Sunday, 2 September 2018

गुंतता हृदय हे

गुंतता हृदय हे

"मनाची मनाला लागतसे आस
प्रीतीच्या फुलांना चांदण्यांचा वास"
  काही वर्षांपूर्वी झी मराठीवर गुंतता हृदय हे नावाची मालिका आली होती. झी मराठीच्या काही उत्कृष्ट मालिकांपैकीच ही  एक मालिका. अवघ्या १६० भागांची ही मालिका  विवाहबाह्य संबंधावर आधारीत  एक रहस्यकथा होती. मला वाटत रात्री १०.३० वाजता लागणारी झी मराठीवरची ही पहिलीच मालिका असावी.
    मृणाल कुलकर्णी आणि संदीप कुलकर्णी अवंतिकानंतर तब्बल आठ वर्षांनी एकत्र आले होते. यांच्या जोडीला मोहन आगाशे पल्लवी सुभाष सारखे तगडे कलाकार होते.
     मृणाल कुलकर्णी(नयना) आणि संदीप कुलकर्णी(विक्रम)  यांच्या सुखाच्या संसारात एक रहस्य वादळ बनून येतं.  अचानक घडणाऱ्या रहस्यमय घटनांमुळे दोघही पुरती हादरुन जातात. या दोघांबरोबरच अजून एका व्यक्तीला या साऱ्याची झळ पोचत असते ती म्हणजे विक्रमची प्रेयसी अनंन्या(पल्लवी सुभाष). अनंन्या विक्रमच्या ऑफिसमध्ये काम करत असते. तिचा नवरा  नेव्हीमध्ये नोकरीला असल्यामुळे ती तिच्या रिटायर्ड आर्मी ऑफिसर असलेल्या आंधळ्या सासऱ्यांसोबत (मोहन आगाशे) राहत असते. या सगळ्या गूढ घटनेमागे नक्की कोण आहे? हे सगळ का घडतय?त्याचा उद्देश काय? याचा  प्रेक्षक आपाआपल्या परीने तर्कवितर्क लावत बसतात. कधी संशयाची सुई विक्रमचा बिझनेस पार्टनर मयंक (सागर तळाशीकर) कधी त्याच्या घरात काम करणारी मोलकरीण, कधी नयनाचे बाबा तर कधी  अनंन्या सासऱ्यांभोवती फिरत रहाते. आणि अगदी सुरुवातीच्या भागापासून उत्कंठा वाढवणारी ही मालिका जसजशी  पुढे सरकत जाते तसतसं  विक्रम, नयना आणि अनंन्या  सोडून प्रत्येकजणच संशयीत वाटू लागतो. रहस्याचा उलगडा जितका धक्कादायक तितकाच  सिरिअलचा शेवट वास्तववादी  आहे.
     यामध्ये विक्रम आणि अनंन्याचे विवाहबाह्य संबंध दिग्दर्शकाने  खूप वेगळ्या पद्धतीने हाताळले आहेत. सिरिअल बघताना कुठेही या दोघांचा राग येत नाही. दोघांनाही आपापले संसार टिकवायचे आहेत. इतकच नाही तर दोघही एकमेकांच्या संसारात काही प्रॉब्लेम येऊ नये याची सर्वोतपरी काळजी घेत असतात. पण मनाने मात्र दोघही एकमेकांमध्ये गुंतलेली आहेत. कुठेही उथळपणा नाही आहे ते फक्त  एक हळवं नातं.  इथे  विवाहाबाह्य संबंधाचा एक वेगळा काहीसा पॉझिटिव्ह असा हळवा कप्पा  दाखवण्याचा आला आहे. पण हे करताना दिग्दर्शकाकडून( सतीश राजवाडे)  अशा संबंधांच  समर्थन केल जातय अस मात्र एकदाही जाणवत नाही.  एकमेकांमध्ये गुंतलेले विक्रम आणि अनंन्या,त्यांचे प्रामाणिक जोडीदार, त्यांची भावनिक गुंतागुंत आणि सरतेशेवटी एकमेकांपासून वेगळे होण्याचा घेतलेला निर्णय हे सारे प्रसंग पाहताना वास्तववादी वाटतात.  कुठेही नाटकीपणा जाणवत नाही.
    मालिकेचे शीर्षक आणि शीर्षकगीत  दोन्हीही अगदी विषयाला समर्पक. रात्र अंधारली, गूढ रानातूनी .... अशा शब्दांनी सुरू झालेले  शीर्षकगीत धृवपदानंतर मात्र अचानक  हळव्या प्रेमाकडे वळते. अवघ्या दीड मिनिटांच्या गाण्यामध्ये मालिकेच्या कथेचा पूर्ण आशय दडलेला आहे. हे गाणं गाणाऱ्या देवकी पंडित या परीक्षक म्हणून मला कधीही आवडल्या नाहीत. पण त्यांची गाणी मात्र नेहमीच मनाला स्पर्श करतात.
     वादळवाट, पिंपळपान, प्रपंच, उंच माझा झोका, असंभव, एका लग्नाची गोष्ट अशा एकापेक्षा एक सरस मालिका देणाऱ्या झी मराठीवरच्या आजच्या मालिका पाहून मात्र, "कोण होतास तू, काय झालास तू" , अस म्हणायची वेळ आली आहे.

©मानसी जोशी

No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...