Tuesday, 1 August 2017

प्रभाती सूर मनी रंगती

सुप्रभात मंडळी! काल सकाळी खूप दिवसांनी  चक्क सूर्यनारायणाचे दर्शन झालं.कोवळं सोनेरी उन पाहून फार बरं वाटलं.खर तर  नेहमीसारखीच  सकाळ  पण खूप वेगळी वाटत  होती. कशी असते ना ही सकाळ? किती वेगवेगळी रुपं तिची! तिच्या प्रत्येक रुपाबरोबरच आपले मूड्सही  बदलत जातात. एखाद्या दिवशी वाटतं उठूच नये. बाहेर मुसळधार पाऊस बरसत असतो. वातावरणात चांगलाच गारवा जाणवत असतो. अशा वेळी वाटतं छान पांघरूण घेऊन झोपून रहावं. एखाद्या दिवशी मात्र हिच सकाळ अचानक रम्य वाटायला लागते. वाटतं सकाळी लवकर उठून किंवा अगदी पहाटेच मस्त टेकडीवर फिरायला जावं. पक्षांचा किलबिलाट, दुरूनच कुठून तरी एखाद्या मंदिरातून येणारा मंजुळ घंटानाद, मंद गार वारा हे सार अनुभवत एखाद्या दगडावर शांतपणे बसून रहावं. पण या सगळ्या गोष्टी मनातच बरं का! कितीही काहीही वाटलं तरी लवकर  उठून रोजची कामे आवरावीच लागतात.  अगदी सुट्टीच्या दिवशीही अनेक कामाची आखणी तयार असते. पण खरं सांगू?  एक दिवस तरी काढावा स्वतःसाठी. निदान एखाद्या सकाळी तरी मनासारखं जगावं. कामं काय रोजचीच असतात. कधीतरी मुद्दाम विसरावं एखादं काम. द्यावा जरा स्वतःला आराम. जास्त नाही पण थोडीशी तरी करावी आपली मनमानी. अगदी साचेबद्ध आयुष्य जगतो आपण.   
    घडाळ्याच्या काट्यावर चाललेलं असतं सगळं. पण एखाद्या दिवशी करावा जरा बदल. कामं उरकली नाहीत तर राहूदेत तशीच. बिघडेल एखादं काम; बिघडूदे.  होइल उशीर ऑफिस गाठायला; होऊदे; बॉसची बोलणी खावी लागतील... ठिक आहे तशीही ती अधूनमधून खातच असतो की आपण. ऑफिसला पोचायला उशीर झाला म्हणून काही  बिघडणार नाही. पण जगायला मात्र उशीर करु नका. घडाळ्याच्या काट्याबरोबर चालताना ते काटे उलटे फिरत नाहीत; हे विसरु नका. घड्याळ आपल्यासाठी आहे आपण घडाळ्यासाठी नाही. बघावं थोडं  मनासारखं जगून; मग कळेल जगण्यातला खरा आनंद! आयुष्य खूप सुंदर आहे फक्त आपल्याला जगणं शिकलं पाहिजे.
  मध्यंतरी 'व्हॉट्स ॲप'वर एक सुंदर मेसेज वाजला होता.

      "आठवणी सांभाळणं सोपं असतं
        क्षण सांभाळणं कठिण
        क्षण सांभाळायला गेलं तर
        एका क्षणात त्या क्षणाच्या आठवणी होतात"

   खरच किती सुंदर विचार आहे हा. पण आठवणी सांभाळण्यासाठी निदान तो क्षण मनमुराद जगला  पाहिजे; तर त्याच्या आठवणी बनतील ना?
    लहान मुलं कशी अगदी मनमोकळं  जगतात. कुठलं स्टेटस नाही; कोण काय म्हणेल याचं टेंशन नाही. माहिती असतं त्यांनाही पावसात भिजल्यावर, चिखलात खेळल्यावर आई ओरडणार! तरीही चिंब भिजून, अंग चिखलात माखून घेऊन घरी येतात. त्यांना फक्त पाऊस अनुभवायचा असतो, चिंब भिजायचं असतं, थोडीशी मनमानी करायची असते ते ती करतात. मग यासाठी बोलणी खायचीही मानसिक  तयारी असते त्यांची. नंतर कोणी काहीही बोललं तरी काय फरक पडणार आहे? जगण्यातला जो आनंद मिळवायचा तो मिळवणं महत्वाचं. या लहान मुलांकडून शिकण्यासारख खूप काही असतं.खर तर जगण्याची कला आपल्याला लहानपणीच अवगत झालेली असते. मोठं झाल्यावर काय होतं कुणास ठावूक ? आपण जगणं सोडून देतो आणि आयुष्य रेटू  लागतो. छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद दडलेला असतो हे विसरुनच जातो आपण. अगदीच नेहमी नाही पण कधीतरी लहान मुलांसारखं असं मोकळं निरागस  होऊन जगून बघावं; जगण्यातला निखळ आनंद अनुभवावा. खात्रीने सांगते, सगळी मरगळ निघून जाईल आणि नव्या विचारांची, नव्या स्वप्नांची  एक नवी सुप्रभात होइल.

©मानसी जोशी
०२/०८/२०१७
फोटो: गुगलवरुन साभार

No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...