Monday, 28 August 2017

हॉन्टेड स्टोरी

हॉन्टेड स्टोरी
(ही घटना सत्यघटनेवर आधारीत आहे)
दोन दिवसापूर्वीची गोष्ट आहे ही. रात्रीची वेळ  होती. बाहेर भरपूर पाऊस पडत होता. गणपतीच्या सणामुळे सोसायटीमधली बरीचशी माणसं  गावाला गेलेली असल्याने सोसायटीमध्ये तसा सन्नाटा होता. आमच्या मजल्यावरचे सगळेजण गावी गेल्यामुळे पूर्ण मजल्यावर आम्ही सोडून कोणीच नव्हतं.
  रात्रीचे ११ वाजून गेले होते. बाहेरचा ढोल ताशांचा आवाज बंद झाला होता. त्यातच लाईट सारखे येत-जात होते. बाहेर पावसाची रिमझिम चालू होती.  कुत्रे बेसूर आवाजात रडत होते. आमच्या घरात सगळे शांत झोपले होते. का कुणास ठावूक पण मला झोपच लागत नव्हती. खर तर दिवसभर भरपूर दगदग झाली होती. तरीही निद्रादेवी प्रसन्न व्हायला तयार नव्हती. 
   अशातच दारावरची बेल वाजली. मी दचकले. इतक्या रात्री कोण आलं असेल? मला काही सुचेना मी 'अहोना हाक मारुन उठवलं. तो अर्धवट झोपेत म्हणाला,  "नाही वाजली ग बेल, तू झोप.
"नाही काय? बेल वाजली, मी ऐकली", मी.
तरीही समोरून काहीच रिस्पॉन्स नाही म्हटल्यावर मी उठून हॉलमध्ये गेले आणि  लाईट लावला. दरवाजाजवळ जाऊन की होलमधून बघितलं तर बाहेरचं नीट दिसत नव्हतं. पण बाहेर कोणीतरी उभं आहे हे मात्र कळत होतं.
तेवढ्यात अहो बाहेर आले आणि म्हणाले, "अगं दार उघड".
"नको बाहेर कोण आहे ते समजत नाहीये. परत अख्ख्या मजल्यावर फक्त आपणच आहोत", मी.
 "असूदे दार उघडून बघूया, बाहेर सेफ्टी डोअर आहे ना?" असं म्हणत अहोंनी दार उघडलं.
     दार उघडून बघितल तर बाहेर वॉचमन उभा होता. सेफ्टी डोअरच्या गॅपमधून एक पेढ्यांची पुडी आत सरकवत म्हणाला, "वो xxxxx साहबने नयी गाडी लेली, उन्होने ये सबको देनेको बोला था|"
      यावर मी वैतागून त्याला म्हणाले, ये कोई वक्त हैं पेढे देने का ? रात के ११ बजे ?"
यावर वॉचमन काही पाल्हाळ लावणार इतक्यात अहो त्याला म्हणाले, "हा ठिक हैं आप जावो."
  तो निघून गेला आणि  हॉन्टेड स्टोरी कॉमेडी स्टोरीमध्ये बदलली.

©मानसी जोशी


Tuesday, 22 August 2017

संपूर्ण स्त्री

"संपूर्ण स्त्री फार कमी लोकांना मिळते.... !!!"
अमृता प्रीतम यांच्या या वाक्यावर आधारीत  अनेक पोस्ट्स वाचनात आल्या आणि माझ्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे, 'संपूर्ण' म्हणजे नक्की कशी?" गेले काही दिवस याच प्रश्नाचा विचार करत होते मी. 'संपूर्ण' म्हणजे परिपूर्ण! पण या जगात १००% परफेक्ट असं कोणीच नसतं. 'संपूर्ण स्त्री'  ही  केवळ शारीरिक सुखापूरतीच मर्यादित नाही तर मानसिक तसच बौद्धिक सुखाशीही निगडीत आहे. खरच अशी परिपूर्ण स्त्री अस्तित्वात असेल? माझ्या मते या प्रश्नाचं उत्तर व्यक्तिसापेक्ष तर  आहेच पण त्या ही पुढे जाऊन मी म्हणेन ते कालसापेक्षही आहे. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्या आवडीनिवडी, विचार सारं काही बदलत असतं. लहान वयात आदर्श वाटणारी स्त्री म्हणजे आई, मावशी,  मामी, काकू किंवा अगदी आपल्या टिचर, अशी कोणीतरी जवळची स्त्री ज्या स्त्रीविषयी आपल्याला प्रचंड आदर वाटतो, विश्वास वाटतो. अर्थात त्या वयात बाकी इतर कुठल्याही भावना नसतात.  पुढे थोडं मोठं झाल्यावर एखाद्या चित्रपटातील  किंवा टिव्ही  मालिकेतली नायिका अथवा एखाद्या कथेमधली एखादी नायिका /व्यक्तीरेखा मनाला आवडून जाते आणि मग तिच आदर्श वाटायला लागते. उमलतं तरुण वय असतं. या वयातच  'अपॉझिट सेक्स ॲटरॅक्शन' हळूहळू निर्माण होत असतं. मग नकळतपणे डोक्यात फिट बसलेल्या व्यक्तिरेखेचा शोध घेतला जातो.त्यावेळेस एखादी मुलगी आवडून जाते. आणि काही काळासाठी तरी का होईना ती परिपूर्ण वाटू लागते. पुढे शिक्षण, अनुभव यामुळे विचार प्रगल्भ होत जातात आणि 'परिपूर्ण अथवा संपूर्ण स्त्री'ची व्याख्या बदलत जाते. पुढे जाऊन वाढतं वय, अनुभव, पैसा, स्टेटस या गोष्टीही 'संपूर्ण स्त्री' ची व्याख्या बदलायला कारणीभूत ठरतात. कारण ही संपूर्णतेची अपेक्षा  निव्वळ शारीरिक नसते तर ती मानसिक आणि बौद्धिकही असते. या तिन्ही पातळ्यांवर परिपूर्ण ठरणारी स्त्री अस्तित्वात असणं हेच मुळात कठीण आणि जरी एखादी अशी समोर असलीच तरी तिला आपलसं करणं तर महाकठीण. थोडक्यात काय तर आयुष्यभरासाठी संपूर्ण  स्त्री लाभणे हे जवळपास अशक्यच! कारण एखाद्या वयात परिपूर्ण वाटणारी स्त्री काही वर्षांनंतर अपूर्णही वाटू शकते.
      जो नियम 'स्त्री'च्या बाबतीत तोच पुरुषांच्या बाबतीत. परिपूर्ण पुरुष मिळणंही तसं कठीणच.कारण परिपूर्णतेची व्याख्याच मुळात व्यक्तीपरत्वे आणि कालपरत्वे बदलत जाते. उदाहरणच द्यायचं झालं तर, माझी एक मैत्रीण आहे. कॉलेजला असताना तिचा एक बॉयफ्रेंड होता. तो मुलगा म्हणजे अगदी 'आयडिअल' या कॅटेगरीतला. सिन्सिअर, हुशार, हॅन्डसम, निर्व्यसनी, वगैरे. दोघांच्याही घरी माहित होतं. पुढे तो ME करण्यासाठी दुसरीकडे गेला. त्याचं ME पूर्ण होवून त्याला चांगली नोकरीही मिळाली. पण हिला लवकर लग्न करायचं नव्हतं. पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी ती पुण्याला गेली. तिथे तिला त्यांच्याच ग्रूपमधला एक मुलगा आवडला. तो याच्या बरोबर विरुद्ध. आधीच दोन गर्लफ्रेंडशी ब्रेकअप झालेला. ड्रिंक पार्टीज,पब, फ्लर्टिंग हे सारं काही करणारा. थोडासा आधुनिक विचारांचा बिनधास्त मुलगा.दोघांचे विचार जुळले, मनं जुळली आणि दोघं जवळ आली. तिचं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यावर तिलाही नोकरी मिळाली. तिने या दुसऱ्या मुलाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय तिच्या घरच्यांसकट सगळ्यांनाच धक्कादायक होता. घरच्यांनी तिला  समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती मात्र तिच्या निर्णयावर ठाम होती. अखेर नाईलाजाने घरच्यांनी होकार दिला आणि तिचे लग्न झाले. या घटनेला जवळपास ७/८  वर्ष होवून गेली. मध्यंतरी ती मला भेटली होती. फारशी खूष दिसली नाही. विचारलं तर म्हणाली, 'कधीकधी वाटतं ग मी चूक केली. बाकी सगळं व्यवस्थित चाललं आहे आमच्या दोघांमध्ये पण कधीकधी काही गोष्टी खटकतात. त्याचं  बिनधास्त नोकऱ्या बदलणं, समाजाचे नियम धाब्यावर बसवणं; हे सारं खटकतं.  माहिती नाही काही पण काहीतरी अपूर्ण वाटतं संसारात. मग मन नकळत दोघांची तुलना करतं आणि भानावर आल्यावर अपराध्यासारखं वाटायला लागतं. त्यावेळी मी लग्नाचा निर्णय घेतला कारण,  त्याच्या सहवासात मनाचं मोहरुन जाणं, त्याचा स्पर्श हवाहवासा वाटणं, त्या स्पर्शामुळे अंगात सळसळणारी लहर, या साऱ्या भावना मी अनुभवल्या ज्या मी पूर्वी कधीच अनुभवल्या नव्हत्या. इतकच नव्हे तर त्याचे आणि माझे विचार जुळत होते. कोशात राहून विचार करणाऱ्यातला तो नव्हता. या साऱ्यामुळे  माझं मन त्याच्याकडे ओढ घेत गेलं. आम्ही एकमेकांमध्ये गुंतत गेलो. असं असताना मनाविरुद्ध लग्न नव्हतं करायचं मला....." खूप वेळ बोलून ती शांत झाली आणि मग तिने मला  विचारलं, "तुलाही असच वाटतं का ग की मी तेव्हा चुकीचा निर्णय घेतला?".तिची अवस्था बघून मला खरं तर वाईट वाटलं. तिला समजावण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा जे आहे ते स्विकारायला हवं, हे पटवून देणं मला जास्त महत्वाच वाटलं. म्हणूनच कुठलाही दोषारोप न करता मी तिला सांगितल, "त्यावेळी तुझा निर्णय चुकीचा होता असं मलाही वाटलं होतं. पण आता नाही तसं वाटत. कारण त्यावेळी तुला तुझ्यासाठी जो सुयोग्य किंवा परिपूर्ण वाटला, तू त्याची निवड केलीस. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपली परिपूर्णतेची व्याख्या बदलत जातात. निर्णय हा चूक किंवा बरोबर हे येणारा काळ ठरवतो. आपल्या आयुष्याचा निर्णय आपण मनापासून घेणं हे आवश्यक असतं.  त्यावेळी तू जो निर्णय घेतलास तो तुझ्या दृष्टीने योग्य होता. तेव्हा जर  मनाविरुद्ध निर्णय घेउन लग्न केलं असतस तर तू कधीच सुखी झाली नसतीस आणि स्वतःलाच दोष देत बसली असतीस. ही नकळत होणारी तुलना कदाचित त्या परिस्थितीतही झालीच असती. तेव्हा चूक बरोबर या चक्रात न अडकता घेतलेला निर्णय योग्यच आहे  असा विचार कर. त्याच्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी बघ. परिपूर्ण कोणीच नसतं. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मर्यादा पुरुषोत्तम राम हाच आदर्श वाटेल असं नाही. कधीकधी खट्याळ कृष्णही तेवढाच आदर्श वाटू शकतो".
   तिच्या मनातला सगळा गोंधळ दूर झाला .मला थॅंक्स म्हणून ती समाधानाने घरी गेली. तिच्या प्रश्नाला उत्तर देताना, मला माझ्या मनातल्या 'संपूर्ण किंवा परिपूर्ण' म्हणजे नक्की कसं? या प्रश्नाचं उत्तरही मिळालं.
©मानसी जोशी
   

   

Friday, 18 August 2017

कथा - एक साधीशी लव्हस्टोरी

एक साधीशी लव्हस्टोरी

त्याने तिला पहिल्यांदा बघितलं तेव्हा ती कुठल्यातरी मैत्रीणी बरोबर चक्क भांडत होती.  चिडलेली ती त्याला आवडून गेली. त्याला आवडलेली ती पहिली मुलगी. अगदी त्याच्या मनात होती तशीच होती ती. गोरी, भावूक डोळे, स्टेप कट मारलेले कुरळे केस... .अगदी माधुरीसारखीच..... त्याला माधुरी दीक्षित खूप  आवडायची. कुठेतरी त्याला 'तिच्या' आणि माधुरीच्या चेहऱ्यामध्ये साम्य जाणवलं.  त्याच्या मनात असणाऱ्या 'त्या' खास प्रतिमेमध्ये  ती परफेक्ट बसली.
      तो तेव्हा FYBSC ला होता. केमिस्ट्रीच्या लॅबमध्ये  प्रॅक्टिकल करताना सहज त्याची नजर खिडकीबाहेर गेली.  लॅबच्या खिडकीसमोरच्या पॅसेजमध्ये ती त्याला दिसली. तिच्या एकंदरीत हावाभावांवरुन  ती भांडतेय हे त्याच्या लक्षात आलं होतं. केमिस्ट्री लॅबसमोरच तिची  क्लासरुम  म्हणजे  ती बारावीला होती हे कन्फर्म होतं. त्यानंतर केमिस्ट्रीचं प्रॅक्टिकल त्याने कधीही चुकवलं नाही.तेव्हापासून त्याला केमिस्ट्री हा विषय प्रचंड आवडायला लागला होता. तिचं नाव गाव माहिती करायला त्याला फार वेळ लागला नाही. तिला बघता बघता वर्ष कधी सरलं हे पण त्याला कळलं नाही.
    सेकंड इअरचं कॉलेज चालू झालं तेव्हा तो उत्साहाने कॉलेजला गेला पण ती काही दिसली नाही. 'पहिला दिवस म्हणून नसेल आली', असा विचार करुन तो गप्प बसला. पण कॉलेज सुरु होवून महिना झाला तरी तिचा पत्ता नाही म्हटल्यावर तो जरा नाराज झाला. अशातच एक दिवस 'ती' त्याला दिसली.  ती आता त्याची 'ती' राहिली नव्हती. ती पूर्णतः बदलून गेली होती. स्लिव्हलेस टि-शर्ट, थ्री फोर्थ जीन्स आणि मुख्य म्हणजे स्ट्रेट करुन घेतलेले केस;  हा तिचा अवतार बघून तर त्याचा मूडच गेला. नंतर त्याला कळलं, तिची फॅमिली मुंबईला शिफ्ट झाली होती आणि तिने मुंबईच्याच कुठल्यातरी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली होती आणि जाण्यापूर्वी मैत्रीणीना भेटायला म्हणून ती कॉलेजला आली होती. तिच्यानंतर त्याला फारशी कोणी आवडलीच नाही .
     ग्रॅजुएशन पूर्ण झाल्यावर MSC साठी तो मुंबईला गेला. तिथे मात्र त्याला एक मुलगी आवडली. त्याच्याच वर्गातली!  लांबसडक केस, गोरी, नाजूक, उंच; अगदी सोनाली बेंद्रेसारखी.... त्याला सरफरोश बघितल्यापासून सोनाली बेंद्रे फार आवडायला लागलेली होती. निदान हिच्याशीतरी बोलायला हवं; म्हणून  काहीतरी कारण काढून त्याने  तिच्याशी ओळख वाढवली. ओळखीचं रुपांतर मैत्रीमध्ये होइपर्यंत फर्स्ट इअर संपल. सेकंड इअरच्या  पहिल्या सेमिस्टरपर्यंत दोघांची छान मैत्री झाली. पण तिला विचारायची त्याची हिम्मतच झाली नाही. पहिल्या सेमिस्टरचा शेवटचा पेपर झाल्यावर त्याने  तिला विचारायचं ठरवलं. पेपर संपल्यावर तो काही बोलणार इतक्यात तिने त्याच्या हातात एक पाकिट दिल आणि म्हणाली, "माझं लग्न ठरलं! पुढच्या आठवड्यात साखरपुडा आहे तू नक्की ये हा....". त्याने उसनं हसू चेहऱ्यावर आणून तिचं अभिनंदन केलं. ती निघून गेल्यावर कितीतरी वेळ तो तिच्या साखरपुड्याची पत्रिका बघत राहिला. कसबसं उदासीन झालेलं सेकंड सेमिस्टर पण संपलं. बाकी काही असलं तरी अभ्यासात तो हुशार होता. फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन मिळवून तो MAC झाला.
    MAC पूर्ण झाल्यावर सुदैवाने त्याला लगेचच नोकरी मिळाली. हळूहळू तो बिझी होत गेला. इनक्रीमेंट, प्रमोशनच्या चक्रात इतर भावना हळूहळू धुसर होत गेल्या. याच चक्रात काळ वेगाने फिरल्यासारखा वाटला त्याला. नोकरी, प्रमोशन, स्वतःच घर, गाडी या साऱ्यामध्ये चार वर्ष निघून गेली. आता त्याच्या घरी  वेध लागले होते ते त्याच्या लग्नाचे. अधूनमधून स्थळं येत होती. पण  कधी पत्रिका जुळत नव्हती; तर कधी फोटो आवडत नव्हता. अशातच एक स्थळ आलं. मुलगी फोटोवरुन बरी वाटली. पत्रिकाही जुळली. बघण्याचा कार्यक्रम ठरला. त्याने तिला प्रत्यक्ष बघितली आणि ती त्याला आवडली. खरं तर ना ती माधुरीसारखी गोरी होती; ना तिच्यासारखा स्टेप कट होता. ना ती सोनालीसारखी उंच गोरी होती; ना तिचे केस सरळ होते. ती अगदी साधीशी मध्यम उंचीची काहीशी गव्हाळ वर्णाची, केस ना धड  सरळ ना धड कुरळे; ना नाजूक ना गोरी. पण तरीही ती त्याला आवडली ते तिच्या मोहक हसण्यामुळे आणि प्रीती झिंटासारख्या गालावर पडणाऱ्या खळीमुळे ! नाही नाही.....  त्याला प्रीती झिंटा आवडायला लागली नव्हती. त्याला ती आवडली होती आणि तिच्यामुळे प्रीती झिंटा आवडायला लागली. ती त्याच्या आयुष्यात प्रीती घेउन आली आणि त्याची सौ. झाली. बाकी त्याच्या आयुष्यात आलेल्या माधुरी, सोनालीपेक्षा 'ती' त्याला जास्तच आवडली कारण ती एकमेव अशी मुलगी होती, जी कोणासारखी असल्यामुळे नव्हे तर ती जशी आहे तशीच त्याला आवडली आणि मुख्य म्हणजे तो ही तिला आवडला. लव्ह मॅरेज  प्रत्येकाचच होतं असं नाही पण अशी एखादी (बहुदा अनेकांची ) अरेंज्डवाली लव्ह स्टोरीसुद्धा खूप काही सांगून जाते.
©मानसी जोशी
फोटो - गूगलवरून साभार


Saturday, 5 August 2017

राग आसावरी

राग आसावरी

   आभाळ मायेचे ओथंबून येइल, सुगंधवारे आर्त होतील
    माझा पत्ता विचारत तुझी सर्व दाने आपसूक येतील
    कोण जाणे भविष्यात असेलसुद्धा स्वप्नांची पूर्तता
    या क्षणी मात्र कोमल धैवतांची असीम आर्तता
    भक्ती असो, प्रीती असो, बाण लागतोच जिव्हारी
    जीवाला जडते अनिवार ओढ
     तिचच नाव आसावरी....

      कॉलेजला असताना मला डायरी लिहायची  सवय होती. डायरीमध्ये मी माझ्या मनातलं किंवा कुठेतरी वाचलेलं आणि मनाला भावलेलं असं काहीही लिहित असे. मध्यंतरी माहेरी गेले तेव्हा येताना ती डायरी घेउन आले होते. पण वाचायला वेळच मिळाला नव्हता. काल सहज त्या डायरीची पाने चाळली. त्यातच एका पानावर  'आसावरी' रागाबद्दल लिहिलेल्या या ओळी सापडल्या. दुर्दैवाने लेखकाचं नाव नव्हतं. पण हे ज्यांनी कोणी लिहिलं आहे ते अतिशय अप्रतिम लिहिलं आहे. सहज कुतुहल म्हणून मी गूगलवर 'आसावरी' रागाची माहिती सर्च केली. एका वेबसाईटवर  पंडित भीमसेन जोशींनी या रागाबद्दल सांगितलेली सविस्तर माहिती मिळाली.
    राग आसावरीला 'आसावरी' हे नाव 'सौवरी' हया जवळपास १५०० वर्षांपूर्वीच्या एका प्रदेशाच्या नावावरुन पडले असावे असे म्हणतात.हा प्रदेश दक्षिण सिंध व कच्छची भूमी हयांच्या सान्निध्यात अस्तित्वात होता. या  प्रदेशाची संस्कृती प्राचीन भारतीय संस्कृतीला खूपच जवळची होती.
    आसावरी हे मूळ रागाचे नाव आहे, परंतु पं. विष्णू नारायण भातखंडे हयांनी 'आसावरी' हे थाटवाचक नाव म्हणून पुढे आणले ".
    थाट आसावरीपासून निर्माण झालेल्या राग आसावरी, राग जौनपूरी, राग दरबारी कानडा, राग अडाणा, व राग गंधारी ह्यावर आधारीत एक कथा-सूत्र आहे. सुरांतून जाणवणारी कल्पनाचित्रे अशी-

राग आसावरीचे सूर :  प्रेयसी, म्हणजे आसावरी. साजश्रृंगार करुन अगदी आतुरतेने आपल्या प्रियकराला भेटायला गेलेल्या प्रेयसीला काही कारणावरुन तिचा प्रियकर  निर्भत्सना करुन परत पाठवितो. त्यामुळे आसावरी खिन्न व उदास होऊन माघारी फिरते.

राग जौनपूरीचे सूर : निराश झालेल्या आसावरीच्या मनात आपल्या प्रियकराला भेटण्याची जागृत झालेली आस, त्यामुळे पुन्हा शृंगार करण्याची तीव्र इच्छा  आणि तो परत आपल्याला नाकारेल ही भीती ह्या भावनांचा ऊन-पावसाचा खेळ तिच्या मनात चालू राहतो.
     राग जौनपुरी हा शास्त्रीय संगीत सादर करणा-या गायकांचा आवडता राग! आकाशवाणीवरील गाण्याच्या कार्यक्रमातून सकाळच्या वेळेस हमखास हा राग तुम्हाला ऐकावयास मिळेल. परंतु असे असले तरी राग जौनपुरीत स्वरबध्द झालेली नाटयगीते किंवा चित्रगीते बघावयास मिळत नाहीत.

राग दरबारी कानडा : चंद्रोदय झाल्यावर प्रियकराच्या मनात आपल्या प्रेयसीला भेटण्याची तीव्र इच्छा जागृत होते. तो प्रेयसीकडे जाऊन तिची परत चलण्यासाठी मनधरणी करतो. परंतु प्रेयसी त्याला नकार देते.
   राग 'दरबारी कानडा' हा आसावरी थाटापासून निर्माण झालेला एक सुप्रसिध्द, प्रचलीत व मनमोहक राग. 'मृगनयना रसिक मोहीनी' तसेच, 'रजनीनाथ हा, नभी उगवला' अशी नाटयगीत अथवा झनक झनक, 'ओ दुनियाके रखवाले 'तोरा मन दर्पन कहलाए' अशा अनेक गाण्यांमधून राग 'दरबारी कानडा' हा एकच राग आपल्याला निरनिराळया प्रकारचे रस व भाव व्यक्त करताना दिसतो आहे. जसे श्रृंगार-रस, भक्ती रस, विरह-भावना, इ.

राग अडाणा :प्रेयसीने आपल्या बरोबर चलावे म्हणून उदासीन झालेला प्रियकर तिच्यावर काहिशी बळजबरी करु बघतो परंतु प्रेयसी त्याला झिडकारुन तिच्या सख्यांसमवेत ओढयावर पाणी भरायला निघून जाते.
    राग 'अडाणा' हा आसावरी थाटातील तसा काहीसा अनवटच राग. क्वचित प्रसंगी एखाद्या मैफिलीतून तो गायला गेलेला  आढळेल.

राग गंधारी :प्रियकर आणि प्रेयसीमध्ये गैरसमजाचे वादळ शमून त्यांचे पुनर्मिलन होते.

        मी वाचलेल्या लेखातील माहितीपैकी  काही महत्वाची आणि मला आवश्यक वाटलेली माहिती मी इथे लिहिली आहे. सगळ्याच गोष्टी लिहायला गेले तर ही पोस्ट क्रमश: ठेवून दोन भागांमध्ये लिहावी लागेल. म्हणून मी इथेच थांबते. एका अतिशय सुरेल रागाच्या माहितीसोबत पुन्हा एकदा तुम्हां सर्वांना सुप्रभात!!!

रागाची माहिती:आंतर्जलावरुन साभार
विशेष संदर्भ: www.marathiworld.com
फोटो: गूगलवरून साभार

©मानसी जोशी
०५/०८/२०१७

Thursday, 3 August 2017

मांडवाखाली

मांडवाखाली !फार पूर्वीच्या काळी वधूच्या घरासमोरच्या अंगणातच लग्न लागत असत. अंगण सारवून मांडव म्हणजेच मंडप घातला जात असे. काळानुसार घरं लहान होत गेली, फ्लॅट सिस्टिम अस्तित्वात आली. अंगणं नष्ट झाली आणि विवाहकार्यासाठी कार्यालय, हॉल, लॉन या संकल्पना अस्तित्वात आल्या. लग्न कुठेही झालं तरीही लग्नमंडपात घडलेल्या घडामोडींना आजही 'मांडवाखाली' घडलेल्या घटना असच म्हटलं जातं.
        किती वेगळं असतं लग्नमंडपातलं वातावरण. सनईचे मंजूळ स्वर कानावर पडत असतात. वरपक्षाच्या आणि वधूपक्षाच्या खोलीत नटणाऱ्या मुलींची, स्त्रीयांची  धावपळ चालू असते. नटलेल्या करवल्या उगाचच  इकडून तिकडे फिरत असतात. चहा कॉफीच्या स्टॉलजवळ गप्पांचा फड रंगलेला असतो. रात्रभर प्रवास करुन खास लग्नासाठी आलेला एखादा पाहुणा, 'यायलाच हवं! आलो नसतो तर मला जिवंत सोडलं नसतं तिने/त्याने' असं म्हणत उत्सवमूर्तीशी असलेली आपली जवळीक दाखवून देत असतो. लहान मुलांना खेळायला भरपूर जागा आणि समवयस्क मित्र मंडळी मिळाल्याने मुलं प्रचंड आनंदात इकडून तिकडे धावत खेळत असतात. त्यातलच एखादं मुल धडपडतं. त्या मुलाची आई मग आतल्या खोलीतून बाहेर येते आणि  गप्पांचा फड जमवून बसलेल्या त्या मुलाच्या बाबांवर वैतागते, 'एक दिवस पण नीट लक्ष ठेवता  येत नाही का? असं म्हणून त्या  मुलाच्या पाठीत एक धपाटा घालून वैतागून पुन्हा आत निघून जाते. चिडलेलं ते मुल आणि त्याचे  'बिचारे' बाबा मग शांतपणे बसून रहातात.
     एखादा तरुणांचा ग्रूप कार्यालयात नटून सजून फिरणाऱ्या  करवल्यांकडे बघत आपल्या  सौदर्यदृष्टीला आव्हान देत त्यामध्येच कोणी 'खास' दिसतेय का ते शोधत असतो. या सगळ्या गदारोळात मात्र एखाद्या 'त्याची' नजर आदल्या दिवशीच मनात भरलेल्या 'तिला' शोधत असते. 'ती' दिसल्यावर मात्र तो मनोमन सुखावतो. लग्नातच लग्न जमतात ती अशी.
      सगळे जण आपाआपल्या परीने एंजॉय करत असताना मात्र ज्यांच लग्न आहे ते 'वर आणि वधू' मात्र भटजी सांगतील तसं करत, मख्ख चेहऱ्याने विवाहविधी पाडत असतात.
      हळूहळू हॉलमधली गर्दी वाढायला लागते. वेगवेगळ्या ठिकाणी गप्पांचा फड रंगलेला असतो. अचानक खूप वर्षांनी भेटलेल्या सग्या सोयऱ्याशी हितगुज सुरु होतं. नाष्ट्याच्या टेबलाजवळची गर्दी वाढायला लागते. तर दुसरीकडे नवऱ्या मुलासाठी रुखवताच्या जेवणाचं ताट सजवलं जातं. या रुखवताच्या जेवणाच्या वेळची एक गम्मत आठवली.
       आमच्या ओळखीतलं एक लग्न होतं. मुलीकडची मंडळी फार हौशी. त्यांनी अनेक वेगवेगळे पदार्थ  अतिशय उत्कृष्टरित्या एका सुबकदार ताटात  मांडून ठेवले होते. ताटाभोवतीची सजावटही अतिशय सुंदर होती. नवरा मुलगा येउन बसणार तोच दिड पावणे दोन वर्षाचा एक छोटा मुलगा पळत येउन त्याच्या जागेवर बसला आणि काही केल्या तिथून उठेना. अखेर नवऱ्या मुलाने गोड बोलून त्याला मांडीवर बसायला तयार केलं आणि त्या मुलाला मांडीवर घेऊन जेवायला बसला. तेवढ्यात मुलाचा एक मित्र आला आणि म्हणाला, 'काय हे लग्नाआधीच प्रॅक्टिस सुरु ?' तेवढ्यात वराचा  दुसरा एक मित्र आला आणि म्हणला, 'ये कब हुवा? ते पण लग्नाआधी?' त्या दोघांचं  हे बोलणं ऐकून सगळे हसायला लागले. पुढे जेवण होइपर्यंत तो मुलगा नवऱ्या मुलाच्या मांडीवर बसून  होता. अशा अनेक गमतीजमतीने सजलेली असते लग्नमंडपातली सकाळ. आणि हो सकाळच हा! कारण एकदा का लग्न लागलं कि हळूहळू सगळा उत्साह आणि करवल्यांचा मेकअपही ओसरत जातो. आलेल्या पाहुण्यांना जेवून ऑफिसला किंवा घरी जायची घाई असते.नवरा नवरी फोटोसेशनमध्ये व्यस्त होतात.या जेवणाची घाई आणि फोटोसेशनच्या गमतींबद्दल बोलायचं तर एक वेगळी पोस्टच लिहावी लागेल त्यावर. बाकी या सगळ्या कार्यक्रमांनंतर शेवटी होणारा पाठवणीचा कार्यक्रम म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा. सगळं हसरं वातावरण एकदम गंभीर होवून जातं. आसू आणि हसू डोळ्यात घेउन नववधू एक नवीन आयुष्य सुरु करण्यासाठी पुढे पाऊल टाकते. हसत हसत सुरु झालेला हा विवाहसोहळा डोळ्यात आनंदाचे आणि दु:खाचे अश्रू एकत्रीत करुन संपन्न होतो.
     

©मानसी जोशी


Tuesday, 1 August 2017

प्रभाती सूर मनी रंगती

सुप्रभात मंडळी! काल सकाळी खूप दिवसांनी  चक्क सूर्यनारायणाचे दर्शन झालं.कोवळं सोनेरी उन पाहून फार बरं वाटलं.खर तर  नेहमीसारखीच  सकाळ  पण खूप वेगळी वाटत  होती. कशी असते ना ही सकाळ? किती वेगवेगळी रुपं तिची! तिच्या प्रत्येक रुपाबरोबरच आपले मूड्सही  बदलत जातात. एखाद्या दिवशी वाटतं उठूच नये. बाहेर मुसळधार पाऊस बरसत असतो. वातावरणात चांगलाच गारवा जाणवत असतो. अशा वेळी वाटतं छान पांघरूण घेऊन झोपून रहावं. एखाद्या दिवशी मात्र हिच सकाळ अचानक रम्य वाटायला लागते. वाटतं सकाळी लवकर उठून किंवा अगदी पहाटेच मस्त टेकडीवर फिरायला जावं. पक्षांचा किलबिलाट, दुरूनच कुठून तरी एखाद्या मंदिरातून येणारा मंजुळ घंटानाद, मंद गार वारा हे सार अनुभवत एखाद्या दगडावर शांतपणे बसून रहावं. पण या सगळ्या गोष्टी मनातच बरं का! कितीही काहीही वाटलं तरी लवकर  उठून रोजची कामे आवरावीच लागतात.  अगदी सुट्टीच्या दिवशीही अनेक कामाची आखणी तयार असते. पण खरं सांगू?  एक दिवस तरी काढावा स्वतःसाठी. निदान एखाद्या सकाळी तरी मनासारखं जगावं. कामं काय रोजचीच असतात. कधीतरी मुद्दाम विसरावं एखादं काम. द्यावा जरा स्वतःला आराम. जास्त नाही पण थोडीशी तरी करावी आपली मनमानी. अगदी साचेबद्ध आयुष्य जगतो आपण.   
    घडाळ्याच्या काट्यावर चाललेलं असतं सगळं. पण एखाद्या दिवशी करावा जरा बदल. कामं उरकली नाहीत तर राहूदेत तशीच. बिघडेल एखादं काम; बिघडूदे.  होइल उशीर ऑफिस गाठायला; होऊदे; बॉसची बोलणी खावी लागतील... ठिक आहे तशीही ती अधूनमधून खातच असतो की आपण. ऑफिसला पोचायला उशीर झाला म्हणून काही  बिघडणार नाही. पण जगायला मात्र उशीर करु नका. घडाळ्याच्या काट्याबरोबर चालताना ते काटे उलटे फिरत नाहीत; हे विसरु नका. घड्याळ आपल्यासाठी आहे आपण घडाळ्यासाठी नाही. बघावं थोडं  मनासारखं जगून; मग कळेल जगण्यातला खरा आनंद! आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आपल्याला जगणं शिकलं पाहिजे.
  मध्यंतरी 'व्हॉट्स ॲप'वर एक सुंदर मेसेज वाजला होता.

      "आठवणी सांभाळणं सोपं असतं
        क्षण सांभाळणं कठिण
        क्षण सांभाळायला गेलं तर
        एका क्षणात त्या क्षणाच्या आठवणी होतात"

   खरच किती सुंदर विचार आहे हा. पण आठवणी सांभाळण्यासाठी निदान तो क्षण मनमुराद जगला  पाहिजे; तर त्याच्या आठवणी बनतील ना?
    लहान मुलं कशी अगदी मनमोकळं  जगतात. कुठलं स्टेटस नाही; कोण काय म्हणेल याचं टेंशन नाही. माहिती असतं त्यांनाही पावसात भिजल्यावर, चिखलात खेळल्यावर आई ओरडणार! तरीही चिंब भिजून, अंग चिखलात माखून घेऊन घरी येतात. त्यांना फक्त पाऊस अनुभवायचा असतो, चिंब भिजायचं असतं, थोडीशी मनमानी करायची असते ते ती करतात. मग यासाठी बोलणी खायचीही मानसिक  तयारी असते त्यांची. नंतर कोणी काहीही बोललं तरी काय फरक पडणार आहे? जगण्यातला जो आनंद मिळवायचा तो मिळवणं महत्वाचं. या लहान मुलांकडून शिकण्यासारख खूप काही असतं.खर तर जगण्याची कला आपल्याला लहानपणीच अवगत झालेली असते. मोठं झाल्यावर काय होतं कुणास ठावूक ? आपण जगणं सोडून देतो आणि आयुष्य रेटू  लागतो. छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद दडलेला असतो हे विसरुनच जातो आपण. अगदीच नेहमी नाही पण कधीतरी लहान मुलांसारखं असं मोकळं निरागस  होऊन जगून बघावं; जगण्यातला निखळ आनंद अनुभवावा. खात्रीने सांगते, सगळी मरगळ निघून जाईल आणि नव्या विचारांची, नव्या स्वप्नांची  एक नवी सुप्रभात होइल.

©मानसी जोशी
०२/०८/२०१७
फोटो: गुगलवरुन साभार

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...