"नमस्कार! आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे." माझ्यासारख्या कित्येकांची सकाळ या वाक्याने किंवा "अरुण उगवला, प्रभात झाली….." अशा एखाद्या भूपाळीने झाली असेल.
जगभरातील घडामोडी असोत किंवा क्रिकेट कॉमेंट्री, सुरेल गाणी, नाट्यवाचन, कथाकथन, रेसिपीज असे मनोरंजनाचे अनेक पर्याय त्या काळात आकाशवाणीने उपलब्ध करून दिले होते. भारतातील जवळपास सर्व भागात आकाशवाणीचे केंद्र सुरू झालं होतं.
आजही मी आकाशवाणीवरचा एखादा कार्यक्रम ऐकला की, मला माझं बालपण आठवतं. घरात जवळपास साडेसहा पासून रेडिओ लावलेला असायचा. बहुदा उठून आवरून झालं की रेडिओ लावायचा हा अधोरेखित नियमच होता त्याकाळी. कोकणातले थंडीचे दिवस, चुलीवरच्या हांड्यावर आंघोळीचं पाणी तापत असायचं. स्वयंपाकघरात आई पोळ्या भाजत असायची. पाखरांची किलबिल ऐकू यायची अशा वातावरणात, लवकर उठायची इच्छा व्हायची पण, "मनात हाय निस्त, पण बॉडी नाय म्हणते", अशी अवस्था असायची.
अशातच, "नमस्कार! आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. "सकाळचे ७ वाजून ५ मिनिटं झाली आहेत…" असा मंजुळ आवाज कानावर पडायचा आणि लागोपाठ, "उठा आता सात वाचून गेले", असा खर्जातला आवाजही कानावर आदळायचा.
कार्यक्रमांची रूपरेखा, बातम्या, सूर मनी रंगती, नभोवाणी, असे कित्येक कार्यक्रम त्यावेळी लोकप्रिय होते. घरात टीव्ही होता, पण सकाळच टीव्ही लावून बसण्याची पद्धत मात्र नव्हती. अपवाद फक्त 'रंगोली' या कार्यक्रमाचा. दुसरी गोष्ट म्हणजे तेव्हा अँटेना सेट करणं हा एक मोठा कार्यक्रम अधूनमधून केला जात असे.
आकाशवाणीवरच्या बातम्या मात्र लोकांच्या विशेष जिव्हाळ्याच्या होत्या. ब्रेकिंग न्यूज म्हणून बेंबीच्या देठापासून केलेला आरडाओरडा नाही की कर्णकर्कश्य म्युझिक नाही. अतिशय शांतपणे बातम्या सांगितल्या जात. मुळात कुठल्यातरी गल्लीच्या कोपऱ्यावर घडलेल्या थातुरमातुर वादाला, ब्रेकिंग न्यूज म्हणून प्रेझेंट करण्याइतका वेळच नसायचा. त्यामुळे केवळ महत्वाच्या बातम्या दिल्या जायच्या.
मला आठवतंय १९९६ साली भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेची मॅच रंगात आली होती आणि अचानक टीव्ही दिसायचा बंद झाला, बहुदा नेहमीप्रमाणे अँटेना हलला होता. रात्रीची वेळ असल्याने अँटेना ऍडजस्ट करणं शक्य नव्हतं त्यामुळे सगळ्यांचा मूड ऑफ झाला होता. पण अशावेळी कामी आला तो रेडीओ! रेडिओवर मॅच ऐकायला मजा आली होती.
महानगरांपासून ग्रामीण भागापर्यंत सर्वदूर पसरलेली आकाशवाणी आजच्या इंटरनेटच्या जगात काहीशी दुर्लक्षित झाली असली, तरी ज्यांनी रेडिओचा काळ अनुभवला आहे त्यांच्या आयुष्यात आकाशावाणीशी निगडित काही ना काही आठवणी नक्की असणार.
लॉ कॉलेजला असताना जवळपास पाऊण महिना आकाशवाणीच्या रत्नागिरी कार्यालयात ट्रेनिंगला जात होते. त्यामुळे आकाशवाणीचे रत्नागिरी केंद्र अगदी जवळून अनुभवले आहे. त्यावेळी, "नमस्कार! आकाशवाणीचे हे रत्नागिरी केंद्र आहे", हे वाक्य म्हणताना 'लै भारी' वाटलं होतं.
हे सगळं आज आठवण्याचं कारण म्हणजे आज आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचा वर्धापनदिन असतो. १८ जानेवारी १९७६ रोजी म्हणजे तब्बल ४६ वर्षांपूर्वी आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र सुरू झालं होतं. पुढेही अगदी केबलच्या आगमनपर्यंत घराघरात रेडिओ मोठ्या प्रमाणावर ऐकला जात असे. आता रेडीओ ऐकणं ही खूप दुर्मिळ गोष्ट झाली असली तरी तेव्हा तो आयुष्याचा एक आमूलाग्र भाग होता.
- मानसी जोशी