Friday, 30 December 2016

Happy New Year2017

आज २०१६ चा शेवटचा दिवस. आजची संध्याकाळ या वर्षाची आणि या महिन्याचीही शेवटची संध्याकाळ. अनेकजण आज संध्याकाळपासून थर्टी फर्स्टच्या  सेलिब्रेशनच्या तयारीमध्ये बिझी असतील. हॉटेल्स तुडूंब भरलेली असतील. वेगवेगळ्या इव्हेंट्सच तिकिट बुकिंग फुल झाल असेल. कुठेतरी एखाद नवपरिणित जोडप अथवा प्रेमी युगुल समुद्रात बूडणाऱ्या किंवा डोंगरामागे जाणाऱ्या सूर्याच्या साक्षीने भविष्याची स्वप्न रंगवत असतील. तर काहीजण हे आपल नविन वर्ष नाही; अस म्हणून शांतपणे घरात बसून राहतील किंवा आजच सेलिब्रेशन म्हणजे हिंदू संस्कृतीचा कसा अपमान आहे वगैरे गोष्टींवर चर्चा करत बसतील. काही जण ऑफिसची कामं, डेड लाईन यामध्ये बिझी असल्यामुळे थर्टी फर्स्ट सेलिब्रेट करता येणार नाही याच दु:ख आळवत बसतील. या साऱ्यामध्ये मात्र हॉस्पिटलमध्ये सिरिअस असणाऱ्या पेशंट्सच्या नातेवाईकांची त्यांच्या जिवलगांची मनस्थिती कशी असेल याचा विचार क्वचितच कोणीतरी करत असेल. तेव्हा आजच्या या दिवसाच सेलिब्रेशन करताना निदान हॉस्पिटलजवळ सेलिब्रेशन करण, फटाक्यांच्या माळा लावणं हे सार टाळाव. सेलिब्रेशन जरुर करा पण ते करताना कुठल्याही वृद्ध माणसांना, आजारी माणसांना आणि लहान बाळांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या एवढीच कळकळीची विनंती.
         माझ्या घरातल कॅलेंडर मी उद्या बदलणार त्यामुळे माझ्यासाठी तरी उद्यापासून नविन वर्ष चालू होणार. माझ्या आयुष्यात नविन स्वप्न घेवून, नविन आशा घेवून आलेल हे २०१६ जाताना खूप काही देवून जातय. काही स्वप्न पूर्ण झाली, काही हवेत विरुन गेली, काही अनपेक्षित सुखद धक्के मिळाले तर काही वेळा अपेक्षाभंग झाला. कधी काही माणसांमूळे माणुसकीवरचा विश्वास ठाम झाला तर कधी परमेश्वराच्या अस्तित्वावरही शंका निर्माण झाली. कधी चुकले पण खूप काही शिकले तर कधी स्वतःलाच  नव्याने ओळखले. याच वर्षी मी फेसबूकवर व्यक्त व्हायला शिकले. यापूर्वी कधीतरीच फेसबूक ओपन करणारी मी आता दिवसातून किमान एकदा तरी फेसबूकवर ॲक्टिव्ह असतेच. माझ्या लेखनाच इतक कौतुक होइल अशी मी कधीच कल्पना केली नव्हती पण फेसबूकवरच्या काही ग्रूपवर माझ्या लेखनाच झालेल कौतुक बघून 'आज मै उपर' अस फिलिंग आल. अनेक नविन ओळखी झाल्या, काही जुन्या ओळखी पुन्हा नव्याने समोर आल्या तर काही कधीही न भेटलेल्या पण फेसबूकवर नेहमीच भेटणाऱ्या व्यक्ती मात्र अनोळखी असूनही ओळखीच्या वाटू लागल्या.  पुन्हा नवी स्वप्न, नवीन आशा घेवून येणार हे नविन वर्ष  माझ्या आयुष्यातल एक सुंदर पान ठराव एवढीच परमेश्वराकडे प्रार्थना!  सगळ्यात महत्वाच नविन वर्षांच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा! गेल्या वर्षी तुमच्या आयुष्यात आलेली  दु:ख, संकटे दूर होवून, येणाऱ्या नविन वर्षांत जवळ असणारी अनुभवाची शिदोरी आणि जिवलगांच्या शुभेच्छा यांच्या आधारे तुमच आयुष्य सुखी संपन्न होवूदे हिच सदिच्छा!! Wish you Happy New Year 2017

Friday, 16 December 2016

कथा - कॅन्डललाईट डिनर

 कॅन्डललाईट डिनर

'ती' तशी हळवी. रोमॅन्टिक कथा कादंबऱ्यामध्ये रमणारी. 'तो' साधा सरळ. रोमॅन्टिक होणं फारस न जमणारा.
     एका संध्याकाळी तो ऑफिसमधून जरा लवकर घरी आला आणि तिला म्हणाला, "चल आज आपण कॅन्डललाईट डिनरला जाऊया".
     क्षणभर तिचा विश्वासच बसला नाही. अनेक कथा कादंबऱ्यांमध्ये वाचलेली आणि मूव्हीज मध्ये बघितलेली कॅन्डललाईट डिनर डेट तिच्यासाठी स्वप्नवतच होती. त्यात तिचा काहिसा अनरोमॅंटिक नवरा हे सांगतोय म्हटल्यावर तर ती एकदम हरखूनच गेली
       तिने  त्याच्या आवडीचा वेस्टर्न ड्रेस घातला. हलकासा मेकअप केला. त्याला आवडतात म्हणून केस मोकळेच सोडले.
      तिने वाढदिवसाला गिफ्ट केलेला शर्ट घालून 'तो' ही तयार झाला.
    गाडीत त्याने खास तिच्या आवडीच म्युझिक लावले.  आपण स्वप्नात तर नाही ना... असं वाटून तिने हळूच स्वतःला चिमटा काढून बघितला.
     गाडी रेस्टॉरंटच्या गेटमधून आत गेली. गेटवरच्या वॉचमनने पार्किंगची जागा दाखवली. त्याने गाडी पार्क केली. तेवढ्यात दुसरा वॉचमन पुढे आला आणि त्याने अदबिने गाडीचं दार उघडून त्या दोघांना वेलकम केलं. ती हरखून गेली. आपले हाय हिल्स सॅंडल्स सांभाळत त्याच्याबरोबर सावकाश चालू लागली.
       आत गेल्यावर त्यांना अटेंडंटने पुन्हा एकदा वेलकम केले. त्याने मंद हसून अटेंडटला सांगितले 'पूलसाईड टेबल!'
    दोघं आतमध्ये गेली. मंद संगित, रुमफ्रेशनरचा सुगंध 'ती' मोहरुन गेली.
       एक छानसं कॉर्नरच टेबल बघून दोघं तिथे बसले. टेबलावर दोन सुंदरसे कॅन्डललाईट  स्टॅंड होते. हॉटेलच्या वेटरने त्यामध्ये दोन सुगंधित कॅन्डल्स लावल्या. ती टेबलावरचे मेनूकार्ड हातात घेऊन बघू लागली.  समोर ड्रिंक्स आणि नॉनव्हेज डिशची नावे बघून तिचा मूड गेला. ती त्याला म्हणाली, "अरे हे हॉटेल तर व्हेज ॲन्ड नॉनव्हेज आहे".
     'तो' म्हणाला, "कॅन्डललाईट डिनरला प्युअर व्हेज हॉटेल शोधावंच लागेल हा!"
      त्याचा मूड जायला नको म्हणून 'ती' उगाचच हसली. पुन्हा मेनूकार्ड बघायला लागली. सवयीप्रमाणे तिने आधी उजव्या बाजूला नजर टाकली. रेट्स बघून तर तिला आश्चर्यच वाटलं. सगळ्या डिशेसचे रेट जवळपास दुप्पट होते. ती नकळत बोलून गेली, "फार महाग आहे ना हे हॉटेल!"
उत्तरादाखल तो फक्त हसला.
     एव्हाना तिचा मुड पूर्णपणे गेलेला होता. तिने विचारलं, "फारच काळोख वाटतोय ना?"
     "अजून दोन कॅन्डल स्टँड आणायला सांगू का?" त्याने विचारलं.
  ती नजरेनेच नको म्हणाली.
 ऑर्डर घेण्यासाठी वेटर आला.
 तिने विचारलं, "तुमच्या इथे व्हेज नॉनव्हेज किचन वेगळी आहेत का?"
 वेटरने 'सॉरी' म्हणून नकारार्थी मान हलवली.
"मग एकाच किचनमध्ये वेगवेगळे सेक्शन आहेत का?" तिने पुढचा प्रश्न विचारला.
वेटर पुन्हा सॉरी म्हणाला .
तिचा चेहरा उतरला.
तिचा उतरलेला चेहरा बघून त्याने वेटरला 'नंतर देतो ऑर्डर' अस खूणेनेच सांगितल.
वेटर निघून गेल्यावर त्याने तिला विचारल, "तू कंफर्टेबल नाहियेस का इथे?" नसशील तर आपण दुसरीकडे जाऊया.”
त्याचा मूड जायला नको म्हणून ती म्हणाली , "नाही, इट्स ओके".
    तेवढ्यात एक वेटर नॉनव्हेज सिझलर आणून बाजूच्या टेबलवर सर्व करू लागला. त्या वासाने तिला मळमळायला लागल. तरिही ती गप्प राहिली; त्याच्यासाठी!
    त्याने मात्र तिच्या नजरेतली उदासी चटकन ओळखली. तो उठून तिला म्हणाला, "चल आपण तुझ्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये जाऊया".
    ती काही न बोलता तिथून उठली. दोघ तिथून बाहेर पडली.
गाडीत बसल्यावर तिच्या डोळ्यात पाणी आलं.
   'ती' त्याला म्हणाली, "सॉरी पण तू प्लीज चिडू नकोस माझ्यावर. मला माहितेय तू एवढ छान प्लॅनिंग केलस आणि माझ्यामूळे.....   
  "तूझ्यामूळे काहीही झालं नाही", तिचं बोलणं मध्येच तोडत त्याने शांतपणे तिला समजावलं. तिच्या पाणावलेल्या डोळ्यातून दोन आसवं तिच्या गालावर ओघळली.
तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला, "तुझ्यासाठीच केला होता सगळा प्लॅन पण जर तूच कंफर्टेबल नसशील तर काय उपयोग? माझ्यासाठी तूझ खूश होणं महत्वाचं बाकी काही नाही".
    त्यावेळी पहिल्यांदा तिला जाणवलं; 'तो' खरच खूप रोमॅन्टिक आहे. त्या कॅन्डललाईट डिनरपेक्षा हा गाडीतला दोन मिनीटांचा संवाद तिला जास्त रोमॅन्टिक वाटला.
    'ती' काही न बोलताही त्याने तिच्या भावना समजून घेणं हाच तर खरा रोमान्स आहे. हे आता तिला मनोमन पटलेलं होतं.
    'ती' ही कॅन्डललाईट डिनर डेट कधीच विसरू शकणार नाही. कारण फसलेली असली तरी, त्यामुळेच तर ती पुन्हा नव्याने त्याच्या प्रेमात पडली होती.

©मानसी जोशी


 





Wednesday, 14 December 2016

कथा - ती रात्र

ती रात्र...
संध्याकाळ टळून हळूहळू रात्र सुरु झाली होती. रेवा खिडकीत बसून बाहेर पडणारा मुसळधार पाऊस अस्वस्थ होऊन बघत होती. भर दिवसा तिन्हीसांजा झाल्यासारखा होणारा काळोख, मुसळधार पडणारा वादळी पाऊस, अशी उदास संध्याकाळ हे सारं ती आयुष्यात प्रथमच यावर्षी अनूभवत  होती. सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट, समोर मोकळा निर्मनुष्य रस्ता डाव्या बाजूचा मोकळा प्लॉट सोडून सुरु होणारं जंगल आणि एका मोठ्या बंगल्यात फक्त ती आणि तिची अडीच वर्षांची मुलगी आभा. वाढत जाणाऱ्या अंधाराबरोबर रेवाच्या मनातली भीतीही वाढत होती. धड महिनाही झाला नव्हता तिला कोकणातल्या या गावात; या बंगल्यात रहायला येऊन. ती व तिचा नवरा अभिजीत लहानग्या आभाला घेऊन प्रथमच कोकणात रहायला आले होते. अभिजीतच्या कंपनीचा कोकणात एक मोठा प्रोजेक्ट चालू होता. त्याच्या कामासाठी कंपनीने सहा महिन्यासाठी अभिजीतला कोकणातल्या ब्रॅंचमध्ये  पाठवलं होतं. कंपनीच्या ब्रॅंच ऑफिसजवळच असणाऱ्या बंगलो सोसायटीमधल्याच एका बंगल्यात कंपनीने त्यांची रहायची व्यवस्था केली होती.
      कोकणातला हा परिसर तसा शांतच. कोकणातल्या निसर्गसौदर्याने सुरुवातीला वेडावलेली रेवा आता मात्र कोकणातल्या पावसाच्या रौद्र रुपाने चांगलीच घाबरली होती. तिचा नवरा अभिजीत मिटिंगसाठी बाजूच्या शहरात गेला होता. शहर तस फार लांब नव्हतं. अवघ १४० किलोमीटरचं अंतर. कारने फक्त अडीच/तीन तास. पण खराब रस्ता आणि मुसळधार पावसामूळे हा वेळ कधीकधी दुप्पट होत असे. संध्याकाळपर्यंत परत येणाऱ्या अभिजीतला कामामुळे तिथून निघायलाच संध्याकाळ होवून गेली होती. एकीकडे अभिजीतची काळजी असूनही रेवा या भयाण वातावरणामुळे त्याला 'आज निघू नकोस' असंही म्हणू शकत नव्हती. घड्याळात आठचे ठोके पडले आणि रेवा विचारांच्या तंद्रीतून बाहेर आली. मेकॅनो खेळण्यात रमलेल्या तिच्या मुलीला कौतुकाने जवळ घेऊन म्हणाली, "पिल्लू बास आता खेळ, छान छान वरण भात जेवायचा ना?"
  "नाही, बाबा आल्यावरच त्यांच्या मांडीत बसून", आभाने हट्ट केला.
    "पिल्लू बाबांना उशीर होणार आहे ग. आज माझ्या मांडीत बसून जेव ना ग. मी छान गोष्ट सांगते ससोबाची चालेल?"
   "रोज रोज काय ग उशीर? एवढे दिवस झाले मला बाबा भेटून" आभा हात पसरुन म्हणाली.
     "हो ग राणी आज आला ना की मी चांगल ओरडेन हा त्याला" , रेवा हसून म्हणाली.
"आणि त्याला उद्या मी उठेपर्यंत घरातच कोंडून ठेव हा! जाऊच नको देऊस ऑफिसला?" आभा लटक्या रागाने म्हणाली.
   रेवाने हसून मान हलवली आणि आभाला भरवायला सुरवात केली. एवढ्यात जोरात वीज कडाडली. ढगांचा गडगडाट झाला आणि लाइट गेले. त्या कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने आणि अंधारामूळे आभा घाबरुन रेवाला बिलगली आणि रडायला लागली.  रेवाने क्षणात मोबाईलची टॉर्च लावली आणि आभाला शांत केले. आभाला कडेवर घेवून ती उठली आणि तिने देवासमोर लावलेल्या निरांजनात तेल घातले. त्या सात्विक प्रकाशात रेवाच्या मनातली भीती जरा कमी झाली. आभाला जवळ घेउनच रेवाने कसेबसे चार घास तोंडात टाकले आणि किचनमधले आवरायचं तसच ठेवून ती आभाला घेउन बेडरूममध्ये झोपायला गेली. थोडंसं थोपटल्यावर आधीच घाबरलेली आभा तिच्या कुशीत शांत झोपली. रेवा मात्र जागीच होती. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा जोर अजूनच वाढला होता. रेवाला आता अभिजीतची अधिकच काळजी वाटू लागली होती. मगाचच्या विजेच्या कडकडाटानंतर रस्त्यावरचे दिवेही गेले होते. नाही म्हणायला बाजूच्या बंगल्यात इनव्हर्टर  असल्यामुळे त्यांच्या किचनमध्ये लाइट चालू होता. पण त्याचा काहीच उपयोग नव्हता. कारण त्या बंगल्यात रहाणारे आजी आजोबा काहीसे विचित्रच वाटत होते. सुरुवातीस जरा बरे वागले होते. पण मागच्या आठवड्यापासून त्यांचं वागणं एकदमच बदललं. रोज सकाळी अभिजीत ऑफिसला जाताना त्याला बाय करायला जाते तेव्हा तर किती विचित्र नजरेने बघतात त्या आजी. अर्थात अभी पण कधीकधी जास्तच रंगात येतो म्हणा. ते खटकलं असेल त्यांना बहुदा. शेवटी गावातली माणसं आहेत ती. तो सोसायटीचा नाईट वॉचमन तर किती विचित्र नजरेने बघत असतो. विचार करता करता रेवाचा डोळा लागला. थोड्या वेळाने दार ठोठावण्याच्या आवाजाने रेवा दचकून जागी झाली. त्या आवाजाने ती खूप घाबरली. तिने मोबाईल हातात घेऊन वेळ बघितली तर रात्रीचे साडेबारा वाजले होते.
   "आत्ता या वेळेला कोण असेल? तिच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली. अभी तर नसेल? या विचाराने क्षणभर तिला दिलासा दिला पण अभि रात्री उशिरा आला की नेहमी त्याच्याजवळच्या किल्लीनेच दार उघडतो आणि जर किल्ली नसेल तर कॉल करतो. रेवा प्रचंड घाबरली. पाऊसाचा जोर जरी ओसरला असला, तरी सगळीकडे पसरलेला अंधार, विचित्र आवाजात रडणाऱ्या कुत्र्यांचा आवाज, पार्किंग शेडच्या पत्र्यावर मधूनच पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा आवाज या साऱ्यामूळे वातावरण अधिकच भयावह बनले होते. रेवाला आता असहाय्य वाटू लागलं होतं. ती कुठलीही हालचाल न करता आभाला कुशीत घेऊन बेडवर तशीच पडून  राहिली. पुन्हा दार वाजले. रेवा खूपच घाबरली, "कोण असेल एवढ्या रात्री? तो वॉचमन तर नसेल? दोन दिवसांपूर्वी मेडिकल चेकअपसाठी अभिच्या ऑफिसमधून काही ऑफिसर्स आले होते तेव्हा कसा फिरत होता तो बंगल्याच्या आसपास. आणि ती माणसे गेली तेव्हा काय बोलत होता त्यांच्याशी कुणास ठावूक? एवढ्यात पुन्हा दार वाजले. हिम्मत करुन रेवाने दाराजवळ जायचे ठरवले. पावलांचा आवाजही न करता रेवा हळूहळू हॉलमध्ये जायला निघाली. मनातून  ती खूप घाबरली होती. हळुवार पावलांनी ती हॉलमध्ये आली. घाबरत घाबरत ती दाराजवळ गेली.  दाराच्या फटीतून तिने बाहेर बघायचा प्रयत्न केला पण बाहेर असणाऱ्या मिट्ट काळोखामूळे तिला काहीच दिसले नाही. ती खूप घाबरली होती तिने पुन्हा हिम्मत करुन कि-होल मधून बाहेर बघितले, एवढ्यात वीज चमकली. ढगांचा गडगडाट झाला.  त्या प्रकाशात तिला गेटबाहेर उभा असलेला वॉचमन दिसला.  रेवाने घाबरून दाराकडे पाठ फिरवली. तिचं उरलसुरल अवसान गळून पडलं होतं. भीतीने ती मटकन खाली बसली.  तिला आता रडू यायला लागल होतं. आपल्या रडण्याचा आवाज बाहेर जाऊ नये म्हणून तीने आपले दोन्ही हात तोंडावर घट्ट धरून ठेवले.
     कितीतरी वेळ रेवा दाराला टेकून रडत होती. अचानक तिला आभाची आठवण आली. आभाच्या काळजीने तिने बेडरुमकडे धाव घेतली. आभाला बेडरुममध्ये शांत झोपलेली बघितल्यावर तिचा जीव भांड्यात पडला. तिने पटकन जाऊन आभाला कुशीत घेतले. काही झाल तरी चालेल, पण उद्या अभी ऑफिसला जाण्यापूर्वी त्याच्याजवळ जागा बदलण्याविषयी बोलायचंच. जेव्हा नविनच इथे रहायला आलो तेव्हा घरासाठी लागणार काही सामान आणायला इथूनच जवळ असणाऱ्या शहरात गेलो होतो. तिथेच एखादा छोटा फ्लॅट मिळाला तरी चालेल. पण तिथेच जागा बघू म्हणून सांगायच अभीला. ऑफिस थोडं लांब पडलं तरी चालेल, पण निदान चार लोक तरी असतील सोबतीला. अभीला पटेल का पण? या बंगल्यात आलो तेव्हा किती खूश होता अभिजीत. एखाद्या रिसोर्टपेक्षाही सुंदर असणाऱ्या तीन बेडरुम्स, मॉड्युलर किचन, अगदी टीव्हीवर दाखवतात तसा मोठा हॉल, त्यामध्ये मोठा सोफा, बाहेर छोटसं पण सुंदर गार्डन, त्यामध्ये एक छोटासा झोपाळा. अगदी एखाद्या स्वप्नातल्या घराइतका सुंदर बंगला. पहिल्याच दिवशी अभी म्हणाला होता, "आता काय रोजच हनीमून." अभिच्या आठवणीने या प्रसंगातही तिला हसू आलं. तिच्या मनात आलं, हा इतका सुंदर बंगला आज मात्र खूपच भयंकर वाटतोय. एखाद्या शापित वास्तुसारखा!
    विचार करता करता तिचा डोळा लागतो न लागतो तोच तिचा मोबाईल वाजला. त्या सवयीच्या आवाजानेही रेवा दचकली. तिने मोबाईल बघितला तर फोन अभिजीतचा होता. "हॅलो रेवा मी आलोय, दार उघड ना, अग किल्ली आहे माझ्याकडे पण अंधारात काहीच दिसत नाहीये. "
"ओके" असं म्हणून रेवाने फोन कट केला आणि धावत जाऊन दार उघडलं. समोर अभिजीतला बघून तिच्या चेहऱ्यावर आनंद तरळला तिने दारातच त्याला मीठी मारली आणि रडत रडत म्हणाली, "बर झाल अभी तू आलास मला खूप भीती वाटत होती".
     "इट्स ओके रेवा, आता आलोय ना मी. प्लिज, डोन्ट क्राय डिअर." अभी तिला समजावत म्हणाला.
      रेवा काहीच ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हती. ती  अभिच्या मीठीत रडतच होती. त्याने तिला हळूवार थोपटलं. काही क्षण तसेच शांततेत गेले. रेवा शांत झाल्यावर अभिजीत हसून म्हणाला, "रेवा घरात घेशील का ग मला आता? का दारातच सगळा रोमान्स करायचा आहे?"
   त्याचं मिश्किल बोलणं ऐकून त्याच्या छातीवर डोक घुसळत रेवा म्हणाली, "मोस्ट वेलकम माय स्वीट हार्ट!".
    आत आल्यावर अभिजीतने रेवाला विचारले, "रेवा काय झालंय? एवढी डिस्टर्ब का आहेस?"
    "अभी आपण ही जागा बदलूया. खूप एकाकी वाटतं इथे. तू नसलास की एखाद्या हॉंटेड हवेलीसारखा वाटतो हा बंगला. वारंवार लाईट्स जातात. तो नाईट वॉचमन विचित्र नजरेने माझ्याकडे आणि आपल्या घराकडे बघत असतो. बाजूच्या बंगल्यातले आजी आजोबा सुद्धा विचित्रच वाटतात मला. आपण बाजूच्या शहरामध्येच एखाद्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट बघूया. रेंट आपल्याला भरायला लागल तरी चालेल, जागा छोटी असली तरी चालेल मला. पण आपण इथून जाऊया." अस म्हणून रेवा पुन्हा रडू लागली.
        "इट्स ओके रेवा. आपण बोलू उद्या. तुला इथे नाही ना रहायचं मग बघू आपण दुसरी जागा. उद्या ऑफिसमध्ये गेल्यावर मी बोलतो सरांशी. ओके?" अभिजीतने रेवाला समजावले.
     जागा बदलायला अभी लगेच तयार झाला म्हटल्यावर तिचा जीव भांड्यात पडला. इतक्यात तिच्यासमोर खिशातला टिशू पेपर धरून अभिजीत म्हणाला, "रेवा आता जर का तुला रडू आलं ना; तर या पेपरला डोळे पुस हा. तोपर्यंत तुझ्या अश्रूंमूळे ओला झालेला हा शर्ट मी बदलून येतो."
     त्याचा हा मिश्किलपणा बघून रेवाला हसू आलं.  रेवाने त्याच्या हातातला टिशू पेपर हातात घेतला आणि बाजूच्या ड्रेसिंग टेबलवर ठेवून लटक्या रागाने म्हणाली, "अभी चेष्टा करतोयस ना माझी? पण खरच भीतीमूळे मला खूप एकाकी वाटत होतं. तुला समोर बघितल आणि जीवात जीव आला माझ्या."
    "हो हो रडूबाई कळल मला आता. मी पटकन आवरुन येतो. तोपर्यंत शांत बस घाबरु नकोस अजिबात", अभिजीत.       त्यानंतर  मात्र अभिजीतच्या  कुशीत रेवाला शांत झोप लागली. सकाळी जाग आली तेव्हा बाहेरच वातावरण एकदम स्वच्छ दिसत होतं. गेले आठ दिवस अविरत बरसणारा पाऊस थांबून सूर्यदर्शन झाल होत. पक्षांचा किलबिलाट ऐकू येत होता. रेवाला खूपच प्रसन्न वाटत होतं. बाजूला शांत झोपलेल्या अभिजीत आणि आभाकडे बघून तिला समाधान वाटले. तितक्यात डोअरबेल वाजली.  रेवाने दार उघडले तर समोर तिच्या सासूबाई, तिची नणंद मेघा आणि काही माणसे उभी होती. रेवाला आश्चर्य वाटले. "आई तुम्ही आत्ता इथे कशा काय"? आणि ही सगळी माणसे कोण आहेत?नकळतपणे रेवाने विचारले. "सगळ सांगते. आम्हाला आत तर येवूदे." सासूबाई शांतपणे म्हणाल्या.
   रेवा खूपच गोंधळून गेली होती. तिच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे बघत तिच्या सासूबाई म्हणाल्या, " रेवा मला खूप महत्वाचं बोलायच आहे."
     "बोला ना आई काय झालंय? तुम्ही अशा अचानक इथे आणि मेघाला(अभिजीतची बहीण) घेवून कशा काय आलात? तिचं कॉलेज नाही का? मला खूप भीती वाटतेय बोला ना लवकर काय झालय ते.  ऱेवाने घाबरून विचारले.
  "रेवा अभिजीत कुठे आहे? सासूबाईंनी शांतपणे विचारलं.
  "आत बेडरूममध्ये झोपलाय. थांबा मी बोलावते" अस म्हणून रेवा बेडरूमकडे जायला वळली तेवढ्यात तिच्या सासूबाई तिला थांबवत म्हणाल्या, "रेवा थांब, आम्ही दोघी पण येतो तुझ्याबरोबर." त्या
      तिघी बेडरूममध्ये गेल्या तेव्हा फक्त आभा शांत झोपली होती. अभिजीत तिथे नव्हता. गोंधळलेल्या रेवाने बेडरुमभर फिरत त्याला हाका मारायला सुरवात केली. तिच्या आवाजाने आभा दचकून उठली आणि रडू लागली. पण रेवाचे तिकडे लक्षच नव्हते. ती अभिजीतला शोधत होती. रेवाच्या सासूबाईनी आभाला जवळ घेवून थोपटलं आणि ती शांत झाल्यावर तिला म्हणाल्या, "आभा आत्येबरोबर जरा फिरून येतेस? आत्येने तुझ्यासाठी खूप सारी चॉकलेट्स आणली आहेत”. समजूतदार आभा चटकन तिच्या आत्येकडे गेली.  मेघा आभाला घेउन बाहेर गेली.
     अख्खा बंगला फिरुन रेवा पुन्हा बेडरुममध्ये आली. अभिजीत कुठेही न दिसल्यामुळे ती डिस्टर्ब झाली होती. तिच्या सासूबाईंनी तिचा हात धरुन तिला बेडवर बसवले आणि शांतपणे म्हणाल्या, रेवा हे काय आहे सगळं? माझ्या बरोबर जी माणसे आली आहेत ना; ती म्हणजे अभीच्या ऑफिसमधले त्याचे सहकारी आहेत. त्यांनीच आम्हाला बोलावून घेतलंय. त्यांना अभिबद्दल काहितरी महत्त्वाचे बोलायचे आहे, असं काहीसं म्हणत होते फोनवर".
      रेवा हताश होवून बसली होती. सासूबाईंच्या बोलण्यामुळे अजूनच गोंधळली होती. अभिजीतच्या ऑफिसमधील मि. साने आणि अजून काही सहकारी आतमध्ये आले. काही क्षण तसेच शांततेत गेले. काय बोलाव कोणालाच काही कळत नव्हत.अखेर शांततेचा भंग करत मिस्टर साने म्हणाले, " मॅडम, अभिजीत कुठे आहे? गेले काही दिवस तो ऑफिसला का येत नाहीये?
      "What? How can it possible Mr. Sane?काल अभिजीत ऑफिसच्या कामासाठी बाजूच्या शहरात क्लाएंट मीटिंगसाठी गेला होता ना?तुम्हांला तर माहितीच असेल तूम्हीच तर पाठवल होत त्याला. रात्री उशीरा परत आला तो." रेवा संतापून म्हणाली.
 "मग तो आत्ता कुठाय?" सानेंनी रेवाला विचारल.
रेवा आता पूर्णपणे गोंधळली होती कसंबसं स्वतःला सावरत ती म्हणाली, "मी खरं तेच सांगतेय प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. काल मी स्वतः दार उघडून त्याला घरात घेतल. लाईट गेले होते म्हणून त्याने मला कॉल केला आणि......; एक मिनिट! काहीतरी आठवल्यासारख करत रेवा क्षणभर थांबली आणि म्हणाली, "काल रात्री अभीने दार उघड म्हणून सांगायला मला कॉल केला होता. Just wait for a second..... ",असं म्हणत तिने बाजूच्या ड्रेसिंग टेबलवरचा आपला मोबाईल घेवून कॉल हिस्ट्री चेक केली आणि रिसीव्ड कॉलमध्ये असलेला अभीचा नंबर मि. सानेना दाखवला. सानेनी कॉल हिस्ट्री चेक केली आणि ते रेवाला म्हणाले, "मॅडम रिसिव्ड कॉल हिस्ट्रीमध्ये अभिजीतचा नंबर आहे. अगदी बरोबर; पण तो कॉल काल रात्री आलेला नव्हता, तर आठ दिवसांपूर्वी संध्याकाळी सहा वाजून आठ मिनिटांनी आला होता."  रेवाने अविश्वासाने सानेंच्या हातून मोबाईल जवळपास ओढून घेतला आणि कॉल हिस्ट्री पुन्हा बघितली. सानेंचं म्हणण बरोबर होतं. कॉल आठ दिवसांपूर्वीचाच होता.
    रेवाचा गोंधळलेला चेहरा बघून साने म्हणाले, "रेवा मॅडम, तुम्हाला अभिजीतचाच काय कोणाचाच फोन काल येणं शक्य नव्हत कारण आठ दिवसांपूर्वी या सोसायटीच्या परिसरात वीज पडल्यामुळे सगळे मोबाईल्स आणि लॅंडलाईन सध्या बंद आहेत. सगळ्यात महत्त्वाच म्हणजे, अभिजीत काल नव्हे तर आठ दिवसांपूर्वीच म्हणजेच गेल्या मंगळवारीच बाजूच्या शहरात मिटिंगसाठी गेला होता. त्यांच्याबरोबर ऑफिसचे क्लार्क मि.सावंतही होते. पण त्यांचं घर त्याच शहरामध्ये असल्याने ते परत येणार नव्हते.  पण अभिजीत परत येणार होता आणि ते ही क्लाएंटने दिलेले २५ लाख रुपये घेऊन. बुधवारी सकाळी अभिजीत ऑफिसला आला नाही. त्याचा फोनही नाही म्हटल्यावर आम्हाला आश्चर्यच वाटल. पण नंतर थोड्या वेळातच कळलं की वीज पडल्यामूळे सगळे मोबाईल आणि लॅंडलाईन बंद आहेत. इतकंच नव्हे तर केबल तुटल्यामूळे त्या दिवशीपासून MSEB च्या काही लाईन्सही बंद आहेत. मंगळवारी अविरत पडणाऱ्या पावसामुळे अभिजीतला मिटिंग आटपून परतायला उशीर झाला असेल व दगदगीमूळे आज ऑफिसला यायचा कंटाळा आला असेल शिवाय फोन बंद असल्यामूळे त्याला ऑफिसमध्ये कळवताही आलं नसेल असा विचार करुन आम्ही त्याचं न येणं फारस गांभीर्याने घेतलं नाही. परंतू  दुसऱ्या दिवशीही जेव्हा अभिजीत ऑफिसला आला नाही तेव्हा मात्र ऑफिसमधले शिपाई मि. मोरे तुमच्या घरी बघायला आले होते. तेव्हा तुम्ही त्यांना अभिजीत ऑफिसला गेला असं सांगितलंत. पण त्या दिवशीही अभिजीत ऑफिसला न आल्याने मला शंका आली. संध्याकाळी कामे आटपून मी स्वतः तुमच्याकडे यायला निघालो.
      संध्याकाळची वेळ असल्याने दिवसपाळीचा वॉचमन नुकताच आपली ड्युटी संपवून निघाला होता आणि नाइट वॉचमन ड्युटीसाठी आला होता. त्यामुळे दोन्ही वॉचमन गेटजवळच भेटले. दोघांच्याही म्हणण्यानूसार त्यांना मंगळवारनंतर अभिजीत दिसलाच नव्हता. मंगळवारी सकाळी ६ वाजता अभिजीतला जाताना दोन्ही वॉचमननी बघितल होतं. कारण नाइट वॉचमनला लवकर जायचं असल्यामुळे दिवसपाळीचा वॉचमन त्यादिवशी थोडं लवकर आला होता. त्या दोन्ही वॉचमनशी बोलल्यावर माझ्या मनात भलत्याच शंका यायला लागल्या. नक्की कोण खरं बोलतंय काहीच कळत नव्हतं. एकीकडे तुम्ही मि. मोरेंना सांगितलंत, "अभिजीत रात्री परत आला व सकाळीच ऑफिसला गेला." पण अभिजीत ऑफिसला तर आलाच नव्हता. अखेर विचार करुन मी पोलीस स्टेशनला गेलो. त्यांना सगळ्या परिस्थितीची कल्पना दिली. पोलिसांनीही वेळ न दवडता तपासकार्याला सुरुवात केली. एका हवालदाराला तुमच्या घरावर पाळत ठेवायला सांगून आजूबाजूच्या बंगल्यांमध्येही चौकशी करण्याची सूचना दिली.
     पोलिसांच्या तपासानुसार मंगळावरी मिटिंग आटोपल्यानंतर अभिजीत आणि मि. सावंत   'विसावा' हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. त्या हॉटेलच्या सिसिटिव्ही कॅमेराचे फुटेज पोलिसांनी चेक केले आहेत. मि. सावंताच्या सांगण्यानूसार तिथून अभिजीत मि. सावंतना त्यांच्या घरी सोडून परतीच्या प्रवासाला लागणार होता. पण तेवढ्यात मीटिंगमध्ये झालेल्या काही पॉईंटसवर पुन्हा चर्चा करण्यासाठी क्लाएंटने अभिजीतला कॉल करुन परत येण्याची विनंती केली. त्यामुळे हॉटेलमधून सावंत त्यांच्या घरी गेले व अभिजीत पुन्हा क्लाएंटच्या ऑफिसमध्ये गेला. क्लाएंटच्या ऑफिसमध्ये असलेल्या सिसिटिव्ही फूटेजनूसार संध्याकाळी बरोबर ६:१० वाजता अभिजीत तिथून क्लाएंटने दिलेले २५ लाख रुये घेवून निघाला होता. निघण्यापूर्वी त्याने तुम्हांला फोन केला होता. त्याच्या मोबाईल कॉल रेकॉर्डनुसार तो त्याने केलेला शेवटचा फोन होता. तोच कॉल जो तुम्ही मला कालचा म्हणून दाखवताय”.
       रेवा आता रडकूंडीला आली होती. ती हतबल होऊन म्हणाली, "हे सारं काय चाललंय? मला नाही माहिती तुम्ही काय बोलताय? पण मला खात्री आहे अभिजीत कोणाचेही पैसे घेवून कुठेही जाणार नाही. तो आत्ता कुठे गेला ते नाही माहिती पण काल रात्री.....
        "काल रात्री तो परत आलाच नाही रेवा मॅडम कारण पोलिसांच्या तपासानूसार त्याच्या मोबाईलच शेवटच लोकेशन मंगळवारी रात्री गाववाडी नावाच्या गावाजवळच्या घाटात ट्रेस झालं. त्याच्याआधारे मुसळधार पावसातही शक्य तेवढी मेहनत घेवून पोलिस अभिजीतला शोधत होते. आम्हाला संशय होता की एकतर अभिजीत पैसे घेवून पळून गेलाय किंवा पैशासाठी अभिजीतचा घातपात करण्याचा प्रयत्न झालाय. पण अखेर दोन दिवसांच्या अथक परिश्रमाने पोलिसांना रविवारी घाटातून खाली कोसळलेली अभिजीतची गाडी आणि तिथूनच थोडया पुढच्या बाजूला एक डेड बॉडी मिळाली. याचा अर्थ त्या रात्री अभिजीतच्या गाडीचा अपघात झाला होता." मि. साने.
"हे काय सांगताय तुम्ही मि. साने"? रेवाला जबरदस्त धक्का बसला होता.
"खरं तेच सांगतोय मॅडम मी. मी हे तेव्हाच तुम्हाला कळवणार होतो. पण जवळपास ४ दिवस मध्ये गेल्यामुळे बॉडी पूर्ण सडली होती. त्यामूळे ती बॉडी अभिजीतचीच आहे हे सिद्ध करावं लागणार होतं. आमच्याकडे असलेल्या अभिजीतच्या मेडिकल रिपोर्टसनूसार ती डेड बॉडी अभिजीतचीच आहे हे सिद्ध झाले.
     नाईट वॉचमनच्या सांगण्यानुसार, "अभिजीत सरांच्या बायकोचं म्हणजे तुमचं वागणं अतिशय संशयास्पद आहे. रात्री साधारणपणे १ ते १.३०च्या सुमारास त्या दार उघडतात. थोडावेळ तिथेच थांबतात रडतात आणि मग हसत हसत दार लावून घेतात."
     तुमच्या बंगल्यावर पाळत ठेवून असणाऱ्या हवालदाराने दिलेल्या माहितीनूसार, "तूम्ही रोज अभिजीत घरी असल्याप्रमाणेच वागत असता. म्हणजे रोज सकाळी तो ऑफिसला जातो असं समजून त्याला निरोप देता. त्याच्यासाठी टिफिन बनवता. आजूबाजूच्या बंगल्यांमध्ये चौकशी केल्यावर त्यांनी सांगितले, मिसेस रेवा वेडसर असल्याप्रमाणे वागतात. त्या एकट्याच बडबडत असतात. त्यामूळे तुम्हाला ही बातमी देणं आम्हाला योग्य वाटल नाही. म्हणून मग आम्ही अभिजीतच्या बायोडेटामध्ये नमूद केलेल्या नंबरवर संपर्क केला. तेव्हा आम्हाला कळले की अभिजीतच्या  घरी सध्या त्याची आई व बहीण दोघीच असतात. मग आमच्या ऑफिसमधल्या दोन महिला कर्मचारी व दोन पुरूष कर्मचारी त्यांना इथे घेऊन येण्यासाठी त्याच्या घरी गेले. त्यांनी अभिजीतच्या घरी परिस्थितीची सगळी कल्पना देवून त्याच्या आईला व बहिणीला हा धक्का पचविण्यासाठी मदत करण्यापर्यंतची सगळी जबाबदारी अगदी उत्तम पार पाडली.
"हे सगळं खोटं आहे. काय सांगताय तुम्ही", रेवा रडत रडत म्हणाली.
       "सावरा स्वतःला मॅडम. हे सगळं खरं आहे. आणि शक्य तितक्या लवकर हे स्वीकारा. कारण मी पुढे जे बोलणार आहे ते तुमच्यासाठी अजून धक्कादायक असेल." मि. साने.
"आता अजून काय बाकी राहीलं आहे? रेवा.
"सांगतो, या साऱ्या प्रकारात सगळ्यात महत्वाची जबाबदारी पार पाडली ती आमच्या मेडिकल टिमने. तुमच्या एकूणच विचित्र वागणूकीबद्दल जी काही माहिती मिळाली त्यावरुन त्यांनी स्वतःहून तुमची भेट घेऊन खरी परिस्थिती जाणून घ्यायची ठरवली. त्यासाठी त्यांनी मानसोपचारतज्ञ डॉक्टर राव यांची मदत घेतली. तुमच्या घरी आलेल्या मेडिकल टिमला आभाने कित्येक दिवसात तिला तिचे बाबा न भेटल्याच सांगितले. हे सारं काय आणि कसं हे तुम्हांला डॉ. रावच समजावतील.” मि. साने बोलायचं थांबले.
रेवा सुन्न होवून सगळं ऐकत होती.  डॉं राव  रेवाला समजावत प्रेमाने  म्हणाले, "मला कळतंय रेवा आत्ता या वेळी तुमची मानसिकता काय असेल. पण आत्ता जर तुम्ही तुमच्या कल्पनाविश्वातच जगत राहिलात तर वास्तवात येणं तुम्हाला खूप कठीण जाईल. तुमच्याशी बोलल्यावर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे गेले काही दिवस तूम्ही रोज एक विचित्र आयुष्य जगताय. तुमची रोजची रात्र म्हणजे अभिजीत मिटींगसाठी बाहेरगावी गेला होता त्या दिवसाची म्हणजेच मंगळवारची रात्र आणि दुसऱ्या दिवशीची सकाळ म्हणजे एक काल्पनिक सकाळ. त्या सकाळी अभिजीत ऑफिसला जातो.
       त्या मंगळवारी आठच्या सुमारास लाईट गेले होते. MSEB कडून तात्पुरती व्यवस्था करुन सध्या दिवसभरात फक्त चार तासांसाठी प्रत्येक विभागात वीज पुरवठा केला जातोय. दुर्दैवाने तुमच्या विभागाला केला जाणारा वीज पुरवठा सकाळी ७ ते ९ आणि संध्याकाळी ६ ते ८ या वेळामध्ये केला जातोय. सहाजिकच रोज रात्री आठ वाजताच लाईट जातात. मुसळधार पावसामुळे तुम्ही अगोदरच थोड्या घाबरल्या होतात. त्यात अभिजीतची वाटणारी काळजी, एकाकीपणा यामुळे तुम्ही खूपच निराश झाला होतात. रात्री अचानक लाईट गेले आणि तुमची भीती अधिकच वाढली. त्यानंतर दार वाजविल्याच्या आलेल्या आवाजामूळे तुमच्या मनात प्रचंड भीती निर्माण झाली. त्या भीतीवर मात करण्यासाठी तुमच्या मनाने अभिजीत परत आल्याची कल्पना निर्माण केली आणि त्या कल्पनेलाच वास्तव मानून तुम्ही जगू लागलात. तुमच्या दुर्दैवाने गेल्या आठ दिवसातल्या प्रत्येक रात्री जवळपास सारख्याच गोष्टी घडत गेल्या त्या म्हणजे मुसळधार पडणारा पाऊस, रात्री आठच्या सुमारास जाणारे लाईट्स, मध्यरात्री ओसरणारा पाऊस,  त्यामुळे तुमच्या मानसिकतेला, तुमच्या काल्पनिक आयुष्याला खतपाणी मिळाले. त्या रात्री तुम्हाला जो दार ठोठावण्याचा आवाज आला त्याचंही स्पष्टीकरण मी देतो.  त्या रात्री नाईट वॉचमनला  तुमच्या बंगल्याबाहेर काही तरी ठोकल्यासारखा आवाज आला. तुमच्या बंगल्यात चोर शिरत असल्याचा संशय आल्यामूळे  तो तिथेच थांबला. थोडा वेळ निरीक्षण केल्यावर त्याच्या लक्षात आल, की दाराजवळच्या झाडाची फांदी वाऱ्यामुळे डाव्या बाजूला झुकल्यावर ती दारावर आपटते आणि त्याचा आवाज दार ठोठवल्यासारखा येतो.  त्यानंतर मात्र तो तिथून निघून गेला होता.  रेवा सावरा स्वतःला. मूळात अभिजीत त्या दिवशी रात्री घरी आलेलाच नाही. कारण त्याच रात्री त्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला. या गोष्टीचा स्वीकार करा".
      रेवा स्तब्ध बसली होती. ती काहीच बोलत नव्हती. रेवाच्या सासूबाईंनी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला पण डॉक्टर रावांनी त्यांना खूणेनेच नको असे सांगितले आणि रेवाला एकट सोडण्याची सूचना दिली. त्यांच्या सुचनेनूसार सगळीजण बेडरूमच्या बाहेर गेली. डॉक्टर राव आणि मि. सानेही बाहेर जाण्यासाठी निघाले जाता जाता डॉ रावांनी केलेल्या सुचनेनूसार मि. साने रेवाच्या सासुबाईंना म्हणाले, "सॉरी टू से पण हा बंगला अभिजीतला कंपनीने रहायला दिला होता. आता अभिजीतच या जगात नाही तर......तुम्हाला बंगला खाली करावा लागेल. Don’t  worry. Take your own time. फक्त काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ऑफिसला यावं लागेल. अभिजीतचा मृत्यू ऑन ड्युटी झाला असल्यामूळे कंपनी नैतिक जबाबदारी स्विकारून तुम्हाला कॉंपेंसेशन देणार आहे. त्यासाठी काही कागदपत्रांवर रेवा मॅडमची सही लागणार आहे. कदाचित त्यांना ऑफिसला यावं लागेल.  Take care". अस म्हणून मि. साने आणि डॉ. राव निघून गेले.
   रेवा तशीच शांत बसून होती. तिने ऐकलेल सारं तिच्यासाठी जेवढ दुःखद होतं तेवढच धक्कादायक. ती हतबल होऊन ड्रेसिंग टेबलवरच्या तिच्या आणि अभिजीतच्या फोटोकडे बघत होती. सहजच तिची नजर तिथे ठेवलेल्या टिशू पेपरवर गेली. तिचे डोळे चमकले. तिने चटकन उठून तो टिशू पेपर हातात घेतला. त्यावर लिहिले होते "हॉटेल विसावा".
समाप्त.
©मानसी जोशी


Wednesday, 7 December 2016

सुप्रभात

काल लेकीच्या शाळेला सुट्टी असल्यामुळे निवांतपणे खिडकीजवळ बसून चहा घेत बसले होते. सहज उगवत्या सुर्यनारायणाचे दर्शन झाले. डोंगराआडून हळूहळू वर येत जाणारा लाल गोळा बघून वाटल, निसर्गाच्या सौंदर्याचा एक अप्रतिम आविष्कार म्हणजे डोंगराआडून वर येणारा आणि समुद्राच्या पाण्यात हळूहळू बुडत जाणारा सूर्य अर्थात सूर्योदय आणि सुर्यास्त. नकळतपणे मनात विचार आला या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत होणारा हा प्रवास माणसाच्या जीवनाशी किती निगडीत असतो. डोंगराआडून हळूहळू वर येणारा सूर्य अगदी निरागस बाळाप्रमाणे भासतो. तो जसजसा वर येत जातो तस तसा त्याचा रंग पिवळा होत जातो आणि निरागसतेमध्ये अल्लडपणा मिसळल्यावर एखाद लहान मुल जस गोड वाटत ना तशीच हि सोनपिवळी सकाळ हवीहवीशी वाटते. हळूहळू लाल रंग जाऊन पिवळसर गोळा दिसायला लागतो.  छान गारवा, पक्षांचा किलबिलाट अगदी प्रसन्न आयुष्य.  जसजशी वेळ धावायला लागते तसतशी निरागसता लोप पावत जाते आणि अल्लडपणाही विरुन जातो. मग हळूहळू मध्यान्हीच्या उन्हासारखे जाणवायला लागतात अनुभवांचे, या निष्ठूर आयुष्याचे चटके. सोनपिवळ्या सकाळच्या शीतल हवेत बघितलेली स्वप्ने हरवून जातात. मग जाणवते ती वास्तवाची प्रखर दाहकता.  अनुभवांचे, नियतीचे टक्केटोणपे खाल्ल्यामूळे आलेल्या परिपक्वतेच प्रखर तेज उरलासुरला अल्लडपणा, निरागसपणा झाकोळून टाकते.  हळूहळू मावळतीची चाहूल लागायला सुरुवात होते. प्रखरतेमूळे हरवलेली निरागसता हळूहळू पुन्हा दिसू लागते. पूर्वीइतका नाही पण थोड्या प्रमाणात शिल्लक असलेला अल्लडपणा आपले अस्तित्व अधूनमधून जाणवून द्यायला लागतो. त्याला जपावस वाटत पण परिपक्व पिवळसर चेहरा त्याला तिथेच थांबवून ठेवतो. उत्तरायण सुरू होत. पुन्हा सूर्य लाल दिसायला लागतो.  उदयाला दिसणाऱ्या सगळ्या रंगछटा पुन्हा मावळतीला दिसू लागतात. या रंगांची पण ना एक गम्मत आहे. दोन्ही  सारख्याच रंगछटा पण दोन्हीमध्ये असतो तो अगदी बारिकसा पण महत्वाचा फरक.  उगवतीचे रंग एक नवा दिवस, नवे आयुष्य घेउन येतात, तर मावळतीच्या रंगात एका परिपक्व पोक्त आयुष्याच्या छटा दिसतात. हळूहळू सूर्य अस्ताला जातो आणि सगळे रंग विरुन अंधार पसरतो. माणसाचही तसच! एकदाचे 'डोळे मिटले' कि पूर्ण अंधार. जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा त्याच वेळी  दुसऱ्या देशात कुठेतरी सूर्योदय होत असतो.  माणसाच आयुष्यसुद्धा असच. एक जन्म संपला कि दुसरीकडे कुठेतरी नव्या जन्माची नव्या आयुष्याची सकाळ होते.  एक सुप्रभात!!
©मानसी जोशी

Tuesday, 6 December 2016

मनमानसी

गेल्या आठवड्यात तो गेला. मला खूप वाईट वाटले. तसा तो आजारीच होता. पण आपले आयुष्य व्यवस्थित जगत होता.  अगदी फार नाही तर गेल्या अडीच वर्षांचा सहवास आमचा. अडीच वर्षांपूर्वी माझ्या नवऱ्यामूळे त्याची आणि माझी भेट झाली. सुरुवातीला हाय हॅलो एवढच नात आमच. पण हळूहळू तो मला कळत गेला आणि त्याचा सहवास मला आवडायला लागला. अनेक गोष्टींमध्ये त्याने माझी मदत केली. माझ्या मुलीलाही तो खूप आवडायचा. त्याच्यामुळेच मी लिहायला लागले अस नाही म्हणणार मी हा पण माझ्या लिखाणासाठी त्याने मला खूपच मदत केली होती. त्याच्यामुळेच माझे अनेक कॉंटॅक्ट्स वाढले होते. दोन वर्षांपूर्वी आमच्या लग्नाचा दहावा वाढदिवस होता त्यावेळेस त्याने काढलेले आमचे सुंदर फोटोज आजही माझ्याजवळ आहेत. आजकाल त्याच माझ एकत्र असण माझ्या नवऱ्याला खटकायला लागल होत. माझ्या मूलीलाही तो फारसा आवडेनासा झाला होता. पण मला त्याचा सहवास फार आवडायचा. त्याच्याबद्दल फारच आपुलकी वाटत होती.  गेल्या मे महिन्यामध्ये त्याचा एक मोठा अपघात झाला होता त्यातून तो वाचला अगदी जीवावरच्या अपघातातून वाचला. पण तेव्हापासून मात्र तो खूपच अशक्त झाला होता.  त्याच हार्ट तस आधीपासून कमजोर होतच पण अपघातामूळे ते अजूनच नाजूक झाल होत.  गेल्या चार महिन्यापासून तो फारच आजारी होता.  त्याचं आयुष्य फारतर सहा महिन्याच्यावर नाही हे मला आधीच कळल होत.  अखेर गेल्या मंगळवारी तो गेला. त्याच जाण जीवाला चटका लावून गेल. मला खूप वाईट वाटले.  अखेर जाणारा जातोच त्याला काही इलाज नसतो. अहो मंडळी कसला  विचार करताय? तो दुसरा तिसरा कोणी नाही हो माझा मोबाईल होता. माझा पहिला स्मार्टफोन. लोक पण काय काय विचार करतात एकएक. तर मागच्या मगळवारपासून माझा मोबाईल बंद पडल्यामुळे मी फेसबूकवर फारशी फिरकू शकले नाही.  शुक्रवारी  नवीन स्मार्टफोन घेतला. पण जरा एका फॅमिली फंक्शन साठी बाहेरगावी गेले असल्याने थोडी बिझी होते. या दिवसांमध्ये अनेकांनी " काय ग आजकाल तू लिहित का नाहीस? तब्येत ठीकआहे ना? काळजी घे  असे मेसेज करून आपूलकीने चौकशी केली त्या सगळ्यांचे आभार आणि सगळ्यांना रिप्लाय करणे शक्य न झाल्याबद्दल सॉरी.
©मानसी जोशी




Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...