Wednesday, 30 January 2019

वाघा बॉर्डर - एक अविस्मरणीय अनुभव

भारत माता की जय !!!
हिंदुस्थान जिंदाबाद !!
वंदे मातरम!!!
मावळत्या सूर्याच्या साक्षीने आसमंतात हे नारे घुमत होते. तिथे जमलेला प्रत्येकजण मोठ्या मोठ्या आवाजात या घोषणा देत होता. समोर दिसणारी पाकिस्तानची बॉर्डर बघून देशप्रेमाचं आलेलं भरतं अजूनच वाढत होतं. आयुष्यात अनुभवलेल्या काही अविस्मरणीय क्षणांपैकी एक असलेला हा क्षण. स्थळ अर्थातच #वाघा_बॉर्डर!!
    अमृतसरवरून दीडशे रुपयात वाघा बॉर्डरला नेऊन आणणाऱ्या गाड्या मिळतात. तिथे पोचल्यावर आतमध्ये काहीही नेऊ देत नाहीत (अगदी लेडीज पर्सही नाही). खाद्यपदार्थ आणि पाण्याच्या बाटल्या न्यायला मात्र परवानगी आहे.  सुरक्षा व्यवस्था अर्थातच कडक असते.
    आतमध्ये सर्वाना कार्यक्रम व्यवस्थित बघता यावा म्हणून दोन बाजूला दोन मोठे प्रोजेक्टर लावलेले आहेत. ठीक साडेचार वाजता कार्यक्रम चालू होतो. प्रचंड गर्दीमुळे तुडूंब भरलेलं स्टेडीयम, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ यासारख्या घोषणा खड्या आवाजात देणारे मिलिटरी ऑफिसर, त्या घोषणा फॉलो करणारे भारतीय, ताठ मानेने आणि निधड्या छातीने पाकिस्तानच्या बॉर्डर पर्यंत जाऊन समोर दिसणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांच्या नजरेला नजर देऊन खुन्नस देणारे आपले भारतीय सैनिक (आनंदाची गोष्ट म्हणजे यामध्ये महिला सैनिकही होत्या), हे सारे दृश्य बघून देशप्रेमाची एक वेगळीच उर्मी मनात दाटून आली.
  कार्यक्रम संपताना पश्चिमेकडे झुकणाऱ्या सूर्याच्या तेजस्वी लाल गोळ्यासमोर तितक्याच तेजाने फडकणारा आपला तिरंगा पाहून ‘विजयी विश्व तिरंगा प्यारा….’ चे सूर आपोआपच मनात गुंजू लागले.
 “बाकी काहीही बघायचं राहिलं तरी चालेल, आपण इतर कुठेही गेलो नाही तरी मला चालेल, पण मला वाघा बॉर्डरला जायचंच आहे…...”  माझं हे वाक्य सर्वतोपरी सार्थ करणारा ‘वाघा बॉर्डरचा कार्यक्रम’ आयुष्यतल्या संस्मरणीय कार्यक्रमांपैकी एक आहे.
कार्यक्रम संपल्यावर अनेक फोटोज क्लिक केले.बाहेर आल्यावरही फोटोसेशन चालूच होतं. त्याचदरम्यान घोषणा देणारे ‘मिलिटरी ऑफिसर’ बाहेर आले. त्यांना भेटायची खूप इच्छा होती पण क्षणार्धात त्यांच्याभोवती एवढी गर्दी जमली की त्यांना भेटायला गेलो असतो तर निघायला उशिर झाला असता.
“सोड ना त्यांना का भेटायचं आहे तुला? काय करणार त्यांना भेटून?” या प्रश्नावरही मी न चिडता शांतपणे उत्तर दिलं,
“इथे शाहरुख अमीर असते तर मी नसतं म्हटलं भेटायला जाऊया but  ‘They are #Real_Heroes of our country. I respect them. आज त्यांच्यामुळेच आपण असं मोकळेपणे फिरू शकतो. सुखाने झोपू शकतो.”
   या कार्यक्रमा-दरम्यान अनुभवलेली आणि मनाला न पटलेली एक गोष्ट मुद्दाम इथे लिहिते. स्टेडीयमवर जागोजागी मोठे मोठे डस्ट-बीन ठेवलेले असूनही सर्वत्र फेकलेल्या पाण्याच्या बाटल्या, चिप्सचे रॅपर आणि इतर कचरा बघून संताप आला. लोकांना एवढी साधी गोष्ट कळू नये? एक दोन ठिकाणी तर डस्ट-बीनही कलंडलेले दिसले. पण नेहमीप्रमाणे, “या गोष्टीला आपण काहीही करू शकत नाही”, असा विचार करून स्वतःची समजूत घातली.
  बाहेर दूरवर पसरलेलं हिरवंगार शेत पण त्यांना दोन देशांमध्ये विभागाणारं तारेचे कुंपण, दोन्ही देशांमधील कुंपणाची जाणीवही नसलेले आणि आकाशात मुक्तपणे पक्षी, वाघा बॉर्डरवर पाकिस्तानच्या हद्दीत असणारं परंतु सावली मात्र हिंदुस्थानात देणारं एक झाड, दोन्ही देशांत एकाचवेळी अस्ताला जाणारा सूर्य आणि वाहणारा गार वारा… नितांतसुंदर अनुभव होता हा. हे सारं बघून कोणाच्याही मनात एकच गाणं घोळत राहीलं ---
“पंछी, नदियाँ, पवन के झोंके
कोई सरहद ना इन्हें रोके..”





©मानसी जोशी

No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...