Monday, 17 July 2017

शिक्षणाचे माध्यम- मराठी का इंग्रजी?

आजकाल सोशल मिडीआवर इंग्लिश मिडिअमची किंवा तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची खिल्ली उडवणाऱ्या बऱ्याच पोस्ट दिसत आहेत. खास करुन मराठी माध्यमातून शिक्षण घेणंच कसं योग्य आहे हे सांगणाऱ्या अनेक पोस्ट्स  जेव्हा ग्रूपवर पोस्ट केल्या जातात तेव्हा हमखास इग्लिश मिडिअमचा दर्जा किती वाईट आहे हा मुद्दा नेहमी मांडला जातो. मुळात एखादी गोष्ट चांगली आहे हे सिद्ध करण्यासाठी त्या गोष्टींची दुसऱ्या गोष्टींशी तुलना करण्याची गरजच काय?  कुठलही माध्यम का असेना शिक्षणासारखं पवित्र कार्य तिथे केलं जातं.(डोनेशन / फी हे वेगळे मुद्दे आहेत तेव्हा ते मांडून कृपया विषयांतर करु नये.)
    मुळात मुलांना कुठल्या माध्यमातून शिकवायचे हा पालकांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याचे जे काही बरे वाईट परिणाम असतील त्याची जबाबदारीही पालकांचीच असते . मुलांसाठी शाळा निवडताना पालकांच्या नोकरीचं स्वरुप हा महत्वाचा मुद्दा आहे.जर पालकांना नोकरीनिमित्त दुसऱ्या राज्यात अथवा  देशात जावं लागणार असेल तर मुलांना इंग्लिश मिडिअमच्या शाळेत घालणं आवश्यक असतं.मुलांनी आई वडिल दोघांजवळ रहाणं हे कुठल्या माध्यमातून मुलं शिकत आहेत यापेक्षा नक्कीच महत्वाचं आहे. अर्थात हे माझं वैयक्तिक मत आहे.
        दुसरी गोष्ट म्हणजे घर आणि शाळा यामधील अंतर, त्या शाळेत मुलांवर होणारे संस्कार आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या शाळेतल्या शिक्षणाचा दर्जा हे मुद्देही माध्यम निवडीइतकेच महत्वाचे आहेत.
     मी मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याच्या विरोधात नाही, असूही शकत नाही कारण माझं दहावीपर्यंतचे शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले आहे. पण म्हणून मराठी माध्यमातून/ मातृभाषेतून शिक्षण घेतलं पाहिजे या अट्टाहासाचं समर्थनही मी करत नाही. मराठी माध्यमातून शिक्षण घेण्याचं महत्व सांगताना बरेचदा इंग्लिश मिडिअम कसं वाईट आहे हे सांगितल जातं हे मला खटकतं. याबरोबरच मराठी माध्यमातून शिकलेल्या  वेगवेगळ्या उच्चशिक्षित, कर्तबगार व्यक्तिंचे दाखले दिले जातात. जरूर द्या अशी उदाहरणे  पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा; ती व्यक्ती स्वतःच्या कर्तुत्वावर यशस्वी झाली आहे. त्या यशात माध्यम ही एकमेव गोष्ट खरच महत्वाची होती का? हा विचार जरुर करावा.

©मानसी जोशी

No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...