Monday, 21 November 2016

माहेरुन निघताना

#माहेरुननिघताना
मंगळवारी रात्री माझ्या माहेरहून म्हणजेच रत्नागिरीहून पुण्याला परत यायला निघाले. लग्नाला १२ वर्षे होवून गेली तरी आजही माहेरहून निघताना मन हळव होतं. बसमध्ये बसल्यावर हात हलवून बाबांना निरोप दिला. त्या स्लिपर कोच नामक सुपरफास्ट बैलगाडीत बसल्यावर जणू जगाशी संपर्कच तुटतो. गाडी पुढे जात होती आणि डोळ्यासमोर गेल्या आठ दिवसातील सगळ्या घटना तरळत होत्या. यावेळी सगळ्यात जास्त धमाल आली ती माझ्या सव्वा वर्षांच्या भाचीमूळे - नीरजामूळे. तिच्या बाललीला बघून मन सुखावून गेले. डोळ्यासमोर सतत तिचा चेहरा येत होता. तिने आsssत्या अशी मारलेली गोड हाक सतत कानात घूमत होती. निघायच्या दिवशी मी तिला सांगत होते, " मनू आज जाणार आहे हा मी ............"  तिला काही कळत होत का ते माहिती नाही पण शांतपणे सगळ ऐकत होती. ते आठवून हसायला आलं. मनात आल, 'पुढच्या वेळी मी हिला बघेन तेव्हा किती बदललेली असेल ही.' या आठ दिवसांमध्ये काय काय करायच ठरवल होतं ते आठवल पण बरचस राहून गेल होत.
बरेचसे नातेवाईक रत्नागिरीमध्येच रहात असल्यामुळे "यावेळी नक्की येते तुमच्याकडे" अस सांगून ज्यांच्याकडे जायला जमल नाही असे नातेवाईक; "काय ग कधी येणार आहेस अस मेसेज करून विचारणारे पण या वेळेसही ज्यांना भेटायला जमल नाही असे मित्र मैत्रिणी सारे डोळ्यासमोर आले. आपल्या नोकरीमुळे जास्त वेळ देता येत नसल्याच शल्य बोलून दाखवणारे भाऊ भावजय आठवले. प्रत्येक खेपेला आपल्या बिझी शेड्युलमधून वेळात वेळ काढून भेटणारे मित्र मैत्रीणी आणि त्यांची भेट आठवली. "काय ग पुणं मानवल हा तुला  किंवा "सॉलिड आहेस हा तू अगदी आहेस तशीच आहेस, पूर्वीइतकीच बारिक असतीस तर कॉलेजची स्टुडंटच वाटली असतीस. अशा शब्दात तारीफ(?) करणारे मित्र मैत्रिणी, त्यांची काही तासांची पण काही मिनिटांतच संपली अशी वाटणारी भेट; निघताना "परत कधी भेटू काय माहिती" अस म्हणून नाराजीने एकमेकांचा घेतलेला निरोप; हे सार आठवून डोळ्यात पाणी तरळल. मनात आल; एक काळ असा होता जेव्हा सगळे रोज भेटत होते. तेव्हा मोबाईल नव्हता; फेसबूक, whats ap, काहीच नव्हत. फक्त लॅंडलाइन फोन होता. कॉलेजमध्ये भेटूनही पुन्हा तासनतास फोनवर गप्पा मारल्या आणि त्यावरुन घरच्यांची किती बोलणी खाल्ली होती. आज जवळ मोबाईल आहे त्याच बिल भरायला हातात पैसा आहे पण कोणाशी कित्येक दिवसात साध दोन मिनिटेही बोलणं होत नाही. फोनवर तासनतास बोलायचे म्हणून ओरडणारे आई बाबा आजही सारखा मोबाईल हातात असला की ओरडतात फरक फक्त एवढाच; तेव्हा त्यांच्या ओरडण्यामुळे चिडचिड व्हायची आणि आज खूप बरं वाटत. निदान काही क्षण तरी आपल्याच घरी असल्यासारख वाटत. लग्नानंतर आपल्याच एके काळच्या हक्काच्या घरी आपण चार दिवस पाहुणी म्हणून जातो; जिथला कोपरान् कोपरा आपल्या परिचयाचा असतो अचानक  तिथली दारे खिडक्याही काहीशी अनोळखी भासतात.  आज इतक्या वर्षानंतरही मनात येतं, "का मुलीना आपल घर सोडून जावं लागत? का आपल्याच घराला आपण परके होवून जातो?" प्रत्येकवेळी माहेरी गेल्यावर वार्धक्याकडे झुकणारे, तब्येतीच्या छोट्या मोठ्या कुरबुरी सुरु झालेले आई बाबा बघितले की अचानक आपल्या वयाच्या  मोठेपणाची जाणीव होते. वाटत लहान होवून आईच्या कुशीत शिराव, बाबांकडे हट्ट करावा पण ......आपण मोठे झालो ना आता.  तस फोनवर रोजच बोलण होतं कधीकधी अगदी दोन तीन वेळा पण प्रत्यक्ष भेटीच समाधान त्यात नसतं. जायच्या दिवशी बॅग भरायची गडबड. बाबांचे नेहमीच बोलणं,"नारळ नेणार आहेस का? आमसूल देवू का? कढिपत्ता काढून ठेव आत्ताच नाहीतर विसरशील, एक ना अनेक. किचनमध्ये आई खाऊची, पीठांची एकएक पुडी गुपचूप बांधत असते.  क्षणाक्षणाला मन उदास होत असत. घरातून निघताना माहेरच्या देवासमोर हात जोडले; पुण्यातून निघताना नेहमी ठरवते, ज्या देवाने लहानपणापासून जे जे  मागितले ते सर्व दिलं  त्याच्यासमोर आपल्या काही मागण्या मागाव्यात; त्याला आपले प्रॉब्लेम्स  सांगून ते दुर करायला सांगावेत पण नेहमी निघताना फक्त एकच मागणं मागते, " या घरातल्या सगळ्यांना नेहमी सुखात ठेव."डोळ्याच्या कडा ओलावतात सगळ्यांच्या नकळत त्या पुसून हसत हसत बॅग घेवून दारापर्यंत जाते. आपले अश्रू डोळ्यातच थांबवणारी आई आणि हळवे झालेले बाबा बघून क्षणभर पाय तिथेच थांबतात. पण शेवटी निघावच लागत कारण गाडीची वेळ झालेली असते. निघताना सगळ्यांना आणि घरालाही मी पुन्हा एकदा डोळे भरून बघते आणि जड झालेली पावलेही भराभर टाकत पुढे जाते. पळणाऱ्या गाडीबरोबर माझ शहरही मागे मागे जात असत.
विचारांच्या तंद्रीत असतानाच बाजूला झोपलेली लेक हात गळ्यात टाकून म्हणाली, "आई उद्या सकाळी बाबा येतील ना आपल्याला न्यायला. माझे सगळे फ्रेन्ड्स पण भेटतील उद्या." मी हसून हो म्हणाले. मनात आलं, मी माझ्या हक्कच्या घरीच तर चाललेय. जिथला प्रत्येक कोपरा मी सजवलाय. माझं घर माझी वाट बघतय. माझं हक्काच घर माझ्या मुलीच उद्याच माहेर!
©मानसी जोशी

No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...