Thursday, 12 July 2018

नॅटवेस्ट सिरिज आणि मी

13 जुलै  2002 .. या दिवशी भारताच्या क्रिकेटच्या इतिहासातल एक सुवर्ण पान लिहिलं गेल. क्रिकेटची पंढरी लॉर्ड्सवर भारतीय क्रिकेट टिमने इंग्लंडला हरवून नॅटवेस्ट सिरिज जिंकली. अजूनही आठवतोय तो दिवस. लॉर्ड्सवर  फायनल ती ही इंग्लंडविरोधात; इंग्लंडच्या टिममध्ये प्रचंड आत्मविश्वास होता. लॉर्ड्स म्हणजे त्यांच होम पीच त्यात नाणेफेक जिंकून नसिर हुसेनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
     सुरुवातीपासूनच सावध खेळणाऱ्या इंग्लंडच्या टिमची पहिली विकेट गेली ती सातव्या ओव्हरनंतर. अवघे 14 रन्स काढून नाईट(Knight) बाद झाला. पण त्यानंतर मात्र कॅप्टन नसिर हुसेन आणि ट्रेस्कोथिक या दोघांच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने ३२५ धावांच तगडं आव्हान भारतासमोर ठेवल.
      आमच्याकडे बाबांनी नेहमीप्रमाणे  टिम इंडियाला नावं ठेवायला सुरुवात केली. "भारत हरणार आता मॅच बघण्यात वेळ फुकट घालवू नका.... वगैरे वाक्यांचा भडिमार सुरु झाला. ब्रेकनंतर आपली इनिंग  सुरु झाली. सुरुवातीपासूनच थोड चाचपडत पण सावधपणे खेळणाऱ्या सेहवाग – गांगुलीच्या चेहऱ्यावर प्रचंड टेंशन दिसत होत. पंधराव्या ओव्हरमध्ये अवघ्या 60 धावा काढून गांगुली बाद झाला. त्यानंतर लगेचच पुढच्या ओव्हरला सेहवाग बाद झाला. खूप अपेक्षा ठेवून मॅच बघणाऱ्या आम्हाला बाबा मुद्दाम चिडवू लागले. "हरणार आहोत आपण चॅनेल बदला" इथपासून ते अगदी पार फिक्सिंगपर्यंत वेगवेगळ्या गोष्टी कानावर येत होत्या. मी शांत होते. पण लगेचच 19 व्या ओव्हरला दिनेश मोंगियाची विकेट गेली आणि भारताला पुढचा धक्का बसला. बाबांनी पुन्हा टिमला नावं ठेवायला सुरुवात केली. विकेट गेलेल्या परवडल्या पण हि बडबड नको अशी आमची अवस्था झाली.  अचानक मला काय झाल काय माहिती मी पटकन बोलून गेले, "काहीही झालं तरी आजची मॅच आपणच जिंकणार”
माझ्या या वाक्यावर बाबा हसायला लागले.  मला अजूनच राग आला आणि मी म्हटल, "हो जिंकणार आपण लावताय पैज ?"
बाबा हसून म्हणाले, "चल लावली पैज भारत जिंकला तर दिले तुला शंभर रुपये. (आमच्याकडे बाबांबरोबरची पैज नेहमी एकतर्फीच असते.)
 भारत जिंकला तर शंभर रुपयांचा फायदा होणार होताच शिवाय "इज्जत का सवाल था".
   मोंगिया पाठोपाठ भारताचा 'द वॉल' द्रविड आणि सर्वेसर्वा सचिन तेंडूलकर बाद झाला. आता भारत मॅच हरणार यावर शिक्कामोर्तब झाल्यातच जमा होता.
    मॅच संथ गतीने चालू होती. घनदाट अंधारात आशेचा किरण बनून आले ते  युवराज आणि कैफ. या दोघांनी मात्र संयमित खेळी करत विजयश्री अक्षरशः खेचून आणली. हे दोघे पीचवर असताना मैदानात अक्षरशः सन्नाटा होता. घरातल वातावरणाही निवळल होत. मधूनच बाबा हॉलमध्ये येउन मुद्दाम, "हे काय? इतकाच स्कोअर? कठीण आहे... अस म्हणून माझी चेष्टा करत होते. पण मी शांत बसले होते.
    बेचाळीसाव्या ओव्हरमध्ये युवराजची विकेट गेली आणि पुन्हा इंग्लंडच पारडं जड झाल. पण त्यानंतर मात्र कैफने बॉलर्सच्या जोडीने अवघड वाटणारा 326 धावांचा पल्ला मोठ्या आत्मविश्वासाने गाठला. शेवटच्या क्षणापर्यंत जीवात जीव नव्हता.  स्कोअर बोर्डवर 326 चा आकडा झळकला आणि पॅव्हेलियनमध्ये एकच जल्लोष झाला. भारताचा कर्णधार सौरभ गांगुलीने आपला शर्ट काढून हवेत फिरवला. बास ! दिल फिदा हो गया उसका ये ॲटीट्यूड देखकर.
       या सिरिजपूर्वी ॲंड्र्यू फ्लिंटॉपने वानखेडे स्टेडियमवर मॅच जिंकल्यावर अशाच प्रकारे  शर्ट काढून हवेत फिरवला होता. त्याला प्रत्युत्तर देण्याची संधी त्यांच्याच देशात मिळाली आणि गांगुलीने या संधीच सोनं केल. इसे कहते हैं हिम्मत.... त्यावेळचा त्याचा ॲटीट्यूड, त्याचा कॉन्फिडन्स, त्याची एक्स्प्रेशन्स .... दिल जीत लीया  बंदेने....
        आजही आठवतोय तो क्षण. शेवटच्या क्षणापर्यंत मी श्वास रोखून बसले होते. India won by 2 Wickets …. हे वाक्य ऐकल आणि सुटकेचा निश्वास टाकला. या मॅचबरोबर आपण नॅटवेस्ट सिरिजही जिंकली (आणि मी शंभर रुपये). मोहम्मद कैफ मॅन ऑफ द मॅच ठरला. खरतर हा सांघिक विजय होता. पण तरीही या विजयाचा खरा हिरो ठरला तो सौरव गांगुली. #रिव्हेंज हा पॉझिटिव्ह असू शकतो हे तेव्हा पहिल्यांदा जाणवल.
©मानसी जोशी






Tuesday, 3 July 2018

दुनियादारी

दुनियादारी
लेखक: सुहास शिरवळकर

आपल्याला आवडलेल्या पुस्तकाबद्दल लिहयचं ठरवलं तेव्हा सगळ्यात आधी माझ्यासमोर दोन नावं आली. एक म्हणजे मृत्युंजय आणि दुसरं म्हणजे दुनियादारी. मृत्यूंजय वाचनाताही डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं, तिथे त्या पुस्तकावर लिहिणं म्हणजे माझ्यासाठी कर्मकठीण. दुनियादारी मात्र सहज, सोपी, मनात घर करुन राहिलेली कादंबरी आहे. फर्स्ट इअरला असताना वाचलेली ही कादंबरी मनाला एवढी भावली होती की काही दिवसांनी पुन्हा लायब्ररीतून ती कादंबरी आणून वाचली होती. प्रत्येकाला आपल्या ‘गोल्डन डेज’ म्हणजेच कॉलेज जीवनात घेऊन जाणारी ही कादंबरी जेवढं हसवते तेवढंच मनाला हळवं करुन स्पर्श करते. स्वप्नापासून सत्यापर्यंत नेणारी ही कादंबरी कुठेही आपला ट्रॅक सोडत नाही आणि आपण स्वप्नातून वास्तवात कधी येतो ते आपलं आपल्यालाही समजत नाही. या कादंबरीबद्दल लिहिणं म्हणजे माझ्यासाठी लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखं आहे. तरीही मी प्रयत्न करते.

दुनियादारी! ही कहाणी आहे श्रेयसची. श्रेयस तळवलकर या प्रमुख पात्राभोवती फिरणाऱ्या या कादंबरीत पुढे अनेक व्यक्तिरेखा येतात. ही कादंबरी वाचणारा जवळपास प्रत्येकाजण यातल्या कुठल्या ना कुठल्या व्यक्तिरेखेशी स्वतःला रिलेट करत रहातो.

    पुण्याच्या SP कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेला मुंबईचा साधा, सरळ, निरागस, हुशार मुलगा श्रेयस सुरुवातीला सिनिअर्सकडून होणारं रॅगिंग सहन करतो. पण पुढे जाऊन श्रेयस या रॅंगिंग ग्रूपचाच एक भाग होतो.  या ग्रूपचा लिडर दिग्या उर्फ डीएसपी आणि श्रेयस एकमेकांचे खास मित्र बनतात. मित्रासाठी जीव टाकणारा दिग्या कादंबरी वाचून झाल्यावरही डोक्यातून जात नाही. या कादंबरीमध्ये अजून एक महत्वाची व्यक्तीरेखा आहे ती म्हणजे साईनाथ. दिग्या आणि साईनाथ हे एकेकाळचे खास मित्र अचानक एकमेकांचे जानी दुश्मन बनतात. या दोघांची दुश्मनी  संपूर्ण कॉलेजला माहिती असते पण त्याच कारण मात्र  कोणालाच माहितीनसतं.
       दिग्या आणि गॅंगबरोबर झालेली श्रेयसची दोस्ती त्याच्या आयुष्याला, व्यक्तिमत्वाला एक वेगळं वळण देते. श्रीमंत घरातला श्रेयस, आई-वडिलांच्या बिघडलेल्या संबंधामुळे घरापासून दूर रहायचं ठरवून मुंबईहून पुण्याला येतो. निरागस एकाकी श्रेयसला दिग्याच्या रुपाने एक जवळचा मित्र मिळतो. दिग्या आणि साईनाथ या दोघांना धरुन ठेवणारा पण प्रत्यक्षात कोणाचाच नसणारा अश्क्या, दिग्याची प्रेयसी सुरेखा, साईनाथची बहीण अशी अनेक पात्रे या कादंबरीत येतात.

      श्रेयसच्या आयुष्यात प्रेमाची हळूवार जाणीव घेऊन आलेल्या मीनू आणि शिरीन वाचताना मात्र हरवून जायला होतं. वयाने मोठी असणारी आकर्षक शिरीन आणि अल्लड मीनू यापैकी आपल प्रेम नक्की कोणावर आहे याचं उत्तर शोधणाऱ्या श्रेयसच्या विवाहाच वळण हे धक्कादायक नसल तरी काहीसं अनपेक्षित आहे.

     श्रेयसच्या आयुष्यात आलेली अजून एक महत्वाची व्यक्तीरेखा म्हणजे MK; प्रचंड हुशार माणूस पण एक  असफल प्रेमी. प्रेयसीच्या आठवणीत सतत दारुमध्ये बुडालेल्या  MK ची व्यक्तीरेखा कथेमध्ये अधूनमधून डोकावत रहाते. MK चा मृत्यू झाल्यावरही ही व्यक्तिरेखा काही डोक्यातून जात नाही. याच कारण म्हणजे काहीस अपेक्षित असणारं पण मनाला स्पर्शून जाणारं आणि कथेच्या शेवटी समजणारं MK बद्दलच एक सत्य!

     असं म्हणतात की कथेचा/कादंबरीचा  शेवट नेहमी मनाला स्पर्श करणारा हवा तर कथा/कादंबरी  संस्मरणीय होते. पण दुनियादारीबद्दल बोलायचं तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही कादंबरी संस्मरणीय आहे. ही कादंबरी वाचताना यातील प्रत्येक व्यक्तीरेखा आपल्या मनात घर करते. प्रत्येक व्यक्तिरेखा जीवंत व्यक्तिरेखा वाटावी इतक्या सुंदर पद्धतीने ती उभी केलेली आहे. यातल्या प्रत्येक व्यक्तीरेेखेबद्दल लिहायल गेल तर ही पोस्ट "क्रमशः" लिहावी लागेल.
   
     दुनियादारी चित्रपट हा फक्त या कादंबरीवर बेतलेला आहे. मूळ कथानकामध्ये आणि काही व्यक्तिरेखांमध्ये केलेल्या बदलांमुळे प्रत्यक्षात हा चित्रपट कादंबरीच्या आसपासही फिरकू शकला नाही. दुनियादारी वाचयचं असेल तर चित्रपट डोक्यातून बाजूला ठेवूनच वाचायला हवं. सुदैवाने मी हे पुस्तक चित्रपट यायच्या खूप आधी वाचलेलं असल्यामुळे मला अस्सल दर्जेदार पुस्तकाचा आस्वाद घेता आला.
     काही कलाकृती या इतक्या दर्जेदार असतात की त्या ‘न भूतो न भविष्यती’ या प्रकारातल्या असतात. दुनियादारी ही त्यातलीच एक कलाकृती आहे.

©मानसी जोशी

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...