Sunday, 18 June 2017

प्रिय बाबांस....

प्रिय बाबांस,
  आज खरं तर लिहू का नाही हा विचारच करत होते मी. पण नंतर विचार केला आज नाही लिहिलं तर कधी लिहिणार? आज फादर्स डे! खरं तर हे डेज वगैरे असल्या गोष्टी तुम्हाला माहितही नसतील. पण तरीही आजपर्यंत ज्या गोष्टी कधी बोलून दाखवता आल्या नाहीत त्या थोडक्यात लिहायचा प्रयत्न करते. खूप काही लिहावसं वाटतय पण मनातल्या भावना शब्दात मांडणं तसं कठीण आहे. तरीही मी प्रयत्न करते.
       लहानपणीचं फार काही नाही आठवत पण तुम्ही, आईने आणि इतरांनी सांगीतलेले माझ्या बालपणीचे काही किस्से मात्र चांगलेच लक्षात आहेत. त्यावेळी तुमच्याकडे 'स्पार्क' का 'लूना' कुठलीतरी गाडी होती. तुम्ही ऑफिसमधून आल्यावर आधी मला गाडीवर बसवून दोन राउंड अंगणात मारायचे आणि मग घरात यायचं, हा तुमचा ठरलेला दिनक्रम. अर्थात मला आठवत नाही काही यातलं पण एक गोष्ट मात्र जाणवतेय हे सारं तुम्ही आनंदाने करायचात ते सुद्धा दिवसभर ऑफिसमध्ये काम करुन; १०/१२ किलोमीटरचा प्रवास, तो ही डांबरी किंवा सिमेंट कॉन्क्रिट रस्त्यावरचा नव्हे तर साध्या लाल मातीचा धुरळ्याच्या रस्त्यावरचा प्रवास करुन आल्यावर.  पण कॉलेजला गेल्यावर जेव्हा मला स्वतःची गाडी घेउन दिलीत तेव्हा मात्र कुठलही काम सांगताना तुम्ही 'जमेल का' असं आवर्जून विचारत होतात. अर्थात आजही त्यात काहीच बदल झालेला नाही. आईची शाळेतली शिक्षिकेची नोकरी. त्यावेळी तिची शाळा दोन शिफ्टमध्ये चालायची. आईची सकाळ शिफ्ट होती. त्यामुळे तिला  पहाटे चार वाजताच उठावं लागे. आई उठली की मी पण लगेच उठून बसायचे. मग सहाजिकच आई वैतागायची पण तेव्हा आईला त्रास नको आणि ती माझ्यावर वैतागायला नको म्हणून तुम्हीसुद्धा पहाटे उठून मला सांभाळत होतात. या सगळ्या झाल्या ऐकिवातल्या गोष्टी. पण एक प्रसंग मात्र मला चांगलाच आठवतोय. मी तेव्हा सहावीत होते. तुमची ट्रान्स्फर तेव्हा मुंबईला होती. मुंबई बॉम्बस्फोटाचा अनुभव अगदी ताजाच होता. त्यावेळी तुम्ही मुंबईला परत जायला निघाल्यावर मात्र मी तुम्हाला घट्ट मिठी मारुन रडत नको जाऊ म्हणून विनवत होते.कारण एकच; बॉम्बस्फोटची भीती! मला कसंबसं समजावून  जडावलेल्या पावलांनी तुम्ही मुंबईला गेलात.
    जसजसं वय वाढत गेलं तसतशी माझी स्वतःची मतं बनत गेली. तुमची आणि माझी मतं फारशी कधीच जुळली नाहीत. तुमचा दिलदार आणि साधा भोळा स्वभाव, चटकन कोणालाही मदत करण्याशी वृत्ती, या उलट मी मात्र माणूस पारखून वागणारी. यावरुन अनेकदा आपले वाद व्हायचे/ होतात. लॉ कॉलेजला असताना कॉलेज डेजच्या वेळी रात्री घरी यायला उशीर झाला म्हणून झालेली तुमची चिडचिड आजही आठवतेय.तसं लॉ कॉलेजचं टायमिंगही संध्याकाळी साडेपाच ते रात्री साडेआठ. म्हणूनच कदाचित जेव्हा मोबाईल सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले तेव्हा स्वतःसाठी मोबाईल न घेता तुम्ही आधी माझ्यासाठी मोबाईल घेतलात.
    लग्नाच्या दिवशी पाठवणीच्या वेळी ओक्साबोक्शी रडणाऱ्या मला बघून कधीही न रडणारे तुम्हीही खूप हळवे झाला होतात.  तुमचेही डोळे पाणावले होते. त्यानंतर जेव्हा पहिल्यांदा माहेरी आले तेव्हा सगळ्यांनी रडूबाई म्हणून खूप चिडवलं पण नेहमी रडत कसली बसतेस म्हणणारे तुम्ही मात्र अगदी गप्प बसला होतात.
     लग्नानंतर तुम्ही लहानपणापासून सांगितलेल्या पण तेव्हा  फारशा सिरिअसली न  घेतलेल्या गोष्टी हळूहळू पटत गेल्या. त्यांचं महत्व लक्षात आलं.  आयुष्यात कधीही कुठलाही प्रॉब्लेम येउदे  'बाबा' आहेत हा विश्वास होता/आहे.
     प्रत्येक बाबांची मुलगी लाडकी असते आणि आईचा मुलगा हे तर निर्विवाद सत्य आहे. आईचा मयुरेश जास्त लाडका आहे हे ती कधीच मान्य करत नाही पण तुम्ही मात्र मी जास्त लाडकी आहे हे प्रामाणिकपणे मान्य करता. गेल्यावर्षी तुम्ही ॲडमिट असताना मला पुण्याहून भर पावसात रत्नागिरीला यावं लागलं याचं तुम्हाला वाईट वाटत होतं पण त्याचवेळी मी भेटल्याचा आनंदही झाला होता आणि म्हणूनच कि काय तुम्ही फ्रेश दिसू लागलात. तेव्हा तुमच्यातला हा बदल बघून हॉस्पिटलमधली नर्सही हसून म्हणाली, 'काका लेक आल्यावर अर्धा आजार पळाला तुमचा....'
    तुम्ही माझे फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड आहात असं मी कधीही म्हणणार नाही. पण तुम्ही माझा आधार आहात बाबा! आणि जगण्यासाठी आधाराचीच गरज असते.अजून काय लिहू ? लिहिण्यासारखं खूप काही आहे पण प्रत्येक गोष्ट शब्दात नाही मांडता येत. खरं सांगायचं तर एका मुलीवर जेवढं प्रेम तिचे वडील करतात तेवढं जगात कोणीच करु शकत नाही. अगदी आईसुद्धा नाही! म्हणूनच असेल कदाचित पण मुली 'डॅडाज गर्ल' असतात.
©मानसी जोशी

No comments:

Post a Comment

Top rated on facebook

कथा - सत्यनारायण

सत्यनारायण टिव्हीवरच्या न्यूज बघून ती प्रचंड अस्वस्थ झाली. कशातच मूड लागत नव्हता तिचा.सत्यनारायणाची पूजा हा विवादाचा मुद्दा होवू शकतो हेच...