Sunday, 28 January 2018

सारेगम

१ मे १९९५..... या दिवशी झी टिव्हीवर एक आगळावेगळा शो चालू झाला होता #सारेगम नावाचा. एका संगीतपर्वाचा नितांतसुंदर प्रवास सुरु झाला तो "सारे सुरोंका हैं यही मिलन.. "  या साधना सरगम आणि सोनू निगमच्या आवाजातल्या टायटल सॉंगने. त्यानंतर "बजे सरगम... " या सोनू निगम आणि स्पर्धकांच्या सुरेल गाण्याने प्रेक्षकांना मत्रमुग्ध केलं.या गाण्यानंतर कार्यक्रम खऱ्या अर्थाने सुरु झाला. सोनू निगमच शांत संयत सूत्रसंचालन, 'कुमार सानू' सारखे परिक्षक आणि मुख्य म्हणजे अगदी सर्वसामान्य कपड्यातले, कुठलाही ड्रामा न करता मनापासून सुरेल गाणी गाणारे चार स्पर्धक; दोन स्त्री स्पर्धक आणि दोन पुरुष स्पर्धक (यामध्ये एक स्वप्निल बांदोडकर होता).

      स्पर्धेच स्वरुपही अगदी साधं; एकूण आठ प्राथमिक फेऱ्या; प्रत्येक फेरीमध्ये चार स्पर्धक आणि चार राउंडस. त्यानंतर चार सेमी फायनल आणि मग फायनल. प्राथमिक फेरीलाच 'कॉड राउंड' आणि 'जजेस चॉइस राउंड' यासारखे दोन कठीण राउंड्सही होते. ज्यामध्ये खरोखरच स्पर्धकांचा कस लागत होता. कुठेही आरडाओरडा नाही,  स्पर्धकांचा ड्रामा नाही,  परिक्षकांच अपमानास्पद बोलणं नाही, सूत्रसंचालकाचा किंवा परिक्षकांचा फ्लर्ट नाही;  होती ती फक्त सुंदर आणि श्रवणीय गाणी. स्पर्धेच्या शेवटी कुमार सानू सरांनी प्रत्येक स्पर्धकाचे मार्क्स कोणालाही न दुखावता सांगितले. यावर स्पर्धकांच्या रिॲक्शनही अगदी सयंत आणि शांत होत्या.

      पहिलाच भाग असल्यामुळे या भागात काही त्रूटीही होत्या.  सूत्रसंचालनाच्या दृष्टीकोनातून एपिसोड म्हणाव तसा खुलला नाही. अगदी एका सरळ रेषेत झालेला कार्यक्रम वाटला. पण गायकांची गाणी मात्र मनाला स्पर्श करुन गेली. कालांतराने हळूहळू हि कमीही भरुन निघाली. सोनू निगमच्या शांत संयत सूत्रसंचालनाला हलक्याफुलक्या विनोदांची, अनुभवाची जोड मिळत गेली आणि कार्यक्रम अधिक रंगतदार होत गेला. कुमार सानू,  अनू मलिक आणि उदित नारायण यासारखे परिक्षक या सारेगपच्या पहिल्याच सिझनला लाभले होते. १९९५ पासून २००० पर्यंत सोनू निगमने सारेगमच सूत्रसंचालन केलं. यामधून संजीवनी, बेला शेंडे, श्रेया घोषल यासारख्या अनेक चांगल्या गायिका पुढे आल्या. १९९८ मध्ये तर या कार्यक्रमाची #मेगा_फायनल झाली होती. यामध्ये १९९८ पर्यंतच्या सगळ्या विनर्सना सामाविष्ट करण्यात आलं.  'एकसे बढकर एक' असणाऱ्या स्पर्धकांमध्ये अगदी चुरशीची स्पर्धा रंगली. स्पर्धेसाठी संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती परिक्षक म्हणून लाभल्या. अत्यंत अभिमानास्पद गोष्ट म्हणजे या मेगा फायनलची विजेती होती ती महाराष्ट्रातील #संजीवनी ही गायिका.

     पुढे २००० सालानंतर 'अमान व अयान खान' या भावांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली.   

   त्यानंतर २००३ सालामध्ये या शो च नाव बदलून #सारेगमप असं करण्यात आलं.  पुढे २००६ सालापर्यंत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 'शान'  या गायकाने केले. वेळोवेळी कार्यक्रमाच्या  नियमांमध्ये, राउंड्समध्ये, परिक्षकांमध्ये वेगवेगळे बदल होत गेले. तरीही कार्यक्रम आपला दर्जा राखून होता. याच कार्यक्रमातून हृषीकेश रानडे, राहुल सक्सेना अर्पिता मुखर्जी यासारखे अनेक गायक/ गायिका पुढे आले. सन २००६ मध्ये तर "सारेगमप लिटल चॅंप्स" हा लहान मुलांसाठीचा सिझनही यशस्वी झाला.  पुढे २००७ मध्ये "आदित्य नारायण"  याने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.   त्यानंतर मात्र कार्यक्रमाचा दर्जा हळूहळू खालावत गेला.  तोपर्यंत अनेक वाहिन्यांवर साधारणतः याच धर्तीवर आधारीत अनेक कार्यक्रम सुरु झाले होते.

   हिंदीनंतर झी टिव्हीने अनेक प्रादेशिक वाहिन्यांवरही 'सारेगमप' हा रिॲलिटी शो सुरु केला. झी मराठी वर चालू झालेल्या #सारेगमप ला पल्लवी जोशीच सुंदर सूत्रसंचालन आणि अवधूत गुप्ते आणि देवकी पंडित सारखे परिक्षक लाभले. हा शो हिट झाला आणि २००९ मध्ये आलेल्या लिटल चॅम्प्सने तर  'सारेगमप' चा मेकओव्हर केला आणि कार्यक्रमाच्या यशाला 'चार चॉंद' लावले. आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड आणि रोहित राऊत या पाच फायनलिस्ट्सना तर लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. शो संपल्यानंतर या पाचही फायनलिस्ट्सच्या  गाण्यांचा #पंचरत्न नावाचा अल्बमही झी मराठीने बाजारात आणला. त्यालाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. लिटिल चॅम्प्सच्या हा सिझन इतका हिट झाला होता की त्यावेळी कार्यक्रमाच्या वेळेत मुंबईतल्या रस्त्यांवरही शुकशुकाट असायचा.  रामायणानंतर एवढा हिट झालेला (निदान महाराष्ट्रात तरी) हा एकमेव कार्यक्रम होता.

    आता मात्र सगळच चित्र बदललं आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्यांना गाण्याच ज्ञान असतच असं नाही. गाण्यांपेक्षा/गायकांपेक्षा जास्त चर्चा "बाकीच्या" मंडळींवरच होते.  गाण्यापेक्षा फॅशन, ड्रामा अधिक खुलतो. काही कार्यक्रमांमध्ये तर परिक्षकही असे होते की ज्यांचा गाण्याशी दुरान्वयेही संबंध नव्हता. असे कार्यक्रम कधी आले आणि कधी गेले हे कळलच नाही. असो. पण  हे शो बघितले की जुन्या "सारेगम" चे दिवस आठवतात. खरतर सारेगम चालू झाल तेव्हा मी खूप लहान होते. त्यामुळे सुरवातीच्या २/३ वर्षातले काही एपिसोड्स मी ही बघितले नव्हते. पण १९९८ ची मेगा फायनल मात्र चांगली आठवतेय. परवा कुतूहल म्हणून सहज "यु ट्यूबवर" झी टिव्हीच्या सारेगमच्या प्रोग्रॅमचा पहिला एपिसोड सर्च केला. व्हिडिओ क्वालिटी एवढी खास नाहीये. पण तरीही मी पूर्ण एपिसोड बघितला. खरतर हा ओरिजीनल एपिसोडही मी पूर्वी बघितला होता.

      अनेक वाहिन्यांवर सद्ध्या सुरु असलेले गाण्याचे #रिॲलिटी_शोज बघितले की वाटतं नक्की गाण्याचा कार्यक्रम आहे की फॅशन शो आहे की ड्रामा शो आहे?  प्रेक्षकांच्या माथी काहीही मारलं तरी खपतं, या भ्रमातून लवकरच या वाहिन्या बाहेर येतील आणि पुन्हा एकदा गाण्याचा एखादा दर्जेदार कार्यक्रम बघायला मिळेल अशी आशा करणसुद्धा आता व्यर्थ वाटायला लागलय.

झी सारेगम च्या पहिल्या भागाची लिंक
https://youtu.be/3r2EbsQildA

फोटो: गूगलवरुन साभार

©मानसी जोशी



Friday, 19 January 2018

तुझे आहे तुजपाशी

    आज मॉर्निंग वॉकला गेले तेव्हा दोन मुके मित्र एकमेकांशी बोलताना दिसते. बोलताना म्हणजे हातवारे करुन एकमेकांशी संवाद साधताना. खरंतर हे दोघेही मला बरेचदा एकमेकांशी छान संवाद साधत मॉर्निंग वॉक करताना दिसतात.  बोलता येत नसलं तरी छान संवाद साधता येतो हे अशा लोकांकडे बघून जाणवतं. गेले चार दिवस "तोंड आल्यामुळे" मला बोलता येत नाहीये. त्यामुळे माझी सहाजिकच चिडचिड होतेय. पण ज्यांना आयुष्यात कधी बोलताच आलं नाही किंवा येणार नाही, अशा लोकांच दु:ख किती मोठ असेल? पण या गोष्टीचा कुठलाही बाऊ न करता एकमेकांशी छान संवाद साधत मॉर्निंग वॉक करणारे ते मित्र बघून मला जाणवलं छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपण किती पॅनिक होतो. खरंच याची गरज असते का? माझ्या माहितीत अशी काही जोडपी आहेत ज्यांना बोलता येत नाही (दोघही मुकी आहेत). पण जेव्हा त्यांना कळलं की त्यांचा मुलगा बोलू शकतो तेव्हा मात्र त्यांना प्रचंड आनंद झाला. आपल्या बाळाच्या तोंडून जेव्हा आपण 'पहिला' शब्द ऐकतो तेव्हा आपणही किती खूष होतो; तर आयुष्यभर मुकेपण सोसणाऱ्या माणसांना किती आनंद होत असेल, याची आपण कल्पनाही करु शकत नाही.

      "ऑल द बेस्ट" नाटकातील एक प्रसंग मला चांगलाच आठवतोय. या नाटकात आधंळा,बहिरा आणि मुका असे तीन मित्र असतात आणि हे तिघेही एकाच मुलीवर प्रेम करत असतात. यातला मुका मुलगा जेव्हा आपलं प्रेम व्यक्त करायचं ठरवतो, तेव्हा त्याच्यासमोर सगळ्यात मोठी अडचड असते ती संवादाची. तो आपल्या परीने तिला सांगायचा प्रयत्न करत असतो. पण तिला नीटसं काहीच समजत नसतं. अखेर हताश होवून तो कागद पेन हातात घेतो. पण ती त्याला थांबवते आणि संवाद साधायचा प्रयत्न करायला सांगते. हा प्रसंग अगदीच 'हार्ट टचिंग' या कॅटॅगरीला;  डोळ्यात पाणी आणणारा!

      आमच्या कॉलेजमध्ये दीक्षित नावाचे एक इंग्रजीचे प्रोफेसर होते. ते जन्मत: आंधळे नव्हते पण चुकीचे ड्रॉप्स डोळ्यात घातले गेल्यामुळे लहानपणीच त्यांना अंधत्व आलं होतं. पण परिस्थितीशी दोन हात करुन त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरीही केली. सामान्यातले असामान्य म्हणतात ते असेच असावेत बहुदा.

    आपल्याजवळ असणाऱ्या अनेक गोष्टींची साधी कल्पनाही आपल्याला नसते.  काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या मैत्रीणीचं मिसकॅरेज झालं होत त्यामुळे ती खूप डिस्टर्ब होती. आधीच खूप वर्षांनी ती प्रेग्नंट राहिली होती. सगळं व्यवस्थित चाललेलं असताना अचानक पाचव्या महिन्यात तिचं मिसकॅरेज झाल्यामुळे ती खूप दु:खी होती. तिच्याशी फोनवर बोलत असताना माझी मुलगी मला सतत हाका मारुन, काही ना काही विचारुन डिस्टर्ब करत होती. मी तिच्यावर वैतागले तर पलीकडून मैत्रीण म्हणाली, "नको ग चिडूस तिच्यावर. तिच्या रुपाने खूप मोठं सुख मिळालंय तुला आयुष्यात. आणि कुठल्याही स्त्री साठी इतर कुठल्याही हाकेपेक्षा 'आई' म्हणून मारलेली हाक किती महत्वाची असते, हे माझ्यापेक्षा जास्त चांगलं कोणीच सांगू शकत नाही. तुला नाही कळणार हे दु:ख कारण तू दिवसातून सतत ती हाक ऐकत असतेस. तिचं बोलणं ऐकून माझे डोळे पाणावले. खरच खूप वाईट वाटलं होतं तेव्हा.

     आपण नेहमीच आपल्याजवळ जे नाही त्याचा विचार करुन कुढत रहातो. जरा मोकळेपणाने आपल्याला खूप काही मिळालं आहे असा विचार केला तर कदाचित आयुष्यात बराच फरक पडू शकेल. अनेक प्रॉब्लेम्स जे आपल्याला खूप मोठे वाटतात; ते अगदीच सर्वसामान्य वाटू लागतील.  problems are too easy we make them difficult.

©मानसी जोशी


Tuesday, 16 January 2018

कथा - रेशीमगाठ

रेशीमगाठ

आदित्य कोल्हटकर, एक सक्सेसफुल बिझनेसमन! अतिशय गरीब परिस्थितीतून आपल्या मेहनतीच्या जोरावर आयुष्यात यशस्वी झालेला. अगदीच नाही पण काहीसा अबोल. मनातल सारं मनातच ठेवणारा. लाथ मारेन तिथे पाणी काढेन इतका आत्मविश्वास असणारा आदित्य अनेकांना त्यांचा आयडॉल वाटत होता तर अनेकजण त्याच्यावर  जळत  होते. कितीही नाही  म्हटल तरी आदित्यला यशाची थोडी नशा चढलेली होतीच. कंपनीतही मी म्हणेन ती पूर्व असा ॲटीट्यूड ठेवून वावरणारा आदित्य अनेकांच्या हिट लिस्टवर होता. 'नाही' हा शब्द त्याच्या खिजगणतीतही नव्हता. आदित्यने घेतलेला निर्णय हा नेहमी अंतिम निर्णय असे त्याला विरोध करायची हिम्मत कोणामध्येच नव्हती. 
     आदित्य बिझनेसमन म्हणून कितीही स्ट्रिक्ट असला तरीही तो एक चांगला एंप्लॉयर होता यात वादच नव्हता. कंपनीमध्ये अगदी सामन्य वर्कर ते हाय प्रोफाइल एंप्लॉयीपर्यंत प्रत्येकजण अगदी आनंदाने नोकरी करत होता. कंपनीमधल वातावरण नेहमी हेल्दी  रहावं यासाठी आदित्य नेहमी प्रयत्नशील असे. कंपनीमध्ये कोणालाही आर्थिक  मदतीची गरज असेल तर आदित्य स्वतः जातीने लक्ष घालून त्याला मदत करीत असे.   आदित्यचा प्रत्येक निर्णय जसा कंपनीच्या हिताचा असे तसा तो वर्कर्स आणि एंपलॉयीज यांचाही विचार करुन घेतलेला असे. AK ग्रूपमध्ये काम करणं हे अनेकांच स्वप्न होत. पण तरीही चंद्रावरचा डाग म्हणजे आदित्यचा 'अहं - मी जे करतो तेच योग्य' असा ॲटीट्यूड.
मनाली पटवर्धन म्हणजे ब्युटी विथ ब्रेनच एक परिपूर्ण उदाहरण. तिच्या हुशारीवर कोणी तीळमात्रही शंका घेऊ शकत नव्हत. MBA फायनान्स झालेली मनाली प्रचंड हुशार तर होतीच त्याच जोडीने ती अत्यंत प्रामाणिक आणि संवेदनशील मुलगी होती.
 मनालीने AK ग्रूप जॉईन केल्यापासून कंपनीमध्ये असे अनेकजण होते ज्यांना  तिचा हेवा वाटत असे. क्वालिफिकेशन आणि अनुभव यापेक्षा मेहनत आणि हुशारीला प्राधान्य देणाऱ्या आदित्यने अत्यल्प अनुभव असणाऱ्या मनालीला कंपनीमध्ये खूप वरची पोझिशन दिली होती. त्यामुळे सहाजिकच अनेकांना तिचा हेवा वाटत असे.
    त्या दिवशी  मिटिंगमध्ये एका प्रोजेक्टसंदर्भात आदित्यने घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांवर चर्चा चालू होती. आदित्यने घेतलेले काही निर्णय अनेकांना पटत नव्हते. पण  आदित्यच्या निर्णयाला विरोध करायचा म्हणजे स्वतःचा अपमान करुन घेणे. त्यात पुन्हा नोकरी जाण्याचा धोका ही होताच. अगदी नोकरी गेली नाही तरी आदित्यच्या 'हिट लिस्टमध्ये' ॲड व्हायची रिस्क कोणालाच घ्यायची नव्हती.
      आदित्य अगदी आत्मविश्वासाने प्रेसेंटेशन करत होता. प्रेसेंटेशन संपल्यावर जवळपास मिटिंग संपल्यातच जमा होती. पण मिटिंग संपण्यापूर्वी मनाली उठून आदित्यला म्हणाली , " आय ॲम सॉरी सर बट आय थिंक यू शुड थिंक अबाऊट युअर डिसिजन".
"व्हॉट यू वॉन्ट टू से मिस मनाली?" आदित्य.
   मनाली आणि आदित्यच बोलण ऐकून मिटिंगमध्ये असलेल्या अनेकांनी भुवया उंचावल्या. इतकी वर्ष या कंपनीमध्ये काढूनही आदित्यशी या भाषेत बोलायची हिम्मत आपण कधीही केली नाही आणि ही काही महिन्यांपूर्वी जॉईन झालेली आणि फारसा अनुभव नसलेली मुलगी अशा भाषेत आदित्यशी बोलतेय याच सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. आता बहुदा मनाली आदित्यच्या 'हिट लिस्टवर' जाणार किंवा कंपनीतून बाहेर जाणार; अस तिथे असलेल्या प्रत्येकालाच वाटत होतं.
    "तुम्ही तुमच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असं मला वाटतय. तुम्ही जे निर्णय घेतले आहेत त्यामुळे कदाचित  कंपनीला तोटा होवू शकत; अस माझा अभ्यास सांगतोय. खरतर माझ्यापेक्षा खूप अनुभवी मेंबर्स इथे उपस्थित आहेत तरीही त्यांच्यापैकी  कोणीच काही बोलत नाहीये याच मला प्रचंड  आश्चर्य वाटतय." मनाली आत्मविश्वासाने म्हणाली.
    मनालीच्या या बोलण्यानंतर मिटिंगमध्ये चुळबुळ सुरु झाली. आता आदित्यचा स्टॅंड काय असेल यावरच सगळ्यांच लक्ष केंद्रित झाल होत.
"ओके, तुम्हाला  माझ प्रेसेंटेशन बेसलेस किंवा इलॉजिकल किंवा चुकीच्या गृहितकांवर आधारीत असणार असं वाटतय का ?
"सॉरी सर मला तस नव्हतं म्हणायच पण काही मुद्दे चुकीचे वाटत आहेत", मनाली.
"ठिक आहे. नो प्रॉब्लेम,  कॅन यू प्रूव्ह  इट?" आदित्य.
"येस आय कॅन." मनाली.
"देन गो अहेड ॲंड प्रूव्ह द सेम." आदित्य
    मनाली पटकन पुढे आली आणि तिने आदित्यच प्रेसेंटेशन ओपन करुन त्यातल्या त्रूटी सांगायला सुरवात केली. मिटिंगमध्ये 'पिनड्रॉप सायलेन्स' होता. आदित्य लक्षपूर्वक मनालीच बोलणं ऐकत होता. गेल्या काही वर्षात त्याला प्रथमच कोणाकडून तरी विरोध झाला होता. खरतर आदित्यला मनालीला चुकीच ठरवायची खूप इच्छा होती आणि म्हणूनच तो तिचा प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐकत होता.
     मनालीच प्रेसेंटेशन संपल्यानंतर  मात्र काही जणांनी आदित्यला 'मनालीच म्हणणं बरोबर आहे' हे सुचवायचा प्रयत्न केला. तर काहींनी आदित्यची बाजू घेतली. बऱ्याच वेळ चाललेल्या डिस्कशनमध्ये आदित्य मात्र शांतपणे बसून विचार करत होता. कुठेतरी त्याला मनालीचे काही मुद्दे पटत होते.अखेर आदित्यने दुसऱ्या दिवशी पुन्हा मिटींग घ्यायचा डिसीजन घेतला.
      मिटींग संपल्यानंतर ऑफिसमध्ये फक्त मिटिंगचीच चर्चा रंगली होती. काहींना मनाली 'ग्रेट' वाटत होती तर काहींच्या दृष्टीने ती 'आगाऊ' मुलगी होती.
     त्या दिवशी आदित्य मात्र रात्री उशीरापर्यंत केबिनमध्ये बसून विचार करत होता. त्याने  प्रेसेंटेशेनचा पुन्हा नव्याने अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आल की खरच मनालीने त्याच्या कंपनीला खूप मोठ नुकसान होण्यापासून वाचवलं आहे. मनालीच्या हुशारीवर, तिच्या कामाप्रती असणाऱ्या निष्ठेवर आदित्य खुश झाला. प्रेसेंटेशनमध्ये आवश्यक ते बदल करुनच आदित्य घरी गेला. दुसऱ्या दिवशी मिटिंगमध्ये आदित्यने मनालीच कौतुक केल आणि नव्याने तयार केलेलं प्रेसेंटेशन सगळ्यांसमोर ठेवलं. मनालीमुळे आता बाकीच्यांनाही धीर आला होता. प्रत्येकजण 'डिसिजन मेकिंग' मध्ये भाग घेत होता. कंपनीमध्ये झालेला हा पॉझिटिव्ह चेंज बघून मनाली मनोमन सुखावली आणि हा बदल असाच कायम रहावा म्हणून नकळत तिने देवाकडे प्रार्थना केली.
       यानंतर आदित्य आणि मनालीमध्ये  एक निखळ मैत्रीचे नाते निर्माण होऊ लागल. मनाली काही महिन्यांपूर्वीच ऑफिसमध्ये रुजू झाली होती. त्यामुळे नवीन एंप्लॉयशी आदित्यची वाढत चाललेली सलगी अनेकांच्या डोळ्यात खुपत होती. आदित्यशी काही बोलायची कोणाची हिम्मत नव्हती. सहाजिकच  काही जणांनी आदित्य विरोधात मनालीचे कान भरायला सुरुवात केली. आदित्यचा ॲटीट्यूड, त्याचा इगो, एवढच नव्हे तर त्याची बायको त्याला चार वर्षापूर्वीच सोडून गेली आहे; हे सुद्धा मनालीच्या कानावर आलं होतं. पण मनाली शांत होती. मुळातच हुशार आणि संस्कारी असणाऱ्या मनालीला एक गोष्ट नक्की माहिती होती; ती म्हणजे कुठलाही माणूस मुळात वाईट नसतो परिस्थिती त्याला तस बनवत असते. तिने आदित्यविषयी जाणून घेऊन त्याला बदलायच ठरवलं. अशा या संस्कारी मनाली च्या सान्निध्यात आदित्यही हळूहळू निवळत होता.
 त्यादिवशी संध्याकाळी  क्लाएंटच्या ऑफिसमधून कंटाळवाणी मिटींग आटपून आदित्य आणि मनाली बाहेर पडले. बाहेर पडताच मोकळ्या वातावरणात आल्यावर दोघांना खूप बरं वाटल. मस्त पावसाळी हवा होती. आदित्यने तिथल्या जवळच्या कॉफी शॉपसमोर गाडी थांबवली. दोघांना खरच गरज होती एका शांत कॉफीची.
      मनाली कॉफीशॉपच्या काचेतून बाहेरच्या रोडवरची गर्दी बघत शांतपणे बसली होती. आदित्यने सहज तिच्याकडे बघितल. तिचा शांत, सुंदर, आत्मविश्वासी चेहरा बघून त्याचा थकवा कुठल्याकुठे पळाला. मनाली ऑफिसला जॉईन झाल्या दिवसापासून तिच्याबद्दल त्याला एक प्रकारच सुप्त आकर्षण आणि एक वेगळीच आत्मीयता जाणवत होती. तिच्या हुशारीच कौतुक तर होतच पण त्याही पलीकडे जाऊन एक व्यक्ती म्हणून मनाली त्याला मनापासून आवडत होती.  वेटरने कॉफीचे दोन वाफाळते मग टेबलवर आणून ठेवले. काही क्षणांची शांतता त्या मग ठेवण्याच्या आवाजाने भंग  पावली. आदित्य आणि मनाली अजूनही शांतच होते. अखेर आदित्य कॉफी घेता घेता मनालीला म्हणाला, "मनाली तू खरच खूप टॅलेंटेड आहेस. तू म्हणजे 'ब्यूटी विथ ब्रेन'च एक परिपूर्ण उदाहरण आहेस."
 "प्रपोज  करायचा विचार आहे का?" मनाली ने हसतच विचारलं.
 "हो विचार तर होता पण तुझ्या बोटातली एंगेजमेंट रिंग मला माझा विचार प्रत्यक्षात आणू देत नाहीये", आदित्य हसत म्हणाला.
"ओह! स्मार्ट हा! असणारच म्हणा; आफ्टरऑल यू आर आदित्य कोल्हटकर." मनाली हसत म्हणाली.
"बरं मला कळू दे तरी कोण आहे तो भाग्यवान?" आदित्यने विचारलं.
 "अभिषेक बापट, स्ट्रगलिंग ॲक्टर आहे.  कॉफी संपवतच मनाली म्हणाली.
"बापरे म्हणजे काही दिवसातच सेलिब्रेटी होणार तू!"
     आदित्यच्या या वाक्यावर दोघही मनमोकळेपणे हसले. आदित्यला आठवलं कितीतरी दिवसांनी तो एवढा मनमोकळा हसत होता. राधिकाला भेटायचा तेव्हाही अशाच मनमोकळ्या गप्पा व्हायच्या. राधिकाची आठवण आली आणि जखमेवरची खपली निघाली. तिच्या आठवणींनी त्याच मन भरून आल.
    त्यानंतर आदित्य मनालीला तिच्या घरी सोडून गडबडीतच घरी गेला. दुसऱ्या दिवशी त्याला खूप महत्वाची मिटींग अटेंड करायची होती. अर्थात मनालीही त्याच्याबरोबर जाणार होती. दुसऱ्या दिवशीही मिटींग आटपायला खूप उशीर झाला. पण मिटींग समाधानकारक झाल्याने दोघही खूप खूश होते. आदित्यची गाडी मनाली च्या बिल्डिंगबाहेर थांबली. तिने त्याला कॉफीसाठी घरी येण्याचा आग्रह केला. तो ही दिवसभराच्या दगदगीने थकला होता. त्यालाही एका कॉफीची गरज होतीच. दोघही घरी जाऊन कॉफी घेत निवांतपणे गप्पा मारत बसले होते. तितक्यात अभिषेक तिथे आला. मनालीने त्याची आणि आदित्यची ओळख करून दिली.
"मनाली जरा आत ये",  अस म्हणून अभिषेक आतल्या खोलीत गेला.
"एक्स्युज मी" अस आदित्यला म्हणून मनालीही त्याच्या मागोमाग गेली.   
     आदित्यला अभिषेकच वागणं खटकलं. पण तो काहीच बोलला नाही. थोड्याच वेळात आतल्या खोलीतून जोरजोरात भांडणाचे आवाज ऐकू येऊ लागले.
"किती दिवसांपासून चालू आहे हे...बॉस बरोबर अफेअर केल की झालं ...अग नसेन मी त्याच्याइतका यशस्वी पण होईन एक दिवस.. " अभिषेकचा ओरडत होता. अधून मधून मनाली चा गयावया केल्याचा आवाजही येत होता. अखेर हिम्मत करून आदित्य आतमध्ये गेला तेव्हा त्याने बघितले अभिषेकने मनालीवर हात उगारला होता. आदित्य ताबडतोब तिथून निघून घरी आला. घरी आल्यावर मनाली च्या घरचा प्रसंग त्याला आठवत होता. त्याने पेग वर पेग रिचवायाला सुरुवात केली.
   दुसऱ्या दिवशी मनाली सकाळीच आदित्यच्या घरी गेली. घर कसलं एक आलिशान बंगला होता तो; पण घरपण नसलेला. मनाली आत गेली तेव्हा आदित्य काहीसा नशेतच होता. मनालीने हिम्मत करुन आदल्या दिवशीच्या प्रसंगाबद्दल  त्याची माफी मागीतली.
 तिला थांबवत आदित्य म्हणाला, "तू कशाला माफी  मागतेयस? माफी तर मी मागीतली पाहिजे."
"तुम्ही का माफी मागताय माझी? तुमच काहीच चुकलेल नाहीये", मनाली.
 "तुझी नव्हे राधिकाची माफी मागायची आहे मला. तिला सॉरी म्हणायच आहे, राधिकाला; माझ्या पत्नीला!  चार वर्षांपूर्वी मी तिच्याशी असाच वागलो होतो, जसं काल अभिषेक तुझ्याशी वागत होता. शब्द वेगळे असतील पण ॲटीट्यूड मात्र तोच होता आणि म्हणूनच ती मला सोडून गेली," आदित्य नशेत असला तरी मनापासून बोलत होता.
  "मी समजले नाही", मनाली गोंधळून म्हणाली.
   "मनाली मी एकेकाळी एवढा सक्सेसफुल नव्हतो. मी एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आहे. आई बाबा मी  आठवीत असतानाच गेले. मग काकांनी माझी जबाबदारी घेतली. आमच घर सोडून मी काकांकडे रहायला गेलो. तिथे सतत त्यांच्या मुलाशी विकासची माझी तुलना केली जायची. काकू प्रत्येकवेळी सगळ्यांसमोर तो माझ्यापेक्षा किती सरस आहे हेच दाखवायचा प्रयत्न करायची. अखेर बारावी झाल्यावर मी ते घर सोडून माझ्या जुन्या घरी रहायला गेलो. पार्ट टाईम जॉब करुन कॉलेजच शिक्षण पूर्ण केल. त्यानंतर दुसरा जॉब न शोधता होता तोच जॉब सुरु ठेवूनच स्वतःचा छोटासा बिझनेस सुरु केला. त्या ऑफिसच्या सरांनी खूप मदत केली. त्याच ऑफिसच्या समोर राधिका रहायची. आम्ही एकमेकांच्या प्रेमात कधी पडलो ते कळलंच नाही.  बिझनेस  धिम्या गतीने चालू होता. राधिकाही इंजिनिअर झाली आणि नोकरी करू लागली. तिला तिच्या ऑफिस मधल्या तिच्या एका सिनिअरचे स्थळ आल. ते स्थळ विकासच म्हणजेच माझ्या काकांच्या मुलाचेच होते. पण राधिकाने स्पष्ट नकार दिला आणि तिच्या घरीही तिने, 'ती माझ्याशीच लग्न करणार' असं  स्पष्ट सांगितल. आयुष्यात पहिल्यांदाच माझा इगो  सुखावला होता. घरच्यांचा विरोध पत्करून तिने माझ्याशी लग्न केले. आमचा संसार सुरु झाला. राधिकाची नोकरी चालूच होती. माझा बिझनेसमध्ये चांगलाच जम बसू लागला होता. मी जोमाने वाढणाऱ्या  बिझनेसमध्ये बिझी  होत होतो आणि अशातच एक दिवस एक वेगळाच आनंद घेऊन आला. राधिका प्रेग्नंट होती. आमच्या आनंदाला पारावर उरला नाही.  राधिकाने नोकरी सोडली आणि काही महिन्यातच आमच्या घरी एक छोटीशी परी जन्माला आली. असेच चार महिने मजेत गेले. एक दोनदा मी विकासला आमच्या घराजवळून जाताना बघितले पण मी सोडून दिले. पण त्या दिवशी मिटींग कॅन्सल  झाल्यामुळे मी लवकर घरी आलो तर राधिका आणि विकास कॉफी घेत गप्पा मारत होते. मग मात्र माझा ताबा सुटला. मी तिला वाट्टेल ते बोललो. तिची बाजूला ऐकून न घेता तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. स्वाभिमानी राधिकाला हे सहन झाले नाही. ती आमच्या लहानग्या मुलीला घेऊन घर सोडून निघून गेली." आदित्य भावनाविवश होऊन बोलत होता.
 “मग तुम्ही तिला परत घरी घेऊन यायचा प्रयत्न नाही केलात?" मनालीने विचारले.
आदित्यने नकारार्थी मान हलवली.
 "का तुमचा इगो,  विकासबद्दलचा तिरस्कार; तिच्या प्रेमापेक्षा अधिक महत्वाचा होता का?" मनाली.
  आदित्य निरुत्तर होता. "आज जर राधिका तुमच्या समोर आली तर तुम्ही काय कराल मिस्टर आदित्य?" मनाली
"तिची माफी मागून तिला घरी घेऊन येईन. खूप होरपळलोय या एकटेपणाच्या आगीत. तिच्या आठवणीत क्षणाक्षणाला तडफडतोय मी, आता तिची खूप गरज आहे मला." आदित्य.
"तुला गरज असताना राधिका तुझ्याजवळ नाही अस होईल का कधी?"
बोलता बोलता आलेल्या राधिकाच्या आवाजाने आदित्यने  दचकून मागे वळून पाहिले तर तिथे खरच राधिका आणि एका छोट्या मुलीला घेऊन अभिषेक उभा होता.
राधिकाला पाहून त्याला खूप आनंद झाला. दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. काय बोलावे दोघांनाही काहीच सुचत नव्हते.
    "राधिका... तू .... इथे?  आदित्य आनंदमिश्रित आश्चर्याने म्हणाला.
   "हो मी  परत आलेय आदि. जेवढा तू होरपळास तेवढीच मी सुद्धा होरपळलेय आणि या सगळ्यांची झळ नकळतपणे का होईना पण आपल्या परीलाही बसली आहे. अरे विकास फक्त मला परत ऑफिस जॉईन कर अस समजावत होता. त्याच्या किंवा माझ्या मनात दुसरं काहीच नव्हतं. तो माझा कलिग, माझा सिनिअर होता. बस यापलीकडे कधी आमच्यात साध मैत्रीचही नात निर्माण झालं नव्हतं." राधिका.
    "चुकलं माझ राधा. खरच चुकलं स्वतःच्या फाजील अहंकारामुळे मी तुला समजून घ्यायला कमी पडलो.  आज मनालीमुळे माझे डोळे उघडले. पण तू आत्ता इथे कशी आलीस ?" आदित्य.
 "कारण मला चांगला अभिनय करता आला. आणि हे आता सिद्ध झालं आहे आणि मला बेस्ट ॲक्टिंगच ॲवॉर्डही मिळाल", अभिषेक हसत म्हणाला.
     आदित्यने गोंधळून त्याच्याकडे बघितलं. त्याच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे बघत अभिषेक म्हणाला, “कालच सगळ नाटक होत मि. आदित्य; मनालीच्या सांगण्यावरून केलेलं."
मनाली मिष्कील हसत म्हणाली, "राधिका माझ्या बिल्डिंगमध्येच रहाते. माझी आणि तिची ओळख झाली तेव्हा  सुरुवातीला मलाही काहीच माहिती नव्हते. पण मी AK ग्रूप मध्ये जॉब करते म्हटल्यावर तिच वागणं बदललं. ती मला टाळू लागली. मला संशय आला. पण मॅडम काही सांगतील तर ना. शेवटी मी सगळं शोधून काढलंच आणि तुम्हाला एकत्र आणायच ठरवलं. आज तुम्हा दोघांना एकत्र आलेलं बघून मला मनापासून आनंद होतोय. तुमची जुळलेली रेशीमगाठ अशीच आयुष्यभर अशीच राहूदे."
"थॅंक्स मनाली! तू माझ्या कंपनी बरोबर माझ आयुष्यही सावरलस. मी यासाठी तुझा आयुष्यभर ऋणी राहीन. आज अजून एक रेशीमगाठ जुळलेय आमच्या दोघांची तुम्हा दोघांशी. मी वचन देतो मी तुला मनाली, या दोन्ही रेशीमगाठी मी आयुष्यभर जपेन", आदित्य म्हणाला. 
 दुसऱ्या दिवशी AK ग्रूप मध्ये सगळ्यांना ई मेल  गेले. Due to some personal reason our chairman Mr. Aditya Kolhatkar Will unable to  attend the office for one month. Miss Manali Patwardhan will handle the office in his absence. official copy of Power of attorney is attached herewith......
©मानसी जोशी

Sunday, 14 January 2018

ब्लॅक

ब्लॅक! नुसतं ब्लॅक हा शब्द म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर कुठलीना कुठली गोष्ट ही येतेच. 
  काहींच्या डोळ्यासमोर 'ब्लॅक मॅजिक' येत, तर काहींच्या डस्की स्किन. काही विज्ञानप्रेमींना  'ब्लॅक होल' आठवेल तर तत्वज्ञानींच्या नजरेसमोर  मात्र 'वर्णभेद' येइल. काहींना 'ब्लॅक मनी' तर काहींना   मात्र काळाकूट्ट 'अंधार' आठवेल. सद्ध्या संक्रांतीमुळे मात्र  अनेक स्त्रियांच्या डोळ्यासमोर ब्लॅक म्हटल्यावर काळी साडी किंवा ड्रेस  येत असेल.
     ब्लॅक! काळा रंग! हा रंग तिमिराकडून तेजाकडे जाताना क्षणाक्षणाला आपल्या छटा बदलून आपल्या नकळत नष्ट होतो तर संध्याकाळपासून रात्रीपर्यंत अगदी अलगद पाऊल न वाजवता सर्वदूर परसतो. कुठल्याही रंगात काळा रंग मिसळला तर त्या रंगाच अस्तित्वच नष्ट होतं.  रंगाचा बेरंग होतो अस म्हणतात ते हेच असाव बहुदा.
     काळ्या रंगाला नेहमीच दुय्यम स्थान देण्यात येत. काळं म्हणजे वाईट असा एक (गैर?)समज समाजामध्ये आहे. एखाद्या गोष्टीत काही संशयास्पद असेल तर काही 'काळबेरं' तर नाही ना? अस म्हटल जात. लग्नासाठी बरेचदा 'गोऱ्या' मुलीचीच अपेक्षा असते. 'ब्लॅक मॅजिक' किंवा 'काळी जादू’ हा शब्दप्रयोग म्हणजे  काळ्या रंगाला अगदीच खलनायकी रंग दिल्यासारख आहे.
       हा रंग कसाही असला तरी मला आवडतो. प्रत्येक रंगात मिसळून आपलं अस्तित्व जपणारा असा हा रंग आहे. म्हणूनच की काय गोऱ्या रंगाच्या सौदर्यवतीपुढे अनेकदा  'डस्की ब्युटी' भाव खाऊन जाते. घनघोर अंधारात जाणवणाऱ्या नीरव शांततेत अनेकदा आयुष्याचा नवीन अर्थ कळतो. 
     बाकी काळ्या रंगाला कोणी कितीही नावं ठेवली तरी काही गोष्टींचा रंग मात्र काळाच असावा म्हणून अनेकांचा अट्टाहास असतो. उदाहरणार्थ केस ......
     मला मात्र काळ्या रंगांच्या कपड्यांच   पहिल्यापासूनच प्रचंड आकर्षण आहे. 'ब्लॅक  ॲन्ड रेड' हे माझ फेव्हरेट कॉम्बिनेशन आहे.  अशुभ मानल्या जाणाऱ्या काळ्या रंगाला संक्रातीमध्ये मात्र मानाचे स्थान मिळते. यामागे वैज्ञानिक किंवा धार्मिक कारण काहीही असल तरी याच सणाला  मुक्तपणे काळ्या रंगाचे कपडे घालता येतात.
©मानसी जोशी

Tuesday, 2 January 2018

हैदराबाद मेमरीज....

 यावेळी विकेन्ड, मन्थ एंड आणि इअर एंड सगळं एकत्रच आलं होतं. हा विकेन्ड माझ्यासाठी जरा खासच होता. गेले तीन वर्ष रेंगाळलेली; या ना त्या कारणाने सतत कॅन्सल होणारी हैदराबाद ट्रिप यावेळी मात्र मस्त जमून आली. शुक्रवारी रात्री पुण्याहून निघून शनिवारी सकाळी हैदराबादला पोचलो आणि वेगवेगळे  अनुभव यायला सुरुवात झाली. हॉटेलमध्ये चेक इन टायमिंग बारा वाजता असल्यामुळे काही तास वेटिंग रुममध्ये बसून रहावं लागणार हे अपेक्षितच होतं. पण तिथे बसल्यावर  रेस्टॉरंटमधल्या नॉनव्हेजच्या वासामूळे मला प्रचंड मळमळायला लागलं. थोड्या वेळाने वेटिंग रुमच्या समोरच्या 'ट्रॅव्हल डेस्क' वर sightseeing ची  चौकशी करुन त्यांचीच कॅब फिक्स केली आणि जादूची काडी फिरल्यासारखी 10 मिनिटात आम्हाला रुम मिळाली ती ही वेळेच्या चक्क तासभर आधी. हे आधीच करायला हवं होत अस उगाचच वाटून गेलं.
     रुममध्ये गेल्यावर लक्षात आलं; बुकिंग पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या  कुठल्याच ॲमिनिटीज आमच्या रुममध्ये नव्हत्या. हॉटेल बुकिंग मी केलेलं होतं.  त्यामुळे मी रिसेप्शनवर जाऊन मॅनेजरशी बोलायचं ठरवल. मी त्यांच्याशी बोलायला जाणार म्हटल्यावर आमच्या 'अहोंना' थोडी काळजी वाटली; अहं माझी नव्हे .. हॉटेल मॅनेजरची! ऑनलाईन बुकिंग करतेवेळी घेतलेले  सगळे स्क्रिनशॉट्स माझ्याजवळ होते. तिथे गेल्यावर मॅनेजमेन्टशी झालेल्या  वादसदृष चर्चेअंती 'ट्रॅव्हल वेबसाईटला' मेल करुन मॅनेजरने जवळपास सगळ्याच ॲमिनिटीज द्यायचं कबूल केलं. हा सगळा प्रकार बघून  हॉटेलच्या मॅनेजमेंट टिममधल्या एकाने मला प्रश्न विचारला, "मॅम आप पुनासे हो क्या?" त्यांच्या या प्रश्नावर त्या वैतागलेल्या अवस्थेतही मला हसू आलं. मान हलवून हो म्हणून मी तिथून रुममध्ये परत आले.
     पहिल्या दिवशी सालरजंग म्युझिअम, चारमिनार, NTR गार्डन, बिर्ला मंदीर करुन संध्याकाळी 'स्नो वर्ल्ड' आणि शॉपिंग केलं. स्नो वर्ल्ड Entry fee च्या मानाने एवढं काही छान आहे असं नाही वाटलं मला. एका तासाच सेशन असतं पण  जास्तीत जास्त 45 मिनिटे आपण तिथे थांबू शकतो. माझी तर अवस्था खूपच बिकट झाली होती. थंडी इतकी वाजत होती की आता आपल्याला ताप येतोय की काय असं एक क्षण वाटून गेलं. बाहेर आल्यावर गरमागरम कॉफी घेतल्यावर जरा बरं वाटलं. त्यानंतर रात्री हुसेनसागर लेक आणि लुंबिनी पार्क बघितल. हुसेनसागर लेक वरुन फेरीबोटीने लुंबिनी पार्कला जातात. तिथे गौतम बुद्धांचा मोठा पुतळा वगळता बघण्यासारखं विशेष असं काही नाही. लेकमधील पाण्यालाही  अतिशय घाण वास येतो.
      दुसऱ्या दिवशी 'रामोजी फिल्मसिटी' बघितली. रामोजी फिल्मसिटी मात्र  बघण्यासारखी आहे. हैदराबाद टूरचा  एक पूर्ण दिवस इथे देणं आवश्यक आहे. एकदा 'इंट्री फी' दिली की काही ठराविक राईड्स आणि खाण्यावरचा खर्च वगळता  आतमध्ये गेल्यावर कसलेही चार्जेस द्यावे लागत नाहीत.  जवळपास दोन हजार एकरच्या परिसरात पसरलेल्या आवारात फिरण्यासाठी त्यांच्या बसेस सतत चालू असतात. या बसेसचे पिकअप / ड्रॉपअप पॉइंट्स ठरलेले असतात. पूर्ण परिसर फिरताना जवळपास 5 ते 6 बसेस आपल्याला बदलाव्या लागतात.  आमची सुरुवात मात्र बसच्या अपघाताने झाली. सुदैवाने कोणाला काही लागल नाही. अवघ्या पाचव्या मिनिटात  दुसरी बस आली. सगळा दिवस फिरुन आपण दमतो तरीही रामोजीचा एखाद दुसरा पॉइन्ट बघायचा राहून जातोच.
     तिसऱ्या दिवशी गोलकोंडा फोर्ट आणि जनरल हैदराबाद फिरलो. गोवळकोंडा फोर्ट मात्र अस्वच्छ आहे. सगळीकडे प्लॅस्टिक बाटल्या आणि रॅपर्सचा कचरा, पडके बुरुज, भिंतींवर लिहिलेली नावं, शेवाळीत बुडलेला अस्वच्छ तलाव या साऱ्यामूळे हा फोर्ट अगदीच भकास वाटतो.
       हैदराबादच्या sightseeing मध्ये जवळपास प्रत्येक ठिकाणी काहीना काही entry fee आहेच. प्रत्येक ठिकाणी  लेडीज आणि जेन्ड्स ला आत जायला वेगळी रांग आहे. सिक्युरिटी चेकिंग अगदी काटेकोरपणे केलं जातं. रस्त्यावरही पोलिसांचा सतत फिरता पहारा असतो.  हैदराबादच्या प्रवासात आलेला अनुभव म्हणजे इथल्या लोकांचा पाहुणचार. कुठल्याही हॉटेलमध्ये अगदी आग्रहाने आणि उत्साहाने पदार्थांबद्दल सांगतात. तोंडावर सतत बारा वाजलेल्या अवस्थेत मख्खपणे फिरणारे वेटर्स इथल्या कुठल्याही हॉटेलमध्ये दिसले नाहीत. बाकी एक गोष्ट आवर्जून सांगाविशी वाटतेय ती म्हणजे पुण्याच्या ट्रॅफिकला नावं ठेवणाऱ्यानी फक्त एकदा हैदराबादच बेशिस्त ट्रॅफिक नजरेखालून जरुर घालावं.

©मानसी जोशी

बर्ड्स पार्क @ रामोजी फिल्म सिटी

बाहुबली सेट @ रामोजी फिल्मसिटी
बिर्ला टेंपल 



Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...