Wednesday, 19 October 2016

मैत्री

मैत्री

कॉलेजचा पहिला दिवस  आणि  तू मला भेटलास ...एका गावातून आलेली बावरलेली गोंधळलेली थोडीशी बावळट अशी  मी F.Y.BCS चा वर्ग शोधत होते....ना आत्मविश्वास ना मोकळेपणा. माझी अडचण तू ओळखलीस आणि मला माझा वर्ग  दाखवलास. शहरातल्या मॉडर्न मुलींसमोर मी खूपच बावळट वाटत होते. सुरुवातीच्या काळात माझ्याशी कोणी फारस बोलायचं नाही. तू मात्र बोलायचास. तू माझ्याशी बोलायचास म्हणून तुझे मित्र तुला हसायचे, तुझी चेष्टा करायचे, पण तू मात्र तस कधी दाखवल नाहीस.मला कळत होत पण मी हि तुला काही विचारल नाही. दिवस असेच सरत होते. आपली ओळख हळूहळू वाढत होती. तू मला कधी बदलायचा प्रयत्न  केला नाहीस पण मी मात्र हळूहळू बदलत गेले. तुझ्या सहवासात आत्मविश्वास मिळत गेला. शहरी वातावरणात हळूहळू रुळू लागले. बघता बघता ६ महिने  निघून गेले. माझे  टर्मिनल एक्झॅमचे मार्क्स बघून नोट्स मागण्यासाठी का होईना वर्गातल्या मुली माझ्याशी बोलू लागल्या. मी या शहरी वातावरणात चांगलीच रुळत  होते आणि मला माझा ग्रुपहि  मिळाला पण तू मात्र कायमच माझी प्रायोरिटी  होतास. मी हि  आता शहरातल्या मॉडर्न मुलींसारखी  स्मार्ट झाले होते. माझ्याशी बोलतोस म्हणून तुला हसणारे तुझे मित्र, "ए तिच्याशी ओळख करून दे ना" अस म्हणून तुझ्या मागे लागत होते. तू मात्र हसून वेळ मारून न्यायाचास.असच सेकंड इअरचं वर्ष सरल. आता फायनल इअर त्यामुळे आपण दोघेही बिझी झालो.  कॉलेज, क्लास, प्रॅक्टिकल्स यातच सारा वेळ  जाऊ लागला. माझ कंप्युटर सायन्स आणि तुझं केमिस्ट्री म्हणजे आपण दोन विरुद्ध टोक. आता रोज होणारी भेटही कमी होत होती. सगळ रुटिन बिझी झाल होतं. तरीही कधीतरी एखाद्या निवांत सोनेरी संध्याकाळी तुझी आठवण यायची आणि मन बेचैन व्हायचं. कधीही कुठलाही प्रॉब्लेम असुदे, मग तो कितीही मोठा किंवा  छोटा, तुझ्याशी बोललं कि सगळच सोप होवून  जायचं.तुझ्याशिवाय मी म्हणजे मला अपूर्णच वाटायचे. मला आजही आठवतोय तो दिवस ज्या दिवशी मी माझ्या मनातले भाव तुझ्यासमोर व्यक्त केले. खरतर आपल्याला एकमेकांच्या भावना समजून घेण्यासाठी शब्दांची गरज कधीच नव्हती, पण तरीही मी माझ्या भावना तुझ्यासमोर व्यक्त केल्या. त्यावर तू म्हणालास, "आपल नात खूप सुंदर आहे ग त्याला कुठल्याही नवीन नात्यात गुंफू नकोस.  आपल्यातली हि निखळ मैत्री माझ्यासाठी माझ्या आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे ती मला अशीच आयुष्यभर जपून ठेवायची आहे.  तू ज्याला प्रेम समजतेस ते प्रेम नाही तुला माझी वाटणारी ओढ आहे. प्रेम आणि मैत्री यामध्ये एक नाजुकशी पुसटशी रेष असते. ती रेष तू ओळख.  निट विचार कर आणि तूच ठरव तुला काय हवय.  तरीही तुझी इच्छा असेल तर आपल्या नात्याला तू म्हणशील ते नाव द्यायची माझी तयारी आहे. आपली निखळ मैत्री कि प्रेम निवड तुलाच करायची आहे...." मला तुझं म्हणण पटल होत. अर्थात तू सांगितलेली कुठलीही गोष्ट मला पटणार नाही, अस कधीच झालं नव्हत. दाटून आलेले मेघ दूर झाले आणि सगळ कस स्वच्छ झालं. आपल्यातल नात म्हणजे निव्वळ निखळ मैत्री  हेच सत्य होतं बाकी सगळा भावनांचा खेळ होता.
   तू नेहमीच मला समजून घेतलस. मला काय हवय हे माझ्या पण आधी आणि माझ्यापेक्षा जास्त चांगल तुला माहित असायचं. माझ लग्न ठरलं तेव्हा माझ्या भावी पतीला तू आपल नातं आधीच स्पष्ट केलस  आणि त्याच्याशी बोलल्यावर तो माझ्यासाठी खरच योग्य आहे हि पावतीही दिलीस आणि मी निर्धास्त झाले. तुझ्या लग्नाच्या वेळी बायकोकडून जणू आठवं  वचनच घेतलस की ती आपल्या मैत्रीच्या आड कधीच येणार नाही. हे सार घडत असताना प्रत्येक नातं तू जपत होतास. नाती जपणं मी तुझ्याकडूनच शिकले. माझ्या नवऱ्याचा अपघात झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू. माझ्यावर तर जणू आभाळ कोसळलं. किती दिवस दु:खात बुडाले होते कोणास ठावूक त्यातच आधीच तब्येतीने नाजूक असणाऱ्या माझ्या सासूबाई तर पूर्ण खचल्या. सासरे आधीच गेलेले, त्यातच मुलाच अस अपघाती जाणं, त्या तर पूर्ण कोलमडून गेल्या. या सगळ्या परिस्थितीमध्ये माझी  ८ वर्षाची  मुलगी खूपच गांगरून गेली. पण त्यावेळी मात्र तू आणि तुझ्या सुस्वभावी पत्नीने आम्हाला सावरल. सुदैवाने माझी नोकरी असल्यामुळे मला आर्थिकदृष्ट्या काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण सासूबाई अंथरुणाला खिळल्या त्या कायमच्याच. आणि वर्षभरात त्याही मला सोडून गेल्या. माहेरी तर गरिबी आणि इथली नोकरी सोडून तिथे जाऊन कसं राहणार? अशा वेळी तू मला आधार दिलास आणि मी माझ्या घरीच रहायचं ठरवलं. संकटं सांगून येत नाहीत आणि आली की पिच्च्छां सोडत नाहीत तस झालं. रिसेशनच्या लाटेत तुझी नोकरी गेली. तू नवीन नोकरी न शोधता व्यवसाय करायचा ठरवलास.प्रश्न होता भांडवलाचा, शिवाय तुझ्या बायकोचाही याला विरोध. अशा वेळी मी माझी सगळी सेविंग्ज तुला दिली तेव्हा तू  बायकोला म्हणालास आमची मैत्री हीच माझी इनव्हेस्टमेंट आहे. आणि मला म्हणालास या इन्व्हेस्टमेंट मध्ये मी तुझं नुकसान नाही होवू देणार. तू प्रचंड मेहनत करत होतास आणि यशाची एकएक पायरी पटापट चढत होतास. तुझ कुटुंब, तुझा बिझनेस या साऱ्या जबाबदाऱ्यांबरोबरच मैत्रीच नातंही जपत होतास. पण या साऱ्यानंतर समाजामध्ये आपल्या दोघांबद्दल नको ती चर्चा होवू लागली त्याची झळ आपल्या दोघांच्याही कुटुंबाला बसत होती. तुझ घर तू सावरलस. पण माझ्या टीनएजर मुलीला समजावण्याचं अवघड कामही तू अगदी सहज केलस. ते हि तिच्यावर न चिडता आणि तिला न दुखावता.
     "तुझं आणि आईच काय नातं आहे? तू का येतोस आमच्याकडे?" या तिच्या प्रश्नावरच तुझ उत्तर ऐकून तर मी सुद्धा थक्क झाले होते.
     किती सहज सांगितलस तिला तू ,"झाडाला गुरफटलेल्या वेलीच जे नातं झाडाशी असतं तेच नातं आमच्यामध्ये आहे. कधी ती झाड झाली तर कधी मी. ना झाडाने कधी वेलीवर आपला अधिकार सांगितला ना वेलीने झाडावर.  एक निरपेक्ष नातं असत दोघांमध्ये तसच तुझ्या आईच आणि माझं निरपेक्ष मैत्रीच नातं आहे.........माझ्या मुलीला  मैत्री आणि प्रेमातल्या नाजूक रेषेची ओळख योग्य वयातच झाली निव्वळ तुझ्यामुळे!माझ्या मनात दाटलेले मेघ जसे दूर झाले होते तसेच तिच्याही झाले.
       अशा किती गोष्टी लिहू? आज मला माझ्या आयुष्याचा नवा जोडीदार मिळालाय. एका नव्या संसाराची सुरुवात करतेय मी. अर्थातच तुझ्या पुढाकारामुळेच. मला आणि माझ्या मुलीला या लग्नासाठी  तयार करण्याच शिवधनुष्य  तू अगदी सहज पेललस. आज मी हे घर, हे शहरच नाही तर हा देश सोडून चाललेय. माहितेय मला एका क्लिक वर कोणालाही बघता येतं कोणाशीही बोलता येत पण तरीही आज मनातल सार मी या चिठ्ठीत लिहितेय ...सतत तुझ्याजवळ राहण्यासाठी. जाता जाता सुचलेल्या चार ओळी लिहिते.
           नाती असतात रक्ताची, नाती असतात व्यवसायाची
          काही नाती फक्त स्वप्नांची तर काही सहज जोडलेली
          असच एक नातं जुळतं मैत्रीच
           उत्कठ भावानेच कि शब्दांच्या पलीकडलं?

*संपूर्णत: काल्पनिक
©मानसी जोशी

No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...