Wednesday, 26 October 2016

गुडमॉर्निंग

गेल्या आठवड्यात मॉर्निंग वॉकला जाताना नेमक  इअरफोन न्यायला विसरले. तशी सकाळची वेळ म्हणजे घाई गडबडीचीच वेळ असते कारण लवकर उठून पोळी भाजीचा डबा तयार करुन लेकीच आवरुन तिला  ६.४० ला येण्याऱ्या स्कूलबससाठी बसस्टॉपवर सोडायला जायच. बस आली कि टाटा बायबायचे सोपस्कार करुन मस्तपैकी गाणी ऐकत मॉर्निंग वॉक करुन ७.३० पर्यंत घरी परत यायच. पण इअरफोन घरी विसरल्यामुळे स्वतःवरच वैतागले आणि त्याचा राग लेकीवर काढत म्हणाले, "किती रेंगाळत रहातेस ग आवरत जा ना पटापट, तुझ्यामुळे मी घाईघाईत इअरफोन विसरले. आता मी चालायला कशी जाणार?"
   यावर लेक म्हणाली, "अग आई चालायला जायचा आणि इअरफोनचा काय संबध? तू पाय घरी विसरल्यासारख काय करतेस?"
   यावर मात्र माझ मलाच हसू आल. तेवढ्यात स्कूल बस आली आणि ती निघून गेली. मीसुद्धा वैतागून चालायला सुरुवात केली.
 "आज काय मॉर्निंगच बॅड झालेय पुढे दिवस कसा जाणार कुणास ठावूक?"असा विचार करतच चालत होते. माझ्या पुढे एक जोडप  हातात हात घेउन अगदी हळू आवाजात गप्पा मारत चालत होत. बहुदा नवीन लग्न झालेल असाव. चालायला येणाऱ्या बहुतांश रणवीर दीपिकांच त्यांच्याकडे अगदी बारीक लक्ष होत. त्यांना क्रॉस करुन मी थोडी पुढे गेले तर माझ्या पुढे एक मध्यमवयीन जोडप चालत होत. बहुदा त्यांच्या मुलाच दहावी च वर्ष होत. त्यामुळे त्याच्याबद्दलच त्यांची काहितरी चर्चा चालू असावी. क्षणात टेंशन आल. "अजून लेक चौथीमध्ये आहे तर तिच्या अभ्यासाची लढाई लढवताना माझी ही हालत होतेय, तर पुढे  काय होइल?" बोलता बोलता ते कपल दुसरीकडे वळल आणि माझ विचारचक्रही थांबल.
   थोड पुढे आल्यावर दोन रिटायर्ड(बहुदा) आजोबा एकमेकांशी बोलत होते
पहिले आजोबा विचारत होते, "मग दिवसभर काय करतो? बोअर नाही होत घरात?"
दुसरे आजोबा अगदी सहज सांगत होते, "नाही बसून असतो कधी हॉलमध्ये बसतो कधी किचनमध्ये. पण  त्रास नाही देत कोणाला."
  ते बहूदा रिटायर्डमेंट नंतरच्या दिनचर्येबद्दल बोलत असावेत अस मला वाटल.
   तेवढ्यात पहिल्या आजोबांनी दुसऱ्या आजोबांना विचारल, "कोणी आल की अंगावर वगैरे धावून जातो की नुसताच भुंकतो?"
यावर दुसरे आजोबा उत्स्फूर्तपणे म्हणाले, "भुंकतो फक्त पण आम्ही समजावल की गप्प बसतो, सगळ ऐकतो अजिबात हट्ट करत नाही अगदी गुणी आहे."
    हे ऐकून माझ्या लक्षात आल की मगाचपासून हे दोघे एका कुत्र्याबद्दल बोलतायत. मला हसू आवरल नाही. कसबस हसू दाबत मी माझा चालायचा स्पिड वाढवून त्यांच्या पुढे गेले.         थोड पुढे गेल्यावर ज्येष्ठ नागरिक महिलांचा एक ग्रूप माझ्या पुढे चालत होता. एक खमकी आजी दुसऱ्या खमक्या आजीला समजावत होती, "अहो अस करुन सवरुन ऐकून नाही घ्यायच. आपल्या पिढीच हेच दुर्दैव आहे. आधी सासुच ऐकायच आणि आता सुनांच ......" त्यांच बोलणं खर तर इंटरेस्टींग होत पण त्यांचा स्पीड कमी असल्याने मी कधीच त्यांच्या पुढे निघून गेले होते.
    थोड पुढे आल्यावर  समोरुन एक गोंडस छोट बाळ येताना दिसल  माझ्याकडे बघुन गोड हसल. मी ही त्याच्याकडे पाहून हसले. दोन मिनिटे थांबून त्याच्याशी गप्पा मारल्या खर तर हे बाळ मला जवळपास रोजच दिसत पण इअरफोन असल्यामूळे कधी त्याच्याकडे लक्षच गेल नाही. या सगळ्या प्रकारात घरी पोचायला मात्र उशीर झाला. चला आता पुढे सगळ्याला उशीर होणार असा विचार करुन घरी आले तर मस्त आलं घालून गेलेल्या चहाचा वास दरवळत होता. अहोंनी वाट बघून चक्क चहा केला होता. कितीतरी दिवसांनी सकाळी असा मस्तपैकी आयता चहा मिळाला आणि एकूणच बॅड वाटणारी माझी मॉर्निंग एकदम गुडमॉर्निंग झाली.
    काही गोष्टी आपण मनाशी पक्क्या ठरवलेल्या असतात आणि आपल्याला वाटत त्या तशा असतिल तरच छान असतात. जरा बदल झाला की आपण वैतागतो. जस माझ झाल इअरफोन न वापरतासुद्धा मॉर्निंग वॉक खूप छान होवू शकत हा  विचारच मी केला नव्हता. अर्थात बाकी काहीही असलं तरी दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र  मी न विसरता इअरफोन घेतले.. काय करणार ? आदत से मजबूर...
©मानसी जोशी
सदरचा लेख म.टा च्या ठाणे आवृत्तीमध्ये(२२ नोव्हेंबर २०१६) छापून आला आहे.


एक्झॅम फिव्हर आणि ए. सी.

एक्झॅम फिव्हर
सद्ध्या ऑक्टोबर हिट चांगलीच जाणवायला लागलेय. अशातच चढलेल्या Exam fever ने समस्त 'आई' वर्ग चांगलाच वैतागलेला आहे. आमच्याकडे तर अगदी भयानकच परिस्थिती आहे. आमची कन्यका या सहामाही परिक्षेच्या पेपर्समध्ये  वेगवेगळे शोध लावून घरी येत आहेत. इतिहासात लागलेला नवीन शोध म्हणजे 'भारुड रचण्याच श्रेय चक्क ज्ञानेश्वर महाराजांना मिळाल आहे. जीथे त्यांना इतिहासच चुकीचा शिकविला जातोय तिथे तिची ही चूक म्हणजे अगदिच सामान्य आहे असा विचार करून मि उदार मनाने तिला माफ केल. "Shahaji Raje had appointed some teachers for Shivaji to teach him warfare". हे इतिहासाच्या पुस्तकातील वाक्य वाचून यापुढे कन्येने लावलेल्या  इतिहासातील प्रत्येक शोधासाठी तिला माफ करण्याचा निर्णय मी घेतला आहे. असो. तर इतिहासाची लढाई लढून झाल्यावर. काल इंग्लिशची लढाई लढववायची होती. संध्याकाळी अहो जरा लवकरच घरी आले. जरा लवकर आलेत तर लेकीचा अभ्यास घेतील अशी उगाचच एक वेडी आशा होती मनाला. आवरुन चहा वगैरे झाल्यावर  मी लेकिला म्हणाले. आता मी जरा बाहेर जावून येते बाबा घेतिल पुढचा अभ्यास, "छे छे अग मला बाहेर जायचय मित्राकडे काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणत होता परवा. बघूया भेटून येतो त्याला". आयुष्याच्या जोडीदारच अस एकटिला लढायला सोडून गेला म्हटल्यावर काय बोलणार? असो.. बाहेर जायचा बेत रद्द....... काय करणार? रात्रीच जेवण आणि किचनचची काम  आवरुन बेडरूममध्ये गेले. फारच उकडत होत म्हणून AC ऑन केला तर रीमोट बिघडलेला. आता रिमोट दुरुस्त करुन आणणे  हे जणू फक्त माझच काम आहे ते उद्या करायलाच हव असा मनात विचार करुन बेडवर आडवी झाले आणि थोबाडपुस्तिका चाळू लागले. गौरी ब्रम्हेची पोस्ट वाचली त्यातल शेवटच वाक्य काळजाला भिडल....... आयुष्य खूप सुंदर आहे फक्त....................... .................................... मुलांची परिक्षा संपली पाहिजे. तेवढ्यात मैत्रिणिचा फोन आला, "अग  तो Rivision चा question 6B लिहिलाय का चिन्मयीने?"  थांब चेक करते अस म्हणून कन्येची वही हातात घेतली तर त्याच्यात 6B हा प्रश्नच अस्तिवात नव्हता. मी मैत्रिणीला तस सांगितल्यावर ती मोठ्या मनाने  म्हणाली, "असूदे  मी Whats ap करते तुला जमल तर घे करुन उद्या पेपरला विचारतील बहुदा." चला लढाई पुन्हा सुरू ..... तासभर डोकफोड करुन अखेर साडेदहा वाजता झोपायला बेडरूममध्ये गेले. झोपताना गौरीच्या पोस्टमधले शब्द थोडा बदल करुन  ओठांवर आले ...... आयुष्य सुंदर आहे  फक्त ................ मुलांचा अभ्यास घ्यायला लागता कमा नये. यावर अहो म्हणाले ....... आणि AC चा रिमोट बिघडता कामा   नये. कोणाच काय तर कोणाच काय असा विचार करुन मी शांतपणे झोपी गेले ...
©मानसी जोशी


Wednesday, 19 October 2016

मनमानसी

कुठे आहेस रे तू? किती मस्त संध्याकाळ आहे. सकाळच्या पावसानंतर आलेल्या सोनेरी किरणांनी सगळा चिखल वाळून गेलाय आणि सगळ कस लख्ख झालय. आकाशात पावसाळी ढग जमा झालेत. पावसापुर्वीचा गारवा जाणवायला लागलाय त्यातच सकाळी पडलेल्या पावसानन्तरचा गारवाही मिसळलाय सगळ कस अगदी छान वाटतंय. घरी परतणारे पक्षांचे थवे मला वाकुल्या दाखवतायत असं उगाचच वाटतंय.
आठवतंय अशाच अनेक संध्याकाळी आपण एकत्र घालवल्यात कितीतरी स्वप्न बघत. आज जवळ सगळ आहे, स्वप्न आहेत, आठवणीही आहेत पण तू कुठे आहे रे? हरवलायस तू या मायावी जगात. तेव्हा मला नुसत बघण्यासाठी सगळी शेड्युल्ड कॅन्सल करुन मी गेलेल्या पावसाळी पिकनिक स्पॉटला अगदी आवर्जून मित्रांबरोबर यायचास. त्या गर्दीतही तू मला शोधून काढायचास आणि उगाचच ,"तू इथे कशी? अस आश्चर्याने विचारायाचास. 
सगळ माहित असायचं एकमेकांना तरी अचानकच भेटल्यासारख दाखवायचं आणि निघताना एकत्रच निघायचं. त्याच रोडवर जर "ट्राफिक जॅम" झालं तर तू खुशच. तेवढाच वेळ एकत्र घालवायला मिळेल म्हणून. 
आज मात्र तुला तिथल्या गर्दीचा वैताग येतो, ते ट्रॅफिक बोअरिंग वाटत. अशा स्पॉट वर जाण्यापेक्षा घरात पांघरून घेऊन लोळत पडायचं आणि मुसळधार पाउस सुरु असेल तर भजी आणि गरमागरम चहाची फर्माईश करायची . तेवढच काय ते गोड बोलण. अन्यथा लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये डोक घालून बसायच आणि तेही कमी पडल तर टिव्ही असतोच जोडीला. बर टिव्हीवर तरी छान रोमॅन्टिक गाणी एकत्र बसून बघावी तर ते नाही कुठले तरी साऊथचे पिक्चर बघत बसायचं. How unromantic!!!
एखाद्या दिवशी सकाळी लवकर उठून किवा अगदी पहाटेच मस्त टेकडीवर फिरायला जाव. पक्षांचा किलबिलाट, दुरूनच कुठून तरी एखाद्या मंदिरातून येणारा मंजुळ घंटानाद, मंद गार वारा; हे सार अनुभवत एखाद्या दगडावर शांतपणे हातात हात घेऊन बसून रहाव. हळूच तुझ्या खांद्यावर डोक ठेऊन तुझ्यावरील माझा अधिकार व्यक्त करावा तर नाही...
तुझी सुट्टी म्हणजे उशिरापर्यंत झोपण्याचा हक्काचा दिवस आणि ऑफिस म्हणजे दिवसभर दगदग असते ऑफिस मध्ये जरा तरी रेस्ट घेउदेना अस वैतागून म्हणायचं आणि पांघरूण डोक्यावर ओढून झोपून रहायचं.
घाई तर नेहमीचीच...
बर संध्याकाळी तरी निवांतपणा...
मस्त मावळत्या सुर्यानारायचे रंग बघत गरमागरम कॉफीचे घोट घेत; दिवसभरच्या गोष्टी एकमेकांशी बोलत बसाव. पण घरी येईपर्यंतच अंधारून आलेलं असत. आल्यावर फ्रेश होऊन सोफ्यावर किवा बेडवर स्वत:ला झोकून द्यायचं आणि हो टिव्ही, मोबाईल, लॅपटॉप यातलं काहीतरी जवळ हवच. अन्यथा तू तर अपूर्णच. किती रुक्ष झालायस रे तू. कधी जाणवत तरी असेल का तुला माझ्या मनात काय चाललय? कुणास ठाऊक? 
   पण असा दूर नको जावूस रे. जवळ असून दुरावा सहन करण आता कठीण जातंय. ये ना तू परत. बरसणाऱ्या पावसासारखा बेभान बेधुंद होऊन, उमलणाऱ्या रातराणीसारखा गंध घेऊन, ओघळणाऱ्या प्राज्क्तासारखा अलगद, हळुवार होऊन; येशील? तुझी वाट बघतेय.......
©मानसी जोशी 

कथा - नि:शब्द

नि:शब्द 
सलोनासा सजन है ओंर मै हू......रेडीओवर लागलेल्या या गाण्यामुळे सायली कॉफीचा घोट घेता घेता तशीच थांबली. खर तर आज खूप दिवसांनी तिला अशी निवांत संध्याकाळ मिळत होती. मुसळधार पाऊस, गार झोबणारा वारा, वाफाळलेली कॉफी...आणि टेरेसमध्ये रेडीओवरची गाणी ऐकत बसणे ...... खूप आवडायचं तिला. आज कितीतरी दिवसांनी नव्हे वर्षांनी हे सगळ जुळून आल होत. घरी कोणीच नव्हते आणि ६.३० वाजल्याशिवाय कोणी येणारही नव्हते. पण या गाण्यातल्या सुरांबरोबर ती भूतकाळातल्या सुरात कधी हरवली ते तिच तिलाच कळल नाही
          फर्स्ट इअरला असताना सिंगिंग कॉम्पीटीशनमध्ये तिने हेच गाणं म्हटलं होत. तेव्हा सूत्रसंचालन करणाऱ्या सेकंड इअरच्या सागरने तिला स्वतः भेटून सांगितल होत, "तुझ गाण खूप छान झाल."
किती खुश झाली होती तेव्हा सायली...."बस आता फर्स्ट प्राईज नाही मिळाल तरी चालेल", असा विचार तिच्या मनात आला.
प्राईजडिस्ट्रिब्युशनच्या वेळी जेव्हा सिंगिंग कॉम्पिटिशनच फर्स्ट प्राईज मिळाल, तेव्हा तर सागरने हात मिळवून अभिनंदन केल होत तिचं, तेव्हा तर हवेतच होती ती . हात धुवूच नये अस वाटत होत.....
कॉफीचा घोट घेता घेता या वेडेपणाच तिला हसू आल.
    त्यानंतर तर ती जणू फक्त सागर साठीच कॉलेजमध्ये जात होती. तो दिसला नाही तर मन बेचैन व्हायचं. तो दिसला कि त्याला नजरेत साठवून ठेवावस वाटायचं..
         दिवसामागून दिवस जात होते. FY ची परीक्षा संपली. आता तर दोन महिने सुट्टी म्हणजे दोन महिने सागर दिसणार नाही . ती उदास झाली. सागर होस्टेलमध्ये रहायचा म्हणजे सुट्टीत तो गावी जाणार हे निश्चितच होतं. ती उदासपणे बसून होती तेवढ्यात तिची मैत्रीण नेहा आली आणि म्हणाली,  "गुड न्यूज आहे सायली! सागर १५ दिवसातच परत येईल. अग तो TY ला गेला ना आता त्यांचे व्हेकेशन्स क्लासेस सुरु होतायत २ मे पासून."
    सायली मनातून खुश झाली. तिचा आणि त्याचा क्लास एकाच ठिकाणी होता. तिची व्हेकेशन बॅच नसली तरी क्लास तिच्या घराजवळच होता.
         सुट्टी संपून कॉलेज सुरु झाल. दिवस मजेत जात होते. आता तर सागरची क्लासरूम तिच्या क्लासरूमच्या बरोबर समोरच होती. सतत जाता येता सागर दिसायचा. त्या दिवशी सायली कॅन्टीन मध्ये तिच्या मैत्रिणीची; नेहाची वाट बघत बसली होती. मुसळधार पाऊस पडत होता. लेक्चरला बसायचा तिचा अजिबात मूड नव्हता. कॅन्टीन मध्ये २/३ जुनिअर मुले सोडली तर बाकी कोणीच नव्हत. तेवढ्यात सागर तिथे आला. तिच्याकडे बघून नेहमीप्रमाणे गोड हसला. "लेक्चर नाही का आज ?" त्याने विचारले .
     "नाही आज मूड नाही. बोअर होता सावंत सरांच्या पिरिअडला." ती म्हणाली.
   "तुझ्याशी बोलायचय थोड - सागर म्हणाला.
    क्षणभर तिचा विश्वासच बसत नव्हता. ती गप्पच बसली छातीतली धडधड अजूनच वाढली होती.
    "वेळ कधी आहे तुला?" सागरच्या आवाजाने ती भानावर आली आणि कसाबसं स्वतःला सावरत म्हणाली ....बोल.
    "नाही इथे नको... .सागर. 
      मग कुठे ?कधी? .... सायली. 
     सागरचा क्लास संपल्यावर सायलीचा क्लास असे. त्यामुळे तो म्हणाला... माझा क्लास सुरु झाल्यावर बरोबर १५ मिनिटांनी , क्लासच्या समोरच्या गल्लीतल्या गणपतीच्या देवळाजवळ भेटशील?"      पण तुझा क्लास ... सायली 
   "मी क्लास बुडवणार आहे आज" तिचं बोलण मध्येच तोडत सागर म्हणाला . 
     तिने होकारार्थी मान डोलावली. 
    ठीक आहे भेटू मग संध्याकाळी .... अस म्हणून सागर निघून गेला. तिचा विश्वासच बसत नव्हता. आपण स्वप्नात तर नाही ना? तिने स्वतःलाच चिमटा काढून पहिला.
         घरी गेल्यावर सायली फ्रेश होऊन जेवायच्या आधी कितीतरी वेळ आराशासामोरच उभी होती. तिला सतत सकाळचाच प्रसंग आठवत होता . लाजत, हसत, स्वप्न रंगवत ती संध्याकाळची वाट बघत होती. जेवायचाही भान नव्हत तिला. कुठला ड्रेस घालू ? सागरला कुठला रंग आवडत असेल? कितीतरी प्रश्न ....पण सगळे सागर भोवती फिरणारे. पिंक कलरचा ड्रेस, नाजुकसे मोत्याचे कानातले, पिंक कलरची हलकीशी लिपस्टिक आणि मोकळे सोडलेले केस .. सायली खूपच सुंदर दिसत होती. देवळाजवळ स्कूटर पार्क करून ती देवळात गेली सागर अगोदरच आला होता. त्याला बघताच तिच्या छातीत धडधडायला लागल. तिने देवाला नमस्कार केला. "एक दिवस मी आणि सागर जोडीने येऊ इथे",  मनात विचार आला आणि ती लाजली. "सायली बाहेरच्या कट्ट्याजवळ ये."
    सागरच्या आवाजाने ती भानावर आली आणि प्रदक्षिणा घालून बाहेर कट्ट्याजवळ गेली. सागर वाटच बघत होता.
"बसना ...." सागर म्हणाला.
 "नाही नको, तू बोल काय बोलायचय", सायली.
       सागरने बोलायला सुरुवात केली... "सायली, मी माझ्या आयुष्याचा खूप वेगळा विचार केलाय. मी जे करायच ठरवलंय ते मी कोणालाच सांगितल नाहीये आणि सांगाणारही नाहीये. मी खूप प्रॅक्टिकल आहे. भावनांनी विचार करणं म्हणजे मला मूर्खपणा वाटतो. माझ्या आयुष्यामध्ये कधीच कुठली मुलगी नव्हती आणि नसेल. मुळात प्रेम वगैरे या सगळ्या गोष्टी मला फाल्तू वाटतात. या गोष्टींवर माझा विश्वासच नाहीये. ................सायलीचे डोळे पाण्याने डबडबले होते. सागरचे लक्षच नव्हते तो बोलतच होता पण सायलीला काहीच ऐकू जात नव्हत. तिचा स्वप्नांचा मनोरा क्षणा क्षणाला कोसळत होता. त्याच्या प्रत्येक शब्दाचा तिच्या मनावर आघात होत होता.
      सायलीने डोळ्यातल पाणी डोळ्यातच थांबवल. कितीतरी वेळ बडबड करून तो थांबला. त्याने तिच्याकडे बघितलं.ती शांतपणे उभी होती. त्याचं बोलणं थांबल्याची खात्री झाल्यावर ती म्हणली ...."पण हे सगळ तू मला का सांगतोयस?"
    तिच्या या प्रश्नावर तो चकित झाला, काय बोलावे त्याला काहीच सुचेना.आता तो नि:शब्द झाला होता. थोडावेळ कोणीच काही बोलत नव्हतं. मग स्वतःला सावरत तो कसबस म्हणाला, "मला वाटल तू माझ्यात इंटरेस्टेड आहेस. आय मिन  तू माझ्यावर प्रेम करतेस." 
    पुन्हा शांताता. तो अस डायरेक्ट बोलेल असं सायलीला वाटलं नव्हतं. ती जरा गोंधळली. थोडा विचार करून आणि मनाची तयारी करून ती म्हणाली ...."हो, आवडतोस तू मला, खूप आधीपासून, तुला पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हापासून ..पण मी तुझ्यावर प्रेम करते का नाही ते नाही सांगता येणार. एवढच वाटतं, सतत तू जवळ असावास सुखात, दुःखात, बरसणाऱ्या पावसात, रणरणत्या उन्हात, कडाक्याच्या थंडीत सतत तुझा हात हातात असावा ,हे प्रेम असेल तर हो करते मी तुझ्यावर प्रेम."
    आता मात्र दोघही नि:शब्द. बराच वेळ तसाच शांततेत निघून गेला. कोणीच काही बोलले नाही. "मी निघते", शांततेच भंग करीत सायली म्हणाली आणि त्याच्या उत्तराची वाट न बघता ती निघून गेली.
         घरी आल्यावर सायलीने स्वतःला बेडवर झोकून दिले, इतकावेळ थांबवलेला अश्रूंचा महापूर ओसंडून वाहू लागला. ती दुखावली गेली होती. घरी कोणीच नव्हते. तिचे आई बाबा दोघही नोकरी करायचे त्यामुळे दिवसभर सायली घरात एकटीच असे. कितीतरी वेळ ती तशीच रडत होती. दुःख, संताप, अपेक्षाभंग या साऱ्या भावना अश्रूवाटे वाहून जात होत्या. एवढ्यात डोअरबेल वाजली...त्या सवयीच्या आवाजानेही सायली दचकली. तिने घड्याळात बघितले तर ६.४५ होत आले होते. "बापरे ६.४५ वाजले म्हणजे आई आली असेल", ती स्वतःशीच म्हणाली. डोळे पुसून तिने दार उघडले. एवढ्यात फोन वाजला. सायलीने फोन घेतला.. 
      "हॅलो...सायली ....क्लासला का आली नाहीस?, काय म्हणाला सागर? फोन नेहाचा होता. 
"नेहा , तू आत्ता माझ्या घरी येऊ शकतेस?" ...सायली. 
  "ओके येते", कुठलाही प्रश्न न विचारता नेहा म्हणाली. 
नेहा घरी आल्यावर त्या दोघी टेरेसवर गेल्या. सायलीने घडलेली सगळी घटना नेहाला सांगितली. त्या दोघी कितीतरी वेळ टेरेसवर होत्या. सायलीच दुःख नेहाला बघवत नव्हत. 
     रडणाऱ्या सायलीला ती मायेने थोपटत म्हणाली, "सायली होईल सगळ नीट, रडू नकोस ना प्लीज."
      "नाही नेहा , आजपासून सागर हा विषय माझ्यासाठी संपला", सायली म्हणाली. 
      "हे बघ सायली उगाच रागाच्या भरात कुठलाही निर्णय घेऊ नकोस", नेहा . 
     "नाही नेहा माझा निर्णय झालाय", सायली. 
       नेहा आणि सायली बालपणापासूनच्या मैत्रिणी. सुरवातीला एकाच शाळेत- एकाच वर्गात आणि आता एकाच कॉलेजमध्ये पण दोघीही विरुद्ध स्वभावाच्या सायली हुशार, आत्मविश्वासी , ठाम पण थोडी तापट , कोणालाही फाटकन बोलणारी, तर नेहा शांत, संयमी, कोणालाही न दुखावणारी. 
     "सायली... ८ वाजून गेले किती वेळ टेरेसवर थांबणार आहात?" आईच्या हाकेने दोघीहि टेरेसवरून खाली आल्या आणि नेहा तिच्या घरी निघून गेली. 
          दिवस भराभर जात होते. सायलीचं आयुष्य पूर्वीसारखच चालू होतं पण आता त्यात एक पोकळी निर्माण झाली होती ....सागर नावाची. सायलीने स्वतःला अभ्यास आणि गाणं यात गुंतवून घेतले. क्लासच्या वेळी अनेकदा तिची सागरशी नजरानजर व्हायची पण ती नजर फिरवून दुसरीकडे बघायची. नेहा हे सार बघत होती पण काहीच बोलत नव्हती. तिला सागरच्या डोळ्यात सायालीसाठी प्रेम दिसत होतं.  पण तिला माहित होत, सायलीची समजूत घालणे शक्य नाही. बघता बघता वर्ष संपल. फायनल एक्झॅम्स संपून व्हेकेशन्स सुरु झाले. दरवर्षीप्रमाणे TY ची व्हेकेशन्स बॅच २ मे पासून सुरु झाली. सायलीला SYला डिस्टिंगशन मिळाली होती. सहाजीकच ती आता स्कॉलर बॅच स्टुडंट होती. आता तर तिला वेळच नसायचा क्लासेस, कॉलेज, गाण्याचा रियाज यातच तिचा सगळा वेळ जायचा. अशातच TY चा रिझल्ट लागला. सागरला सेकंड क्लास मिळाला. सागरने पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पुन्हा त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. 
      सागर आणि सायली आता फारसं समोरासमोर येत नव्हते. त्यांच्या क्लासच्या, कॉलेजच्या सगळ्याच वेळा आता बदलल्या होत्या. लास्ट इअर असल्याने सायली खूप मेहनत घेत होती. खर तर सुरुवातीपासूनच सायली खूप करिअर ओरिएंटेड आणि महत्वाकांक्षी होती, अर्थात तिच्या घरातही तसच वातावरण होत. तिची आई बॅंक मॅनेजर तर वडील क्लास वन ऑफिसर होते. सायलीला नेहमीच मेट्रो सिटीजच खुप आकर्षण होतं. त्यामुळेच तिने पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पुण्याला जायचं ठरवलं होत. मोठ्या कंपनीत मोठ्या पगाराची नोकरी, बंगला, गाडी, हाय लाईफस्टाईल, स्टेटस ,..या सगळ्याच गोष्टींच तिला प्रचंड आकर्षण होतं. 
      बघताबघता वर्ष संपल आणि फायनल एक्झॅम पार पडली. फायनल रिझल्ट अपेक्षेप्रमाणे लागला, सायली फर्स्ट क्लास विथ डिस्टिंगशन मिळवून पास झाली होती आणि नेहालाही फर्स्ट क्लास मिळाला होता. रिझल्टनंतर नेहाने पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी पुन्हा त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली. सायली अर्थातच पुण्याला जाणार होती. पुण्याला जाण्यापूर्वी सायली आणि नेहा एकमेकींना भेटल्या. त्याचवेळी नेहाने सायलीजवळ पुन्हा एकदा सागरचा विषय काढला. त्यावर सायली चिडून म्हणाली....."नाही नेहा, मला त्याच्यासारख्या भावनाशुन्य माणसाबद्दल काहीही सांगू नकोस, प्रेमाचा अर्थ तरी कळला असेल का कधी त्याला? काय तर म्हणे या सगळ्या फालतू गोष्टी आहेत. अग प्रॅक्टिकल असणं म्हणजे काय भावनाशून्य असणं का?" सायली संतापून बोलत होती, मनात इतके दिवस धुमसत असलेल्या ज्वालामुखीचा उद्रेक होत होता. 
"सायली, अस एकाच भेटीत त्याच्याबद्दलच मत बदललं तुझं? अग असं तडकाफडकी कोणाबद्दल मत बनवू नये ग. कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात. तू एकच बाजू बघतेयस. दुसऱ्या बाजूचा कधी विचार तरी केलायस का? नेहा.
      "मला तो करायचाही नाहीये. काय गरज होती त्याला मला असा भेटायला बोलावून हे सगळ सांगायची? मी काही बोलले होते का त्याच्याशी? .....सायली.
    "तू खरच विसरू शकतेस त्याला?"...नेहाने शांतपणे विचारलं. 
    नेहाच्या या प्रश्नाचं सायलीकडे काहीच उत्तर नव्हत. तिच्या मनात विचारांचं वादळ उठलं होतं, ते तसच थांबवत सायली म्हणाली, "मला आता या सगळ्याचा विचार करायचाच नाहीये आणि प्लीज हा विषय नको. मी आज खूप खुश आहे .माझं इतक्या दिवसाचं स्वप्न पूर्ण झालय. मला जिथे हवी होती त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालेय. पण तिथे तू माझ्याबरोबर नसशील याचच वाईट वाटतंय." 
    "मी ही तुला खूप मीस करेन सायली", नेहा रडवेली होवून म्हणाली. सायालीलाही खूप वाईट वाटलं. दोघीही एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडल्या.
         MBA च कॉलेज सुरु झाल होतं. नवीन कॉलेज, नवीन शहर सायालीसाठी सगळच नवीन होत. या सगळ्या नव्या वातावरणात ती नेहाला खूप miss करत होती. सहाजिकच होतं, आतापर्यंतच त्यांच सगळ शिक्षण एकत्रच झाल होतं. हळूहळू सायली या नव्या वातावरणात रुळू लागली होती. नवे मित्र मैत्रिणी जोडताना हळूहळू ती सागरपासून दुरावत चालली होती. बघता बघता दोन वर्ष सरली. नेहाचं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाल आणि तिचं लग्नही ठरलं. सायलीचं मात्र अजून एक वर्ष बाकी होतं. नेहाच्या लग्नाच्या बातमीने सायली खूप खुश झाली होती आणि थोडी उदास पण. कारण आता सुट्टीत ती घरी जाईल तेव्हा तिला नेहा भेटणार नाही. नेहाच्या लग्नाच्या धमाल आठवणी घेऊन सायली पुन्हा पुण्याला आली. आता MBA च लास्ट इअर होतं. त्यात कॅम्पसच टेंशन. सायली खूप मेहनत घेत होती. लास्ट इअरच पाहिलं सेमिस्टर संपत आल होतं. अशातच एक दिवस आईचा फोन आला. "सायली अग स्थळ आलय तुला पुण्याचं....मुलगा मल्टिनॅशनल कंपनीमध्ये नोकरी करतो. MBA झालाय. पुण्याला बंगला आहे त्यांचा आणि आई वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे." .... आई       "आई अग आत्ता कुठे लग्न? अजून माझ MBA  कंप्लीट व्हायचंय. कॅम्पससाठी खूप मेहनत घेतेय मी. मला चांगला जॉब मिळवायचा आहे....." सायली वैतागून बोलत होती. 
     "अगं नुसत बघायला काय जातंय? आणि मी कुठे आताच मुहूर्त काढायला निघालेय , आत्ता नुसता बघण्याचा कार्यक्रम करुया, तुम्ही एकमेकांना पसंत केलत तरच लग्न ठरेल...असं म्हणून आईने फोन ठेवला. 
    सायली मनातून वैतागली होती. पण नन्तर तिने विचार केला की जाऊदे , आई बाबांची इच्छा आहे तर बघायचा कार्यक्रम करुया तसही मी नाहीच म्हणणार आहे. क्षणभर मनात सागरचा विचार आला. पण तिने तो लगेचच झटकला. 
     सायली तयार झाली. खूप सुंदर दिसत होती ती आज. तिचा 'तो' बघायचा कार्यक्रम होता. ती आई बाबांबरोबर जायला निघाली. गाडीत बसल्यावर तिच्या लक्षात आलं आपण ज्याच्यासाठी जातोय त्या मुलाचं नावसुद्धा आपल्याला माहिती नाहीये. "आई, नाव काय ग त्या मुलाचं?" सायलीने विचारलं.                                                                             "लवकर विचारलास", आई हसत म्हणाली. सायलीलाही हसू आल. एवढ्यात एका बंगल्यासमोर गाडी थांबली. तो बंगला बघून सायली तर हरखून गेली. गाडीचा आवाज ऐकून त्या बंगल्यातून कोणीतरी गेटजवळ येऊन अगदी अदबीने त्यांना बंगाल्यामद्धे घेऊन गेले. तिच्या आई बाबांच्या आणि त्या मुलांच्या आई बाबांच्या गप्पा चालू झाल्या. सायलीला खरतर खूप ऑकवर्ड वाटत होत.
            आतल्या खोलीतून एक हॅन्डसम मुलगा बाहेर आला. त्याला कुठेतरी पाहील्यासारखा वाटलं सायलीला. "हा माझा मुलगा निखिल" ..त्याच्या बाबांनी ओळख करून दिली. 
        थोडी बोलणी झाल्यावर निखिल तिला बंगला दाखवण्यासाठी म्हणून घेऊन गेला आणि दोघाना जरा एकांत मिळाला.सगळा बंगला फिरून दोघही गार्डनमध्ये गेले. गार्डन छोटं होतं पण खूप सुंदर होत. संध्याकाळच्या सोनेरी उन्हात तर ते अधिकच आकर्षक दिसत होत ....अगदी सायालीसारख. 
      "तुमचं घर आणि गार्डन दोन्ही खूप छान आहे." सायली म्हणाली.          "Thank God तुम्हाला बोलता येतं", निखिल गोड हसत म्हणाला. सायालीही मंद हसली कारण आल्यापासून खरच ती काहीच बोलली नव्हती. काय बोलाव तिला काहीच सुचत नव्हत.काहीतरी बोलायचं म्हणून सायली म्हणाली," तुमच्याबद्दल काहीतरी सांगाना." "काय?"..निखिल." 
     "काहीही तुमची लाईफस्टाईल, तुमचा जॉब, तुमचे मित्र मैत्रिणी, कॉलेजमधल्या गोष्टी, आयुष्यातलं कोणी खास न विसरता येण्यासारखं", सायली.
       तिच्या प्रश्नाचा रोख लक्षात घेत निखिल म्हणाला, "कोणीतरी खास असं कोणी नाहीये माझ्या आयुष्यात. हा एक मुलगी आवडायची कॉलेजला असताना पण ती आधीच एंगेज्ड होती. नंतर MBAला असतानाहि एक मुलगी आवडली होती. आवडली कुठली मी तर प्रेमातच पडलो होतो तिच्या".
       "मग तिचं काय झालं? का ती पण एंगेज्ड होती", त्याच बोलणं मद्ध्येच तोडत थोडस वैतागूनच सायलीने विचारलं. 
      "नाही नाही , ती एंगेज्ड नव्हती, म्हणूनच तर आजचा बघण्याचा कार्यक्रम होतोय"' निखिल हसत म्हणाला. 
      क्षणभर सायलीला काहीच कळल नाही. तिने गोंधळून निखीलकडे बघत विचारलं.." म्हणजे? मी समजले नाही?"
     "अग तूच होतीस ती मुलगी! आपण एकाच कॉलेजमद्ध्ये होतो तेव्हा, आठवतंय का? पर्सनॅलिटी कॉन्टेस्ट, लायब्ररीच्या बाहेर चिखलात पडलेल्या तुझ्या नोट्स, त्यावरून तुझ माझं झालेल भांडण..." निखिल      "येस! म्हणजे कॉलेज किंग निखिल साने ?...TY MBA Finance, कॉलेज टॉपर, करेक्ट?" सायलीने विचारलं. 
    "करेक्ट! मेमरी चांगली आहे हा तुझी." निखिल हसत म्हणाला. 
    "तरीच मला तुला कुठेतरी बघितल्यासारखं वाटत होत...सायली.
    बोलता बोलता ती दोघं एकेरीवर कधी आली ते त्यांनाच कळल नाही.
 "खर तर मला तेव्हा खूप राग आला होता तुझा मी मेहनतीने काढलेल्या सगळ्या नोट्स तुझा धक्का लागल्यामुळे चिखलात पडून खराब झाल्या होत्या". सायली हसत म्हणाली.
   "मलाही! मी सॉरी म्हणून पण तुझी बडबड चालूच होती. पण मग नंतर कॉलेजच्या ॲन्युअल फंक्शनला तुझ गाणं ऐकल आणि तुझ्या आवाजाबरोबर तू पण आवडायला लागलीस. 'बेदर्दी बालमा तुझको ,मेरा मन याद करता है.......काय गाणं म्हटलयस तेव्हा? त्यानंतर तुझं आवडण प्रेमात कधी बदललं तेच कळल नाही. तेव्हाच ठरवलं तुझ्याशीच लग्न करायचं. नशिबाने तू एंगेज्ड नव्हतीस." निखिल हसत म्हणाला. 
     " हे तुला कस कळलं?" सायलीने आश्चर्याने विचारले. "
     "मुलांना मुलींबद्दल सगळ्या बातम्या काढता येतात मॅडम", त्याशिवाय का तुझ्या घरी डायरेक्ट मागणी घातली?" निखिल हसत म्हणाला. 
       "पण मग तेव्हा का नाही विचारलंस?........ सायली. 
    "तेव्हा मी लास्ट इअरला होतो शिवाय कॅम्पसचं पण टेंशन होतं आणि मुख्य म्हणजे मी काहीच कमवत नव्हतो आणि सेटल झाल्याशिवाय कुठल्या मुलीला प्रपोज करण मला पटणार नव्हतं. पण तेव्हाच ठरवलं होतं;  सेटल झाल्यावर डायरेक्ट लग्नाचीच मागणी घालायची. सेटल झाल्यावर मी माझ्या घरी आई बाबांना सगळं सांगितलं आणि त्यांनी तुझ्या आई बाबांना."निखिल म्हणाला. 
    "काय? आई बाबांना हे सगळ आधीपासूनच माहिती होतं? पण मला काहीच बोलले नाहीत, सायली आश्चर्याने म्हणाली. 
    "कारण मी तस सांगितल होतं, हे सगळ मला स्वतःहून तुला सांगायचं होत"...निखिल.
   "अच्छा असं आहे तर" ....सायली गमतीने म्हणाली.
     "तर मग तुझा होकार समजू का? निखिलने गुलाबाचं फुल तिच्यासमोर धरत विचारलं. 
     सायलीला खर तर निखिल आवडला होता. पण तरीही असा डायरेक्ट लग्नाचा निर्णय घ्यायला तिचं मन तयार होत नव्हतं. "मला विचार करायला थोडा वेळ हवाय", सायली निखिलला म्हणाली.  
 "ok take your own time", निखिल शांतपणे म्हणाला. 
      काही वेळ तसाच शांततेत गेल्यावर सायलीने निखिलला विचारलं, "तुला माझ्याबद्दल काही जाणून घ्यावसं नाही वाटलं?
 "नाही! अग मला तुझ्याबद्दल अगोदरपासूनच माहिती आहे. मी सांगितल ना तुला मुलांना कुठल्याही मुलीची माहिती काढणे अशक्य नसतं",निखिल. 
 "पण माझ्या भूतकाळाबद्दल.... "सायली.
"भूतकाळाबद्दल? म्हणजे त्या बेदर्दी बालमाबद्दल?" मिश्किलपणे हसत  निखिलने विचारलं.  
"तुला कस माहित? आश्चर्यचकित होत सायलीने निखिलला विचारलं. 
 "मला काहीच माहित नाही, पण तुझ्या गाण्यातून तुझ्या भावना कळत होत्या. तू गाणं नुसतं गात नव्हतीस तर ते जगत होतीस. त्यावरूनच मी अंदाज केला. तसंही तुझ्या भूतकाळापेक्षा मला वर्तमान आणि तू हो म्हणालीस तर आपल भविष्य जास्त महत्वाचं आहे. आणि तुझ्या त्या बेदर्दी बालमाला मी थॅंक्सच म्हटलं पाहिजे. तो बेदर्दी नसता तर तू तेव्हा एंगेज्ड असतीस." निखिल हसत म्हणाला.
     सायलीही निखीलकडे बघून मंद हसली. आता तर तो तिला अधिकच आवडायला लागला होता. निखिल आणि त्याच्या  फॅमिलीचा निरोप घेऊन सायली आई बाबांबरोबर रूमवर आली. आई बाबा दुसऱ्या दिवशी सकाळीच परत जाणार होते.  सायलीला त्यांच्याबरोबर जास्त वेळ घालवता आला नाही म्हणून ती मनातून थोडी नाराज झाली होती. रात्री मात्र तिला सारखा निखिल आठवत होता. तिला आठवत होतं कॉलेजमध्ये कितीतरी मुली निखिलच्या मागे होत्या, पण निखिल मात्र तेव्हापासून फक्त आपल्यावर प्रेम करतो हे ऐकून ती सुखावली होती. 
       सायली आणि निखिलच्या आता वारंवार भेटी होऊ लागल्या होत्या. ती त्याच्यामध्ये गुंतत चालली होती. अखेर विचार करून तिने आपला निर्णय सांगितला, "मी लग्नाला तयार आहे. पण मला आधी माझं करिअर करायचं आहे. त्यामुळे MBA पूर्ण झाल्यावर किमान १ वर्ष नोकरी करूनच मी लग्न करेन."
     निखिलने अर्थातच ही अट मान्य केली. दोघांच्याही घरी आधुनिक वातावरण असल्यामुळे तसा प्रोब्लेम नव्हता. पण MBA च अर्ध वर्ष आणि त्यानंतर अजून १ वर्ष हे दोघांच्याही मातोश्रीना पटत नव्हतं. अखेर आधी साखरपुडा करायचा ठरवून सगळ्याचीच मर्जी राखण्यात आली. लग्न ठरल्याच्या आनंदाप्रीत्यर्थ सायलीच्या आई बाबांनी तिला मोबाईल भेट दिला. त्या काळात मोबाईल नुकतेच सर्वसामान्यांच्या आवाक्यात येऊ लागले होते. निखीलकडे तर अगोदरपासूनच मोबाईल होता. दिवस असेच मजेत चालले होते. मोबाईलमूळे तिचं आणि निखिलचं दिवसातून अनेक वेळा बोलणं व्हायचं आणि जवळपास रोजची संध्याकाळ दोघं एकत्रच घालवत होते. सायली निखिलच्या प्रेमात हळूहळू सागरला विसरत चालली होती. हुशार, सुंदर आणि आत्मविश्वासी सायलीचं कॅम्पसमधून एका चांगल्या कंपनीत सिलेक्शन झालं. सगळ तिच्या मनाप्रमाणे घडत होतं. निखिलसारखा रिच, हॅन्डसम, वेल सेटल्ड, संस्कारी आणि मुख्य म्हणजे तिच्यावर खूप प्रेम करणारा लाईफ पार्टनर, कॅम्पसमधून मिळालेला हाय प्रोफाइल जॉब; सायली जणू हवेत तरंगत होती. माझ्यासारखी भाग्यवान मीच अस तिला आता मनोमन वाटत होतं.
       यथावकाश ठरल्याप्रमाणे निखिल आणि सायलीचा साखरपुडा अगदी साधेपणाने पार पडला. साखरपुड्याला दोन्ही घरचे अगदी जवळचे नातेवाईक सोडून फारस कोणाला बोलावलं नव्हत. नेहा मात्र खास बॅंगलोरहून तिच्या साखरपुड्यासाठी आली होती. सायलीला खुश बघून नेहाही सुखावली. कितीतरी वर्षांनी ती सायलीला इतकी आनंदी आणि समाधानी बघत होती. साखरपुडा झाल्यावर मात्र त्याच दिवशी नेहा बॅंगलोरला परत गेली कारण ती ही नुकतीच बंगलोरच्या एका कॉलेजला लेक्चरर म्हणून नवीनच रुजू झाली होती. त्यामुळे तिला जास्त रजा घेणे शक्य नव्हते. निखिलच्या भेटीपासूनच्या सगळ्या गोष्टी सायलीला नेहाशी प्रत्यक्ष भेटून बोलायच्या होत्या, पण नेहाच्या अशा लगेचच जाण्याने सहाजिकच सायली थोडी हिरमुसली.
       सायलीची परीक्षा जवळ आली होती त्यामुळे सायलीला आता पूर्णपणे अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचं होतं. अर्थातच तिला निखिलला जास्त वेळ देणे शक्य नव्हते. म्हणूनच त्या दोघांनी एक पूर्ण दिवस एकमेकांसोबत घालवायचा ठरवलं. दिवसभर भटकंती, लॉंग ड्राइव्ह आणि मग फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कॅन्डललाईट डिनर, निखिलने तिच्यासाठी अशी एक खास 'रोमॅन्टिक डेट' प्लॅन केली होती. ते सगळ बघून सायली खूप खुश झाली होती. त्याच दिवशी निखिलने तिला सांगितल की कंपनी त्याला तीन महिन्यांसाठी US ला पाठवतेय. सायली तर हरखूनच गेली. तिच्या महत्वाकांक्षी स्वप्नाना आता नवे पंख लाभले होते.
      पंधरा दिवसांनी निखिल US ला निघून गेला. त्याला एअरपोर्टवर सोडायला सायली गेली होती. जाता जाता सायलीपेक्षा तोच जास्त भावूक झाला होता. "बघ मलाही नेल असतस तर आज असं एकट्याला नसतं जायला लागलं." सायली मिश्किलपणे म्हणाली. 
    "अच्छा मॅडम, साखरपुड्याऐवजी लग्न केलं असतं तर जाडीने गेलो असतो आज "निखील हसत म्हणाला. एवढ्यात अनाऊन्समेंट झाली आणि सायलीने पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला निरोप दिला. निखिल गेल्यानंतर सायलीला खूपच एकटेपणा जाणवायला लागला.       "निखीलवर इतक प्रेम करते मी की त्याच्याशिवाय जगणं कठीण जातंय?' सायली स्वतःशीच म्हणाली. कुठेतरी वाचलेलं तिला आठवलं 'सहवासातल्या आनंदापेक्षा विरहातील दुःखच एखाद्याबद्दल आंतरिक ओढ निर्माण करतं'. अखेर सगळे विचार झटकून सायली परीक्षेच्या तयारीत गर्क झाली. यथावकाश परीक्षा पार पडली. प्रोजेक्ट्सच कामही पूर्ण झाल. रिझल्ट लागल्यानंतर १५ दिवसांनी ती नवीन कंपनीत रुजू होणार होती. तोपर्यंत तिच्याकडे मोकळा वेळ होता. पण या वेळेचे सगळे प्लॅन्स तिने आधीच ठरवले होते. कॉलेज मधल्या मित्र मैत्रिणींबरोबर पिकनिक, भटकंती, गेट टुगेदर यासाठी ती निदान १५ दिवस तरी पुण्यातच थांबणार होती. त्यानंतर ती घरी जाणार होती कारण नेहाही त्याच सुमारास माहेरी येणार होती. 
           एक महिना तर गेला आता १५ दिवस सगळ्या मित्र मैत्रिणींबरोबर मजेत जातील मग फक्त दीड महिन्याचा प्रश्न मग निखिल परत येईल. ..सायली स्वताशीच म्हणाली. तो परत आल्यावर काय काय करायचे हे प्लॅन्स ती ठरवत होती. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. 
"हॅलो सायली" ....पलीकडून आवाज आला ...
"हो मी सायलीच बोलतेय".....सायली. 
"सायली मी तुषार बोलतोय. तुषार देशमुख ....GJ कॉलेज..... आठवतंय का?"
 पलीकडचा आवाज ऐकून सायली दचकलीच कारण तुषार हा सागरचा रुममेट आणि बेस्ट फ्रेंड होता.
 स्वतःला सावरत सायली म्हणाली .."हो ओळखल,बोल" 
"सायली तुला आत्ता आपल्या गावी येणं शक्य आहे का? शक्य असेल तर आजच निघ....तुषार.
"पण काय झालय?" सायलीने गोंधळून विचारले.
"ते फोनवर नाही सांगता येणार पण अस समज कि खूपच महत्वाच काम आहे आणि तुझ्याशिवाय ते अडलंय".....तुषार म्हणाला. 
"ठिक आहे मी प्रयत्न करते ...सायली 
"प्रयत्न नको सायली कन्फर्म सांग....तुषार काकुळतीला येऊन म्हणाला. 
"ओके, बुकिंग मिळालं तर आजच निघते मी" ...एवढ बोलून तिने फोन ठेवला. तुषारच माझ्याशी काय काम असणार? आणि त्याला माझा मोबाईल नंबर कसा मिळाला? सायली विचार करत होती, तेवढ्यात तिला निखिलचे शब्द आठवले, 'मुलांना कुठल्याही मुलीची माहिती काढणे अशक्य नसतं.' पण विचार करत बसण्यापेक्षा तिने बुकिंग ऑफिसला फोन करून आजच्या रात्रीच्या गाडीच बुकिंग कन्फर्म केलं. तिच्या आणि निखिलच्या घरीही फोन करून तसं कळवल. 
     घरी आल्यावर सायलीने तुषारला फोन केला. तुषार म्हणाला आपण प्रत्यक्ष भेटून बोलूया. कुठे भेटायचं ते तू सांग, मी तुझ्या घरी येऊ कि तू माझ्या रूमवर येशील?, कि कुठे बाहेर भेटूया?तू ठरव आणि मला तस कळव पण एक मात्र लक्षात ठेव कि मला तुझ्या एकटीशीच बोलायचय. बाहेर भेटण्याचा पर्याय तिला कधीच मान्य नव्हता, त्यापेक्षा त्याच्या रूमवर जाऊन त्याला भेटणंच तिला जास्त सोयीस्कर वाटलं. तुषारच्या रूमचा पत्ता घेऊन ती त्याला भेटायला गेली. 
       सर्वसामान्य मुलांची असते तशीच त्याची रूम होती अस्ताव्यस्त पसरलेली. सायली येणार म्हणून त्याने रूम आवारण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न सायलीच्या नजरेतून सुटला नाही. 
"ये बस ना".... खुर्ची सरकवत तुषार म्हणाला. 
"काय झालय तुषार एवढ कसल महत्वाच काम आहे ?" ...सायलीने विचारले. 
     कुठलीही प्रस्तावना न देता तुषार म्हणाला, "सागरबद्दल बोलायचं आहे" 
    "काय??? मला त्याच्याबद्दल काहीही बोलायचं आणि ऐकायचं नाहीये....सायली चिडून म्हणाली. 
     "सागरचा ॲक्सिडेंट झालाय सायली, गेले १५ दिवस झाले तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. बेशुद्ध आहे .त्याला ICU मध्ये ठेवलय.. डॉक्टरांच्या कुठल्याच प्रयत्नाना तो प्रतिसाद देत नाहीये. त्याच्या जगण्या मरण्याचा प्रश्न आहे म्हणून मी तुला बोलावलंय ",...तुषार भावनाविवश होत म्हणाला. 
     तुषारचं बोलणं ऐकून सायली निरुत्तर झाली होती. तिला खूप मोठा धक्का बसला होता काय बोलाव तिला काहीच सुचत नव्हत. तेवढ्यात तुषारने तिच्यासमोर एक डायरी धरली आणि म्हणाला' " हि डायरी वाच सायली म्हणजे तुला आपोआपच कळेल कि तुला का बोलावलंय.            "कसली आणि कोणाची डायरी आहे हि?", सायलीने विचारले. "         "सागरची! खर तर मलाही या डायरीबद्दल काहीच माहिती नव्हते. तुझा साखरपुडा झाल्याच कळल्यावर एक दिवस सागर माझ्याकडे आला होता. खूप उदास दिसत होता तो. त्याचवेळी एक गिफ्ट पॅक केलेला बॉक्स माझ्या हातात ठेवून म्हणाला, 'माझा आता यावर काहीही अधिकार नाही, मी आता या सगळ्या गोष्टी माझ्याजवळ ठेऊ शकत नाही. पण हि माझी आयुष्याची ठेव समजून तुझ्याजवळ जपून ठेव आणि शक्य असेल तर हा बॉक्स कधीही उघडून बघू नकोस.' त्या दिवशी तो मला भेटला ते शेवटच, त्यानंतर दोनच दिवसांनी त्याचा ॲक्सिडेंट झाला. समोरून येणाऱ्या एका भरधाव टेम्पोने त्याला उडवले आणि तेव्हापासून तो ICU मध्ये ॲडमिट आहे . डॉक्टरांच्या कुठल्याच प्रयत्नाना तो प्रतिसाद देत नाहीये म्हणून मग मी न राहवून तो बॉक्स उघडला,कारण मला वाटत होतं की कदाचित त्या बॉक्समध्ये सागरला वाचवण्याचा मार्ग सापडेल. तो बॉक्स उघडताना सतत मनात येत होत कि मी हे चुकीच तर करत नाहीये ना? . पण हि डायरी वाचल्यावर माझी खात्री झाली की माझा बॉक्स उघडण्याचा निर्णय चुकीचा नव्हता." तुषार न थांबता बोलत होता आणि सायली सुन्नपणे सगळ ऐकत होती. तिचे डोळे पाणावले होते. थरथरत्या हातांनी तिने डायरी उघडली. 
        डायरीच्या पहिल्याच पानावर मोठ्याअक्षरात लिहील होत ..to my sweet love Sayali....त्याच्यासोबतच सिंगिंग कॉम्पिटिशनच्या वेळेचा तिचा एक फोटो आणि प्राईज डिस्ट्रीब्युशनच्या वेळेचे दोन फोटो; एक तिचा प्राईज घेतानाचा आणि दुसरा तिच्या आणि सागरच्या हस्तांदोलनाचा. त्यानंतरच्या प्रत्येक पानावर सायलीच्या भेटीपासूनच्या सगळ्या गोष्टी जशाच्या तशा लिहिलेल्या होत्या. प्रत्येक पान त्याच्या प्रेमाचा पुरावा देत होत. वाचता वाचता सायली त्या देवळातल्या भेटीच्या दिवसापर्यंत आली. 
            सागरने लिहिल होतं..... "दुरूनच तू मला कॅन्टीनच्या दाराशी उभी दिसलीस , नेहमीप्रमाणेच खूप सुंदर दिसत होतीस. पाऊस असाच मुसळधार कोसळत रहावा आणि मी तुझ्याकडेच असच बघत रहाव असं मनोमन वाटत होतं. तू ही माझ्यात गुंतत चालली आहेस हे मला माहित होत. सगळं कळत होतं, पण नाही हे सगळ कुठेतरी थांबायला हवं. हे शक्य नाहीये. माझा मेंदू माझ्या मनाला समजावत होता. तू माझ्यात जास्त गुंतण्याआधीच तुला थांबवायला हवं. मग विचार करून आणि मनाची पूर्ण तयारी करून मी तुला भेटायला बोलावले. मी जे करायच ठरवल होत ते माझ्या मनाला पटत नव्हत पण आपल्या दोघांसाठीही तेच योग्य होतं. देवळात झालेल्या आपल्या भेटीचा क्षणन् क्षण मी माझ्या नजरेत साठवून ठेवलाय कारण कदाचित ती आपली शेवटची भेट होती. मी बोलत असताना तुझ्या डोळ्यात साठलेले अश्रू मला जाणवत होते पण तरीही मी कठोर झालो होतो. मला तस होणंच भाग होतं. तू निघते म्हणून निघून गेलीस क्षणभर तुला थांबवावस वाटल, वाटलं मनातलं सगळं तुफान तुझ्यासमोर उधळून द्याव, तुला मिठीत घेऊन तुझे डोळे पुसावेत आणि तुला सांगाव कि खूप प्रेम करतो सायली मी तुझ्यावर अगदी वेड्यासारख, पण तरीही मी शांत राहिलो. मला माहितेय घरी जाऊन तू खूप रडली असशील पण मला खात्री होती कि तू माझ्यापासून दुरावशील. आपण दोघेही वेगळ्या वाटेचे प्रवासी आहोत सायली . या वाटा एकत्र येणच शक्य नाहीये. तू हुशार, कॉन्फिडंट, करिअर ओरिएंटेड आणि महत्वाकांक्षी. तुझ्यासमोर भव्य दिव्य आकाशाला गवसणी घालणारी स्वप्ने आणि मी मात्र साध आयुष्य जगण्यातच समाधान मानणारा. माझ्या अगदीच पुराणमतवादी नाही पण आधुनिक नसणाऱ्या कुटुंबात तुला सामावून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे माझ्या कुटुंबासोबत तुझीही फरफट करण्यासारख. तू मेट्रो सिटीच्या झगमगाटात रमणारी आणि मी गावातल्या हिरवळीत. तुझं मल्टिनॅशनल कंपनीमध्ये हाय प्रोफाइल जॉब करण्याचं स्वप्न तर मी गावातल पिढ्यान पिढ्या चालत आलेलं दुकान सांभाळणार. तुला स्टेटसचंआकर्षण तर मला घरातल्या आंब्याच्या आणि नारळी-पोफळीच्या बागांच . कसं जमणार सायली आपल? माझ्या खेडेगावातल्या घरी तुझी घुसमट झाली असती. मला माहित होतं, तू खेडेगावातल्या एखाद्या परंपरा पाळणाऱ्या घरात कधीही सामावून जाऊ शकत नाहीस. म्हणूनच मी ठरवलं स्वतः थांबायचं आणि तुलाही थांबवायचं. आमच्या पिढीजात श्रीमंत घराला पैशाची काहीच कमी नाहीये पण त्यातून तुझी स्वप्न , तुझ सुख नाही विकत घेऊ शकत मी. कारण त्याच्या बदल्यात मला माझ्या कुटुंबाच्या अपेक्षाना तिलांजली द्यावी लागेल. कुटुंबातला एकुलता एक मुलगा आहे ग मी त्याना दुखावून कस चालेल? सायली खूप प्रेम करतो ग मी तुझ्यावर पण कधीच ते व्यक्त नाही करू शकत. तुझ्याबरोबरच्या क्षणांची खूप स्वप्न बघितली होती मी, पण कधीच प्रत्यक्षात नाही आणू शकत. एक मात्र नक्की सांगतो माझ्या हृदयातील एक कोपरा फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच असेल....आयुष्यभरासाठी. ती जागा फक्त तुझी असेल तिला कधीच कोणी धक्का लावू शकणार नाही. तू कायम सुखात रहावस एवढीच माझी इच्छा आहे. कुठेतरी वाचलेल्या कवितेतल्या काही ओळी आठवतायत सायली ....
          एक सांगशील,
          आपले रस्ते अवचित कुठे; असे जुळले?
          आपल्याच नादात चालताना हे देखणे वळण कसे भेटले?
           क्षणाभोवती, हि कसली अनोखी रंगत खुलते आहे?
           जगणे व्हाव गाणं, अशी सुरांची रंगत जुळते आहे
          पण खरं सांगू ?
            या वाटांच हे अस भेटणं बर नव्हे ,
            जीवघेणं उत्कट असेल पण ते खर नव्हे.
            तुझी दिशा पूर्वीच निश्चित ती बदलणं हिताचं नाही
            माझ्यापुरत बोलायचं तर मला माझी दिशाच नाही
            तुझ्या संगतीत आनंद आहे, आश्वासन आहे, दिलासा आहे
            माझ्या मात्र स्वप्नांच्या हातात फक्त भंगण्याचाच वास आहे
         म्हणून म्हणतो,
          अशा वाटांनी मुळात एकत्रच येऊ नये
          जीव जडवून चटका लाऊन निदान दूर होणं तरी असू                          नये.........................
    वाचता वाचता सायलीने इतका वेळ डोळ्यात साठवलेलं पाणी तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातून ओसंडून वाहू लागलं. किती चुकीच समजत होती ती सागरला. खर तर तिने सागरला ओळखलच नव्हतं. त्याच प्रेम तिला कधी समजलच नव्हतं. ती नेहमी स्वतःच्या विश्वातच दंग असायची. आता मात्र तिला नेहाचे शब्द आठवत होते," कुठल्याही गोष्टीला दोन बाजू असतात सायली. तू एकच बाजू बघतेयस. दुसऱ्या बाजूचा कधी विचार तरी केलायस का?" तिला नेहाची खूप आठवण येत होती. आत्ता या क्षणी ती आपल्याजवळ असावी अस तिला सारख वाटत होत. खरच मी प्रेम केल होत सागरवर? सायलीच्या मनात द्वंद्व चालू झालं. तिचच मन आता तिच्याविरुद्ध उभं ठाकलं होतं. स्वतःला सावरत सायली म्हणाली, "मला सागरला भेटायचंय" मला त्याच्याकडे घेऊन जाशील ?
   तुषारने फक्त होकारार्थी मान हलवली. हातातली डायरी बाजूला ठेऊन सायली त्याच्याबरोबर जायला निघाली. तुषारने मात्र आठवणीने डायरी बरोबर घेतली.
             सायली आणि तुषार हॉस्पिटल मध्ये गेले. सुदैवाने ती दोघं विजिटिंग अवर्समद्धेच तिथे गेली होती. ती दोघं गेली तेव्हा सागरची आई बाहेरच भेटली. तुषारने त्यांची आणि सायलीची ओळख करून दिली. तुषार आणि सायली ICU मध्ये गेली. दोघं आत जाताच सागरचे वडील बाहेर जावून थांबले. कारण ICU मध्ये फक्त दोन माणसांनाच थांबायची परवानगी होती. आत गेल्यावर मात्र सागरला पाहुन तिला रडूच आल. कितीतरी दिवसांनी ती सागरला बघत होती ते हि अशा अवस्थेमध्ये. हिम्मत करून ती सागरजवळ जाऊन बसली. त्याचा हात हातात घेऊन म्हणाली, " सागर काय अवस्था करून घेतलेयस स्वतःची? का सांगितल नाहीस मला सगळं? का एकट्यानेच सगळं  ठरवलस? why saagar why? असं म्हणून सायली रडू लागली. तुषार शांतपणे मागे उभा होता. त्याच्याही डोळ्यात पाणी तरळले. दु:खाचा आवेग ओसरल्यावर ती म्हणाली, "तू खूप मोठ्या मनाचा आहेस सागर, किती ओळखलस तू मला, माझी सगळी स्वप्न, माझे विचार, माझ्या आवडी निवडी सगळ तुला माहिती होते आणि मी मात्र तुला समजून घ्यायचा साधा प्रयत्नही केला नाही कधी. मला माफ कर सागर. मी तुझं प्रेम कधी समजूच शकले नाही. पण तू हे सगळं मला का सांगितल नाहीस? एकदा सांगून तरी बघायचास....आणि ठिक आहे मी नव्हते ॲडजस्ट होऊ शकत तुझ्या कुटुंबात पण तू तर माझ्याबरोबर ॲडजस्ट होऊ शकला असतास ना?  मेट्रोसिटीमध्ये राहून गावाकडची शेती, व्यवसाय सांभाळणारे कितीतरी लोकं आहेत. मी ही मदत केली असती तुला.
     सायलीच्या या वाक्यावर मात्र तुषार चमकला. तो काही बोलणार इतक्यात नर्स आली व वेळ संपल्याच सांगून त्याना बाहेर जायची विनंती केली. बाहेर जाऊन सागरच्या आई बाबांचा निरोप घेऊन दोघही जायला निघाली. तेवढ्यात ICU जवळ कसलीतरी धावपळ चालू झालेली दिसली. काय झालं काहीच कळत नव्हत. इतक्यात तुषारला ती मगाचचीच नर्स दिसली. तिच्याजवळ चौकशी केल्यावर कळलं १५ दिवसानंतर सागरने हालचाल केलेय. अजून पूर्ण शुद्धीत नाही आलाय पण डॉक्टर प्रयत्न करत आहेत. हे ऐकून सायली आणि तुषार दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद तरळला. डॉक्टर बाहेर येईपर्यंत दोघांनी थांबायचे ठरवले. सागरचे आई बाबा ICU बाहेरच थांबले. तुषार आणि सायलीला मात्र नर्सने वेटिंगरूममध्ये थांबायची विनंती केली. वेटिंग रुममध्ये विशेष गर्दी नव्हती पण बसायला मात्र जागा नव्हती. तुषारने सायालीसमोर डायरीचे एक पान काढून ते वाचायला सांगितले. तेवढ्यात तुषारचा मोबाईल वाजला तुषार बोलण्यासाठी म्हणून बाजूला गेला. सायलीने हातातल्या डायारीकडे बघितले तुषारने काढून दिलेले पान तिने उभ्याउभ्याच वाचायला सुरवात केली. ते वाचल्यावर मात्र सायलीचे डोळे अश्रुंनी डबडबले आणि आधारासाठी म्हणून मागच्या भिंतीला टेकली. पुढच काहीच ती वाचू शकली नाही. सागरने त्यात लिहील होतं," मला माहित आहे मी माझ्या भावना कधीही तुझ्यासमोर व्यक्त करणार नाही सायली कारण मला खात्री आहे तू माझ्यासाठी माझ्या गावात रहायला कधीच तयार होणार नाहीस उलट तू मला मेट्रो सिटीमध्ये रहावूनच गावाकडचं सगळं मी कसं सांभाळू शकतो हेच पटवून द्यायचा प्रयत्न करशील. पण ते मला शक्य नाही. तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहात होते. तेवढ्यात तुषार तिथे आला रडणाऱ्या सायलीकडे बघून तो पळतच तिच्याजवळ गेला. तुषारने तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण ती आता पूर्णपणे नि:शब्द होती.
        "सायली, कॉफी!" निखिलच्या आवाजाने सायली भानावर आली.
 "अरे तू कधी आलास? आज लवकर ?"सायलीने आश्चर्याने विचारलं. "जेव्हा तू सागरच्या आठवणीत होतीस, निखिल म्हणाला.
  ते ऐकून सायली दचकून म्हणाली. "पण तुला....
 तिचं बोलण मध्येच थांबवत निखिल म्हणाला , "मी आलो तेव्हा रेडीओवर सलोनासा सजन है...चालू होतं आणि तू कॉफी तशीच ठेवून शांतपणे बसली होतीस, त्यावरूनच ओळखल मी." सायलीला उदास झालेली बघून निखिलने तिला जवळ घेतले आणि म्हणाला, "Its ok सायली, येणाऱ्या आठवणी थांबवता येत नाहीत.
     "मी खूप हर्ट केलं ना तुला?" सायलीने रडतच विचारलं.
"नाही ग राणी", तिचे अश्रू पुसत निखिल म्हणाला. तरीही ती उदासच होती. निखिलने तिचा हात हातात घेऊन तिला जवळ घेतले आणि आकाशाकडे बोट करून म्हणाला," त्या तिथे आकाशात खूप तारे असतात ढग दाटून आल्यावर ते आपल्याला दिसत नाहीत पण आपण मात्र त्यांना दिसत असतो. सागरही त्यातलाच एक तारा बनलाय आता, तिथून कुठूनतरी तो तुला नक्की बघत असेल , त्याला अशी रडणारी, उदास सायली नाही हा आवडणार. सायलीने नेहमी सुखात रहाव हीच त्याची इच्छा होती. त्याच्या या बोलण्याने सायलीला अधिकच रडू आलं ती स्वतःला सागर आणि निखिल या दोघांचीही अपराधी समाजत होती. त्यांच्या प्रेमापुढे,त्यांच्या मनाच्या मोठेपणापुढे ती पूर्णपणे नि:शब्द होती आणि पाउस मात्र मुसळधार बरसत होता.
समाप्त.
©मानसी जोशी

(सदर कथेतील सागरच्या डायरीमधील कविता मी लिहिलेली नसून एका अपरीचित कवीची आहे. निव्वळ कथेचा भाग म्हणून मी ती माझ्या कथेत वापरली आहे.)


मैत्री

मैत्री

कॉलेजचा पहिला दिवस  आणि  तू मला भेटलास ...एका गावातून आलेली बावरलेली गोंधळलेली थोडीशी बावळट अशी  मी F.Y.BCS चा वर्ग शोधत होते....ना आत्मविश्वास ना मोकळेपणा. माझी अडचण तू ओळखलीस आणि मला माझा वर्ग  दाखवलास. शहरातल्या मॉडर्न मुलींसमोर मी खूपच बावळट वाटत होते. सुरुवातीच्या काळात माझ्याशी कोणी फारस बोलायचं नाही. तू मात्र बोलायचास. तू माझ्याशी बोलायचास म्हणून तुझे मित्र तुला हसायचे, तुझी चेष्टा करायचे, पण तू मात्र तस कधी दाखवल नाहीस.मला कळत होत पण मी हि तुला काही विचारल नाही. दिवस असेच सरत होते. आपली ओळख हळूहळू वाढत होती. तू मला कधी बदलायचा प्रयत्न  केला नाहीस पण मी मात्र हळूहळू बदलत गेले. तुझ्या सहवासात आत्मविश्वास मिळत गेला. शहरी वातावरणात हळूहळू रुळू लागले. बघता बघता ६ महिने  निघून गेले. माझे  टर्मिनल एक्झॅमचे मार्क्स बघून नोट्स मागण्यासाठी का होईना वर्गातल्या मुली माझ्याशी बोलू लागल्या. मी या शहरी वातावरणात चांगलीच रुळत  होते आणि मला माझा ग्रुपहि  मिळाला पण तू मात्र कायमच माझी प्रायोरिटी  होतास. मी हि  आता शहरातल्या मॉडर्न मुलींसारखी  स्मार्ट झाले होते. माझ्याशी बोलतोस म्हणून तुला हसणारे तुझे मित्र, "ए तिच्याशी ओळख करून दे ना" अस म्हणून तुझ्या मागे लागत होते. तू मात्र हसून वेळ मारून न्यायाचास.असच सेकंड इअरचं वर्ष सरल. आता फायनल इअर त्यामुळे आपण दोघेही बिझी झालो.  कॉलेज, क्लास, प्रॅक्टिकल्स यातच सारा वेळ  जाऊ लागला. माझ कंप्युटर सायन्स आणि तुझं केमिस्ट्री म्हणजे आपण दोन विरुद्ध टोक. आता रोज होणारी भेटही कमी होत होती. सगळ रुटिन बिझी झाल होतं. तरीही कधीतरी एखाद्या निवांत सोनेरी संध्याकाळी तुझी आठवण यायची आणि मन बेचैन व्हायचं. कधीही कुठलाही प्रॉब्लेम असुदे, मग तो कितीही मोठा किंवा  छोटा, तुझ्याशी बोललं कि सगळच सोप होवून  जायचं.तुझ्याशिवाय मी म्हणजे मला अपूर्णच वाटायचे. मला आजही आठवतोय तो दिवस ज्या दिवशी मी माझ्या मनातले भाव तुझ्यासमोर व्यक्त केले. खरतर आपल्याला एकमेकांच्या भावना समजून घेण्यासाठी शब्दांची गरज कधीच नव्हती, पण तरीही मी माझ्या भावना तुझ्यासमोर व्यक्त केल्या. त्यावर तू म्हणालास, "आपल नात खूप सुंदर आहे ग त्याला कुठल्याही नवीन नात्यात गुंफू नकोस.  आपल्यातली हि निखळ मैत्री माझ्यासाठी माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे ती मला अशीच आयुष्यभर जपून ठेवायची आहे.  तू ज्याला प्रेम समजतेस ते प्रेम नाही तुला माझी वाटणारी ओढ आहे. प्रेम आणि मैत्री यामध्ये एक नाजुकशी पुसटशी रेष असते. ती रेष तू ओळख.  निट विचार कर आणि तूच ठरव तुला काय हवय.  तरीही तुझी इच्छा असेल तर आपल्या नात्याला तू म्हणशील ते नाव द्यायची माझी तयारी आहे. आपली निखळ मैत्री कि प्रेम निवड तुलाच करायची आहे...." मला तुझं म्हणण पटल होत. अर्थात तू सांगितलेली कुठलीही गोष्ट मला पटणार नाही, अस कधीच झालं नव्हत. दाटून आलेले मेघ दूर झाले आणि सगळ कस स्वच्छ झालं. आपल्यातल नात म्हणजे निव्वळ निखळ मैत्री  हेच सत्य होतं बाकी सगळा भावनांचा खेळ होता.
   तू नेहमीच मला समजून घेतलस. मला काय हवय हे माझ्या पण आधी आणि माझ्यापेक्षा जास्त चांगल तुला माहित असायचं. माझ लग्न ठरलं तेव्हा माझ्या भावी पतीला तू आपल नातं आधीच स्पष्ट केलस  आणि त्याच्याशी बोलल्यावर तो माझ्यासाठी खरच योग्य आहे हि पावतीही दिलीस आणि मी निर्धास्त झाले. तुझ्या लग्नाच्या वेळी बायकोकडून जणू आठवं  वचनच घेतलस की ती आपल्या मैत्रीच्या आड कधीच येणार नाही. हे सार घडत असताना प्रत्येक नातं तू जपत होतास. नाती जपणं मी तुझ्याकडूनच शिकले. माझ्या नवऱ्याचा अपघात झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू. माझ्यावर तर जणू आभाळ कोसळलं. किती दिवस दु:खात बुडाले होते कोणास ठावूक त्यातच आधीच तब्येतीने नाजूक असणाऱ्या माझ्या सासूबाई तर पूर्ण खचल्या. सासरे आधीच गेलेले, त्यातच मुलाच अस अपघाती जाणं, त्या तर पूर्ण कोलमडून गेल्या. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझी  ८ वर्षाची  मुलगी खूपच गांगरून गेली. पण त्यावेळी मात्र तू आणि तुझ्या सुस्वभावी पत्नीने आम्हाला सावरल. सुदैवाने माझी नोकरी असल्यामुळे मला आर्थिकदृष्ट्या काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण सासूबाई अंथरुणाला खिळल्या त्या कायमच्याच. आणि वर्षभरात त्याही मला सोडून गेल्या. माहेरी तर गरिबी आणि इथली नोकरी सोडून तिथे जाऊन कसं राहणार? अशा वेळी तू मला आधार दिलास आणि मी माझ्या घरीच रहायचं ठरवलं. संकटं सांगून येत नाहीत आणि आली की पिच्च्छां सोडत नाहीत तस झालं. रिसेशनच्या लाटेत तुझी नोकरी गेली. तू नवीन नोकरी न शोधता व्यवसाय करायचा ठरवलास.प्रश्न होता भांडवलाचा, शिवाय तुझ्या बायकोचाही याला विरोध. अशा वेळी मी माझी सगळी सेविंग्ज तुला दिली तेव्हा तू  बायकोला म्हणालास आमची मैत्री हीच माझी इनव्हेस्टमेंट आहे. आणि मला म्हणालास या इन्व्हेस्टमेंट मध्ये मी तुझं नुकसान नाही होवू देणार. तू प्रचंड मेहनत करत होतास आणि यशाची एकएक पायरी पटापट चढत होतास. तुझ कुटुंब, तुझा बिझनेस या साऱ्या जबाबदाऱ्यांबरोबरच मैत्रीच नातंही जपत होतास. पण या साऱ्यानंतर समाजामध्ये आपल्या दोघांबद्दल नको ती चर्चा होवू लागली त्याची झळ आपल्या दोघांच्याही कुटुंबाला बसत होती. तुझ घर तू सावरलस. पण माझ्या टीनएजर मुलीला समजावण्याचं अवघड कामही तू अगदी सहज केलस. ते हि तिच्यावर न चिडता आणि तिला न दुखावता.
     "तुझं आणि आईच काय नातं आहे? तू का येतोस आमच्याकडे?" या तिच्या प्रश्नावरच तुझ उत्तर ऐकून तर मी सुद्धा थक्क झाले होते.
     किती सहज सांगितलस तिला तू ,"झाडाला गुरफटलेल्या वेलीच जे नातं झाडाशी असतं तेच नातं आमच्यामध्ये आहे. कधी ती झाड झाली तर कधी मी. ना झाडाने कधी वेलीवर आपला अधिकार सांगितला ना वेलीने झाडावर.  एक निरपेक्ष नातं असत दोघांमध्ये तसच तुझ्या आईच आणि माझं निरपेक्ष मैत्रीच नातं आहे.........माझ्या मुलीला  मैत्री आणि प्रेमातल्या नाजूक रेषेची ओळख योग्य वयातच झाली निव्वळ तुझ्यामुळे!माझ्या मनात दाटलेले मेघ जसे दूर झाले होते तसेच तिच्याही झाले.
       अशा किती गोष्टी लिहू? आज मला माझ्या आयुष्याचा नवा जोडीदार मिळालाय. एका नव्या संसाराची सुरुवात करतेय मी. अर्थातच तुझ्या पुढाकारामुळेच. मला आणि माझ्या मुलीला या लग्नासाठी  तयार करण्याच शिवधनुष्य  तू अगदी सहज पेललस. आज मी हे घर, हे शहरच नाही तर हा देश सोडून चाललेय. माहितेय मला एका क्लिक वर कोणालाही बघता येतं कोणाशीही बोलता येत पण तरीही आज मनातल सार मी या चिठ्ठीत लिहितेय ...सतत तुझ्याजवळ राहण्यासाठी. जाता जाता सुचलेल्या चार ओळी लिहिते.
           नाती असतात रक्ताची, नाती असतात व्यवसायाची
          काही नाती फक्त स्वप्नांची तर काही सहज जोडलेली
          असच एक नातं जुळतं मैत्रीच
           उत्कठ भावानेच कि शब्दांच्या पलीकडलं?

*संपूर्णत: काल्पनिक
©मानसी जोशी

Saturday, 8 October 2016

कथा - झाले मोकळे आकाश

झाले मोकळे आकाश

ओपीडी संपवून अदिती राउंडला जायला निघाली. आज खर तर तसा उशीरच झाला होता. रात्रीचे दहा वाजत आले होते. अदिती खरं तर खूपच कंटाळली होती. पण काय करणार न जाऊन पण चालणार नव्हत. राउंडला जायचं म्हणजे आता पुन्हा अवनी आणि आशुतोष देशपांडे भेटणार हा विचार मनात आला आणि अदितीचा कपाळावर किंचितशी आठी आली. अदिती एक हुशार गायनॅक होती आणि अवनी देशपांडे ही तिची पेशंट. पाच महिन्याच्या गरोदर अवनीचा खूप मोठा अपघात झाला होता. अदितीने प्रयत्नांची शर्थ करुन तिचा जीव वाचवला होता. पण तिच्या बाळाला मात्र ती वाचवू शकली नव्हती आणि दुर्दैवाने या अपघातामूळे अवनीचे आई होण्याची शक्यता खूपच कमी झाली होती. अस असूनही अदितीला अवनीबद्दल एक प्रकारची असूया वाटत होती. तस बघायला गेल  तर अवनी देशपांडे आणि सुंदर, हुशार अदितीची तुलनाच होवू शकत नव्हती. अवनी एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील. शिक्षणही जेमतेम ग्रॅज्युएट. रुपानेही यथातथाच. पण तरीही अदितीकडे जे नव्हतं किंवा अदितीला जे हवं होत ते अवनीकडे होत. ते म्हणजे अवनीला मिळणार आशुतोषच प्रेमं. आशुतोष देशपांडे एक अत्यंत सज्जन  माणूस या पलीकडे त्याच्याबद्दल  बोलण्यासारखं काहीच नव्हत. एका प्रायवेट लिमिटेड कंपनीत साधा अकाऊंटट असणारा आशुतोष रुपानेही अगदी सामान्यच होता. अदिती त्याच्याकडे आकर्षित होईल अस त्याच्याकडे काहीही नव्हतं. अवनीसारख्या कितीतरी केसेस तिने हाताळल्या होत्या तरीही अविनाश ज्या पद्धतीने अवनीची काळजी घेत होत होता, तिला समजून घेत होता ते पाहून अदितीच्या मनात अवनीबद्दल असूया निर्माण होत असे. त्यांच एकमेकांशी असलेलं नातं, एकमेकांवरच प्रेम पाहून अदितीच्या मनात चलबिचल होत असे. अदितीला कळत होत आपलं हे वागणं चुकीचे आहे, आपल्या मनात होणारी घालमेलही चूक आहे पण तरीही ती हे सार थांबवू शकत नव्हती.
          अदिती घरी पोचली तेव्हा ११.३० होवून गेले होते. भूक तर कधीच मेली होती. नुसतंच कपभर दूध पिवून अदिती झोपायला गेली. ती खूप दमली होती तरीही खूप प्रयत्न करुनही निद्रादेवी काही तिच्यावर प्रसन्न होत नव्हती.मनात विचारांच काहूर माजलेलं असताना ती तरी कशी प्रसन्न होणार म्हणा. तिच्या डोळ्यासमोर सतत अवनीचा चेहरा येत होता. तिने अवनीला जे सांगितल ते नक्कीच खोट नव्हत पण त्यात सत्यता किती होती हे खर तर अदितीलाही ठावूक नव्हत. आज ज्या ठिकाणी अवनी आहे काही वर्षांपूर्वी अदिती त्याच जागेवर होती. अदिती विचार करत होती आज या परिस्थितीतही अवनीसोबत तिच प्रेम, तिचा समजूतदार नवरा आशुतोष आहे आणि त्यावेळी माझ्यसोबत गौरांग कधीच नव्हता. गौरांगच्या आठवणीने तिच्या मनात एक सूक्ष्म कळ उठली. "का वागलास गौरांग तू माझ्याशी अस किती प्रेम केल होत मी तुझ्यावर आणि तू मात्र........ अदितीच मन आक्रोश करीत होत. आठ वर्ष होवूनही अदिती 'तो' दिवस विसरू शकत नव्हती.
    गौरांग पटवर्धन; पटवर्धन ग्रूप ऑफ इंडस्ट्रीज च्या मालकांचा म्हणजेच नानासाहेब पटवर्धनांचा  मुलगा. घरात लक्ष्मी पाणी भरत असताना गौरांगला मात्र त्यात काहीही रस नव्हता. घरचा बिझनेस सांभाळण्यापेक्षा त्याला डॉक्टर गौरांग ही ओळख मिळवण्यातच जास्त रस होता. अदिती एम.डी गायनॅक  झाल्यानंतर एका मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये नोकरी करत होती. गौरांगची आणि तिची तिथेच भेट झाली. गौरांगही हार्ट स्पेशॅलिस्ट  म्हणून तिथेच नोकरी करत होता. सुंदर, हुशार अदिती त्याला प्रचंड आवडली होती. अदिती मात्र आपलं काम बरं की आपण बरं या विचारांची होती. ती गौरांगशी मोजून मापूनच बोलत असे. एक तर गौरांग तिला जवळपास २ वर्षांनी सिनिअर होता आणि दुसरं म्हणजे त्याच्यासारख्या बड्या घराणातल्या मुलांपासून लांबच राहत असे. पण गौरांग मात्र सतत तिच्या अवती भोवती राहायचा प्रयत्न करीत असे. खर तर त्या दोघांची ही भेट फार कमी होत असे. अशातच एक दिवस गौरांगने तिला प्रपोज केल. अदितीला काय बोलाव काहीच सुचेना. तरीही तिने धीर करुन स्पष्ट शब्दात नकार दिला. गौरांगने मात्र तरीही मैत्रीचा हात पुढे केला आणि अदितीला म्हणाला, "अदिती मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो तरीही तुझ्या मताचा मी आदर करतो जर तुझं माझ्यावर प्रेम नसेल तर ठिक आहे, पण निदान आपल्यामध्ये सहज निर्माण होवू शकणाऱ्या मैत्रीच्या नात्याला तरी नाकारु नकोस". 
का कुणास ठावूक पण अदिती नकार देवू शकली नाही आणि तिनेही मैत्रीचा हात पुढे केला.
     हळूहळू गौरांग तिला आवडायला लागला. ती कधी त्याच्या प्रेमात पडली ते तिच तिलाच कळलं नाही. गौरांगच्या घरी मात्र अदिती कोणालाच मनापासून पसंत नव्हती. गौरांगचं लग्न त्यांच्यासारख्याच एखाद्या बड्या घराण्यातील मुलीशी व्हावे अशी त्याच्या आई वडीलांची इच्छा होती. पटवर्धनांच्या घरात बायकांना कधी कमावण्यासाठी बाहेर जावं लागल नाही आणि तसही बायकांनी चूल आणि मुलच सांभाळावे या मताच्या त्याच्या आईला अदितीसारखी करिअर ओरिएंटेड मुलगी आपली सून होणं हे फारसं पटलेलं नव्हतं. परंतू निव्वळ गौरांगच्या सुखासाठी म्हणून या लग्नाला  कोणीच विरोध केला नाही. आणि मिस अदितीची मिसेस अदिती गौरांग पटवर्धन झाली. लग्नानंतरही अदितीने नोकरी चालूच ठेवली होती.
       असच वर्ष निघून गेल. या वर्षभरात तिच्या अनेक रजा झाल्या होत्या. सुरुवातीला हनीमूनसाठी आणि नंतर कधी वर्षभरातले सणवार म्हणून तर कधी घराण्यातील परंपरा म्हणून असणाऱ्या विविध पूजा आणि कार्यक्रम म्हणून. तरीही अदितीने कसलीही तक्रार केली नाही. त्या दिवशी गौरांगच्या आईने तिला लवकरच गोड बातमी मिळूदे वर्ष झाल आता अस सुचवलं, सुचवलं कसलं फर्मावलच. अदिती त्यांच्यासमोर काहीच बोलली नाही पण रात्री गौरांगजवळ मात्र तिने आपली नाराजी व्यक्त केली. तिला वाटलं होत गौरांग तिला समजून घेईल पण झाल मात्र उलटच त्यानेही त्याच्या आईचीच री ओढली. त्यावेळी अदितीने मात्र ठामपणे नकार देउन गौरांगला स्पष्टपणे सांगितले, माझं करिअर ही माझी प्रायॉरिटी आहे आणि ही गोष्ट मी लग्नाआधीच तुला सांगितली होती आणि तेव्हा तू हे मान्यही केल होतस तर आत्ता का असा आग्रह करतोयस?"
    यावर गौरांग तिला समजावण्याचा सुरात  म्हणाला होता, "अग तुला करिअर नको करुस अस मी म्हणतच नाहीये पण मलाही आता अस वाटतय आपल्या घरात एक छोटं बाळ यावं. मला खूप आवडतात लहान मुलं प्लीज तू विचार कर ग जरा. तू नंतर पुन्हा हॉस्पिटल जॉईन करु शकतेस.
 यावर मात्र अदिति संतापली आणि गौरांगला म्हणाली, "Please Gaurang dont be emotional. Be practical. मी आत्ता ब्रेक घेणं हे माझ्या करिअरसाठी किती रिस्की आहे हे तुला चांगलंच कळतंय. मला समजावण्याचा प्रयत्न करु नकोस. काहीही झालं तरी मला निदान अजून दोन वर्षे तरी मुलाचा विचार करायची इच्छा नाहीये."
गौरांग काही बोलणार इतक्यात अदिती म्हणाली, "No more discussion please, its over now"
          त्या दिवसानंतर मात्र गौरांगच वागणं पूर्णपणे बदललं. पूर्वी अदितीच्या केसेस उत्साहाने ऐकणारा, त्यावर चर्चा करणारा गौरांग तिच्या केसेस बद्दल बोलणं टाळू लागला. त्यांच्यातील संवाद कमी होवू लागला. अदितीला या साऱ्याचा खूप त्रास होत असे. याचा परिणाम सहाजिकच तिच्या कामावर होवू लागला होता. तिच्या हातून छोट्या छोट्या चुका होवू लागल्या. तिच्या सिनिअर डॉक्टर माया यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी अदितीला विश्वासात घेऊन खर काय आहे ते जाणून घ्यायचं ठरवलं. अदितीनेही इतके दिवस मनात साठलेलं सार त्यांच्याजवळ बोलून दाखवलं.
    डॉक्टर माया अतिशय हुशार आणि प्रेमळ होत्या. त्यांनी अदितीला सांगितले, "अदिती कुटुंब आणि करिअर यामध्ये सुवर्णमध्य साधायचा असेल तर कुटुंबातल्या सदस्यांच्या इच्छा, त्यांच्या आवडी निवडीही जपाव्या लागतात. तू चार पावले पुढे जा गौरांग आणि त्याच्या घरातलेही चार पावले पुढे येतील. गौरांग शिकलेला आहे डॉक्टर आहे,  त्यामुळे मला नाही वाटत तो तुझ्या करिअरच्या आड येइल. अग करिअर या एकमेव कारणासाठी तुला आई न  होण्याचा निर्णय घ्यायचा नसेल तर तसा विचार करु नकोस. अगदी डिलिवरीच्या दिवसापर्यंत तू काम करु शकतेस. राहता राहिला प्रश्न नंतरच्या तीन/चार महिन्यांचा तर तू त्याची काळजी करु नकोस मी आहे ना ? मी सांभाळून घेईन सगळं. ते माझ्या हातात आहे.  पण जर तुझ्या संसाराची घडी जर विस्कटली तर ती मात्र मी काय कोणीच नाही सावरू शकत. हा पण तू आई होण्यासाठी जर मानसिकदृष्ट्या तयार नसशील तर मात्र तू हा निर्णय न घेतलेलाच बरा. आणि तस असेल तर मला गौरांगशी बोलाव लागेल. तुझ आयुष्य तुझ्या पद्धतीने जगण्याचा तुला पूर्ण अधिकार आहे."
      डॉ. मायांशी बोलल्यावर अदितीच्या मनातला गोंधळ अजूनच वाढला. आपल्याला नक्की काय हवं आहे हेच तिला कळत नव्हतं. असेच २/३ महिने गेले. तिच्यातला आणि गौरांगमधला संवाद अलीकडे खूपच कमी झाला होता. अखेर अदितीने माघार घेऊन आपला संसार आणि आपलं करिअर दोन्हीचा सुवर्णमध्य साधायचा ठरवले.
      त्या दिवशी पटवर्धनांच्या बंगल्यात जणू आनंदोत्सव साजरा होत होता. अदितीने ती गोड बातमी दिल्यावर गौरांग तर खूश झालाच होता पण तिच्या सासूबाईसुद्धा खूप खूश झाल्या. नव्या जीवाच स्वागत करण्यासाठी सगळेच उत्सुक होते. तिच्या सासूबाईंनी स्वतःजवळचा हिऱ्यांचा हार तिला भेट दिला. तिच्यासाठी खास तिच्या आवडीचे जेवण बनविण्यात आले. हे सगळं कौतुक बघून अदिती हरखून गेली होती. पण तेवढ्यात तिच्या सासूबाई म्हणाल्या, "अदिती आता हॉस्पिटलमध्ये जाणं बंद बरं का ? आता तू फक्त तुझ्या स्वतःच्या बाळंतपणाची काळजी करायची."
       अदितीच्या सगळ्या आनंदावर जणू विरजण पडले. तिने आशेने गौरांगकडे बघितले पण तो काहीच बोलला नाही. अदिती खूपच चिडली होती. बेडरुममध्ये गेल्यावर तिने आपली नाराजी गौरांगसमोर व्यक्त केली. त्यावर गौरांग काहीच बोलत नाही म्हटल्यावर अदिती रागाच्या भरात बोलून गेली, "तुझ्यासाठी आणि तुझ्या फॅमिलीसाठी मी आत्ता माझी इच्छा नसताना बाळाचा विचार केला पण आता हे फार होतय हा गौरांग, तुझ्या आईच अस माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाक खूपसणं  मला मान्य नाही. काहीही झालं तरी मी हॉस्पिटलला जाणार.....
   तिचं बोलणं मध्येच तोडत गौरांग म्हणाला, "अदिती प्लीज शांत हो आई तुझ्या काळजीपोटीच बोलतेय ना?" "कसली काळजी गौरांग? मला वाटतय तू विसरलास बहुदा मी स्वतः एक गायनॅक आहे." अदिती आता खूपच संतापली होती. शब्दाला शब्द वाढत गेला आणि वाद विकोपाला गेला. अखेर गौरांग वैतागून खोलीबाहेर निघून गेला. अदिती हतबल झाली होती. आत्ता या क्षणी तिला  गौरांग तिची बाजू समजून घेईल अस वाटत होत. पण नेहमीप्रमाणे त्याने त्याच्या आईचीच बाजू उचलून धरली होती. पण अदिती मात्र तिच्या निर्णयावर ठाम होती. काहीही झाल तरी ती तिची नोकरी सोडणार नव्हती. बाकी कोणी नाही पण डॉक्टर माया तिला समजून घेवून तिला सपोर्ट करतील अशी तिला अपेक्षा होती.
      यावेळी मात्र गौरांगने माघार घेतली आणि अदितीची माफी मागीतली. शिवाय आईशी बोलून तिला अदितीची बाजूही पटवून दिली. अखेर गौरांगच्या आईने अदितीला  काम सुरू ठेवण्यासाठी काही अटिंवर परवानगी दिली. अदितीनेही या अटी मान्य केल्या त्यात सर्वात महत्वाची अट होती ती म्हणजे 'नो नाईट शिफ्ट्स'. डॉक्टर मायानी कसलेही प्रश्न न विचारता तिला फक्त डे शिफ्ट्समध्ये काम करायची परवानगी दिली.  एरवी वेळ मिळेल तेव्हा जेवणारी अदिती आता प्रयत्नपूर्वक जेवणाच्या वेळा पाळू लागली. तिच्यासाठी रोज खास तिच्या डाएट प्लॅननुसार ठरलेल्या वेळात घरुनच गरमागरम जेवणाचा डबा येऊ लागला. अदिती,  गौरांग आणि घरचे नाराज होणार नाहीत याची तिच्या परीने शक्यतो सगळी काळजी घेत असे. असेच चार महिने गेले. सुरुवातीला बाळ नको म्हणणारी अदिती आता तिच्या बाळाच्या आगमनाची तयारी उत्साहाने करु लागली. घरी तर सगळेजण तिची काळजी घेत होतेच पण हॉस्पिटलमधला स्टाफही आपाआपल्यापरीने तिची काळजी घेत होता. गौरांग आणि आदितीने बाळासाठी खूप स्वप्न रंगवली होती. सासूबाईंचा कल थोडा मुलगा व्हावा असा असला तरी गौरांगला आणि अदितीला मात्र मुलगीच हवी होती. खर तर अदितीपेक्षा गौरांग या बाळाची खूपच आतूरतेने वाट बघत होता.
        त्या दिवशी  डॉक्टर माया एका  क्रिटीकल केसाविषयी अदिती आणि इतर ज्युनियर डॉक्टर्ससोबत चर्चा  करीत होत्या. डॉक्टर माया खूप हुशार गायनॅक होत्या कितीतरी क्रिटीकल केसेस त्यांनी अत्यंत हुशारीने सोडविल्या होत्या. त्यांच व्यक्तिमत्व अतिशय प्रभावी होतं. अदिती त्यांनाच आपला आदर्श मानत असे. चर्चा करता करता संध्याकाळचे ७ वाजून गेलेलेही कोणाला कळले नाही. तितक्यात रिसेप्शन काउंटरवरुन अदितीसाठी फोन आला. अदितीचा ड्रायव्हर ६ वाजल्यापासून तिची वाट बघत पार्किंगमध्ये थांबला होता. सुरुवातीला रिसेप्शनिस्टने मिटींग चालू आहे अस सांगून फोन करण्यास नकार दिला. ड्रायव्हरही समजून घेवून थोडा वेळ शांत राहिला होता. पण पटवर्धनांच्या घरून सतत येणाऱ्या फोनमूळे तो ही  वैतागला आणि त्याने गौरांगला फोन केला. खुद्द डॉक्टर गौरांग सरांचा फोन आल्यावर मात्र रिसेप्शनिस्टचाही नाईलाज झाला आणि तिने फोन केला. डॉ. मायानी अदितीला जायची परवानगी दिली पण अदितीने मात्र मिटींग संपेपर्यंत थांबायचं ठरवले. तिने ड्रायव्हरला फोन करुन घरी जायला सांगितले. मिटींग संपायला उशीर झाला. अदिती घरी जायला निघाली तेव्हा रात्रीचे ९.३० वाजले होते.  घरी काय वाढून ठेवले असेल या विचाराने ती जरा धास्तावलीच. पटापट सामान आवरुन ती धावतच लिफ्टजवळ गेली. नेमकी लिफ्ट त्याचवेळी वरती गेली. एवढा वेळ थांबण्यापेक्षा जिन्याने जाऊया असा विचार करुन ती पळतच जिन्याकडे गेली. गडबडीत जीना उतरत असताना तिचा पायरीचा अंदाज चुकला आणि ती घरंगळत खालच्या पायरीपर्यंत गेली. त्यानंतर तिला शुद्ध आली तेव्हा ती हॉस्पिटलच्या बेडवर होती. तिने तिच बाळ गमावले होते.  गौरांग आणि डॉ. मायाही तिथेच होत्या.
 "थँक गॉड अदिती तु शुद्धीवर आलीस. काळजी करु नकोस हळूहळू होईल सगळं नीट",असं म्हणून  डॉ. मायांनी अदितीला तपासले आणि गौरंगकडे बघून म्हणाल्या Don’t worry she is fine now take care both of you."
     अदितीच्या डोक्यावरुन प्रेमाने हात फिरवून "उद्या सकाळी येते" अस म्हणून निघून गेल्या. अदितीला खूप दुख झाले तिने गौरांगकडे बघितले तो काहीच बोलत नव्हता. "I am sorry Gaurang", अदिती रडतच म्हणाली. तिला त्याच्याकडून सहानुभूतीची अपेक्षा होती. पण झाल उलटच गौरांग तिला म्हणाला,  "आता सॉरी म्हणून काय उपयोग अदिती तुला जे करायच होत ते तू केलसच ना".
"मी हे मुद्दाम केल का गौरांग? It was just an accident", अदिती त्याला समजावण्याचा सुरात म्हणाली.
 अदिती तू जर ड्रायव्हर बरोबर  घरी गेली असतीस तर हे अस काही घडलंच नसत. पण नाही तुला प्रत्येक वेळी तुझं स्वतःचच म्हणणं खर करायच असतं हे अस काही होवू नये ना म्हणून आईने तुला हॉस्पिटल बंद अस सांगितल होत. पण तुझं करिअर ही तुझी प्रायॉरीटी आहे. हे मुल जन्माला घालायचा निर्णय घेउन तू आमच्यावर उपकारच केले होतेस ना. तुला काय फरक पडतोय? फरक तर आम्हाला पडलाय आमची सगळी स्वप्न एका क्षणात उध्वस्त झाली. अग आईची काय अवस्था झाली आहे हे माहित आहे का तुला काल रात्रीपासून ती जेवलीसुद्धा नाहीये."
   गौरांग बोलत होता. त्याचा प्रत्येक शब्द अदितीच्या मनाला असंख्य जखमा करत होता. एक हार्ट स्पेशॅलिस्ट असून स्वतःच्या बायकोचे मन मात्र त्याला कधीच कळले नव्हते.
      डिसचार्ज मिळाल्यानंतर अदिती तिच्या आई बाबांकडे गेली ती कायमचीच. गेल्या आठ वर्षात ना गौरांगने तिला कॉन्टॅक्ट  केला ना तिने त्याला.
      अदितीला डीसचार्जपूर्वीचा तो दिवस आजही जसाच्या तसा आठवत होता त्या दिवशी डॉक्टर मायांनी  तिला सांगितल होतं की ती कधीही आई होऊ शकणार नाही. पण त्याहीपेक्षा जास्त दु:खद होतं ते गौरांगच वागणं. खर तर या बातमीमूळे दोघही खूप दुखावली गेली होती. त्या वेळेस दोघांनीही एकमेकांना समजून घ्यायची, एकमेकांना आधार द्यायची गरज होती पण गौरांगने आधार देणं तर दूरच उलट अदितीला दुखावलं होत.
   तो अदितीला दोष देत म्हणाला होता, "सगळं संपवलस तू अदिती, तुझ्या हट्टापाई सारं काही गमावलस. करिअर करायचं होतं ना तुला? या शहरातील नामवंत गायनॅक व्हायचं होतं. होशील नक्कीच होशील तू नामवंत गायनॅक, पण एक चांगली आई कधीच होऊ शकली नसतीस अग चांगली तर दूरच तू तर आता आईसुद्धा होऊ शकणार नाहीस. करिअरच्या हव्यासापाई सारं गमावलस तू अदिती, जोडीला आम्हालाही खूप मोठं दु:ख दिलस तू. मी तुला कधीही माफ करणार नाही अदिती. मला आता एकच प्रश्न आहे हे सार आईला कस सांगायचं? तिने खूप स्वप्न पाहीली होती आपल्या संसाराची. माहित नाही ती हा धक्का कसा पचवेल."
   त्याचं बोलणं ऐकून अदिती खूप दुखावली होती. तिचा स्वाभिमान दुखावला गेला होता. जीवावरच्या संकटातून ती वाचली होती. तिला गौरांगच्या प्रेमाची त्याच्या सहानुभूतीची खूप गरज होती. पण त्याला मात्र या साऱ्याचं काहीच वाटत नव्हत. अदितीला दोष देण्यातच तो धन्यता मानत होता. काय तर आईची काळजी, मग माझ काय? अदितीच्या मनात विचारांचं वादळ घोंघावत असताना तिला अचानक आठवलं तिच्या सासूबाई तिला साध बघायलाही आल्या नव्हत्या किंवा त्यानी तिला फोनही केला नव्हता. अदितीला या साऱ्याचं खूप आश्चर्य वाटत होतं. दुसऱ्या दिवशी डीसचार्ज मिळाला तेव्हा अदितीच्या बाबानी गौरांगला विचारले, "अदितीला आम्ही आमच्याकडे नेऊ का ?"
  तेव्हा, "तुमची मुलगी स्वतःचे निर्णय स्वतः घेते, मला कशाला विचारताय तिलाच विचारा" अस उद्दामपणे बोलून गौरांग रुमच्या बाहेर निघून गेला होता.
   आजही सगळं व्यवस्थित  आठवत होत तिला. त्या घटनेनंतर खर तर अदिती पूर्णपणे कोलमडली होती पण तिचे आई बाबा आणि डॉ. मायानी तिला समजावले. तिच्या मनातली अपराधीपणाची भावना काढून टाकून तिचा हरवलेला आत्मविश्वास तिला परत मिळवून दिला. जवळपास महिनाभर अदिती घरीच होती. या महिनाभरात ना गौरांगने तिला फोन केला ना तिला भेटायला आला.
     अदितीने स्वतःला सावरून  हॉस्पिटल पुन्हा जॉईन केले. हॉस्पिटलला गेल्यावर तिला कळलं की गौरांगने राजीनामा दिला आणि तो दुसरीकडे जॉईन झाला आहे. अदिती काय समजायचं ते समजली. अदितीने घडलेल्या घटनेचा कुठलाही परिणाम तिच्या कामावर होवू दिला नाही. जवळपास सहा महिने असेच गेले. त्यानंतर डॉ. मायानी स्वतःच हॉस्पिटल सुरु केल आणि अदितीही त्यांना जॉईन झाली.
     बघता बघता आठ वर्ष सरली. तरीही अदितीच्या मनाला झालेली जखम आजही भरुन आलेली नाही. अवनी आणि आशुतोषकडे बघून तिला नेहमी अस वाटे, "जर गौरांगने तिला समजून घेतले असते तर......" तिच मन तिच्याही नकळत नेहमी गौरांग आणि आशुतोषची तुलना करायच. खर तर हुशार, श्रीमंत आणि देखण्या गौरांगच्या आसपासही आशुतोष पोचू शकत नव्हता. पण आशुतोषचा समजूतदारपणा, त्याने अवनीला दिलेली साथ, प्रेम हे सार गौरांगला कधीच जमले नाही. डॉक्टर असली तरी अदिती एक स्त्री होती आणि एका स्त्रीला आपल्या नवऱ्याकडून प्रेमासोबत जो  आधार, जो सन्मान  हवा असतो तो अदितीला गौरांगकडून कधीच मिळाला नाही. आणि यामुळेच तिच्या मनात अवनीविषयी किंचितसी असूया वाटत होती. एवढ्यात मोबाईलच्या मेसेज टोनचा आवाज ऐकू आला आणि अदिती भानावर आली. तिने मेसेज बघितला "Reached safely at home will call you later".  मेसेज  डॉ. मायांचा होता. आपल्या Ph.D. च्या कामासाठी ३ महिने अमेरिकेला गेलेल्या डॉ. माया आज परत आल्या होत्या. हे ३ महिने हॉस्पिटलची संपूर्ण जबाबदारी अदितीने अगदी समर्थपणे सांभाळली होती. अदितीने घड्याळात बघितले पहाटेचे साडेचार वाजले होते. रात्रभर न झोपलेल्या अदितीने मनातले सगळे विचार झटकून झोपायचा प्रयत्न केला. तिला झोप लागली असेल नसेल तेवढ्यात साधारण साडेसहाच्या सुमारास तिला हॉस्पिटलमधून फोन आला, "मॅडम एक इमर्जन्सी आली आहे. आपल्या हॉस्पिटल बाहेरच एक अपघात झालाय. एका मॉर्निंगवॉकला गेलेल्या  गरोदर तरुणीला एका मोटारसायकलने धक्का दिला. पेशंटची ट्रिटमेंट आपल्याकडे चालू नाहीये पण चार महिन्याची गरोदर आहेत."
 "ओके", असं म्हणून अदितीने नाइट ड्युटीच्या डॉक्टरांना  योग्य त्या सूचना करून फोन ठेवला  आणि आवरुन लगेचच हॉस्पिटलला गेली.
         सुदैवाने या वेळेस अदिती आई आणि मुल या दोघांनाही वाचविण्यात यशस्वी झाली. साडेसातच्या सुमारास पेशंटचे नातेवाईक हॉस्पिटलमध्ये पोचले. तोपर्यंत ती स्त्री शुद्धीवर आली होती. सगळ्या फॉरमॅलिटिज पूर्ण करून आणि असिस्टंट डॉक्टरना योग्य त्या सूचना करून अदिती घरी जाण्यापूर्वी पुन्हा एकदा पेशंटला तपासण्यासाठी तिच्या रुममध्ये गेली तेव्हा त्या स्त्रीचा नवरा तिला, "योग्य काळजी घेता येत नाही का?" अस म्हणून तिच्यावर ओरडत  होता. त्याचा प्रत्येक शब्द तिला गौरांगची आठवण करून देत होता.
     तो बोलत होता आणि अपघातामुळे घाबरलेली ती शांतपणे आसवं गाळत बेडवर पडून होती. त्याला ना तिची भीती कळत होती ना आसवं दिसत होती.
 तो बोलतच होता "It's  enough now. What's your problem.  Why you don't understand? नशीब चांगलं म्हणून बाळाला काहीही झाल नाही. काय गरज होती तुला एवढ्या सकाळी वॉकला जायची? किती वेळा सांगितलय तुला घरी एवढं मोठं गार्डन आहे तिथे वॉकला जात जा पण नाही, का तर बाहेर मोकळ्या हवेत, मोकळ्या वातावरणात जास्त फ्रेश वाटत .प्रत्येक वेळी स्वतःचा विचार. स्वतःचा फिटनेस स्वतःचा जॉब या पलीकडे दुसरं विश्व नाही तुझं. पण आता हे सगळं बंद. आजपासून तुझं एकटीने घराबाहेर पडणं बंद आणि तुझा तो जॉब सोडून द्यायचा आता. जहांगीरदारांच्या घराला तुझ्या जॉबची आणि तुझ्या पैशांची गरज नाहीये."                           'Enough!' Mind your language Mr. ……  तुम्ही जे कोणी आहात. अदिती खड्या आवाजात म्हणाली.     "मी  अभय जहांगीरदार आणि मी माझ्या पत्नीशी काय आणि कसं बोलायचं ते तुम्ही सांगायची गरज नाही. हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे तुम्हाला त्यात पडायची गरज नाही", तो उद्दामपणे म्हणाला.
    "गरज आहे मिस्टर अभय तुम्ही जे बोलताय ते अत्यंत चुकीच आहे. तुमची बायको तुमची गुलाम नाहीये आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे हॉस्पिटल आहे तुमची बेडरुम नव्हे आणि तुमची बायको माझी पेशंट आहे. माझ्या पेशंटची शारीरिक आणि मानसिक काळजी घेणं ही माझी आणि या हॉस्पिटलची नैतिक जबाबदारी आहे. तुम्हाला काय वाटत? तुमच्या पत्नीचा जो अपघात झाला त्याला फक्त ती जबाबदार आहे? तिने फिटनेस मेंटेन करण हे चुकीच आहे? उलट तिच्या आत्ताच्या अवस्थेत तिला याची जास्त गरज होती. आणि तुम्ही काळजीचा फार मोठा आव आणता मग तुम्ही का नाही जात तिच्याबरोबर? आणि तुम्ही आत्ता जे काही बोलताय त्यामुळे तुमची पत्नी किती दुखावली गेली आहे हे कळतय का तुम्हाला? तिची मानसिक स्थिती काय असेल याचा विचार केलाय तुम्ही? एक डॉक्टर म्हणून नाही एक स्त्री म्हणून सांगते, एक स्त्री आपल्या पोटातल्या बाळाची जेवढी काळजी घेते, जेवढा विचार करते ना तेवढा कोणीच करत नाही. अगदी त्या बाळाचे वडीलसुद्धा नाही. सुदैवाने तुमचं बाळ वाचलय. पण या हॉस्पिटलमध्ये असेही पेशंट आहेत कि ज्या स्त्रियांनी त्याच बाळ गमावलय आणि सोबत त्यांचं मातृत्व. पण त्या स्त्रीच्या पतीने तिला ज्या पद्धतीने समजून घेतल; तिची काळजी घेतली; ते बघता एक आदर्श पती कसा असावा याच उत्तम उदाहरण म्हणून त्यांचा उल्लेख केला तर ते चूकीचं ठरणार नाही.  आणि हो यापुढे आपल्या पत्नीला  विनाकारण दोष देण्यापूर्वी तुमचं काही चुकत नाही ना, याचा विचार करा. जमलं तर तिचा सन्मान करायला शिका. आत्ता या क्षणाला तुमच्या पत्नीला तुमच्या सल्ल्यांची नाही तुमच्या प्रेमाची तुमच्या आधाराची जास्त गरज आहे."अदिती.
     अभय जहांगीरदारला बहुदा त्याची चूक कळली होती म्हणूनच तो सार काही शांतपणे ऐकून घेत होता. अदितीचं बोलून झाल्यावर अभयने म्हणाला, "थॅंक्स  डॉक्टर....
    "डॉक्टर अदिती जोगळेकर. अदितीने आपली ओळख सांगितली. तितक्यात अदितीला एक नर्स सांगत आली, “मॅडम त्या विमलताईंच्या मुलीला कळा यायला लागल्या आहेत".
    "ठिक आहे तिला लेबर रुम मध्ये घे मी आलेच असं म्हणून अदिती जायला वळली तर समोर गौरांग आणि त्याची आई उभी होती. क्षणभर काय बोलावं, काय करावं कोणालाच काही कळत नव्हत. तेवढ्यात मगाचचीच नर्स परत बोलवायला आली आणि अदिती लगबगीने तिथून निघून गेली.
     विमलताईंच्या मुलीला जुळ्या मुली झाल्या. अदितीने बाहेर येवून त्यांना ही गोड बातमी दिली. पण बातमी ऐकून आनंद होण्याऐवजी विमलताई कपाळावर हात मारून मोठमोठ्याने रडू लागल्या. अदितीला कळेच ना त्यांना काय झाल? अदिती विमलताईना म्हणाली, "अहो असं रडताय का तुम्ही? सगळं व्यवस्थित झालय तुमची मुलगी अगदी सुखरूप आहे.
    "तस न्हाय व डाक्टर तै आव मागल्या खेपस बि मुलगी झालीया आता या येळीस लई आशा व्हती मुलगा हुइल म्हुन पर समदच अक्रित झाल बगा. आता तिला तिच्या सासरची मानसं काय हिथुन न्येत नाइत. मागल्या खेपेलाच सांगुन ठिवल व्हतं त्यानी कि पुढल्या येळी मुलगा झाला तरच घरला यायच न्हायतर म्हाहेरीच राहायच." असं म्हणून विमलताई अजूनच रडू लागल्या.
    "अहो रडू नका मी बोलू का तिच्या सासरच्यांशी? आदितीने विचारलं.
 "नग तुमी नग बोलू काय भी लै वंगाळ मानस हायत ती", विमलताई.      
   अदितीला काय बोलाव काहीच कळेना. ती काही न बोलता तिथून निघून तिच्या केबिनमध्ये गेली. आज २१ व्या शतकात काय परिस्थिती आहे आपल्या देशात. ती विचार करत होती तिचं डोकं सुन्न झाल होत. एकीकडे अवनीची केस; तिला मुल व्हायची कुठलीच शक्यता नाही म्हणून ती दु:खी आणि एकीकडे विमलताईंची मुलगी तिला दोन मुली होवूनही मुलगा न झाल्याने दु:खी. आधीच रात्रभर न झोपलेल्या अदितीला सकाळपासून घडणाऱ्या घटनांमुळे खूपच थकवा आला होता. तिने घड्याळात बघितले ११ वाजत आले होते. आता ओपीडीला जायची वेळ होत आली होती. तेवढ्यात केबिनमधला फोन खणखणला. "मॅडम डॉ. माया आल्या आहेत. त्यानी तुम्हांला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं आहे."
   'ओके' म्हणून अदितीने फोन ठेवला. तिला आश्चर्य वाटलं. आज पहाटेच यु एस वरुन आलेल्या डॉ. माया आज हॉस्पिटलमध्ये आल्यासुद्धा? मला कॉल कसा केला नाही त्यांनी?", असा विचार करता करता तिने बघितलं तर सकाळपासून डॉ मायांचे ४ मिस्ड कॉल होते. सकाळपासून अदिती इतकी बिझी होती कि तिने मोबाईल बघितलाच नव्हता.
   अदिती डॉं.मायांच्या केबिनमध्ये जाताना अवनी देशपांडेची फाईल घेऊन गेली. कारण तिला माहित होत डॉ माया याच केससाठी आज हॉस्पिटलमध्ये आल्या आहेत. डॉ. मायांना भेटल्यावर अदितीला खूप बरं वाटलं. डॉ. मायानी अदितीची ओपीडी दुसऱ्या असिस्टंट डॉक्टरना हॅन्डल करायला सांगितली. हॉस्पिटलची चौकशी आणि काही जुजबी बोलण झाल्यावर डॉ. मायानी अवनीची फाईल उघडली. सगळी फाईल व्यवस्थित वाचून झाल्यावर त्यांनी एवढी क्रिटीकल केस हाताळल्याबद्दल अदितीच खूप कौतुक केलं.
"अवनी आई होण्याचे काही चान्सेस आहेत का?" अदितीने डॉ. मायांना विचारले.
अदितीच्या प्रश्नावर डॉ. मायानी नकारार्थी मान हलवली आणि अदितीला म्हणाल्या, "अदिती अग अवनी वाचली ती निव्वळ तुझं कौशल्य आणि तिच नशीब दोन्ही चांगलं होतं म्हणूनच. माझा इतक्या वर्षांचा अनुभव आणि अभ्यास हेच सांगतोय की ती आई होणं शक्यच नाही.
   "मला अंदाज होताच तुम्ही हेच सांगाल याचा", अदिती म्हणाली.
   "ठिक आहे मग त्यांना या परिस्थितीची पूर्ण कल्पना दे. आत्ताच मनाची तयारी झालेली चांगली. समजदार असतील तर उगाच कुठेतरी आपला वेळ आणि पैसा वाया घालवणार नाहीत." डॉ. माया म्हणाल्या.
   "तुम्ही सांगाल का? कारण माझ्यापेक्षा तुम्ही छान पद्धतीने समजावू शकता", अदितीने विचारले.    
 'ओके' म्हणून डॉ माया अदितीला म्हणाल्या, "अदिती डॉक्टरने पेशंटमध्ये जास्त गुंतू नये. मी निघते आता. तू ही घरी जा सकाळपासून खूप दगदग झालेय तुझी. तुझा चेहराच सांगतोय तू किती थकली आहेस ते".
   "हो खरच खूप थकलेय आज.  सकाळीच एक इमर्जन्सी आली तेव्हापासून चालूच आहे एकएक. अदिती म्हणाली.
 "काही खाल्ल आहेस का सकाळपासून? नसेलच बहुदा" डॉ. माया.
  डॉ.मायांच्या या प्रश्नाने अदितीला जाणवलं खरच तिने सकाळपासून काहीच खाल्ल नव्हत.
   "अदिती काळजी घेत जा ग स्वतःची." डॉ मायानी तिला प्रेमाने दटावलं.
   "हो राउंडला जाऊन येते आणि निघतेच घरी असं म्हणून अदिती राउंडला जायला निघाली. जाता जाता तिला अचानक सकाळचा प्रसंग आठवला. जहांगीरदारांच्या खोलीतून निघताना आज जवळपास ८ वर्षांनी ती आणि गौरांग समोरासमोर आले होते. "कशासाठी आले असतील ते तिथे? त्यांचा आणि जहांगीरदारांचा काय संबंध असेल. नशीब तेव्हा नर्स बोलवायला आली नाहीतर......"  अदितीच्या मनात विचारांचा गोंधळ चालू होता.
    सगळे पेशंट तपासून अदिती जहांगीरदारांच्या रूममध्ये गेली. सुदैवाने गौरांग तिथे नव्हता. तिला हायसं वाटलं. "कसा आहे पेशंट?" अदितीने हसून विचारलं.
  "थॅंक्स अदिती वहिनी आज तुझ्यामुळे अभयला त्याची चूक कळली. मला ओळखलं नाहीस? मी मिताली गौरांगची आत्ये बहीण", मिसेस जहांगीरदार म्हणाल्या.
  "मिताली अगं किती मोठी झालीस तू? आमचं लग्न झाल तेव्हा  बारावीला होतीस." अदिती आश्चर्याने म्हणाली.
   मिताली गौरांगची खूप लाडकी बहीण होती. बारावीच्या परिक्षेनंतर ती जेव्हा त्यांच्या घरी आली होती तेव्हा तिघांनी मिळून खूप धमाल केली होती.
  "वहिनी गौरांग दादा खूप चांगला आहे ग. काहीतरी समजुतीचा घोटाळा झालाय", मिताली.
   मितालीच्या बोलण्याने अदिती विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली. "वहिनी प्लीज एकदा भेटून गैरसमज मिटवत का नाही तुम्ही?" मिताली खूप मनापासून विचारत होती.
    "मिताली सॉरी आपण नंतर बोलूया आत्ता मला राउंडला जायचं आहे", असं बोलून अदिती तिला तपासून व नर्सला योग्य त्या सूचना करून तिथून निघाली.
    "आज काय घडतय सगळं? सकाळपासून सगळं अनपेक्षित समोर येतय." विचारांच्या तंद्रीत हरवलेल्या अदितीसमोर अचानक विमलताई आल्या आणि म्हणाल्या, "डाक्टर तै जरा बोलायचय."
   'बोला', अदिती थोडी त्रासूनच म्हणाली. "तै लेकिला नांदवायस तयार हाइत तिच्या घरचे पर पोरिस्नी आनायच न्हाय म्हणत्यात. कुट तरी आश्रम असल येखादा तर सांगता का मला." विमलताई
    "अहो काय बोलताय तुम्ही? नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आईपासून तोडून दुसरीकडे ठेवायचे? आणि तुमची मुलगी तयार आहे का यासाठी?" अदितीने आश्चर्याने विचारलं.      
 "हाय ती तय्यार. नांदवणार हायत ना सासरी? मग काय भि प्राब्लेम न्हाय बगा", विमलताई म्हणाल्या.
  "ठिक आहे, चौकशी करून सांगते नंतर," असं म्हणून अदिती घरी जायला निघाली.
   अदिती घरी गेली तेव्हा तिचे आई बाबा जेवायलाच बसत होते. अदिती पटकन आवरुन त्यांच्याबरोबर जेवायला बसली. आज कितीतरी दिवसानी दुपारी घरी होती आणि आई बाबांसोबत जेवत  होती. जेवण झाल्यावर अदिती तिच्या खोलीत झोपायला गेली. तिने मोबाईल सायलेंट मोडवर ठेवला. मनाने आणि शरीराने थककेल्या अदितीला अंथरुणावर पडताक्षणी झोप लागली.
  अदितीला जाग आली तेव्हा संध्याकाळ झाली होती. अंथरुणातून उठूच नये असं तिला वाटत होत. सहज तिची नजर खिडकीबाहेर गेली. डिसेंबर महिना असल्याने सूर्य जरा लवकरच मावळतीला चालला होता. मावळतीच्या रंगछटा आकाशात पसरल्या होत्या. पक्षांचे थवे आपआपल्या घरट्यांकडे परतत होते. हवेमध्ये चांगलाच गारवा जाणवत होता. कितीतरी दिवसांनी नव्हे वर्षांनी ती हे सार अनुभवत होती. ती उठून खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. दिवसभराचा थकवा कुठच्या कुठे पळाला होता. अचानक तिच्या मनात एक विचार आला आणि अनेक प्रश्नांची उत्तरे त्यामध्ये मिळाली. तिने बाहेर जाऊन आई बाबांना आपल्या मनातला विचार बोलून दाखवला आणि पटवूनही दिला. खूप दिवसानी अदिती खूष दिसत होती.
    संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर तिने अवनी देशपांडेची चौकशी केली. "मॅडम त्यांचे डिसचार्ज पेपर तयार आहेत फक्त तुमची सही राहिली  आहे", नर्सने माहिती पुरवली.
     "ठिक आहे पेपर माझ्या केबिनमध्ये पाठवून दे आणि अवनी आणि आशुतोष देशपांडे दोघांनाही आत पाठव आणि हो डॉ.राजेशना आजची माझी ओपीडी घ्यायला सांग." अदिती.
     अवनी आणि आशुतोष केबिनमध्ये गेल्यावर अदितीने त्यांना विचारले, "डॉं मायांशी तुमच बोलणं झालच असेल पण मला फक्त एवढंच सांगा की तुम्ही सत्य स्विकारले आहे कि तुम्हाला अजून थोडा वेळ हवा आहे?"
 "आम्ही जे आहे ते स्वीकारुन आनंदाने जगायचं ठरवलं आहे", आशुतोष म्हणाला.
अदिती: गुड, मग मी आत्ता जे काही सांगते ते शांतपणे ऐका. अवनी तू जर ठरवलस तर तु एका बाळाची आई होऊ शकतेस.
अवनी: म्हणजे मी समजले नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे?
अदिती: सांगते, सगळं सांगते. फक्त मी सांगते त्याचा तुम्ही दोघांनीही शांतपणे विचार करा आणि मगच आपला निर्णय सांगा. मी फक्त माझा विचार मांडतेय. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. असं म्हणून अदितीने विमलताईंच्या मुलीची परिस्थिती सांगून त्यातली एक मुलगी दत्तक घ्यायचे सुचवले.
    अदितीच बोलणं ऐकून आशुतोष आणि अवनी विचारात पडले" मॅडम हे सगळं आमच्यासाठी अनपेक्षित आहे. आम्ही विचार करून सांगतो" आशुतोष म्हणाला.
    "Take your own time. फक्त एवढंच सांगते की त्यातली एक मुलगी मी स्वतः दत्तक घेणार आहे." अदिती
  अवनी आणि आशुतोष निघून गेल्यावर अदितीने विमलताईना बोलावून सारी कल्पना दिली. विमलताईंनी तिचे आभार मानले. अदितीने डॉ. मायांना फोन करुन सारी कल्पना दिली. तितक्यात अदितीच्या केबिनमधला फोन खणखणला, "मॅडम मिताली जहांगीरदारच्या नातेवाईकांना तुम्हाला भेटायचं आहे”.
    "ठिक आहे त्यांना आत पाठव", असं म्हणून अदितीने फोन ठेऊन दिला आणि काही क्षणातच गौरांग आणि त्याची आई तिच्या केबिनमध्ये होते. त्या दोघांना पाहून अदितीला धक्का बसला. काय बोलाव तिला काहीच कळेना. थोडा वेळ तसाच शांततेत गेला.
 "आम्ही बसू का?" गौरांगने विचारले.
"हो बसा ना", अदिती स्वतःला सावरत म्हणाली.
   काही क्षण केबिनमध्ये शांतता पसरली. या शांततेचा भंग करत गौरांग म्हणाला, "अदिती मला माफ कर, खूप चुकलं माझं. काल तू अभयला जे काही सांगत होतीस ते सार ऐकलं आम्ही. ते ऐकून मला माझ्या चुकीची जाणीव झाली. खर तर ही जाणीव आधीच माझ्या मनाला झाली होती पण माझा इगो मला पुढे येऊ देत नव्हता. पण कालच तुझं बोलणं ऐकून ठरवलं, नाही आता बास, खूप झाल पश्चात्तापाच्या आगीत होरपळणं.  आता इगोला मागे ढकलून पुढे व्हायच. अदिती मी आजही तुझ्यावर पूर्वीइतकच प्रेम करतो. प्लीज तू परत ये माझ्या आयुष्यात"
        अदिती शांत होती काहीच बोलत नव्हती. पुन्हा शांतता पण यावेळी मात्र शांततेचा भंग करीत गौरांगची आई म्हणाली, “अदिती तुमच्यातल्या दुराव्याला खरं तर मी कारणीभूत आहे. त्याची शिक्षा तु गौरांगला नको देवूस ग! बायको आणि आई यांच्यातल्या शीतयुद्धात तो होरपळत होता. त्याला लहान मुलांची खूप आवड आहे म्हणूनच भावनिक होवून तो तुझ्याशी अस वागला. पण खर सांगते अदिती गौरांगच तुझ्यावर खूप प्रेम आहे. गेल्या आठ वर्षात आम्ही कितीतरी वेळा त्याला घटस्फोट घेण्याविषयी सांगितले पण त्याने काही ऐकलं नाही. अदिती आम्हाला माफ कर प्लीज घरी परत ये. माझ्या गौरांगला पुन्हा मनमोकळं जगताना बघायचं आहे मला. ते फक्त तुझ्या हातात आहे."
    "मी माझ्या आयुष्याचा वेगळा निर्णय घेतलाय आता मी एक बाळ दत्तक घ्यायचं ठरवलं आहे. उद्या सकाळीच सगळ्या फॉरमॅलिटिज पूर्ण होतील. Now its too late", अदिती ठामपणे म्हणाली.
    "तुझ्या दत्तक बाळासकट मी तुला स्वीकारायला तयार आहे अदिती. तू पूर्ण विचार करुन निर्णय घे. त्यासाठी तुला हवा तेवढा वेळ तू घे. आम्ही निघतो आता." अस म्हणून गौरांग व त्याची आई जायला निघाली. निघताना गौरांग अदितीला म्हणाला, "अदिती तू कितीही वेळ घे फक्त एक लक्षात ठेव मी तुझी वाट बघतोय, अगदी आयुष्यातल्या शेवटच्या क्षणापर्यंत!"
  ती दोघं निघून गेल्यावर डोळ्यात साठलेल्या अश्रूंना तिने वाट मोकळी करुन दिली. तितक्यात तिच्या मोबाईलवर वकिलांचा फोन आला, "मॅडम तुम्ही सांगितलेली सगळी कागदपत्रे तयार आहेत. उद्या ११ वाजता मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये येतो.
   "ओके थँक्स", अस म्हणून अदितीने फोन ठेवला आणि राउंडसाठी जायला निघाली. पण मनात गौरांगचाच विचार चालू होता.
      हॉस्पिटलमधून आल्यावर अदिती शांतपणे काहीही न बोलता जेवून आपल्या खोलीत  झोपायला गेली. तिने ठरवलं होत आता शांत रहायचं कसलाही विचार करायचा नाही. उद्या सगळ्या कायदेशीर बाबींची  पूर्तता करुन ती एका छोट्याशा बाळाला घरी आणणार होती. तिच्या आयुष्यातल्या एका नवीन पर्वाची सुरुवात होणार होती.
     दुसऱ्या दिवशी अदिती हॉस्पिटलमध्ये जायला निघणार तेवढ्यात डॉ. माया तिच्या घरी आल्या. त्यांना बघून अदितीला आश्चर्य वाटलं. "अदिती बस मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे." डॉ माया म्हणाल्या.
 "काय झालय मॅडम?" अदितीने विचारलं.
डॉ. माया: अदिती अवनी आणि आशुतोषने बाळाला दत्तक घेण्यासाठी नकार दिलाय. माझं आत्ताच त्यांच्याशी बोलणं झालय."
अदिती: ठिक आहे आपण विचार करु दुसऱ्या बाळाच काय करायच याचा.
डॉ. माया: नाही कसलाही विचार करायची गरज नाही. दोन्ही बाळं त्यांचा आई बाबांजवळच राहतील.
अदिती: हे तुम्ही काय बोलताय मॅडम?
डॉ. माया: खर तेच बोलतेय मी अदिती. आज सकाळीच मी विमलताईंच्या जावयाला आणि त्यांच्या घरातल्या मंडळींना हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतलं होतं. त्याला समजावलं. मुलींसाठी असणाऱ्या शासनाच्या योजना सांगितल्या. मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करायची तयारी दाखवली तरी तो ऐकत नाही म्हटल्यावर मी शेवटी ACP गोखलेंना फोन केला. तशी त्यांना मी आधी कल्पना दिली असल्यामुळे ते आधीच हॉस्पिटलमध्ये येवून थांबले होते. पोलीसी खाक्या दाखवल्यावर मात्र सगळी घाबरली आणि सुतासारखी सरळ झाली. मुलींना स्विकारून बायकोला नांदवायलाही तयार झाला. ACP साहेबानी त्याच्याकडून प्रतिज्ञापत्रही लिहून घेतलय. अदिती बाळ नेहमी आई वडीलांबरोबरच राहिलेलं चांगल नाही का? माझं वकिलांशी बोलणं झालं आहे. त्यांना मी येऊ नका म्हणून सांगितल आहे. त्या बाळांना त्यांच्या आई वडीलांकडे रहाण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्यांना  सांभाळणे हे त्यांच्या आई वडीलांचे कर्तव्य आहे."
    अदिती शांतपणे सगळं ऐकून घेत होती. तिला डॉ. मायांच बोलणं पटलं होत. डॉ माया तिला समजावत म्हणाल्या, "अदिती मुल दत्तक घेणं सोपं वाटलं का तुला ? तू खूप हुशार डॉक्टर आहेस, एक चांगली व्यक्ती आहेस पण अनेकवेळा निर्णय घेताना भावनेच्या भरात निर्णय घेतेस. तु प्रेग्नंसीचा निर्णयही असाच भावनेच्या भरात घेतला होतास आणि आता हा मुल दत्तक घेण्याचा. अग ती अवनी देशपांडे अजून मानसिक धक्क्यातून सावरलीही नाही आहे आणि तू तिच्यासमोर दत्तक मुलाचा पर्याय ठेवलास? मान्य आहे तुझा हेतू वाईट नव्हता पण अदिती तुला वाटत होतं तेवढं हे सगळं सोपं नव्हतं गं. ना तुझ्यासाठी आणि ना अवनीसाठी. तरीही तुला बाळ दत्तकच घ्यायचं असेल तर एखाद्या अनाथ बाळाला घे ज्याला कोणाचा आधार नसेल. ज्याला आई वडीलांच्या प्रेमाची गरज असेल. माझ्या माहितीत अशी एक संस्था आहे जिथे जवळपास आठवड्याला एखादं नवजात बालक अथवा लहान मुलं भरती होत असतात. तुला माहित आहे ती संस्था कोण चालवतं? ती संस्था चालवणाऱ्या माणसाचं नाव आहे डॉ गौरांग पटवर्धन!"
  गौरांगच नाव ऐकून अदितीला आश्चर्य वाटलं. पण क्षणात तिने स्वतःला सावरलं.
  "काल गौरांग आला होता ना तुला भेटायला अदिती? काय निर्णय घेतला आहेस तू? डॉ मायांच्या या बोलण्यावर अदितीने दचकून तिच्या आई बाबांकडे बघितले कारण तिने त्यांना गौरांगच्या भेटीबद्दल काहीच सांगितले नव्हते. तिच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे बघून डॉ माया म्हणाल्या, "मी त्यांना सगळं सांगितल आहे आहे अदिती. तू काय निर्णय घेतला आहेस ते सांग. अदिती मी तुला मागेही सांगितल होतं; तू चार पावलं पुढे जा मग गौरांगही चार पावले पुढे येइल. तेव्हा तू पुढाकार घेतलास, आज तो घेतोय. मान्य आहे मला चूक त्याची होती. पण तू चुकली नसलीस तरी बरोबरही नव्हतीस. तो चुकला आणि तू ती चूक त्याला दाखवून द्यायचा प्रयत्नही केला नाहीस? जी गोष्ट तू अभय जहांगीरदारला समजावलीस ती गौरांगलाही सहज समजावू शकली असतीस. त्याची चूक मान्य करुन स्वत:चा इगो विसरुन आज तो तुझ्याकडे परत आला आहे. मग तू का तयार नाहीस? अदिती सायन्सने कितीही प्रगती केली तरी नात्यांना जोडणारा धागा नाही बनवता आला कोणाला. त्यासाठी कुठलीही टेक्नॉलॉजी कुठलंही ॲप नाही बनवू शकत कोणी. ते काम तुमचं तुम्हालाच करावं लागतं. नशीबाने तुला एक संधी दिली आहे. अदिती नको आता हट्ट करुस. यापूर्वी तू जे केलस तो तुझा  स्वाभिमान होता आणि आत्ताचं तुझं वागणं तुझा इगो आहे. तुझ्या इगोला इतकं पण महत्व देवू नकोस की तो तुला तुझ्या आयुष्यातला आनंद हिरावून घेईल. अग गौरांगच खरच खूप प्रेम आहे तुझ्यावर म्हणूनच इतके दिवस त्याने तुला घटस्फोट दिला नाही. त्याच्यासारख्या श्रीमंत देखण्या हुशार मुलाला दुसरी कुठलीही मुलगी सहज मिळाली असती पण तो आजही तुझी वाट बघतोय. स्वतःची  चूक मान्य करुन त्याने तुझी माफी मागीतली आहे. जे दु:ख आठ वर्ष तूं भोगलंस ते त्यानेही भोगलय; आत्ताही तो तुझ्या घराबाहेर उभा राहून तुझ्या होकाराची  वाट बघतोय. अदितीच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मला माझ उत्तर मिळालं अदिती असं म्हणून डॉ मायांनी गौरांगला आत बोलावलं आणि अदितीच्या आई वडिलांना घेऊन बाहेर निघून गेल्या.
      गौरांग समोर आल्यावर  अदितीने धावत जाऊन त्याला मिठी मारली. दोघही काही न बोलता फक्त रडत होते. एकमेकांशी न बोलताही त्यांना एकमेकांच्या मनातले भाव कळले होते.
    त्या दिवशी पटवर्धनांच्या घरात आनंदोत्सव साजरा होत होता. अदितीच्या निघून जाण्याने उदास झालेलं घर उत्साहाने तिच्या स्वागताची तयारी करत होत.
          सुरु झाला एका जुन्या नात्याचा
 एक नवीन प्रवास
         गैरसमजाचे काळे ढग विरुन
  झाले मोकळे आकाश.

समाप्त .

©मानसी जोशी







Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...