाल तर अवघे दोन महिने झाले माझा नवरा जाऊन इतक्या लवकर त्याला विसरून कोणा दुसऱ्याचा विचार कसा करू? पुढे काय होईल माहिती नाही पण जे नातं निर्माण होईल की नाही माहिती नाही त्यासाठी मी या बाळाशी निर्माण झालेल्या नात्याला का संपवू?” ती.
  सायली काही बोलणार एवढ्यात त्या बाईचा नंबर आला आणि ती निघून गेली. स्वतच्याही नकळत ती त्या बाईच्या बोलण्याचा विचार करायला लागली होती. तिला आठवलं, प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर शुभम किती खुश झाला होता. पण तिच्यासाठी मुलाची जबाबदारी घेणं ही सोपी गोष्ट नव्हती. बाळामुळे शुभमची नोकरी, त्याचं करिअर जसं आहे तसं चालू राहणार होतं. फरक पडणार होता तो तिच्या करिअरवर तिच्या आयुष्यावर. बस फक्त हे एवढंच कारण होतं ही प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्याचं. 
तिला आठवलं, "निव्वळ तिला नॉन-व्हेज आवडत नाही म्हणून व्हेजिटेरिअन झालेला शुभम,
तिच्यासाठी कित्येक पार्टीज कॅन्सल करणारा शुभम,
निव्वळ तिच्यासाठी न आवडणाऱ्या टिपिकल बॉलिवूड मुव्हीज बघणारा शुभम,
आज त्याच्या मनाचा विचार न करता मी हा निर्णय घेतेय. त्याला काय वाटत असेल? 
हा कसला विचार करतेय मी?  इमोशनल फुल असल्यासारखा विचार करून माझं करिअर पणाला लावतेय मी. यावर्षी प्रमोशन ड्यू आहे. माझी गेल्या पाच वर्षांची मेहनत आता कुठे फळाला येतेय. त्यात ही जबाबदारी? काय करू मी? उगाच बोलले त्या बाईशी खरंतर मुलीशी. तिला काय कळतंय करिअर म्हणजे काय? गेले पाच वर्षे मी या संधीची वाट बघतेय. यासाठी घेतलेली मेहनत तिला कुठे माहिती आहे?”
    सायली सुन्न झाली होती. काय करावं तिला काहीच कळत नव्हतं. रिसेप्शनिस्टने तिचे नाव घेतलं. तिचा नंबर आला होता. ती चेकअप साठी केबिनमध्ये गेली. पण अबॉरशनबद्दल बोलायची किंवा विचारायची तिची हिम्मत झाली नाही. 
    डॉक्टरनी तिला तपासून टॅब्लेट्स आणि टेस्ट लिहून दिल्या व तिला इतर सूचना देऊन पुढची अपॉइंटमेंट दिली . सायली काहीही न बोलता यांत्रिकपणे वावरत होती. केबिनमधून बाहेर आल्यावर तिला स्वतःचाच राग येत होता. का बोलले नाही मी अबॉरशनबद्दल? मी बोलायला हवं होतं. हताश होऊन ती हॉस्पिटलमधून घरी जायला निघाली. 
    ती घरी आली. ती लॉक उघडणार तेवढ्यात शुभमने दार उघडलं. शुभमला घरी बघून तिला आश्चर्य वाटलं. ती आत येऊन सोफ्यावर बसली. तू गेला नाहीस ऑफिसला? तुझी महत्वाची मिटिंग होती ना आज?”
यावर उत्तर न देता शुभम म्हणाला, “झालं सगळं? केलंस तुझ्या मनासारखं? कधी करणार आहेस अबोर्शन? सगळं ठरवूनच आलीस का? अग काय वाटत होतं तुला, या बाळाच्या जन्मानंतर माझं आयुष्य सुरळीत चालू राहील? माझ्या करिअरवर त्याचा काहीच परीणाम होणार नाही?  अग 'यूएस'ला पाठवतेय कंपनी मला, एक वर्षासाठी. पण निव्वळ या बाळासाठी अजून होकार दिला नाही मी. तुझ्यासाठी नॉनव्हेज सोडण्यापासून हा फ्लॅट खरेदी करण्यापर्यंत सगळ्या अडजस्टमेंट्स केल्या तर तुला बाळाला सांभाळायला मदत नाही करणार? आयुष्य आपल्या दोघांचंही बदलणार. मी तयार होतो या बदलाला, अजूनही आहे. प्रत्येक गोष्टीला पर्याय असतो. थोडा विचार कर ग. अजून वेळ गेलेली नाहीये. नको करुस हे अबॉरशन. हे मूल हवंय ग मला. प्लिज फक्त एवढी गोष्ट ऐक माझी. पुन्हा कधीही काहीही मागणार नाही.”
 बोलता बोलता शुभमचे डोळे भरून आले होते. सायली अजूनही शांत होती. शुभम हतबल होऊन खाली बसला. काही क्षण तसेच शांततेत गेले.  
  "मला प्रमोशन हवंय पण त्यासाठी शुभमच्या भावनांचा आणि या बाळाचा बळी द्यावा लागेल. अचानक आयुष्याला एक वेगळंच वळण मिळालंय. हा निर्णय कठीण असला तरी घ्यावा तर लागणारच आहे. पण इतक्या वर्षांच्या मेहनतीचं काय? प्रमोशन स्वीकारलं तर बाळ आणि नोकरी या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळू शकेन का मी? दोन्ही ठिकाणी न्याय देऊ शकेन का?  ही तारेवरची कसरत झेपेल का मला? अखेर विचार करून सायलीने तिचा निर्णय घेतला. 
  “शुभम, उद्या रजा घेशील प्लिज? डॉक्टरांनी काही टेस्ट्स आणि सोनोग्राफी करायला सांगितली आहे. आणि हो घराचं इंटेरिअर थोडं चेंज करूया. अरे हो महत्वाचं म्हणजे आत्ता तू बाहेर जाऊन या टॅब्लेट्स आणशील? विशेष नाही मल्टिव्हिटॅमिन आणि फॉलिक ऍसिडच्या टॅब्लेट्स आहेत आणि येताना बाळाचं एक सुंदर  पोस्टर घेऊन ये तुझ्या आवडीचं! आणि …..” 
“म्हणजे सायली तू …. आपण… आय मिन आपल्या …. ”
“मी आपल्या बाळाला जन्म द्यायचा निर्णय घेतलाय शुभम”, सायली.
सायली? म्हणजे? खरंच? आय लव्ह यु सायली, तू आयुष्यातलं खूप मोठं सुख दिलयस मला आज. आपण सेलिब्रेट करू हा क्षण. मी आधी बाहेर जाऊन टॅब्लेट्स घेऊन येतो आणि संध्याकाळी आपण पोस्टर आणू आपल्या दोघांच्या आवडीचं. तू रेस्ट घे. मी आलोच जाऊन”, असं म्हणून शुभम जायला निघाला. 
सायलीला आता खूप शांत वाटत होतं. मनातले सगळे संभ्रम दूर झाले होते. एका अनोळखी व्यक्तीशी झालेल्या त्या काही मिनिटांच्या संभाषणाने तिच्या विचारांना, आयुष्याला एक नवीन दिशा दिली होती. "To be or not to be" च्या चक्रव्यूहातून तिची सुटका केली हाती.

©मानसी जोशी 

Tuesday, 9 July 2019

मावळतीचे रंग

"राघव,  हे काय? दिवा नाही लावलात अजून?"
"अगं, संध्याकाळ होऊन गेली ते लक्षातच नाही आलं."
"कशामध्ये रमला होतात एवढं? फेसबूक का मेसेंजर? रिटायर्ड झाल्यापासून सतत त्या मोबाईलला चिकटून असता. अहो एवढा वेळ तरुण पोरं पण त्या मोबाईलला चिकटून राहत नसतील."
"चालतं ग. तरुण वयात कुठे होते मोबाईल साधा लँडलाईनही फारसा वापरला नाही. जीव रमवतो आपला. आणि तू कुठे रमली होतीस आज? तुला पण उशीर झाला."
"अहो कट्ट्यावर त्या क्रिकेट मॅचवाल्या आजीबाईंची चर्चा रंगली होती त्यामुळे वेळेचं भान राहिलं नाही."
"अच्छा. पण काही म्हण रमा मानलं त्या बाईला. या वयातही किती उत्साह, अगदी एखाद्या लहान मुलांसारखी निरागस वाटत होती ती.
"हूं, तुम्हाला पण पडली का तिची भुरळ. कट्ट्यावरच्या सगळ्या बायकांचे नवरे फिदा आहेत तिच्यावर. 😏  काय ते पोरांसारखं पेपाटणं वाजवत होती. नाचत काय होती. उड्या काय मारत होती. ध्यान नुसतं."
"अगं किती चिडतेस? उलट मला कौतुक वाटतंय तिचं."
"करा तुम्हीपण त्या बयेचं कौतुक करा. काय नशीब असतं एकेकीचं म्हातारपणात पण चाहते मिळतात."
"आता या वयात काय मागणी घालणार आहे का मी तिला?"
"फेसबुकवर तरी नक्की शोधाल. मिळाली तर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवाल. आणि तिने ती स्वीकारली तर बघायलाच नको. रोजच चॅटिंग चालू. अगदी कौतुकाचा वर्षाव कराल तिच्यावर."
"कौतुक तुझंही आहे रमा. अगदी या वयातही तू कट्ट्यावर जातेस, स्विमिंग, योगा, हास्यक्लब, समाजसेवा सगळं करतेस. ज्या गोष्टी तरुण वयात करायच्या राहून गेल्या त्या सगळ्या गोष्टी अगदी उत्साहाने करतेस."
"आता नको उगाच मस्का मारू. उगाच खोटं खोटं कौतुक."
"नाही ग. खोटं नाही अगदी मनापासून बोलतोय. आपला एकुलता एक मुलगा असा अचानक आपल्यातून निघून गेल्यावर मी तर कोसळलोच होतो. पण तू स्वतःसकट मला सावरलंस. आज आयुष्याच्या मावळतीच्या दिवसांत कसं जगायचं? या प्रश्नावर 'मुक्तपणे' असा तू काढलेला तोडगा अगदी संजीवनीसारखं काम करतोय. पण तुला अगदी मनापासून सांगतो, या मुक्तपणाला पोक्तपणा नकोय, थोडा निरागसतेचाही स्पर्श होऊदे. कुठल्याही वयात आपल्यातलं लहान मूल जपता यायला हवं, जसं त्या #मॅचवाल्या_आजींनी जपलंय. हे जमलं पाहिजे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जर लहान मुलांसारखी निरागसता जपली ना तर आयुष्य एकदम सोपं होऊन जातं."
"खरं आहे हो तुमचं. प्रत्येक गोष्टीत निखळ आनंद मिळायला हवा. आपला एकुलता एक मुलगा देवाने आपल्यापासून हिरावून नेला. तो परत येणार नाही. पण एकाकी असलं तरी उरलं आयुष्य जगावं तर लागणारच आहे. मग ते रडत नाही तर हसत जगायला हवं."
दोघांच्याही डोळ्याच्या ओलावलेल्या कडा एकमेकांच्या नकळत पुसल्या जातात. हे दोघांच्याही लक्षात येतं.
राघव उठून देवासमोर दिवा लावतो. काही क्षण घरात शांततेत गेल्यावर, आता राघव भावुक होणार हे लक्षात येताच नेहमीप्रमाणे वातावरणाचा भार हलका करत रमा म्हणते, "पण तरीही तुम्ही कोणासमोरही त्या बयेचं कौतुक अजिबात करायचं नाही. 'माझा नवरा तिचा फॅन नाही', असं सांगून मला कट्ट्यावर मिरवता आलं पाहिजे.
रमाच्या या वाक्यावर दोघेही हसतात आणि अजून एक दुखरी संध्याकाळ हसत हसत मावळते.

©मानसी जोशी

Monday, 24 June 2019

स्कुल बस स्टॉपची अनोखी दुनिया

स्कुल बसचा स्टॉप ही जागा म्हणजे आई वर्गाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जणींच्या ओळखी तिथे होतात. सकाळच्या वेळेत तर इथली मजा अनुभवण्यासारखी असते. अनेकदा कित्येक दिवस आपण जिच्याशी बोलत असतो तिचं नावही माहिती नसतं. खरंतर त्याची गरजही नसते. अमुक अमूकची आई एवढी ओळख पुरेशी असते. पहाटे लवकर उठून लेकरांना आणि त्यांच्यासाठी डबा तयार करून बसची वेळ गाठण्यासाठी धावत पळत येणाऱ्या समस्त आयांचा थकवा बस स्टॉपवरच्या एखादया गॉसिपनेही कुठल्या कुठे पळून जातो..
    एरवी अगदी टापटीप आवरल्याशिवाय सोसायटीच्या गेटपर्यंतही न जाणाऱ्या, बस स्टॉपवर जायला निघताना मात्र ड्रेसला लागलेलं पोळीचं पीठ झाडत केसांवरून कंगवा नाही हात फिरवून केस सारखे करत बस स्टॉप गाठतात.
     मुलं गेली की, "जा सिमरन जा जिले अपनी जिंदगी" अशा थाटात मॉर्निंग वॉकला निघणाऱ्या; शाळा, सोसायटी, क्लास, सासू, नणंद, जाऊ अशा अनेक जिव्हाळ्याच्या विषयावर गॉसिप करत अर्धा एक तास स्टॉपवरच उभ्या राहणाऱ्या; ऑफिस आहे म्हणत निव्वळ गॉसिप ऐकण्यासाठी दोन मिनिटं थांबून नाईलाजाने निघून जाणाऱ्या अशा  विविध वैशिष्ट्यपूर्ण जमाती या स्टॉपवर पहायला मिळतील.
   तसंच नाईलाजाने जीवावर उदार होऊन,अर्धवट झोपेतून उठून आलेले, प्रत्येक येणाऱ्या बसकडे आशेने बघणारे, मोबाईलमध्ये डोकं खुपसून उभं राहणारे (हे करताना हळूच एखादा चोरटा कटाक्ष एखाद्या देखण्या चेहऱ्याकडे टाकणारे), अशा प्रजातीही इथे पहायला मिळतात.
    प्रत्येक बसची वेळ ठरलेली असते, इतकंच काय त्या येण्याचा सिक्वेन्सही माहिती झालेला असतो. छोट्या छोट्या गल्ल्यांमधून मोठ मोठ्या गाड्या चालवणाऱ्या  स्कुल बस ड्रायव्हर्सचं मला प्रचंड कौतुक वाटतं.
   एरवी सुट्टीत यातल्या कोणाशी फारसा संबंध येत नाही. क्वचित रस्त्यात दिसल्यावर दुरूनच एक 'स्माईल' फेकलं जातं. पण शाळा सुरू झाल्यावर आयुष्य पुन्हा सुरू झाल्यासारखं वाटतं. मे मध्ये शांत असणाऱ्या रस्त्यावर पुन्हा रहदारी वाढते. कधी कधी सगळ्या गाड्या एकाच वेळी येतात आणि गोंधळ होतो. मुलं मात्र ही धमाल एन्जॉय करत असतात.
      गप्पात रंगलेल्या आया बघून दगड, पानं, फुलं गोळा करणारी, मस्ती करणारी आणि मधूनच एखादा दणका खाणारी मुलं बघितली की रस्त्यावरचं हरवलेलं चैतन्य परत आल्यासारखं वाटतं. कधी कधी मुलांचं नाव माहिती नसतं पण त्याची बस मात्र माहिती असते. कधी आरामात चालत येणाऱ्या एखादया मुलाची बस येताना दिसली की पालक ड्रायव्हरला थांबायला सांगतात तर मुलं इतक्या मोठ्या आवाजात त्याला/ तिला हाका मारतात की, आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये झोपलेली लोकं खडबडून जागी होत असतील. अशी ही स्कुल बस स्टॉपची #एक_वेगळीच_दुनिया आणि इथली एक #वेगळीच_दुनियादारी!

Tuesday, 18 June 2019

अंकांमधील बदल कितपत योग्य ?

महाराष्ट्रात दर १४ मैलावर भाषा बदलते असं म्हणतात. एकच मराठी भाषा पण त्यामध्ये एकूण ५२ प्रकारच्या बोली भाषा बोलल्या जातात. पण यामध्ये गमतीचा भाग म्हणजे प्रत्येक बोलीभाषेत  #मराठी_आकडे मात्र सारखेच आहेत. (उच्चाराचा फरक असूच शकतो कारण उच्चारांवर बोली भाषेचं प्रभुत्व असतं).
    तर मुद्दा तोच जो गेले ४/५ दिवस सोशल मीडियावर गाजतोय.
दहा दोन, पन्नास सहा, दहा सात….. ( लक्षात आलं असेलच)
    हा बदल करण्यामागे जी काही स्पष्टीकरणं देण्यात येत आहेत ती अजिबात म्हणजे अजिबातच पटणारी नाहीत.
स्पष्टीकरण क्र. १
जोडाक्षरे: हे अतिशय हास्यास्पद स्पष्टीकरण आहे.  
इतकी वर्षे मुलं शिकत आली आहेत, हा मुद्दा तर आहेच, पण जाऊदे हा मुद्दा बाजूला ठेवूया उगाच 'भूतकाळावर बोलू काही… ' असं नको.
आमच्या महाराष्ट्रात आम्ही मुलांना लहानपणी गणपती स्तोत्र, मारुती स्तोत्र, रामरक्षा, मनाचे श्लोक, पसायदान हे सर्व किंवा यातलं काही ना काही शिकवत असतो. त्यामुळे आकड्यांची जोडाक्षरे उच्चारताना त्यांना कठीण वाटण्याचा संबंधच नाही.
बरं धरून चालू नाही शिकवत आम्ही यातलं काहीच. पण शाळेत जन-गण-मन आणि प्रतिज्ञा तरी मुलं म्हणत असतीलच ना?
जोडाक्षरांच्या उच्चारामुळे मुलांचे उच्चार अधिक स्पष्ट होतात, हे तर सिद्ध झालं आहे.
बरं या सगळ्या अवांतर गोष्टी जाऊदेत.
  सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये 'फॉनिक्स' नावाचा प्रकार अनेक शाळांमध्ये शिकवला जातो. अगदी मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांनाही पहिलीपासून इंग्रजी शिकवले जात असल्यामुळे अनेक शाळांमध्ये हा प्रकार शिकवला जातो.
    'फॉनिक्स'मध्ये इंग्रजी अल्फाबेट्सचा उच्चार कसा करायचा हे शिकवतात.  सुरवातच A says 'अॅ' …. 'E says ए'....G says 'ग'…. या पद्धतीने उच्चार शिकवले जातात.  पण यामध्ये मुलांचं #confusion होत नाही. इतकंच काय तर मुलांना 'फॉनिक्स' हा शब्द उच्चारणे सत्तेचाळीस, त्रेपन्न, नव्वद अशा शब्दांपेक्षा सोपा वाटत असेल नाही?
  बरं ते फॉनिक्स बाजूला ठेवू. पण इतर इंग्लिश आकडे तरी पहिलीपासून शिकवत असतील? मग Three, six, Twelve, Thirteen…. हे सगळे उच्चार सोपे आहेत आणि ही जोडाक्षरे नाहीत हे मला नव्यानेच कळलं.
बरं उच्चारही बाजूला ठेवूया. मुलांना जोडाक्षरे लिहिणं कठीण जातं, हा मुद्दा धरला तर अनेक मुलांना त्यांचं नाव, वडिलांचं नाव, आण्णाव, घर/ गाव/ तालुका/ जिल्हा/ क्वचितप्रसंगी शाळेचं नावही लिहिणं कठीण होत असेल, तर ते ही बदलायचं का? (मी इथे आपल्या राज्याच्या नावविषयी काहीही लिहीत नाही. उगाच बदललं जाण्याची भीती ओ दुसरं काही नाही.)
 आमच्या इथल्या भाजी मंडईत शाळेत न जाणारी, जेमतेम ५ वी/ ६वी शिकलेली असतील/ नसतील, अशी मुलं भाजी विकायला बसलेली असतात. ती मुलं ज्या पद्धतीने हिशोब करतात त्याचं खूप कौतुक वाटतं मला. अगदी कमी शिकूनही मराठी आकडे उच्चारणे, हिशोब करणं त्यांना कठीण वाटत नाही. असो.

स्पष्टीकरण २:
संस्कृत आणि इंग्रजी भाषेचा संदर्भ
हे स्पष्टीकरण अतिशय कीव आणणारं आहे. प्रत्येक भाषा वेगळी असते. त्यामुळे एका भाषेची तुलना दुसऱ्या भाषेशी करण्याची गरजच काय? कोणतीही व्यक्ती कितीही हुशार असली तरी तिला भाषा बदलण्याचा अधिकार अजिबात नाही.
     "संस्कृत ही मराठीची जननी आहे." १००% मान्य! पण मुलीने आईसारखेच असले पाहिजे हा अट्टाहास चुकीचा नाही का? प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. त्या व्यक्तीची गुणवैशिष्ट्ये वेगळी असतात. तशीच प्रत्येक भाषा व तिची रचना, तिची वैशिष्ट्ये ही वेगळीच असतात. त्यामुळे या स्पष्टीकरणाला तर अजिबात अर्थ नाही.

आता प्रॅक्टिकल मुद्दा - खरंतर मुलांना दुसरीत नाही तर खूप लहान वयातच आकडे शिकवले जातात. अगदी सिनिअर केजी किंवा मोठ्या गटात फारफार तर पहिलीत शंभर पर्यंतचे आकडे शिकवले जातात.  मग मुलांना गेली २/३ वर्ष जे शिकलात ते चुकीचं होतं, असं सांगायचं का? यामुळे मुलांचा गोंधळ उडणार नाही?
या साऱ्यांमुळे किती गोंधळ होणार आहे याचा विचार शिक्षणमंडळाने केला नाही की त्यांना तो करायचा नाहीये?

तळटीप: मी कोणीही भाषा अभ्यासक नाही. पण भाषा बदलण्याचा अधिकार कोणालाच नसतो. हा बदल हा मराठी भाषेचा अपमान तर आहेच. पण त्या पेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे हा बदल एकूणच शिक्षण पद्धतीला धोकादायक आहे, म्हणून हा पोस्टप्रपंच!

©मानसी जोशी

Monday, 3 June 2019

मिस यु युवराज..

तो आला, तो खेळला आणि त्याने जिंकलं…!!!
२००० साली अंडर १९ क्रिकेट टीम इंडियाने जिंकला. त्या वर्ल्ड कपचा #प्लेअर_ऑफ_द_सिरीज होता #युवराज_सिंग.
२००७ साली T20 वर्ल्ड कप टीम इंडियाने जिंकला. त्या वर्ल्ड कपनंतर २००८ साली एका भारतीय खेळाडूला आयसीसी अवॉर्डस मध्ये #टी_२०_इंटरनॅशनल_प्लेअर_ऑफ_द_इअर  पुरस्काराने गौरविण्यात आले, तो प्लेअर म्हणजे युवराज सिंग.
२०११ साली भारतीय क्रिकेट जगतात वानखेडे स्टेडिअमवर माहिच्या टीमने इतिहास घडविला. भारताने वर्ल्ड कप तर जिंकलाच शिवाय #मॅन_ऑफ_द_सिरीज चा किताबही भारतीय खेळाडूला मिळाला, तो खेळाडू म्हणजे युवराज सिंग!
त्यानंतर त्याला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. पण म्हणतात ना दुर्धर इच्छाशक्ती आणि आकाशाला गवसणी घालण्याची स्वप्न जाच्याजवळ असतील तो नियतीलाही हरवू शकतो. आणि झालंही तसंच, कॅन्सरवर मात करून युवराज परत आला आणि त्याने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये पुनरागमन केले.
   कॅन्सरचं निदान होईपर्यंतचा काळ, ते निदान झाल्यानंतरचा आणि उपचारादरम्यानचा काळ युवराजसाठी सोपा नव्हता. त्याची खालावत जाणारी तब्बेत आणि ठासळत जाणारी मनस्थिती त्याला निराशेच्या खोल गर्तेत ढकलत होती. पण या निराशेवर मात करून त्याने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली. युवराजच्या #द_टेस्ट_ऑफ_माय_लाईफ या पुस्तकात युवराजने त्याचं बालपण, क्रिकेट करिअर, कॅन्सरची सुरुवात झाल्यापासून बरं होऊन पुन्हा मैदानात खेळायला उतरेपर्यंतचं संपूर्ण वर्णन केले आहे. कॅन्सरच्या आजारादरम्यान त्याची बदलत जाणारी मनस्थिती आणि क्रिकेटपासून सुरू होऊन क्रिकेटपर्यंतच येऊन थांबणार प्रश्न  वाचून गहिवरून जायला होतं.
  "Whatever happens tomorrow I just want God above to give us the 'World Cup'. He can take whatever he wants, take away my life, giving me pain…..God, just give me World Cup."
फायनल मॅचच्या आदल्या दिवशी रात्री गोळ्या द्यायला आलेल्या  संघाच्या डॉक्टरांशी युवराज भावूक होऊन बोलत होता. युवराजच्या आजाराच्या लक्षणाची सुरुवात २०११ च्या वर्ल्ड कपच्या आधीच झाली होती. संघाच्या डॉक्टरांनी त्याला चेक अप करुन घ्यायचा सल्लाही दिला होता. परंतु त्याने तो गांभीर्याने घेतला नाही. मॅचदरम्यान खेळताना त्याला होणारा त्रास त्याने निव्वळ वर्ल्ड कप जिंकायच्या इच्छाशक्तीच्या जोरावर सहन केला होता.
 युवराज केवळ चांगला खेळाडू नव्हे तर तो एक चांगली व्यक्तीही आहे. म्हणूनच स्वतः बरं झाल्यानंतर कॅन्सर पेशंट्सच्या मदतीसाठी  #You_can नावाची संस्था सुरू केली आहे.
 पण या साऱ्यानंतर २०१५ सालच्या वर्ल्ड कपमधून युवराजला वगळण्याची न्यूज आली आणि धक्का बसला. आधीच्या वर्ल्ड कपचा हिरो वर्ल्ड कप खेळणार नाही हेच मनाला पटत नव्हतं. त्याची निवड न होण्यामागची कारणे काहीही असुदेत पण प्रत्येक वेळी युवराज हवा होता हेच वाटत होतं.
 या वर्ल्ड कपमध्येही युवराज नसणार हे माहिती होतं, तरीही एक वेडी आशा होती. पण …
   कितीही नाकारलं तरी यापुढच्या कुठल्याच वर्ल्ड कपमध्ये युवराज खेळणार नाही हेच खरं आहे.  
   वर्ल्ड कप सुरू होऊन आठवडा होत आला. उद्या भारताची वर्ल्ड कपमधली पहिली मॅच आहे. पण मनात सतत एकच विचार येतोय ….  #Miss_you_Yuvaraj

© मानसी जोशी
फोटो: गुगलावरून साभार


Tuesday, 16 April 2019

सेल्फ मेडिकेशन

सेल्फ मेडिकेशन

….My favorite part of the chemist is the guy who stands behind the counter. Because abroad Pharmacies are very strict and they will not give you medicines without a prescription. But, in India guy behind the counter gives you prescription…   

स्टँड अप कॉमेडीचा एक व्हिडिओ बघताना लक्षात राहिलेला हा पार्ट. . खरंच बरेचदा असं होतं. काही होत असलं की डॉक्टरांकडे न जाता डायरेक्ट मेडिकल स्टोअर गाठायचं आणि तो देईल ते औषध घ्यायचं. किती तो आंधळा विश्वास त्या मेडिकल स्टोअरमधल्या माणसावर?
अगदी मेडिकल स्टोअर कशाला मित्र मैत्रिणी, नातेवाईक, कलीग, इत्यादी कोणाच्याही सल्ल्याने अनेकदा औषधं घेतली जातात. आजकाल तर सोशल मीडियावर सल्ले मागायचं नवीन फॅड आलं आहे. म्हणजे ज्या व्यक्तींना आपण ओळ्खतही नाही, ज्यांना कधी भेटलो नाही इतकंच काय तर बघितलंही नाही, अशा व्यक्तींनी सांगितलेल्या औषधांचा प्रयोग आपल्या शरीरावर करायचा?
या सगळ्यांच्या पलीकडे एक एक्सपर्ट सगळ्यांच्या आयुष्यात आहे. सगळे त्याच्याकडून सल्ला घेतात. मी अगदी प्रांजळपणे कबूल करते की मी सुद्धा त्याचा सल्ला घेतला आहे. ते म्हणजे “गूगल सर्च इंजिन!”
जरा काय झालं की गुगल करायची जवळपास सगळ्यांनाच सवय असते. इतकंच काय तर डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेल्या औषधांची माहिती, त्याचे साईड इफेक्ट्स याबद्दलची माहितीही गुगल करणारे महाभाग कमी नाहीत.
हे सगळं का?
डॉक्टरांकडे जायचा आळस? त्यासाठी नसणारा पैसा किंवा वेळ? का पैसा खर्च करायची नसणारी तयारी?
सेल्फ मेडिकेशनचा अजून एक मार्ग म्हणजे आयुर्वेदिक औषधे घेणे. अनेकांचा असा (गैर)समज असतो आयुर्वेदिक औषधांचा कोणताही साईड इफेक्ट नसतो. माझाही होता. ज्यांना असं वाटतं त्यांनी याबद्दल फक्त आयुर्वेदिक डॉक्टरांना विचारून बघा, म्हणजे खरं काय आहे ते लक्षात येईल.
कारण काहीही असुदे. सेल्फ मेडिकेशन करताना आपण आपल्याच आरोग्याशी खेळत असतो.
2015 साली टाईम्स ऑफ इंडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार भारतामध्ये 52% लोक सेल्फ मेडिकेशन करतात. डॉक्टरांच्या मते हे धोकादायक आहे. कारण आजार जरी सारखा असला तरी प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार त्याची ट्रीटमेंट ठरते. अनेक क्रोनिक आजारांचं कारण हे “सेल्फ मेडिकेशन किंवा चुकीचे औषधोपचार” हे आहे. सेल्फ मेडिकेशनमुळे मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
“जरा काय झालं की डॉक्टर कशाला हवेत?”
माझं असं अजिबात म्हणणं नाही की सेल्फ मेडिकेशन संपूर्णतः  चुकीचच आहे. सर्दी झाली की घरगुती काढा घेणे, वाफारा घेणं असे उपाय आपण करू शकतो, करतोच. पण तीच सर्दी जर दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस राहिली तर तिसऱ्या दिवशी डॉक्टरांकडे जाणं हिताचं आहे.
    काही दिवसांपूर्वी माझी मुलगी दुपारी शाळेतून रडतच घरी आली.  तिच्या पोटात दुखत होतं. आदल्या दिवशीच घरी पाणीपुरी केली होती. ती भरपूर खाल्ल्यामुळेच हा त्रास होतोय, हे माझ्या चटकन लक्षात आलं. त्यामुळे पोट शेकण्यापासून, पाचक देण्यापर्यंत सगळे घरगुती उपाय मी केले. पण तरीही काहीच फरक पडत नाही म्हटल्यावर संध्याकाळी डॉक्टरांकडे घेऊन गेले. पोटदुखीचं कारण तेच होतं, अजीर्ण. पण डॉक्टरांच्या औषधांमुळे तिला एका रात्रीत आराम पडला.
    पूर्वीच्या काळी घरात अनुभवी आजी आजोबा असायचे. त्यामुळे, घरात कोणाला काही झालं की आजीच्या बटव्यातली औषधं हा बरेचदा रामबाण उपाय ठरायचा. परंतु आता परिस्थिती वेगळी आहे. आता अनुभव कमी आणि बटवा मात्र भरलेला अशी परिस्थिती आहे.    
“एवढ्या टेस्ट्स? नक्कीच लॅबवाल्याशी त्यांचं कनेक्शन असणार.”
“इतकी औषधं? नक्कीच मेडिकलवाल्याकडून त्यांना कमिशन मिळत असणार.
हे असे विचार अनेकांच्या मनात सतत घोळत असतात. चांगलं आहे तिथे वाईट असणारच. मेडिकल फिल्डही यासाठी अपवाद नाही. त्यामुळे एकवेळ धरून चालू तुमच्या मनात येणाऱ्या शंका खऱ्या आहेत.
पण त्यावर उपायही आहेत.
अनेक नामांकित लॅब टेस्टसाठी खूप चांगलं डिस्काउंट ऑफर करतात…
मेडिकल शॉप्स तर आजकाल गल्लोगल्ली आहेत. त्यामुळे अमुक एका मेडिकल स्टोअरमधूनच औषधं घ्या असं कुठले डॉक्टर सांगत असतील असं मलातरी वाटत नाही. शिवाय आता ऑनलाईन मेडिकल खरेदीचा पर्यायही सध्या उपलब्ध झाला आहे.
तुम्हाला पटत नसल्यास तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करा. गरज वाटल्यास सेकंड ओपिनिअन घ्या.  पण तब्येतीच्या बाबतीत हेळसांड करु नका. चार पैसे वाचविण्यासाठी तुमचा लाख मोलाचा जीव धोक्यात घालू नका.
कोणी आपला पैसा कुठे व कसा खर्च करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.  स्वतःच्या मेहनतीच्या पैशातून 500 रुपयांचा पिझ्झा खा किंवा मॉलमध्ये हजारो रुपयांचे शॉपिंग करा, तो तुमचा अधिकार आहे. पण डॉक्टर, औषधे, लॅब यावर खर्च करायला नको म्हणून सेल्फ मेडिकेशनचा पर्याय मात्र निवडू नका. काय माहिती, आज वाचवलेले शेकडो रुपये उद्याच्या लाखो रुपयांच्या खर्चाचे कारण ठरू शकतील. त्यामुळे सेल्फ मेडिकेशन करण्यापेक्षा सेल्फ- मेडिटेशन करा, त्याने जास्त फायदा होईल.

©मानसी जोशी


Wednesday, 6 March 2019

ज्वाला मंदिर - एक अविस्मरणीय अनुभव

ट्रिपचं प्लॅन करत असताना नेटवर अचानक एक ठिकाण दिसतं आणि ते ठिकाण तुमच्या लिस्टमध्ये must visit place मध्ये ऍड केलं जातं.अगदी तसंच झालं…
हिमाचल प्रदेशमधील टुरिस्ट प्लेसेस नेटवर सर्च करत असताना ज्वालामुखी मंदिराची माहिती मिळाली. का कुणास ठाऊक पण या मंदिराबद्दल मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आणि नेटवरून त्याबद्दलची अजून माहिती मिळवली. जितकी माहिती मिळत गेली तितकी उत्सुकता वाढत गेली आणि काही झालं तरी या ठिकाणी जायचंच असं ठरवलं.
ट्रिपच्या सुरुवातीच्या दोन दिवसांचं प्लॅनिंग पाऊस आणि स्नो फ़ॉलमुळे विस्कळीत झालं होतं. मी नेटवर सतत तिथलं वेदर फोरकस्ट बघत होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथलं वेदर फोरकस्ट अगदी परफेक्ट येत होतं. तिसऱ्या दिवशी ऊन पडावं म्हणून सतत मनात देवाला प्रार्थना करत होते. पहिल्यांदा बघताना स्नो फॉल कितीही आनंददायी वाटत असला तरी सततच्या स्नो फॉलमुळे आणि ढगाळ वातावरणामुळे मनात एक प्रकारचं डिप्रेशन येतं. त्यात तिकडचं मायनस टेम्प्रेजरही सोसवत नव्हतं. ही ट्रिप अशीच फुकट जाणार असा निगेटिव्ह विचार सतत मनात येत होता.
तिसऱ्या दिवशी सकाळी जाग आल्यावर सर्वात आधी रूममधल्या खिडकीचे पडदे बाजूला करून बाहेर बघितलं आणि तिथलं सुंदर दृष्य बघून हरखून गेले. बर्फाची शाल पांघरलेल्या हिमालयाच्या पर्वतरांगा आणि त्यावर पडलेली सूर्याची सोनेरी किरणे. सृष्टीच्या सौंदर्याचा अवर्णनीय नजारा! तब्बल दोन दिवसानंतर सूर्यनारायणाचे दर्शन झाले होते. क्षणात रूमचा दरवाजा उघडून गॅलरीत गेले आणि सर्वात आधी सूर्यनारायणाला नमस्कार केला. सूर्य म्हणजे ऊर्जेचा स्रोत! मनातली सगळी मरगळ दूर करण्याचं त्या कोवळ्या किरणांमधील सामर्थ्य बघून नकळतपणे या सृष्टीच्या निर्मात्यासमोर मी नतमस्तक झाले. जणू काही खूप वर्षांनी सूर्योदय बघतेय असं वाटत होतं. नजरेच्या कॅमेऱ्यामध्ये उगवत्या सूर्याचे रूप साठवून लगेच मोबाईलकडे धाव घेतली.
 त्यानंतर त्या दिवशी ठरल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित पार पडलं. रात्री रूममध्ये आल्यावरही फ्रेश वाटत होतं. रात्री झोपण्यापूर्वी दुसऱ्या दिवशीचं वेदर फॉरकस्ट बघितलं आणि  mostly sunny हे शब्द बघून मन सुखावलं. आत्तापर्यंतचं सगळं फोरकास्ट अगदी बरोबर येत होतं. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही ऊन असणार याबद्दलचा विश्वास हळूहळू वाढू लागला होता. तरीही मनातून मात्र कुठेतरी भीती होतीच. अपेक्षेनुसार दुसऱ्या दिवशीही ऊन पडलं. मनातून खूप आनंद झाला कारण त्या दिवशी या ट्रिपमध्ये must visit लिस्टमध्ये ऍड केलेल्या ठिकाणी म्हणजेच ज्वालामुखीला जायचं होतं.
   सगळं आवरून निघालो आणि नेमकं बाहेर पडायच्या वेळी अचानक कंबरेतून जोरात कळ आली. ज्वालादेवीची माहिती मिळाल्यापासून काहीही झालं तरी ज्वालादेवीला जायचंच हा निश्चय मनात केला होता. पण कंबरेतून आलेल्या कळीमुळे मला जागेवरून हलताही येत नव्हतं. बाम, तेल लावून थोडं बरं वाटलं. पण तरीही अधूनमधून कंबरेतून जोरदार कळा येतच होत्या. शेवटी पेनकिलर घेतली. खरंतर पेनकिलर घेणं मी नेहमी टाळत असते. पण त्या दिवशी काहीच पर्याय नव्हता   
मी आस्तिक किंवा देवभोळी नाही आणि नास्तिकही नाही. माझा कर्मावर प्रचंड विश्वास आहे. पण काही काही वेळा मात्र मी प्रचंड धार्मिक होते. त्या दिवशीही तसंच झालं. दर्शनाची ओढ एवढी तीव्र होती की शारीरिक त्रासावर तिने सहज मात केली. का माहिती नाही पण त्या जागेविषयी मला प्रचंड ओढ वाटत होती. अगदी नेटवर जेव्हा हे ठिकाण पहिल्यांदा बघितलं तेव्हापासूनच तिथे जायची जबरदस्त आंतरिक ओढ मनात निर्माण झाली होती.
  ज्वालामुखीला जायला धरमशालाहुन थेट बसेस आहेत. स्टेट ट्रान्सपोर्टच्या बसेस बरोबरच प्रायव्हेट बसचा पर्यायही आहे. पण तरीही  डायरेक्ट बसची संख्या मर्यादित आहे. सर्वात बेस्ट ऑप्शन म्हणजे धरमशाला वरून कांग्राला जायचं. कांग्रा बस स्टँडवरून स्टेट ट्रान्सपोर्ट किंवा प्रायव्हेट बसचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. हिमाचल प्रदेशमधील जवळपास सर्व बस स्टँडवर आलेला सुखद अनुभव म्हणजे तिथे चौकशी केल्यानंतर अगदी शांतपणे सविस्तर माहिती सांगितली जाते. बसमध्येही कंडक्टर अगदी व्यवस्थित माहिती सांगतात. विशेष म्हणजे इथल्या बस स्टँडवर स्टेट ट्रान्सपोर्ट बससोबतच प्रायव्हेट बसही लागतात. स्थानिकांना दोन्हीतला फरक पटकन ओळखता येत असला तरी बाहेरच्या लोकांना मात्र सहजी कळत नाही. टुरिझम हा तिथला मुख्य व्यवसाय असल्यामुळे असेल कदाचित पण तिथली माणसं मुळातच अगत्य करणारी वाटली. दुसरी नोटिस करण्यासारखी गोष्ट म्हणजे बसमध्ये अगदी शेवटच्या सीटवर जरी बसलं तरी उडायला होत नव्हतं. अगदी वळणावळणाचे छोटे छोटे रस्ते असूनही प्रवासाचा त्रास अजिबात जाणवत नाही. तिथले रस्ते बघून मला आमच्या कोकणातले रस्ते आठवले. “हिमाचल म्हणजे कोकणचा मोठा भाऊ आहे.” माझं हे वाक्य अनेकांना अतिशयोक्ती वाटेल किंवा पटणार नाही. पण तिथले रस्ते आणि एकंदरीतच सगळं वातावरण बघुन काही क्षण कोकणचा फील आल्याशिवाय रहात नाही. कोकणात सह्याद्रीच्या डौलदार रांगा तर इथे हिमालयाच्या पर्वतरांगा. कोकणात उंच उंच वाढणारी नारळ, पोफळी तर इथे देवदार आणि ओकचे वृक्ष.  समुद्रकिनारी वसल्यामुळे कोकणातली हवा दमट तर इथली प्रचंड थंड. वातावरणातील हा मुख्य फरक हिमाचल आणि कोकणास वेगळे करतो. तसं बघायला गेलं तर हिमालयाची निर्मिती समुद्रापासूनच झाली आहे. त्यामुळे हिमालयाच्या कुशीत क्षणभर का होईना कोकणचा भास होणं, यामध्ये काहीच विशेष नाही.
  ज्वालादेवी मंदिर परिसरातच बस स्टॉप असल्यामुळे बसमधून उतरल्या उतरल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्रसाद, पूजेची थाळी, देवतेवतांच्या मूर्ती, कीचेन इत्यादींची दुकाने दिसत होती. मला वाटतं भारतातल्या कुठल्याही प्रदिद्ध मंदिरात अथवा मठात जाताना सर्वप्रथम  रस्त्याच्या दुतर्फा मांडलेली ही दुकाने आपलं स्वागत करतात. संपूर्ण प्रवासात कंबरेतून येणाऱ्या कळा अधूनमधून त्रास देत होत्या. ज्वालामुखी मंदिरात जाताना थोडं चढावं लागतं. त्यामुळे पायऱ्या चढतानाही थोडासा त्रास होत होता. पण हा त्रास सहन करण्यासारखा होता. खरंतर दर्शनाची आंतरिक उर्मी होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करायला भाग पाडत होती. थोडंस चालून गेल्यावर डाव्या बाजूला चपला स्टँड आहे. विशेष म्हणजे तिथे आपल्या चपला ज्या कप्प्यात ठेवलेल्या असतील तो नंबर आपण लक्षात ठेवायचा. तिथे कोणीही माणूस उपलब्ध नसतो. इतर ठिकाणी असतात तशी पूजेच्या थाळीच्या बदल्यात चपला ठेवून घेणारी दुकानेही तिथे आहेत. त्यानंतर थोडं पुढे गेल्यावर उजव्या बाजूला ‘लंगर’ आहे. तिथे एका मोठ्या हॉलमध्ये सर्वांना मोफत भोजन दिले जाते. हॉलमधून सरळ आत गेल्यावर आतमध्ये ताट, वाटी, भांड, चमचे सर्व ठेवलेलं असतं. त्यामधलं आपल्याला जे हवं ते घेऊन हॉलमध्ये अंथरलेल्या बैठकांवर जेवायला बसायचं. जेवण वाढतानाही शांतपणे वाढलं जातं.  जेवणानंतर आपलं ताट, वाटी जे काही असेल ते स्वच्छ धुवून जागेवर ठेवायचं. एकंदरीत स्वावलंबन हा या मंदिराचा पहिला नियम आहे असं वाटत होतं आणि हे नक्कीच कौतुकास्पद होतं.
   ज्वालादेवी मंदिर प्रमुख शक्तिपीठांपैकी एक आहे. प्रजापती दक्ष यांच्याकडून एक यज्ञ आयोजित करण्यात आला होता. या यज्ञासाठी भगवान शंकर सोडून इतर सर्वांना आमंत्रित करण्यात आले होते. आपल्या वडिलांच्या अशा वागण्यामुळे अपमानित झालेल्या सतीने स्वतःला हवनकुंडात झोकून दिले. हे कळल्यावर अतीव दुःख आणि रागामुळे वेडेपिसे झालेले भगवान शंकर सतीचे जळलेले शरीर घेऊन त्रैलोक्यात धावू लागले. त्यांना शांत करण्यासाठी भगवान विष्णुंनी सुदर्शन चक्राने सतीच्या शरीराचे अनेक तुकडे केले. पृथ्वीवर जिथे जिथे हे तुकडे पडले ती जागा शक्तीपीठ समजली जाते. ज्वालामुखी मंदिराच्या जागी सतीची जीभ पडली अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.
मुख्य मंदिरामध्ये देवीची मूर्ति नसून देवळाच्या मध्यभागीं एक खड्डा आहे. खड्डयाच्या आंतून एकसारखी ज्वाला वर येत असते. आणखी दोन ठिकाणींहि डाव्या व मधल्या खडकांतून अशाच तर्‍हेच्या ज्वाला बाहेर पडतांना दिसतात. मुख्य मंदिर आणि आणि परिसर मिळून एकूण सात ज्वाळा आहेत. या ज्वाळा सात देवीचं प्रतिनिधित्व करतात.
मुगल सम्राट अकबरने मुख्य मंदिरामधील ज्वाळा विझवायचा खूप प्रयत्न केला होता. ज्वाळेवर सतत पाण्याचा मारा होईल अशी व्यवस्था केली होती. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यानंतर त्यावर लोखंडाची मोठी ढाल ठेवून ज्वाळा विझवायचा प्रयत्न केला. परंतु या प्रयत्नात ते लोखंड वितळून ढालीला भोक पडलं. त्यानंतर मात्र हतबल झालेल्या अकबर राजाने आपले प्रयत्न थांबवले. ही ढाल परिसरातील एका मंदिरात काचेच्या बंद पेटीत ठेवण्यात आली आहे. ज्वालामुखीच्या मुख्य मंदिरात फोटो काढायला मनाई असल्यामुळे तिथला फोटो काढता येत नाही. पण आजूबाजूच्या इतर मंदिरांमध्ये तसेच या ढालीचा फोटो काढायला मात्र परवानगी आहे.
मंदिर परिसरात इतर अनेक देवतांची मंदिरेही आहेत. यातील महत्वाचे ठिकाण म्हणजे गोरखडीब्बी. निसर्गाच्या चमत्कारांपैकी एक चमत्कार इथे पहायला मिळतो. येथील एका कुंडात पाणी उकळत असल्यासारखे वाटते पण प्रत्यक्षात हात लावल्यावर मात्र हाताला थंडगार पाण्याचा स्पर्श होतो. याबद्दलची आख्यायिका अशी आहे की, गोरखनाथांच्या तपश्चर्येने देवी त्यांच्यावर प्रसन्न झाली होती. एक दिवस गोरखनाथांना भूक लागली म्हणून त्यांनी मातेला पाणी गरम करायला सांगितले व स्वतः भिक्षा मागण्यासाठी निघून गेले. त्यानंतर ते परत कधी आलेच नाहीत आणि देवी माता आजही त्यांची वाट बघते आहे. याबद्दल असंही सांगितले जाते की कलियुग संपून सत्ययुग सुरू झाल्यावर गोरखनाथ परत येतील.
  सर्वात वरती शंकराचे मंदिर आहे. या मंदिरात जायला पुन्हा काही पायऱ्या चढून जाव्या लागतात. पायऱ्या चढून वर गेल्यावर माझ्याबरोबरची सगळीजणं देवळात आतमध्ये गेली पण नेमकं त्याचवेळी माझ्या कंबरेतून जोरात कळ आली आणि मी तिथेच खाली बसले. समोरच्या होमकुंडाजवळ बसलेल्या पुजाऱ्यांनी दुरूनच मला बघितले. त्यांच्यासमोर बसलेली लोकं उठून गेल्यावर त्यांनी दुरूनच विचारले, “ कुछ तकलीफ हो रही है क्या बेटी?”  
“नहीं ठीक हैं बस कमरमें थोडी मोच आ गयी..” असं म्हणून पुन्हा देवळात जायच्या उर्मीने मी त्या अवस्थेतही पटकन उठून उभी राहिले. नंतर आम्ही दर्शन आटपून होमकुंडाजवळ गेलो. तिथल्या पुजाऱ्यांनी आस्थेने चौकशी केली व म्हणाले, “रुको चाय लेके जाओ.” आम्ही नको म्हणत असतानाही आग्रह करत म्हणाले, “भगवान का प्रसाद हैं बेटा, मना मत करो.” या वाक्यामुळे मात्र आम्ही नाही म्हणू शकलो नाही. त्या दिवशी प्रत्यक्ष देवीच्या द्वारी जेवण आणि चहा दोन्हीचा योग होता. चहा घेऊन गुरुजींना नमस्कार करून आम्ही तिथून निघालो. तिथल्या बस स्टँडवर गेल्या गेल्या लगेचच धरमशालाला जाणारी बसही मिळाली. वाटेतच संध्याकाळ झाली होती. परतीच्या प्रवासात मात्र कंबरदुखीचा जराही त्रास झाला नाही आणि मावळत्या सूर्याच्या दर्शनाने मनही तृप्त झाले. जवळपास तीन चार दिवसांनी मी सूर्यास्त बघत होते. सूर्यास्त म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याचा एक अप्रतिम नजारा असतो. अनेकांना संध्याकाळ आणि सूर्यास्त निराशाजनक वाटतात. पण मला मात्र या दोन्हीही गोष्टी खूप आवडतात. खरतर सूर्यास्त आणि सूर्योदय यामध्ये मुळातच इतके सौंदर्य आहे की ते बघण्यासाठी कुठल्याही ‘पॉईंट’वर जायची गरज नाही. ते कुठूनही पाहिलं तरी सुंदरच दिसतात.
सकाळी झालेलं सुर्यनारायणाचे दर्शन आणि त्यानंतरच्या ज्वालादेवीच्या दर्शनाने मन शांत झालं होतं. या ज्वाळांमागील भौगोलिक किंवा शास्त्रीय कारण शोधण्याचे अनेक प्रयत्न करण्यात आले. सतराव्या दशकात भारत सरकारने यामागील भौगोलिक कारण अथवा तेथील नैसर्गिक वायूच्या साठ्याची शक्यता शोधण्याचे काम एका परदेशी कंपनीला दिले होते परंतु अनेक वर्षे काम करूनही न त्यांना कोणता गॅस सापडला ना या ज्वाळांमागचे भौगोलिक कारण. काही जणांच्या मते लोकांच्या धार्मिक भावनांचा आदर ठेवून ‘नैसर्गिक गॅसचं’ सत्य लोकांपासून लपविण्यात येत आहे. काय खरं, काय खोटं, हे सांगता येणं कठीण आहे. नेटवर सर्च केल्यास ज्वालादेवीचे अनेक थक्क करणारे अनुभव वाचायला मिळतील. तसंही सगळ्या गोष्टी मानण्यावर असतात. माझा अनुभव मी सांगितला तर कोणीही विश्वास ठेवणार नाही. पण ही पोस्ट लिहायला घेतल्यावर माझ्या कंबरेतून तशाच कळा येत होत्या जशा दर्शनाच्या दिवशी येत होत्या. आत्ता हा शेवटचा परिच्छेद लिहताना मात्र कंबरदुखी पुर्णपणे थांबली आहे. हे काय आहे? का आहे? मला खरच काही कळत नाही. पण हा योगायोग नक्कीच नाही. शेवटी काय, मानला तर देव नाहीतर दगड. तसच मानली तर देवी नाहीतर नॅचरल गॅसची ज्वाळा. जे काही नाव असेल ते चमत्कारी आहे हे मात्र नक्की.
©मानसी जोशी





Tuesday, 5 February 2019

अलक

अलक १

बिझनेस पार्टी आटपून घरी आल्यावर तिच्या इच्छेचा विचारही न करता आपल्या शरीराची भूक भागवून झोपलेला नवरा पाहून तिला त्या बेडरूमचीच किळस आली आणि रात्री 12 वाजता तिच्या आलिशान बंगल्याच्या बाल्कनीत जाऊन ती उभी राहिली. सहज तिची नजर समोरच्या सर्व्हर्ट कॉर्टर्सकडे गेली. तिच्या घरात काम करणाऱ्या जोडप्याला एकमेकांशी समाधानाने हितगुज करताना बघून नकळतपणे तिच्या मनात असूया दाटून आली. तिला त्यांच्या सुखाचा हेवा वाटू लागला. त्याचवेळी पलीकडच्या सर्व्हन्ट कॉर्टर्समध्ये राहणारी वॉचमनची तरुण मुलगी मात्र लग्नानंतर अशाच बंगल्यात राहायचं स्वप्न बघत तिच्या सुखाचा हेवा करत होती.

©मानसी जोशी

अलक २
ब्रेकअप नंतरही त्या संध्याकाळी तो त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी गेला. एकत्र बसून घेतलेली वाईन, तिचं लाडिक बोलणं सगळं आठवून तो काहीही न घेता तिथून निघाला. बाहेर आल्यावर मात्र नेहमीच्या रस्त्याने न जाता मुद्दाम  तिला न आवडणाऱ्या आणि जिचा उच्चार ती नेहमी ‘लोअर क्लास गल्ली’ असा करायची त्या
गल्लीकडे त्याने गाडी वळवली. तिथल्या बकाल वस्तीत संध्याकाळच्या थंडीत फाटक्या कपड्यात कुडकूडणारी मुलं बघून अचानक त्याचा मूड बदलला आणि त्याने गर्रकन गाडी वळवली. काही मिनिटातच तो त्या मुलांसाठी स्वेटर आणि गरम खाणं घेऊन परत आला. आजच्या डेटसाठी जो खर्च झाला असता त्यामध्ये थोडीशी भर घालून कित्येक मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर दिसलेलं लाख मोलाचं समाधान बघून त्याला खूप शांत वाटत होतं. एका तुटलेल्या नात्यामुळे त्याची माणुसकी नावाच्या नव्या नात्याशी ओळख झाली होती.
©मानसी जोशी


अलक ३
जबरदस्त अपघातात जखमी झालेल्या तिच्या नवऱ्याला डॉक्टरांनी अखेर ब्रेनडेड जाहीर केले. एक क्षण ती मटकन खाली बसली पण दुसऱ्या क्षणाला तेवढ्याच आत्मविश्वासाने उठून तिने आपल्या नवऱ्याचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या नवऱ्याला केवळ आठवणीतच नाही तर अनेकांच्या हृदयातही जिवंत ठेवले.

भाग २
अलक १

जीवन से भरी तेरी आँखे मजबूर करे जिने के लिए…त्याने तिला डेडीकेट केलेलं हे एकमेवं गाणं. एवढा मोठा सिंगर असूनही खास आपल्या पत्नीसाठी म्हणून त्याने गायलेलं हे एकमेव गाणं. तो नेहमी म्हणायचा, गाणं केवळ गायचं नसतं तर गाताना ते जगता आलं पाहिजे.  त्याचं हे वाक्य खरं ठरलं ‘त्या’ अपघातात तिचे डोळे गेले आणि त्याचे श्वास थांबले.

अलक २

समोरच्या झाडावरच्या चिमणीच्या रिकाम्या घरट्याकडे उदासापणे बघत असलेल्या आपल्या पतीला पाहून ती म्हणाली, “दोन महिन्यांपूर्वी चिमणीने किती मेहनतीने हे घरटं बांधलं होतं. त्यानंतर त्यात अंडी घातली, पिल्लं जन्माला आली, त्यांना चोचीने भरवलं, उडायला शिकवलं. आता पिल्लं उडून गेल्यावर ती चिमणीही आपल्या मार्गाने उडून गेली. परत या घरट्याकडे फिरकलीही नाही. माणूस कितीही हुशार असला तरी आयुष्य जगण्याची कला त्याच्यापेक्षा पक्षांना जास्त चांगली जमते.” आपल्या पत्नीचं हे बोलणं ऐकून त्याचं मुलाच्या वेगळं राहण्याच्या निर्णयाचं दुःख हलकं झालं आणि उतारवयात पत्नी पुरुषाची आई होते, हे त्याला मनोमन पटलं.

अलक ३

कोर्टाचा निर्णय झाला आणि संपत्ती बरोबर आईच्या जबाबदारीचीही वाटणी झाली. ज्या मुलांची वाटणी होऊ नये म्हणून एके काळी तिने याच कोर्टात ‘सेटलमेंट’ करून मन मारून संसार करायचा निर्णय घेतला होता. आज त्याच कोर्टात तिच्या मुलांनी तिची वाटणी केली होती.


©मानसी जोशी



Wednesday, 30 January 2019

वाघा बॉर्डर - एक अविस्मरणीय अनुभव

भारत माता की जय !!!
हिंदुस्थान जिंदाबाद !!
वंदे मातरम!!!
मावळत्या सूर्याच्या साक्षीने आसमंतात हे नारे घुमत होते. तिथे जमलेला प्रत्येकजण मोठ्या मोठ्या आवाजात या घोषणा देत होता. समोर दिसणारी पाकिस्तानची बॉर्डर बघून देशप्रेमाचं आलेलं भरतं अजूनच वाढत होतं. आयुष्यात अनुभवलेल्या काही अविस्मरणीय क्षणांपैकी एक असलेला हा क्षण. स्थळ अर्थातच #वाघा_बॉर्डर!!
    अमृतसरवरून दीडशे रुपयात वाघा बॉर्डरला नेऊन आणणाऱ्या गाड्या मिळतात. तिथे पोचल्यावर आतमध्ये काहीही नेऊ देत नाहीत (अगदी लेडीज पर्सही नाही). खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्या न्यायला मात्र परवानगी आहे.  सुरक्षा व्यवस्था अर्थातच कडक असते.
    आतमध्ये सर्वाना कार्यक्रम व्यवस्थित बघता यावा म्हणून दोन बाजूला दोन मोठे प्रोजेक्टर लावलेले आहेत. ठीक साडेचार वाजता कार्यक्रम चालू होतो. प्रचंड गर्दीमुळे तुडूंब भरलेलं स्टेडीयम, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ यासारख्या घोषणा खड्या आवाजात देणारे मिलिटरी ऑफिसर, त्या घोषणा फॉलो करणारे भारतीय, ताठ मानेने आणि निधड्या छातीने पाकिस्तानच्या बॉर्डर पर्यंत जाऊन समोर दिसणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांच्या नजरेला नजर देऊन खुन्नस देणारे आपले भारतीय सैनिक (आनंदाची गोष्ट म्हणजे यामध्ये महिला सैनिकही होत्या), हे सारे दृश्य बघून देशप्रेमाची एक वेगळीच उर्मी मनात दाटून आली.
  कार्यक्रम संपताना पश्चिमेकडे झुकणाऱ्या सूर्याच्या तेजस्वी लाल गोळ्यासमोर तितक्याच तेजाने फडकणारा आपला तिरंगा पाहून ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा….’ चे सूर आपोआपच मनात गुंजू लागले.
 “बाकी काहीही बघायचं राहिलं तरी चालेल, आपण इतर कुठेही गेलो नाही तरी मला चालेल, पण मला वाघा बॉर्डरला जायचंच आहे…...”  माझं हे वाक्य सर्वतोपरी सार्थ करणारा ‘वाघा बॉर्डरचा कार्यक्रम’ आयुष्यतल्या संस्मरणीय कार्यक्रमांपैकी एक आहे.
कार्यक्रम संपल्यावर अनेक फोटोज क्लिक केले.बाहेर आल्यावरही फोटोसेशन चालूच होतं. त्याचदरम्यान घोषणा देणारे ‘मिलिटरी ऑफिसर’ बाहेर आले. त्यांना भेटायची खूप इच्छा होती पण क्षणार्धात त्यांच्याभोवती एवढी गर्दी जमली की त्यांना भेटायला गेलो असतो तर निघायला उशिर झाला असता.
“सोड ना त्यांना का भेटायचं आहे तुला? काय करणार त्यांना भेटून?” या प्रश्नावरही मी न चिडता शांतपणे उत्तर दिलं,
“इथे शाहरुख अमीर असते तर मी नसतं म्हटलं भेटायला जाऊया but  ‘They are #Real_Heroes of our country. I respect them. आज त्यांच्यामुळेच आपण असं मोकळेपणे फिरू शकतो. सुखाने झोपू शकतो.”
   या कार्यक्रमा-दरम्यान अनुभवलेली आणि मनाला न पटलेली एक गोष्ट मुद्दाम इथे लिहिते. स्टेडीयमवर जागोजागी मोठे मोठे डस्ट-बीन ठेवलेले असूनही सर्वत्र फेकलेल्या पाण्याच्या बाटल्या, चिप्सचे रॅपर आणि इतर कचरा बघून संताप आला. लोकांना एवढी साधी गोष्ट कळू नये? एक दोन ठिकाणी तर डस्ट-बीनही कलंडलेले दिसले. पण नेहमीप्रमाणे, “या गोष्टीला आपण काहीही करू शकत नाही”, असा विचार करून स्वतःची समजूत घातली.
  बाहेर दूरवर पसरलेलं हिरवंगार शेत पण त्यांना दोन देशांमध्ये विभागाणारं तारेचे कुंपण, दोन्ही देशांमधील कुंपणाची जाणीवही नसलेले आणि आकाशात मुक्तपणे पक्षी, वाघा बॉर्डरवर पाकिस्तानच्या हद्दीत असणारं परंतु सावली मात्र हिंदुस्थानात देणारं एक झाड, दोन्ही देशांत एकाचवेळी अस्ताला जाणारा सूर्य आणि वाहणारा गार वारा… नितांतसुंदर अनुभव होता हा. हे सारं बघून कोणाच्याही मनात एकच गाणं घोळत राहीलं ---
“पंछी, नदियाँ, पवन के झोंके
कोई सरहद ना इन्हें रोके..”





©मानसी जोशी

Wednesday, 2 January 2019

ब्रेकिंग न्यूज आणि चॅट शो

ब्रेकिंग न्यूज…
नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार गेल्यावर्षी दुष्काळग्रस्त असलेल्या पाणीपूर गावात आज चक्क 25 mm पावसाची नोंद झाली. या पावसामुळे गावकरी सुखावले असून जाणून घेऊया गावकऱ्यांची मतं आमचे प्रतिनिधी निखिल यांच्याकडून…
हॅलो...हॅलो… निखिल तुम्हाला माझा आवाज ऐकू येतोय का? हॅलो… हा बोला निखिल….
माफ करा तांत्रिक अडचणींमुळे निखिलशी संपर्क होऊ शकत नाही… तोपर्यंत आपल्या स्टुडियोत या क्षणाला उपस्थित असणाऱ्या काही महत्वाच्या माणसांशी वार्तालाप करून त्यांची मते जाणून घेऊयात…
आपल्या सोबत उपस्थित आहेत विरोधी पक्ष नेते अण्णाभाऊ, आमदार तात्यासाहेब, ज्योतिष विभूषित संत महाराज आणि वेधशाळेतील रिटायर्ड ऑफिसर आणि  पर्यावरण अभ्यासक श्रीयुत अंदाजे….
तर आमदारसाहेब पहिला प्रश्न तुम्हाला … गेल्या वर्षी दुष्काळग्रस्त असणाऱ्या गावात आज 25 mm पाऊस पडला याबद्दल काय वाटतं तुम्हाला ?
तात्यासाहेब: हे बघा आमचं सरकार नुकतच सत्तेत आलं आहे आणि सत्तेत आल्यापासून या सगळया सुधारणा घडवून आणायला सुरवात केली आहे.
अण्णासाहेब: आव काय बोलताय तुम्ही तात्यासाहेब? आमी सत्तेत असताना काय त्या गावात जाणारे ढग अडवून ठेवत होतो व्हय?
तात्यासाहेब: तुमच्या पाऊस आणि धरणं यांच्या धोरणाबद्दल न बोललेलेच बरे..
अण्णासाहेब: आता धरणांचा मुद्दा कुटं आला हितं? आणि पाणीपूर मध्ये काय यांचा पक्ष सत्तेत आल्यामुळं पाऊस पडला व्हय...
एक मिनिट अण्णासाहेब तुम्हालाही बोलण्याची संधी देण्यात येईल. तोपर्यंत दुसरा प्रश्न संत महाराज तुमच्यासाठी …
काय वाटतं तुम्हाला आजच्या पावसाबद्दल?
संत महाराज: (पोथी समोर घेऊन चष्मा लावून) हे बघा पाणीपूरच्या पत्रिकेनुसार त्यांची साडेसाती आता संपलेली आहे त्यामुळे आता यावर्षी तिथे चांगला पाऊस पडेल.
तात्यासाहेब: आमचा पक्ष सत्तेत आल्यापासून पाणीपूर काय अख्ख्या देशाचीच साडेसाती संपली आहे.
अण्णासाहेब: हे बघा उगाच कुटल्या बी गोष्टी चा संबंध तुमच्या सत्तेशी जोडू नका.
..एक मिनिट अण्णासाहेब मी लवकरच तुमच्या प्रश्नापाशी येतेय पण त्याआधी मी पर्यावरण अभ्यासक श्रीयुत अंदाजे यांना आजच्या पावसाबद्दल  त्यांचं मत विचारते
अंदाजे: अहो नैऋत्येस वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे हा पाऊस पडलेला आहे. बाकी ग्रह तारे वगैरे सगळं झूठ असतं हो.
संत महाराज: हे बघा उभं आयुष्य वेधशाळेत नोकरी करूनही एकदाही अंदाज बरोबर आला नाही तुमचा. मी सांगितलेली 70% भविष्य बरोबर असतात.
अंदाजे: म्हणजे 70% अंधारात मारलेले बाण लागले असं म्हणा ना.
तात्यासाहेब: आम्ही सत्तेत आल्यावर वेधशाळेसाठी आधुनिक उपकरणे खरेदी करण्याच्या प्रयत्नात आहोत. यामुळे अचूक अंदाज वर्तविण्यात हवामान खाते यशस्वी होईल.
अण्णासाहेब: हे बघा आम्ही सत्तेत असताना बी आधुनिक उपकरणे हवामान खात्याला पुरवली होती. विचरा की या अंदाजे सायबासनी.
…. अण्णासाहेब मी तुमच्या प्रश्नाकडे वळतेय पण त्याआधी….
अण्णासाहेब: मगाच पासन बघतूया मी बोलायला लागलो की “मी तुमच्या प्रश्नाकडे वळतेय”, असं म्हनून थांबवताय मला.. बोलूच द्यायचं नव्हतं तर कशापायी बोलावलं मला.
… माफ करा अण्णासाहेब आत्ता पाणीपूर गावात असणाऱ्या आमच्या प्रतिनिधींशी आमचा संपर्क होतोय….
हॅलो …. हा निखिल बोला….
निखिल: पाणीपूर मध्ये सर्व लोक खूप खुश आहेत. जवळपास दीड वर्षांनी पाऊस पडल्यामुळे इथली जनता सुखावली आहे. मुले आनंदाने पावसात भिजतायत। आणि ….
माफ करा … पुन्हा निखिलशी संपर्क तुटलाय.. आता स्टुडियोत मान्यवरांना प्रश्न विचारण्यासाठी  येणाऱ्या नागरिकांच्या फोन कॉल्सकडे वळूया..
पहिला फोन आहे पुण्याहून ××××× यांचा
हॅलो… हा बोला…..तुम्हाला कोणाला प्रश्न विचारायचा आहे.
पलीकडून: हे बघा मला तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे. साधा 25 mm पाऊस पडला त्याची ब्रेकिंग न्यूज कसली आणि
चॅट शो कसले करता ? तुमच्याकडे दाखवायला दुसरं काही नसेल तर…..
हॅलो हॅलो श्री  ××××× यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. आता पुढच्या फोन कॉलकडे वळण्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक! कुठेही जाऊ नका पाहत रहा……

©मानसी जोशी








Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...