Sunday, 25 March 2018

ऊर्मिला- रामायण

रामनवमी म्हटल की  मला  दोनच गोष्टी आठवतात; पहिली म्हणजे "गदिमा" आणि "सुधीर फडके" यांनी अजरामर केलेलं गीत रामायण. पूर्वी गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत रोज आकाशवाणीवर गीत रामायण सादर केल जात असे. गीत रामायणातील  काही गाणी ऐकताना आजही डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत.
      रामनवमीच्या दिवशी आवर्जून आठवते ती ऊर्मिला! लक्ष्मणाची पत्नी!. बारावीला असताना मराठीच्या पुस्तकात "उर्मिले त्रीवार वंदन तुला" नावाची कविता होती. ती कविता वाचल्यावर उर्मिलाच्या एकूणच व्यक्तिरेखेबद्दल एक सुप्त आकर्षण निर्माण झाल. त्यानंतर मी  उर्मिलाबद्दल शक्य तितक वाचण्याचा प्रयत्न केला. मध्यंतरी एके ठिकाणी रामनवमीच्या किर्तनात किर्तनकारांनी आवर्जून उर्मिलेचा उल्लेख केला होता तेव्हा मात्र खूप छान वाटल होतं.
    रामायणातील प्रत्येक पात्र हे आदर्श आहे. अगदी आदर्श पित्यापासून आदर्श पतीपर्यंत; आदर्श मित्रापासून आदर्श शत्रूपर्यंत प्रत्येक पात्र आदर्श पद्धतीने रेखाटल आहे. पण रामायणात सर्वात जास्त #अंडररेटेड कोण असेल तर ती उर्मिला; लक्ष्मणाची पत्नी आणि सीतेची बहीण असूनही हिच्या वाटेला एकाकीपण आलं. राजवैभवाचा त्याग करुन आपल्या पतीसोबत वनवासात निघून गेलेली सीता महान झाली पण ऊर्मिलेच काय? जिच्या पतीने एका क्षणासाठीही तिचा विचार न करता रामासोबत जायचा निर्णय घेतला तिची मानसिक अवस्था काय झाली असेल? रामासोबत वनवासात जाऊन लक्ष्मण  'आदर्श बंधू'  झाला पण आदर्श पती नाही होऊ शकला.
     रामायणात जिला "आदर्श पत्नी" म्हणून सन्मान मिळतो त्या सीतेइतकाच मान किंबहूना थोडा जास्तच मान उर्मिलेलाही  मिळायला हवा होता. पण तो नाही मिळाला; का? निव्वळ ती राजवैभव सोडून वनवासात गेली नाही म्हणून? १४ वर्षे तिनेही पत्नीधर्म निभावला.  आपल्या बंधूप्रेमापाई जो पती आपल्याला वाऱ्यावर सोडून गेला अशा पतीवर जीवापाड प्रेम करुन त्याच्याशी एकनिष्ठ रहाणं ही सुद्धा काही सोपी गोष्ट नाही.  खरतर उर्मिलाही लक्ष्मणाबरोबर वनवासात जायला तयार होती परंतू लक्ष्मणाने तिला राज्यातच थांबून कुटूंबाची सेवा करायला सांगितले.  उर्मिलानेही पतीच्या इच्छेचा मान ठेवला व ती अयोध्येतच राहिली असा उल्लेख काही पुस्तकांमध्ये आढळला. तर काही ठिकाणी ऊर्मिलाला 14 वर्षे झोपण्याचा शाप मिळाला होता आणि तो या कालावधीत तिला उपयोगी पडल्याचा उल्लेख वाचनात आला पण हे कितपत विश्वसनीय आहे ते मला माहिती नाही.
    ऊर्मिलाला, तिच्या त्यागाला नेहमीच दुर्लक्षीत केलं गेल. इतकच काय तर अजरामर गीत रामायणातही उर्मिलेचा विशेष  उल्लेख कुठे आढळला नाही  याचच वाईट वाटतय. Pervin Sanket नावाच्या लेखिकेने उर्मिलाच्या व्यक्तीरेखेने प्रेरित होवून "ऊर्मिला" नावाच एक सुंदर पुस्तक लिहिल आहे. हे पुस्तक इंग्लिशमध्ये आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद कोणी केला आहे का नाही याबद्दल काही माहिती नाही; पण #उर्मिला  या व्यक्तिरेखेवर कोणालातरी विचार करुन लिहावस वाटल हिच आनंदाची गोष्ट आहे.

©मानसी जोशी
   


No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...