Tuesday, 28 November 2017

इगो का स्वाभिमान

ती बॅग घेवून जायला निघाली.
भरलेल्या डोळ्यांनी तिने त्याच्याकडे बघितलं. तो तसाच शांत उभा होता.
तिने दार उघडलं आणि बाहेर पाऊल टाकण्यापूर्वी पुन्हा एकदा त्याच्याकडे वळूनबघितलं.
आता त्याच्याही मनात कालवाकालव होत होती. मनातून त्याला खूप वाटत होतं; सांगाव तिला, "अशी जावू नकोस ना मला एकट्याला सोडून......." पण त्याचा 'इगो' त्याला तसं करायची परवानगी देत नव्हता. कारण त्याने तिला जायला सांगितलं नव्हतं. ती स्वतःहून जात होती.
तो थांबवेल या आशेने काही क्षण ती दारातच उभी राहिली. मनातून तिला खूप वाटत होतं, परत फिरुन त्याला मिठी मारावी. पण तिचा 'इगोही' काही कमी नव्हता. तो थोडीच तिला असं काही करु देईल.
ती दार ओढून निघून गेली. दार बंद झाल्याचा आवाज आला आणि त्याने दचकून वळूनबघितलं. ती खरंच निघून गेली होती. तो हतबल होऊन खाली बसला.

त्या दोघांच 'लव्ह मॅरेज’-

त्यांच्या 'डेटला' तो बरेचदा उशीरा जायचा. ती कितीतरी वेळ त्याची वाट बघत बसायची. ती चिडली की तो कान धरुन तिची माफी मागायचा. कॅडबरी, रेड रोझ, गिफ्ट्स आणि रोमॅन्टिक बोलणं यामुळे ती ही विरघळायची. पण तरीही आतून कुठेतरी ती निदान एकदा तरी त्याने आपली वाट बघावी म्हणून तळमळायची .
       पुढे लग्नझालं. नव्याची नवलाई संपली. दोघांनाही एकमेकांच वागणं खटकायला लागलं. तो पक्का धार्मिक तर ती नास्तिक नसली तरी कर्मावर विश्वास ठेवणारी. त्याच्या रुढी परंपरा जपणाऱ्या घरात तिची घुसमट व्हायची पण तरीही ती सगळं ॲडजस्ट करत होती. त्याच्यासाठी!
     तिने केलेली बेचव कॉफीही आवडीने पिणाऱ्या त्याला तिने केलेली त्याची आवडती भरली वांगीही आवडत नाहीशी झाली.
     त्याचं ओला टॉवेल बेडवर टाकणं, नोकरी करणारी बायको असूनही तिने घरातले रितीरिवाज सांभाळावे, त्याला प्रायोरिटी द्यावी अशी इच्छा असणं हे सारं तिला खटकायला लागलं. नवरेशाही चालवून घेणाऱ्यातली ती नव्हतीच कधी.
    साध्या साध्या गोष्टीही आता वादाच कारण बनू लागल्या. एकमेकांची छोटीशी चूकही अक्षम्य अपराध असल्यासारखी  वाटू लागली. वाद वाढत गेले आणि तिने घर सोडून जायचा निर्णय घेतला.

ती माहेरी गेली. तिथे दादा वहिनीचा संसार अगदी जवळून बघत होती.
    तसं तिच्या लग्नाआधीच तिच्या भावाचं लग्न झाल होत. पण आज नव्यानेच एका वेगळ्या दृष्टीकोनातून ती त्यांचा संसार बघत होती. तिला त्यांच्या संसारात आपण अडचण आहोत असं उगाचच वाटू लागल. दादा वहिनी खूप चांगले होते. त्यांच्या मनात तसा विचारही नव्हता. पण आपण या चांगुलपणाचा फायदा घेणं योग्य नाही असा विचार तिच्या मनात येवू लागला.
     वहिनी करत असलेल्या ॲडजस्टमेंट ती अगदी जवळून बघत होती. दादासाठी ती अनेक गोष्टी जुळवून घेत होती. आईचा कडक शिस्तीचा काहीसा तापट स्वभाव,बाबांचं पथ्य पाणी, सगळं काही अगदी सहज सांभाळत होती. दादाही ॲडजस्ट करत होता. तिच्यासाठी काही प्रमाणात का होईना त्याने स्वतःला बदललं होतं.

      ती निघून गेल्यावर घरच काय त्याचंआयुष्यच रितं झाल्यासारख वाटलं त्याला. सकाळच्या कॉफीपासून प्रत्येक गोष्टीत त्याला तिची आठवण येत होती.
     त्याने ओला टॉवेल बेडवर फेकणं सोडून दिलं. त्याला आता स्ट्रॉंग कॉफीपेक्षा माईल्ड कॉफीच आवडायला लागली होती. कॅन्टिनच्या तिखट तेलकट भाज्या खाताना त्याला जाणवलं; ती आपलं डाएट किती व्यवस्थित सांभाळत होती. आपणच चुकलो निदान थोडं तरी तिला समजून घ्यायला हवं होत. पण परत कसं आणायच तिला ?

आजूबाजूच्या ओळखीच्या लोकांचे, आपल्या मैत्रीणींचे संसार आता ती विचारपूर्वक बघू लागली. क्षणाक्षणाला तिला जाणवत होतं. तो खरच खूप ॲडजस्ट करत होता आपल्यासाठी. पण परत कसं जाणार आता ?
   
काही दिवस असेच सरले. त्यादिवशी ऑफिसमध्ये कामाच शेड्युल ठरवत असताना अचानक तिच्या लक्षात येतं; तिच्या लग्नाचा पहिला वाढदिवस अगदी दहा दिवसांवर येउन ठेपला आहे. "गेल्यावर्षी याच वेळी मी किती खूष होते", या विचाराने तिच्या डोळ्यात पाणी आलं.

    आता तो खरच तिची खूप मनापासून वाट बघत होता. फरक फक्त एवढाच होता ती वाट बघायची तेव्हा तो येणार याची तिला खात्री असायची पण त्याच्यासाठी मात्र सगळच अनिश्चित होतं.

    खरच इगो इतका महत्वाचा असतो का ? की ज्यामुळे जे आपल्याला पटतंय, जे वाटतय ते आपण करुच शकत नाही?
   दोघांनाही आपाआपल्या चुकांची जाणीव झालेली होती. चूका सुधारायची, समोरच्याला माफ करायची तयारीसुद्धा होती; पण त्यासाठी पाऊल उचलायला मात्र कोणीच तयार नव्हतं.

       बाकीच्या गोष्टींसारखा या गोष्टीचाही शेवट गोड व्हावा असं प्रत्येकालाच वाटत असेल. होईलही कदाचित कारण ही गोष्ट आहे,कल्पना आहे. पण प्रत्यक्ष आयुष्यात  खरच असं घडत असेल?
     इगो आणि स्वाभिमान यामध्ये अगदी बारीकसा फरक आहे. पहिल्याचं नसणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच दुसऱ्याच असणं आवश्यक आहे. असे किती 'तो' आणि 'ती' असतील ज्यांना मनापासून एकत्र यायचं आहे पण इगो आड येतोय. कोणीही पुढे पाऊल टाकायला तयार होत नाही. आयुष्य रेटत रहातात. समोरचा कधीतरी आपल्याकडे येइल याची वाट बघत रहातात. मग हळूहळू एकटेपणाचीच सवय होते. एकटेपणा आवडायला लागतो आणि एक नातं फुलायच्या आधीच कोमेजतं.
     कुठल्याही समस्येवर 'एक घाव दोन तुकडे' हे सोल्यूशन नसतं. चर्चा करुन अनेक प्रश्न सोडवता येतात.
पटत असेल तर विचार करा. शेवटी महत्व कशाला द्यायचं हे ज्याच त्याने ठरवायचं असतं.

©मानसी जोशी











No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...